आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
जागतिक इतिहासात युरोपला महत्त्वाचे स्थान आहे. आधुनिक जग आकारास आणण्यात युरोपने महत्वाची भूमिका बजावली हे एकप्रकारे सर्वमान्यच आहे. युरोपात तीन महत्त्वाच्या आणि मोठ्या सत्ता होत्या. स्पेन, पोर्तुगाल आणि ग्रेट ब्रिटन. यांपैकी स्पेन आणि पोर्तुगालने सतराव्या, अठराव्या शतकात ग्रेट ब्रिटनसारखी कामगिरी केली नाही. पण पंधराव्या-सोळाव्या शतकात मात्र ते युरोपची महाशक्तीच होते असं म्हटलं तर ते अतिशयोक्त ठरणार नाही.
इबेरियन द्वीपकल्पाच्या नैऋत्य भागावर वसलेल्या पोर्तुगालने जगाचा मागोवा घेण्यासाठी अटलांटिक महासागराकडे आपला मोर्चा वळवला. सन १३४१ च्या सुरुवातीला पोर्तुगीज खलाशांनी आफ्रिकेच्या वायव्य किनारपट्टीवरील कॅनरी बेटांचा शोध लावून ते त्या पुढे असलेल्या समुद्रात पहिल्यांदाच गेले होते. पोर्तुगीजांचा प्रतिस्पर्धी स्पेन कॅनरी बेटांवर विजय मिळवू शकला असता, पण जहाज बांधणी, नेव्हिगेशन आणि नकाशा तयार करण्याच्या बाबतीत पोर्तुगीजांनी त्यांना कधीच मागे टाकले होते.
पंधराव्या शतकाला सुरुवात झाल्यानंतर काही काळानेच महत्त्वाकांक्षी राजा जॉन १ च्या नेतृत्वाखाली पोर्तुगालने आपला मोर्चा मोरोक्कोकडे वळवला. मुस्लिम धर्मीयांचा हा गड म्हणजे आफ्रिका आणि त्यापलीकडील सोन्याच्या भांडाराचे प्रवेशद्वार असल्याचे त्यांना वाटत होते. १४१५ साली, पोर्तुगीज जहाजांच्या ताफ्याने जिब्राल्टरची सामुद्रधुनी ओलांडली आणि सेउटाचे मजबूत तटबंदी असलेले मोरक्कन बंदर ताब्यात घेतले.
पुढील काही दशकांमध्ये, जॉनचा मुलगा प्रिन्स हेन्री नेव्हिगेटरने आफ्रिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर जाणाऱ्या असंख्य सागरी मोहिमांना आर्थिक मदत केली. त्याचे मूळ उद्देश उद्देश ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणे तसेच सोने, मसाले आणि गुलामांच्या व्यापारातून मोठा नफा मिळवून पोर्तुगालला समृद्ध करणे हे होते.
१४६० साली हेन्रीचा मृत्यू झाला, तेव्हा पोर्तुगीज खलाशी आधुनिक ‘सिएरा लिओन’ पर्यंत पोहोचले होते आणि पोर्टो सॅंटो, माडेरा आणि अझोर्स या बेटांवर सक्रिय पोर्तुगाल वसाहती तयार केल्या होत्या. हेन्रीच्या मृत्यूनंतर पोर्तुगीज सागरी शोधाचा वेग काहीसा मंदावला, पण त्याचा नातू ‘किंग जॉन २’च्या अधिपत्याखाली सागरी शोधाला पुन्हा बळ मिळाले.
१४८७ साली, ‘पोर्तुगाल ते भारत’ हा सागरी मार्ग शोधण्याच्या मोहिमेवर, ‘बार्टोलोम्यू डायस’ने आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंतच्या पहिल्या यशस्वी समुद्र प्रवासाचे नेतृत्व केले. त्याने ‘केप ऑफ गुड होप’ला वळसा घातला पण काही कारणाने तो तिथूनच पोर्तुगालकडे वळला.
