आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
आपण सर्वांनी नाझी जर्मनीचा खुनी इतिहास वाचला आहे. हिटलरच्या नेतृत्वाखाली नाझींनी केलेल्या हत्याकांडाविषयी देखील आपण वाचलेलं आहे, पण हा हिटलर त्याच्या देशातील लोकांचा लाडका कसा बनला आणि त्याने सत्ता कशी काबीज केली, याचा इतिहास फार रंजक आणि भयंकर आहे.
जेव्हा द्वेष डोक्यावर स्वार होतो तेव्हा काय घडतं याचं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे हिटलरचा नाझीवाद असून, एक सामन्य युद्धकैदीते जर्मनीचा सर्वोच्च सत्ताधीश हा त्याचा प्रवास अंगावर काटा आणणारा आहे.
पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीची विभागणी दोन गटात झाली. एक गट होता जहाल डाव्या विचारसरणीचा आणि एक गट होता जहाल उजव्या विचारसरणीचा लोकांचा.
व्हर्सेलीसच्या तहामुळे जर्मन जनता पिचून गेली होती, सर्वत्र आर्थिक दारिद्र्याचे स्तोम माजले होते. जर्मनीचा आर्थिक गाडा विस्कटला आणि यामुळे जर्मनीत असलेल्या वेयमर सरकारच्या विरोधात लोकांच्या मनात असंतोष खदखदु लागला. ह्या असंतोषाचा फायदा घेत अँटोन ड्रेक्सलर, कार्ल हरेर आणि अजून लोकांनी उजव्या राष्ट्रवादी विचारसरणीच्या जर्मन वर्कर्स पार्टीची स्थापना केली. समाजवादी भूमिकेची ही पार्टी कम्युनिस्ट विचारसरणीची कट्टर विरोधक बनली.
पहिल्या महायुध्दातील मानहानीकारक पराभव हिटलरच्या प्रचंड जिव्हारी लागला होता, आपल्या राष्ट्राला सर्वस्व गमवावं लागल्याचे दुःख त्याला झाले होते, देशातील अराजकाची परिस्थिती बघता हिटलरने १९१९ साली राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याने जर्मन वर्कर्स पार्टीचे सभासदत्व स्वीकारले.
गुप्तचर म्हणून काम करत असतांना हिटलर एकदा जर्मन वर्कर्स पार्टीचा कार्यक्रमाला गेला होता त्यावेळी तो पार्टीच्या तत्वांनी आणि विचारांनी प्रेरित झाला होता.
वेयमर सरकारच्या विरोधात त्याच्या मनात धगधगत असलेल्या असंतोषाला मोकळी वाट करून देण्यासाठी जर्मन वर्कर्स पार्टी त्याला एक उपयुक्त जागा वाटली. तो त्या पक्षाचा ५५ वा सदस्य होता.
पार्टीचा प्रतनिधी म्हणून हिटलरच्या कामाचा आवाका प्रचंड मोठा होता, हिटलरने आपल्या नेतृत्वगुणांची आणि कार्यकुशलतेची प्रचिती अवघ्या काही दिवसांत आणून दिली. पुढे त्याला ड्रेक्सलर यांनी आपल्या पार्टीच्या प्रोपागंडा सेलचा प्रमुख बनवण्यात आले. मग हिटलरने मागे वळून पाहिले नाही, त्याने लढा उभारायला सुरवात केली. जर्मनीच्या म्युनिक शहरात हिटलरने दिलेल्या भाषणाने प्रभावित होऊन २००० लोकांनी जर्मन वर्कर्स पार्टीचे सदस्यत्व स्वीकारले. त्याने त्या सभेत पक्षाचा २५ कलमी कार्यक्रम जाहीर केला.
ह्या कार्यक्रमाची रचना ड्रेक्सलर, हिटलर आणि फेडर यांनी तयार केली होती. मतभेदामुळे कार्ल हेररने १९२० साली पक्षाचा राजीनामा दिला.
पक्षाच्या कलमात एक कार्यक्रम होता तो म्हणजे देशातील शुद्ध आर्यवंशीय लोंकांचे एकत्रीकरण करून त्यांच्या राज्याची स्थापना करणे आणि ह्या राज्याच्या कल्पनेतून ज्यू लोकांना हद्दपार करण्याची घोषणाच त्यांनी केली होती.
