आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
१९३० साली महात्मा गांधी एकीकडे आपल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या चळवळीत महिलांचा सहभाग वाढवा यासाठी प्रयत्न करत होते. ब्रिटिश सत्तेविरोधात राष्ट्रवादी महिलांचा एक गट उभा करण्याचा त्यांचा मानस होता. त्यांच्या अहिंसात्मक लढ्यामुळे त्यांनी अनेक महिलांना आपल्या चळवळीकडे आकर्षित केलं पण अनेक महिला होत्या ज्यांना क्रांतिकारी मार्ग हा अहिंसावादी मार्गापेक्षा जास्त खुणावत होता.
प्रीतीलता वड्डेदार आणि कल्पना दत्ता या दोन महिलांनी देखील क्रांतिकारी मार्गाची निवड केली होती. त्यांनी भारताच्या क्रांतिकारी इतिहासात सुवर्णपान म्हणून नोंदवल्या गेलेल्या चित्तगाँव शस्त्रलुटीत आपला सहभाग नोंदवला होता.
हिंसा हा स्वातंत्र्यासाठी योग्य मार्ग आहे की नाही, यावर अनेक विद्वान लोकांमध्ये मतभेद होते. पण या महिलांनी कसलाच विचार न करता या क्रांतिकारी लढाईत उडी घेतली होती. त्यांच्या डोळ्यात फक्त राष्ट्रप्रेम होते, बाकी कसलीच तमा या दोन स्त्रियांनी त्यावेळी बाळगली नव्हती. महिला देखील क्रांतिकार्याच्या मोठ्या भागीदार होत्या, याचं हे दोन महिला जिवंत उदाहरण आहेत.
१८ एप्रिल १९३० साली पश्चिम बंगालमधील चित्तगाँव येथे ब्रिटींश सरकारच्या शस्त्र लुटीचा प्रकार घडला होता. या लढ्याचे नेतृत्व सूर्य सेन या क्रांतिकाराने केले होते. हा राष्ट्रवादी विचारांच्या क्रांतिकारकांचा एक गट होता, जो शक्तीच्या मार्गाने ब्रिटिश अधिसत्तेला उलथवून टाकण्याचा प्रयत्नात होते.
चित्तगाँवच्या शस्त्रागारावर कब्जा करून त्या ठिकाणची टेलिफोन आणि तार सेवा बंद करणे अशी योजना या क्रांतिकारी गटाने आखली होती. या गटात प्रामुख्याने युरोपियन कौन्सिलने बंदी घातलेले क्रांतिकारक होते, जे आधी ब्रिटिश सत्तेविरोधात कारवाईत सापडले होते. यात प्रीतीलता वड्डेदार आणि कल्पना दत्ता यांचा देखील समावेश होता.
प्रीतीलता वड्डेदार या स्वतःहून सूर्य सेन यांच्याकडे “मला ही या कटात सहभागी करून घ्या” अशी मागणी घेऊन गेल्या होत्या.
त्यांना याची पूर्वकल्पना होती की हे त्यांच्या जीवावर देखील बेतू शकते. प्रीतीलता या संपूर्ण लढ्याच्या मास्टरमाइंड ठरल्या होत्या. आपल्या पदवीच्या शिक्षणाच्या वेळी त्यांच्या मनात ब्रिटिशांच्या विरोधात मोठा राग निर्माण झाला होता. कॉलेजात होत्या त्यावेळी पासूनच त्यांचा क्रांतिकार्यात मोठा सहभाग होता.
सूर्य सेन यांनी प्रीतीलता यांना सहभागी करून घेतले खरे पण योगदान किती प्रमाणात देऊ शकतील याबाबतीत ते साशंक होते. पण प्रीतीलता यांनी खूप मोठे योगदान त्या लढ्यात दिले होते. त्यांनी या सगळ्या कटाची योजना केली होती.