१४८८ च्या उत्तरार्धात लिस्बनमध्ये, जेनोस नेव्हिगेटर क्रिस्टोफर कोलंबस दरबारात असलेल्या अनेक प्रेक्षकांपैकी एक होता, कारण डायसने त्याच्या ऐतिहासिक भारताकडे जाणाऱ्या प्रवासाची वर्णने जॉनच्या दरबारात सांगितली होती. क्रिस्टोफर कोलंबसने लिस्बनमध्ये नेव्हिगेशनचे आणि खलाशांचे प्रशिक्षण घेतले होते.
समुद्रातून आणखी पश्चिमेकडे प्रवास केल्यास आपल्याला संसाधन-समृद्ध ‘इंडिज’ सापडेल अशी त्याची भूमिका होती. त्याने डायसला आपल्या या प्रस्तावाला मान्यता मिळवून देण्याची विनंती केली. पण पोर्तुगीज राजाने ही कल्पना नाकारली. त्यानंतर पोर्तुगाल राजा जॉनची प्रतिस्पर्धी स्पेनची सम्राज्ञी इसाबेला आणि सम्राट फर्डिनांड यांच्याकडून पाठिंबा मिळवण्यासाठी कोलंबस पोर्तुगाल सोडून स्पेनमध्ये गेला.
१४९४ साली सध्याचे बहामास, क्युबा, हैती आणि डोमिनिकन रिपब्लिक यांचा शोध लावून कोलंबस पुन्हा सुखरूपपणे युरोपमध्ये परतला. यावेळी पोर्तुगाल आणि स्पेनमधील आर्थिक वाटाघाटी करणारे काही श्रीमंत लोक एका छोट्या स्पॅनिश शहरात भेटले. या तथाकथित ‘नव्या जगा’वर कोणाचे नियंत्रण असावे हे ठरवण्यासाठी ते भेटले होते.
काही दिवसांनी ‘टोरडेसीलस’चा करार झाला. या करारान्वये, पोर्तुगाल नियंत्रित ‘केप वर्डे’ बेटांच्या पश्चिमेस सुमारे ३४५ मैल, अटलांटिक महासागरातून एक उभी रेष आखण्यात आली. स्पेनने रेषेच्या पश्चिमेकडील सर्व जमिनीवर आपला दावा केला. तर पोर्तुगालने ब्राझीलच्या किनाऱ्यासह पूर्वेकडील सर्व भूभाग, जो त्या वेळी अद्याप अधिकृतपणे “शोधले गेले नव्हते” अशावर आपला दावा केला.
काही इतिहासकारांच्या मते पोर्तुगीज खलाशी ‘पेड्रो अल्वारेस कॅब्रल’ इसवी सन १५०० मध्ये ब्राझीलला पोहोचला होता. खरं तर पोर्तुगालला आधीपासूनच ब्राझीलच्या अस्तित्वाबद्दल माहिती होती आणि म्हणूनच त्यांनी याच माहितीचा उपयोग ‘टोरडेसीलस’ कराराच्या सीमांना आणखी पश्चिमेकडे ढकलण्यासाठी केला.
अनेक वर्षे स्पेन आणि पोर्तुगालने टोर्डेसीलस करार मानला असला तरी, ब्रिटन, फ्रान्स आणि नेदरलँडसह इतर युरोपीय शक्तींकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असत. याव्यतिरिक्त, या करारामुळे अमेरिकेत आधीच राहत असलेल्या ५ करोड स्थानिक लोकांकडे पूर्णतः दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे युरोपियन विस्तारवादाचे विनाशकारी परिणाम त्यांनाही भोगावे लागले.