ह्या पक्षाच्या अजेंड्यानुसार पूर्व युरोपियन नागरिक आणि ज्यू लोकांनी जर्मनीत स्थलांतर करून देशातील सत्ता स्वतःच्या ताब्यात घेतली आहे, त्यांना सत्तेतून बाजूला करत आपण आता जर्मन वंशाच्या लोकांचे राज्य स्थापन करायला हवे ह्या मुद्द्यावर त्यांनी जोर दिला.
पुढे ह्या पक्षाने स्वतःच्या नावात ‘सोशलिस्ट’ ह्या शब्दाचा समावेश केला. ह्यामुळे जर्मन भाषेतील या पक्षाच्या नावाचा शॉर्ट फॉर्म हा ‘नाझी’ असा झाला आणि हा पक्ष नाझी पक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला.
पक्ष मोठा होत होता तशी हिटलरची लोकप्रियता गगन चुंबत चालली होती. १९२१ साली काही कारणाने वाद होऊन हिटलरने पक्षाचा राजीनामा दिला पण यानंतर हिटलर पुन्हा पक्षात सामील झाला, काहीच दिवसांत हिटलरची पक्षनेता म्हणून घोषणा करण्यात आली. हिटरलची लोकप्रियता पक्षाच्या सदस्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ करत होती. १९२३ च्या मध्या पर्यंत नाझी पक्षाची सदस्य संख्या २० हजारांपर्यंत येऊन पोहचली होती.
हिटलरच्या ज्यूविरोधी आणि जर्मन राष्ट्राच्या महानतेचा गोडवा गाणाऱ्या विचारसरणीला लोकांचा पाठिंबा मिळत होता. ८ नोव्हेंबर १९२३ ला हिटलरच्या गटाने बव्हेरीयन सरकारच्या एका सभेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण हा प्रयत्न अयशस्वी ठरला.
बव्हेरियन सरकार आणि मग जर्मनीच्या वेयमर सरकारचे उच्चाटन करून देशात आपली सत्ता प्रस्थपित करण्यासाठी त्यांनी सशस्त्र दलाच्या निर्मितीचे प्रयोग सुरु केले होते.
पण त्याचे बव्हेरियन सरकार उलथवून टाकण्याचे प्रयोग फसले आणि त्याची रवानगी पाच वर्षांच्या कालावधीसाठी तुरुंगात करण्यात आली, तिथे त्याने माईन काम्फ नावाचे आत्मचरित्र लिहले आणि त्याने पुढे जाऊन त्याच्या नाझी पक्षावर तत्कालीन वेयमर सरकारने बंदी घातली.
जर्मन पार्टी नावाने हा पक्ष गुप्तपणे काम करत होता. १९२५ साली हिटलरची जेव्हा तुरुंगातून सुटका करण्यात आली त्यावेळी हिटलरने नाझी पक्षाचे पुनरुज्जीवन केले.
त्याने पक्षाच्या रचनेत मोठा बदल केला आणि त्याने आपल्या विचारांचा प्रसार करायला सुरुवात केली. तो जागोजागी भाषणं देऊ लागला. त्याने त्याच्या आत्मचरित्राच्या माध्यमातून आपला प्रोपागंडा जगाला दाखवायला सुरुवात केली.
त्याने काही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत थोडेफार यश देखील मिळवले पण त्याला गरजेचा असलेल्या जागा त्याला मिळू शकल्या नव्हत्या.
पुढे १९२९ साली जर्मनीत जागतिक मंदीची लाट आली आणि अर्थव्यवस्था संपूर्णपणे खोळंबली. याचा फायदा घेऊन वेयमर सरकारच्या विरोधात लढा उभारला गेला, ज्यात नाझी पक्षाने जर्मनीच्या अर्थव्यवस्थेच्या वाताहातीसाठी वेयमर सरकारच्या विरोधात प्रचार करायला सुरुवात केली आणि त्याचा परिणाम असा झाला की हिटलरच्या विचारसरणीकडे जनता आकृष्ट होऊ लागली.
