आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारताच्या क्रिकेट इतिहासामध्ये आतापर्यंत हजारो सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये शेकडो खेळाडूंनी आपलं नशीब आजमावलं आहे. अनेक गोलंदाज आणि फलंदाजांनी मॅच विनिंग खेळी करून आपल्या संघाला यश मिळवून दिलं आहे. मात्र, काही सामने आणि काही खेळाडू कायम लक्षात राहतील असेच आहेत.
येणाऱ्या कित्येक पिढ्यांना त्यांच्या गोष्टी सांगितल्या जातील. ९०च्या दशकातील असाच एक सामना आहे जो आजही अनेकांच्या लक्षात आहे. बंगळुरूमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान झालेली ही लढत ‘टायटन कप फिक्स्चर’ नावानं ओळखली जाते. कुणाच्याही ध्यानीमनी नसताना दोन भारतीय गोलंदाजांनी अचानक ‘वर्ल्डक्लास’ फलंदाजी केली आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या भुवया आश्चर्यानं उंचावल्या. जवागल श्रीनाथ आणि अनिल कुंबळे या जोडीनं अशक्य वाटणारा विजय अक्षरश: खेचून आणला होता. त्या सामन्यात नेमकं काय झालं होतं हे आपण जाणून घेऊया..
काही मोजक्या खेळाडूंचा अपवाद वगळता १९९० चं दशक भारतीय क्रिकेटसाठी फारसं चांगलं ठरलं नाही. अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये भारतीय संघाला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. अनेकदा मोठ्या फरकानं पराभवाची नामुष्की संघावर ओढावली.
त्या काळात सचिन तेंडुलकर सामर्थ्याच्या आणि यशाच्या शिखरावर होता. भारतीय संघाच्या दशकभरातील विजयांमध्ये प्रामुख्यानं त्याचा वाटा होता. मात्र, तो बाद झाल्यानंतर पूर्ण संघ एकदम गळून जात असे. जणू काही सचिन तेंडुलकरशिवाय दुसरा पर्यायचं नाही, अशी स्थिती अनेकदा निर्माण होत असे. १९९६च्या टायटन कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.
टायटन कप ही भारतानं आयोजित केलेली तिरंगी एकदिवसीय सिरीज होती. त्यात भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या तीन संघांचा समावेश होता. दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या फेरीतील आपले दोन्ही सामने जिंकून अंतिम फेरीसाठी आपलं स्थान निश्चित केलं होतं. तर भारत आणि ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत जाण्यासाठी एकमेकांशी भिडणार होते. दोन्ही संघांदरम्यानचा निर्णायक सामना बंगळुरूच्या अवघड खेळपट्टीवर ठेवण्यात आला होता.
ऑस्ट्रेलियन कर्णधार मार्क टेलरच्या उत्कृष्ट १०५ धावांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ५० ओव्हर्समध्ये सात विकेट्सच्या बदल्यात २१५ रन्स केले होते. २१५ धावांचं लक्ष्य नक्कीच जास्त नव्हतं. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाच्या आशा पुन्हा एकदा सचिनवर टिकलेल्या होत्या. सचिननं देखील निराश केलं नाही परंतु त्याला दुसऱ्या टोकाला कुणाची साथ मिळाली नाही. शेवटी ८८ रन्सवर सचिन तेंडुलकर आऊट झाला.
तेव्हा भारताला विजयासाठी ५२ धावांची आवश्यकता होती आणि आठ खेळाडू तंबूत परतलेले होते. संघाच्या शेपटामध्ये सर्व बॉलर्सचा भरणा असतो. त्यांच्या बळावर ५२ धावा मिळवणं म्हणजे जवळपास अशक्यच होतं. भारतीय ड्रेसिंग रूममध्ये चिंतेचे ढग रेंगाळत असल्याचं स्पष्ट दिसत होतं. ऑस्ट्रेलियन संघाला आपला विजय निश्चित वाटत असल्याचं त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून दिसत होतं. स्टेडियममधील प्रेक्षकांनी खुर्च्या खाली करण्यास सुरुवात केली होती. घरी बसलेल्या लोकांवर देखील दूरदर्शन बंद करण्याची वेळ आली होती.