१४९७ साली वास्को-द-गामाने चार जहाजांचे नेतृत्व केले आणि जवळपास १७० सहकाऱ्यांसह बार्टोलोम्यू डायस ज्या समुद्री मार्गाने भारत शोधण्यासाठी गेला होता त्याच मार्गाने प्रवास करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी ‘केप ऑफ गुड होप’ला वळसा घातला, पण उपासमारीने आणि समुद्री प्रवासाच्या इतर संकटांनी ग्रस्त असलेले जहाजांवरील लोक अखेर आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्याकडे निघाले. आधुनिक मोझाम्बिक आणि केनियामधील इतर बंदरांवर ते विश्रांतीसाठी थांबले. तेथील स्थानिक नेव्हिगेटरच्या मदतीने, वास्को-द-गामा आणि त्याच्या जहाजांनी हिंद महासागर ओलांडून ‘मे १४९८’ मध्ये समृद्ध भारतातील कालिकत बंदरावर पाय ठेवले.
या नंतरच्या युरोपीय मोहिमांवर मात्र, वास्को-द-गामा आणि इतरांनी पूर्वेकडील आफ्रिका तसेच भारतात अनेक व्यापारी ठिकाणं आणि किल्ल्यांचे पोर्तुगीज जाळं विकसित केलं. स्थानिक हिंदू आणि मुस्लिम लोकांवर या तथाकथित ‘युरोपीय व्यापाऱ्यां’नी प्रचंड अ*त्याचार केले. शिवाय लिस्बनचे बंदर लवकरच मौल्यवान वस्तूंसह दालचिनी, आले, काळी मिरी आणि केशर यांसारख्या मौल्यवान मसाल्यांच्या जहाजांनी गजबजले.
सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला समुद्री शोध, अन्वेषण तसेच यु*द्धांतील विजय आणि पराक्रमामुळे पोर्तुगाल हे युरोपातील सर्वात समृद्ध राष्ट्र बनले होते. भारतापासून पोर्तुगालची जहाजे आणखी पूर्वेकडे गेली, १५१२ साली स्पाइस आईसलॅंड्स (इंडोनेशिया) आणि १५१४ साली चीनपर्यंत ही पोर्तुगीज जहाजे पोहोचली.
काही वर्षांनंतर, खलाशी आणि नेव्हिगेटर ‘फर्नाओ डी मॅगालहिस’ (मॅगेलन) दक्षिण अमेरिकेच्या टोकाभोवती वळसा देऊन स्पाइस बेटांकडे जाण्याचा प्रस्ताव दिला. पोर्तुगालचा राजा मॅन्युएलने हा प्रस्ताव नाकारल्यानंतर, मॅगेलन कोलंबसप्रमाणेच स्पेनकडे गेला. पुढे याच समुद्री प्रवासात मॅगेलन फिलिपिन्समध्ये मरण पावला, परंतु त्याचे एक जहाज १५२२ साली स्पेनला परत आले. या स्पॅनिश जहाजाने जगभर प्रदक्षिणा घालण्याचा पराक्रम केला आणि पोर्तुगालच्या समुद्रावरील वर्चस्वाच्या समाप्तीची सुरुवात झाली.
पण पोर्तुगालने तब्बल ४०० वर्षे भारतातील गोव्यसह दीव-दमण येथे राज्य केले. गोव्यात चर्चच्या आदेशानुसार अनेक वर्षे ‘गोवा इन्क्वीजीशन’ सुरूच होते. यामध्ये जबरदस्तीने धर्मांतरण, ह*त्या, अ*त्याचार असे अनेक प्रकार ‘इन्क्वीजीशन कोर्ट’च्या माध्यमातून घडत राहिले. १८१२ साली इन्क्वीजीशन कोर्ट बंद पडले.
पण या नंतरही ‘शेंडी टॅक्स’सारखे जाचक कर स्थानिकांवर लादले जात असत. या चारशे वर्षांच्या कालावधीत मराठी सत्तेसमोरही मुत्सद्देगिरीच्या मदतीने पोर्तुगीज गोव्याला चिकटून राहिले आणि सर्वच बाबतीत त्यांनी या परशुरामभूमीचे शोषण केले. अखेरीस १९६१ साली पोर्तुगालच्या ताब्यातून भारतीय सैन्याने गोवा स्वतंत्र केला आणि जगामध्ये पोर्तुगालचे अस्तित्व त्यांच्या भूभागापुरतेच मर्यादित राहिले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.