त्यांचा कट जरी फसला आणि टेलिफोन, टेलिग्राफच्या वायर तोडण्यात त्यांना दिरंगाई झाली तरी तत्काळ युरोपियन क्लबने त्यांच्यासमोर शरणागती पत्करली होती.
पण काही युरोपियन क्लबच्या लोकांनी याची माहिती ब्रिटीशांना दिली आणि ब्रिटिश सैनिक आणि क्रांतिकारी यांच्यात चकमक झाली ज्यात १२ लोकांचा जीव गेला. पण सेन आणि प्रीतीलता यांनी पुन्हा क्रांतिकारकांची मोट बांधली.
४० माणसांच्या नेतृत्वाची जबाबदारी प्रीतीलता यांच्या खांद्यावर होती. पाथराली पहाडीच्या इथे असलेल्या युरोपियन क्लबला आग लावण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.
या भागात घडलेल्या हत्याकांडाचा सूड उगवण्यासाठी हा कट रचला होता, पण त्यांच्या दुर्दैवाने ते पकडले गेले होते. युरोपियन क्लबला आग लावण्यात ते यशस्वी झाले होते. पण नंतर ब्रिटिश सैनिकांशी त्यांचे द्वंद्व झाले ज्यात त्यांचे अनेक क्रांतिकारी धारातीर्थी पडले होते. पण प्रीतीलता शेवटपर्यंत ब्रिटिशांच्या हाती आल्या नाहीत, त्यांनी विष पिऊन मरण पत्करलं पण ब्रिटिशांची अटक स्वीकारली नाही. त्या पहिल्या महिला क्रांतिकारक आणि बलिदानी होत्या.
कल्पना दत्ता.
या कटातील अजून एक क्रांतिकारक होत्या, ज्यांनी प्रीतीलता वड्डेवार यांच्या त्या सहकारी, त्या देखील कॉलेज जीवनापासून क्रांतिकार्यात सहभागी होत्या. त्या छात्र संघ नावाची क्रांतिकारी विद्यार्थी चळवळीत देखील सामील झाल्या होत्या.
त्यांनी या कटात शस्त्रास्त्र वहनाची जबाबदारी स्वीकरली होती.
कटाच्या आधी त्या दोन तीन वेळा पकडल्या देखील गेल्या. पण त्या यशस्वीरित्या पलायन करून तावडीतून सुटल्या देखील होत्या.
कल्पना दत्त यांच्या विज्ञानातील ज्ञानाचा फायदा क्रांतीकारकांना झाला होता. त्यांनी बॉम्ब निर्मितीत क्रांतीकारकांना सहाय्य केलं होतं. दुर्दैवाने कटाच्या आदल्या आठवड्यात त्या ब्रिटीशांच्या तावडीत सापडल्या पण त्या तिथून निसटल्या आणि कटाच्या दिवशी प्रीतीलता यांना आवश्यक मदत त्यांनी पुरविली होती.
त्यांना इतर क्रांतिकारकांसोबत पुन्हा अटक झाली. राष्ट्रविरोधी कारवाया केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला.
त्यांना जन्मठेपेची शिक्षा ब्रिटीश सरकारने सुनावली. पुढील सहा वर्षे त्या करावासात राहिल्या, तेथून बाहेर आल्यावर देखील त्यांनी कुठलीही तडजोड आपल्या विचारांशी केली नाही. पण त्यांचे सहकारी हयात नसल्यामुळे त्या पुन्हा क्रांतिकारी कारवायात सहभागी होऊ शकल्या नाहीत.
कल्पना दत्ता आणि प्रीतीलता वड्डेवार या दोन महिलांनी आपल्या परीने शक्य ते सर्व काही अगदी आपले आयुष्य मातृभूमीला अर्पण केले होते.
या दोघीही क्रांतिकारी कारवाईत सामील झाल्या आणि स्त्रियांचा क्रांतिकारी कारवायांमधील सहभाग अधोरेखित केला होता. या दोन अमर महिला क्रांतिकारकांना भावपूर्ण श्रद्धांजली!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.