मात्र, त्यावेळी मैदानावर असलेल्या दोन ‘लोकल बॉईज’ला पराभव मान्यच नव्हता. जवागल श्रीनाथ आणि अनिल कुंबळे हे दोघे नवव्या विकेटसाठी मैदानावर होते. दोघेही आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी ओळखले जात. श्रीनाथ कधीतरी एखादा चांगला शॉट खेळून विकेट वाचवू शकत होता म्हणून त्याला नवव्या क्रमांकावर पाठवण्यात आलं होतं.
आल्या बरोबर लाँगऑफला एक उत्तुंग सिक्स मारून त्यानं हे सिद्ध देखील करून दाखवलं. यामुळं नाराज होऊन स्टेडियमच्या बाहेर जाणाऱ्या प्रेक्षकांची पावलं आपोआप रेंगाळली. नेमकं त्याचवेळी कॅमेरामॅननं प्रेक्षकांमध्ये बसलेल्या दोन ज्येष्ठ स्त्रियांवर फोकस केलं. श्रीनाथनं मारलेल्या सिक्सनंतर दोघीजणी आनंदानं टाळ्या वाजवत होत्या. त्यातील एक स्त्री अनिल कुंबळेची आई होती तर दुसरी स्त्री आजी.
प्रत्येक बॉलनंतर कॅमेरा त्या दोघींवर फोकस होत असे. जणू काही त्या दोघी त्यावेळी संपूर्ण देशातील प्रेक्षकांचं प्रतिनिधीत्व करत होत्या. त्यांच्या चेहऱ्यांवरील प्रत्येक भाव अनिल आणि जगवालच्या जोडीप्रमाणं अजरामर झाले. पुढच्या ओव्हरमध्ये कुंबळेनं लेग साईडवर विकेट किपरच्या मागे हळूच बॉल ढकलून दिला. तो थेट बाऊंड्रीपार करून गेला. स्टेडियममध्ये उत्साह वाढू लागला होता. जवागल-अनिल जोडीनं हळूहळू आणि समंजसपणे रन जमवण्यास सुरुवात केली होती.
मात्र, ऑस्ट्रेलियन कर्णधारानं हुशारी केली आणि ग्लेन मॅकग्राला बॉलिंग अटॅकमध्ये आणलं. कुंबळेला अडचणीत आणण्यात मॅकग्रा यशस्वी झाला. लेग स्पिनर असलेल्या कुंबळेकडून एक बॉल हुकला आणि तो त्याच्या पॅडवर आदळला. मॅकग्रानं तत्काळ एलबीडब्ल्यूचं अपील केलं. तोपर्यंत भारतीय जोडीने एक रन घेतला. जेव्हा कुंबळे रन घेण्यासाठी धावत होत्या तेव्हा त्याच्या आईनं तर आपल्या डोक्यालाच हात लावला होता.
ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी कुंबळे आणि श्रीनाथवर दबाब आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते घाबरले नाहीत. उलट त्यांनी हळूहळू ऑस्ट्रेलियावर दबाव आणत भारताला लक्ष्याच्या जवळ नेलं. जेव्हा श्रीनाथनं मॅकग्राच्या बॉलवर चौकार मारला तेव्हा भारताचा विजय नजरेच्या टप्प्यात आला. एरवी चांगली फिल्डिंग करणाऱ्या डेमियन मार्टिनच्या हातून बॉल निसटून सीमेपार गेला होता.
ऑस्ट्रेलियन्सच्या हातून मॅच जवळपास निसटली होती. प्रेक्षकांनी विजयाचा उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली होती. मात्र, कुंबळेची आई शांत होती कारण त्यांना देखील आपल्या मुलाप्रमाणे कुठलीही गोष्ट गृहीत धरण्याची सवय नव्हती. जेव्हा श्रीनाथनं विजयी धाव घेतली तेव्हा संपूर्ण ‘चिन्नास्वामी स्टेडियम’सह कुंबळेच्या आई आणि आजीनं जल्लोष साजरा केला.
बंगळुरूच्या मॅच सिरीजमधील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी दोन्ही संघांसाठी ही मॅच महत्त्वाची होती. अनिल कुंबळे आणि जगवाल श्रीनाथ या दोन भारतीय खेळाडूंनी गेलेला सामना परत ओढून आणला होता. या विजयामुळं भारत अंतिम फेरीत पोहचला. मुंबईत झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून टायटन कप जिंकला. जर श्रीनाथ आणि कुंबळेनी बंगळुरूमध्ये लढाऊ वृत्ती दाखवली नसती तर हे कधीच शक्य झालं नसतं, हे नक्की.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.