मार्च १९३२ साली हिटलरने पहिल्या महायुद्धाचा हिरो असलेल्या पॉल हिंडेनबर्गच्या विरोधात अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उभा राहिला.
हिटलर ती अध्यक्षपदाची निवडणूक जरी पराभूत झाला तरी त्याचा मातांशी टक्केवारी खूप जास्त होती, जिच्यामुळे त्याचा राष्ट्रीय राजकारणात उदय झाला होता. त्याच्या पक्षाच्या समर्थकांत मोठ्या संख्येने वाढ झाली होती. पण अजूनही हिटलर सत्ता मिळवू शकलेला नव्हता.
रेइश्टाग ह्या जर्मन विधिमंडळातील महत्वपूर्ण सभागृहात जुलै १९३२ साली बहुमत मिळवून सत्ता स्थापन केली. नाझीनी ३७.४% मत प्राप्त करून आजवरच्या विक्रमी मताधिक्याने त्या सभागृहावर आपला झेंडा फडकवला.
आता नाझी पक्षाकडे सर्वाधिक जागा होत्या आणि कम्युनिस्ट विचारांचा केपीडी नावाचा पक्ष हा दुसऱ्या स्थानावर होता, ज्याच्या कडे १४% मतं होते. पूण यामुळे सत्ताधारी वेयमर रिपब्लिकला उतरती काळ लागला.
अशा बिकट परिस्थितीत आपली प्रतिमा मोठी करण्यासाठी तत्कालिक निवडणुकांची घोषणा तेव्हाचे चॅन्सलर फ्रिटज पेपेन यांच्या कडून करण्यात आली. नोव्हेंबर १९३२ मध्ये ह्या निवडणूका घेण्यात आल्या होत्या, पेपेन यांना फाजील आत्मविश्वास होता की केपीडी आणि नाझी पक्ष ह्या निवडणुकीत खाली आपटतील पण नाझी पक्षाच्या अगदी थोड्या जागा कमी झाल्या. ३३.१ टक्के मतं आणि केपीडीच्या सोबतीने नाझी पक्षाने ५० टक्के जागांवर आपले वर्चस्व कायम ठेवले होते आणि पेपेन याने सत्तेच्या हट्टापायी हिटलरशी तह केला की त्याला जर्मनीचा चॅन्सलर बनवण्यात येईल आणि ते कॅबिनेट मंत्री बनतील.
पेपेनने अध्यक्ष हिंडेनबर्ग यांना आपल्या बाजूने वळवलं आणि हिटलर सत्तेत असणं हे आपल्या फायद्यात असून त्याला समर्थन देण्यात फायदा असल्याचं त्यांनी हिंडेनबर्गच्या डोक्यात उतरवलं.
३० जानेवारी १९३३ साली हिटलरला चॅन्सलरपद बहाल करण्यात आलं.
जर्मनीचा चॅन्सलर बनल्यावर हिटलरच्या रेइश्टाग सभागृह जाळून टाकलं आणि याचा ठपका त्यांनी कम्युनिस्ट पार्टीच्या ५ सभासदांवर ठेवला, ज्यांच्या घरी छापे मारून त्यांना आत टाकण्यात आलं.
हिंडेनबर्ग यांना विश्वासात घेऊन हिटलर यांनी जर्मन नागरिकांच्या संरक्षणाचा कायदा केला. ह्या कायद्याने जर्मन लोकांच्या मानवी हक्कांवर गदा आली. रेइश्टागच्या आरोपाखाली हिटलरने विरोधकांच्या घरांवर छापेबाजी करून त्यांना आत टाकायला सुरुवात केली.
जर्मनीतलं शेवटचं खुलं इलेक्शन त्यावेळी घेण्यात आलं आणि हिटलरने आपल्या जोर जबरदस्तीच्या बळावर त्यात ४३.९ % बहुमत प्राप्त केलं.
यानंतर हिटलरने ज्यूंचे हत्याकांड आणि पुढे दुसऱ्या महायुद्धात उडी मारली, त्याने पोलंडवर आणि दुसऱ्या देशांवर हल्ला चढवून आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.