आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
मुंबईच्या मातीनं भारतीय क्रिकेटमध्ये खूप मोठं योगदान दिलं आहे. सध्या आपल्याला भारतीय क्रिकेटचा जो वैभवशाली महाल दिसतो आहे त्याच्या बांधकामात आजवर शेकडो मुंबईकर खेळाडूंनी आपला घाम गाळलेला आहे. चंदू बोर्डे, फारूक इंजिनियर, सुनिल गावसकर, विनू मांकड, विजय मर्चंट, सचिन तेंडुलकर, वसिम जाफर, जहीर खान, अजिंक्य रहाणे, दिलीप वेंगसरकर अशी कितीतरी मोठी ही यादी आहे.
या यादीमध्ये आणखी एक नाव न विसरता घ्यायला हवं ते म्हणजे अजित आगरकरचं! प्रविण आमरे, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी यांच्याप्रमाणं रमाकांत आचरेकर सरांच्या तालमीत तयार झालेल्या अजित आगरकरनं भारतीय क्रिकेटमध्ये मोलाचं योगदान दिलं. नवीन आणि जुना बॉल दोन्ही प्रकारे स्विंग करण्याची दुर्मिळ क्षमता त्याच्याकडे होती.
वेगवान गोलंदाजी आणि फलंदाजी येणारा अजित आगरकर हा भारताचा उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू होता. त्याच्याकडे प्रचंड प्रतिभा होती मात्र, त्याच्या प्रतिभेला म्हणावी अशी ओळख मिळाली नाही. आगरकरनं मैदानावर अशा काही गोष्टी केलेल्या आहेत की ज्या जाणून घेतल्यानंतर अजित आगरकर हा भारतीय क्रिकेटचा ‘अनसंग हिरो’ असल्याची जाणीव होईल.
४ डिसेंबर १९७७ रोजी मुंबईतील मीना आणि भालचंद्र आगरकर या दाम्पत्याच्या घरी अजितचा जन्म झाला. क्रिकेटचे द्रोणाचार्य समजल्या जाणाऱ्या रमाकांत आचरेकरांच्या कृपादृष्टीखाली त्यानं आपला क्रिकेटचा प्रवास सुरू केला. विशेष म्हणजे आगरकरनं एक फलंदाज म्हणून सुरुवात केली होती. शालेय क्रिकेटमध्ये एक फलंदाज म्हणून अनेक सामने गाजवले.
नंतर, त्यानं आपल्या गोलंदाजीवर काम करण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यानं प्रचंड कष्ट घेतले. अजितच्या एकूण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला असता त्यानं भारतासाठी १९१ एकदिवसीय, २६ कसोटी आणि ४ टी ट्वेंटी सामने खेळलेले आहेत. कसोटीच्या तुलनेत ५० ओव्हर्सच्या फॉरमॅटमध्ये तो जास्त रमला. जास्त विकेट घेण्यात अनिल कुंबळे (337) आणि जवागल श्रीनाथ (315) नंतर आगरकरचाचं क्रमांक लागतो.
भारतीय संघात प्रामुख्यानं एका गोलंदाजीची भूमिका निभावलेल्या अजितच्या नावावर फलंदाजीचा एक असा विक्रम आहे जो एकाही दिग्गज फलंदाजाला अद्याप मोडता आलेला नाही. वर्षानुवर्षे भारतानं वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंगपासून अगदी सुरेश रैनापर्यंत अनेक आक्रमक फलंदाज तयार केले आहेत. मात्र, भारतासाठी वनडेमध्ये सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रम प्रस्थापित करण त्यांना शक्य झालेलं नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा विक्रम अजित आगरकरच्या नावावर आहे! आगरकरने १४ डिसेंबर २००० रोजी राजकोट येथे झिम्बाब्वेविरुद्ध ही सर्वोत्तम खेळी केली होती.
उजव्या हातानं फलंदाजी करणारा आगरकर ४४ व्या षटकातमध्ये मैदानावर आला होता. आल्यानंतर त्यानं चौफेर फटकेबाजी करत गोलंदाजांना अक्षरश: फोडून काढलं आणि अवघ्या २१ चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक साजर केलं. हा भारतासाठी एक विक्रम होता. आगरकर २५ चेंडूंत ६७ धावा करून नाबाद राहिला होता. याच सामन्यात त्यानं ८.४ षटके गोलंदाजी करून २६ धावांच्या बदल्यात तीन गडी बाद केले होते. त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता.
आगरकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान ५० बळी घेण्याचा भारतीय विक्रम नोंदवलेला आहे. २९ ऑक्टोबर २०१७ रोजी कानपूर येथे न्यूझीलंडविरुद्ध पन्नासावा बळी घेणारा जसप्रीत बुमराह दुसऱ्या क्रमांकावर आहे. आगरकरने झिम्बाब्वेविरुद्ध आपला पन्नासावा एकदिवसीय बळी टीपला होता. त्यानं केवळ २३ सामन्यांमध्ये हा टप्पा गाठला होता त्या वेळी हा विश्वविक्रम होता.
१२ जानेवारी २००९ रोजी श्रीलंकेच्या अजंता मेंडिसनं त्याचा हा विक्रम मोडला. मेंडीसनं १९ सामन्यांमध्ये ५० बळी घेतले. अजितनं ९०च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि २००० दशकाच्या सुरुवातीला भारतासाठी अष्टपैलूची भूमिका बजावली. त्याने एकदिवसीय सामन्यात १ हजार २६९ धावा केल्या आणि २८८ बळी घेतले. एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद एक हजार धावा आणि २०० बळी घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्याने १३३ सामन्यांमध्ये ही कामगिरी केली यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू शॉन पोलॉकनं १३८ सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती.
अजित आगरकरच्या नावावर फलंदाजीचा आणखी एक असा विक्रम आहे जो सचिन तेंडुलकर सारख्या दिग्गजाला देखील करता आलेला नाही. इंग्लंडच्या लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमला क्रिकेटची पंढरी म्हटलं जात. या ठिकाणी आतापर्यंत भारतानं अनेक सामने खेळले आहेत. मात्र, त्याठिकाणी फक्त दहा भारतीय खेळाडूंना शतकी खेळी करता आलेली आहे. या मोजक्या दहा खेळाडूंमध्ये अजितचा समावेश होतो. विनू मांकड, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, गुंडप्पा विश्वनाथ, मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली, राहूल द्रविड, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल आणि अजित आगरकर अशी या खेळाडूंची नावं आहेत.
जुलै २००२ मध्ये भारत आणि इंग्लंड लॉर्ड्सच्या आयकॉनिक स्टेडियमवर एकमेकांविरुद्ध भिडले होते. इंग्लंडनं पाहुण्या भारतासमोर ५८६ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. भारताची अवस्था ६ बाद १७० अशी झाली होती. त्यानंतर आगरकर फलंदाजीला आला होता. त्यानं व्हीव्हीएस लक्ष्मणसोबत मिळून १२६ धावांची भागीदारी केली. मात्र, तो इतक्या लवकर हार मानणार नव्हता. टेल एंडर्सच्या मदतीनं आणखी १०१ धावा जमवल्या यादरम्यान त्यानं आपलं शतक केलं. शेवटी भारतीय संघ ३९७ धावांवर ऑलआउट झाला. १९० चेंडूत १०९ धावांवर नाबाद राहिलेल्या आगरकरनं लाखो क्रिकेट रसिकांची मनं जिंकली होती.
ज्युनियर लेवलवर क्रिकेट खेळत असताना त्याच्या नावावर आणखी एक खास गोष्ट नोंदवली गेलेली आहे. त्यावेळी तो फलंदाजी करत असे. शाळेत असताना त्यानं त्रिशक ठोकलेलं आहे. याशिवाय त्याच्या नावावर आणखी एका खास गोष्टीची नोंद आहे. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये विजयी मोहिमेवर गेलेल्या भारतीय संघामध्ये अजित आगरकरचा समावेश होता. एमएस धोनीच्या युवा ब्रिगेडमधील तो सर्वात ज्येष्ठ खेळाडू होता. २०१३मध्ये अजितनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि तो आता क्रिकेट अनालिस्ट म्हणून काम करतो.
आकड्यांचा विचार केला तर कित्येक नावाजलेल्या खेळाडूंपेक्षा अजित उजवा ठरतो. मात्र, त्याच्या वाट्याला पाहिजे तशी प्रसिद्धी कधीच आली नाही. उलट कित्येकदा त्याला टीकेचा सामना करावा लागला. त्याच्या कारकिर्दीचा बारकाईनं अभ्यास केल्यास नक्कीच तो ‘अनसंग हिरो’ असल्याचं सिद्ध होत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.