आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
नेहरू-गांधी परिवाराचे भारताच्या राजकारणाशी अतूट नाते आहे. इंग्रज गेल्यावर अनेक वर्ष राजकारणाची धुरा नेहरू-गांधी कुटुंबाच्याच हातात होती. राजकारणातील वाद तर लोकांपुढे येतच होते पण त्याबरोबरच गांधी कुटुंबातील वाद देखील कधी लपून राहिले नाही.
अशीच एक कहाणी होती मनेका गांधी आणि स्व. इंदिरा गांधींचा लहान मुलगा संजय गांधी यांच्या लग्नाची.
मनेका गांधी यांचा जन्म २६ ऑगस्ट १९५६ला दिल्ली येथे झाला. लॉरेन्स शाळेतून शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्या लेडी श्रीराम कॉलेजमध्ये दाखल झाल्या. १९७३ च्या ‘मिस लेडी’ या स्पर्धेमध्ये विजयी झाल्यानंतर त्यांना अनेक मॉडेलिंगची कामं मिळू लागली. यादरम्यान त्यांनी दिल्ली क्लास मिल्स या टॉवेल बनवणाऱ्या कंपनीसाठी मॉडेलिंग केले ज्याचे सगळ्या दिल्लीत होर्डींग लागले होते. असं म्हणतात की तिथेच मेनकाला बघून संजीव त्यांच्या प्रेमात पडले.
त्यांची खरी ओळख मनेकाच्या बहिणीच्या लग्नात झाली. आणि इथूनच संजीव-मेनकाच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली. हळूहळू ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात झाले. खरंतर मनेका आणि संजीव यांच्यात ११ वर्षांचे अंतर होते पण म्हणतात ना प्रेम वय बघून होत नाही.
एक दिवस दोघांनी पण लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि तसे आपापल्या घरी सांगितले. मनेकाच्या वडिलांना या लग्नाला काहीच हरकत नव्हती पण आईला तयार करण्यात थोडा वेळ गेला. तसंच काहीसं इंदिराजींचं पण. त्या मुलाच्या लग्न होतंय या कारणानी खुश तर होत्या पण दोघांमधील वयातील अंतर त्यांच्यासाठी चिंतेचं कारण होतं.
त्यासाठीच एक दिवस त्यांनी मनेकाला घरी बोलावून बराच वेळ त्यांची चौकशी केली. आणि सगळ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळाल्यावर त्यांनी दोघांच्या लग्नाला होकार दिला. सरतेशेवटी, घरच्यांच्या साक्षीने १९ सप्टेंबर १९७४ला स्व. इंदिराजींचे विश्वस्त मोहम्मद युनुस यांच्याकडे एका घरगुती समारंभात संजीव-मनेका लग्नाच्या बंधनात अडकले.
बऱ्याच लोकांना असं वाटायचं की हे लग्न फार काळ टिकणार नाही. पण मनेका-संजीव ह्यांनी सगळ्यांना खोटं ठरवलं. १९८० साली वयाच्या २३व्या वर्षी त्यांनी एका मुलाला जन्म दिला आणि त्याचे नाव बाळाच्या आजोबांच्या आठवणीत फिरोज ठेवले. पण फिरोज (वरुण) अवघ्या १०० दिवसांचा असताना संजीव यांचा विमान अपघातात मृत्यू झाला.
संजीव इंदिराजींच्या फार जवळ होते. आणीबाणीच्या काळात त्यांनी आईला तर सांभाळलच पण त्याचबरोबर सगळा कारभार देखील आपल्या हातात घेतला होता. त्यांच्या मृत्यू नंतर मात्र सगळी समीकरणं बदलत गेली. इंदिराजींना राजीव गांधी यांना राजकारणात उतरवायचं होतं.
पण मनेकाच्या मनात राजकारणात उतरण्याची इच्छा घर करू लागली होती आणि संजीवची जागा त्या घेतील अशी इंदिराजींना भीती होती.
प्रसिद्ध लेखक खुशवंत सिंग यांनी एका लेखात मनेकाचं समर्थन करत त्यांना संजीवची जागा मिळावी असे विचार व्यक्त केले. कारण राजीवना राजकारणात फार कधीच रुची दिसली नाही. याउलट मेनका कायम संजीवच्या बरोबरीने उभ्या होत्या. प्रत्येक सभेला, प्रचाराला त्या सगळीकडे संजीवसोबत असायच्या. एवढंच नाही तर आणीबाणी नंतर त्यांनी सूर्या नावाचं एक मासिक काढलं ज्याचा उपयोग कॉंग्रेसला १९७७च्या निवडणुकांच्या प्रचारासाठी झाला.
पण मनेकाला मिळणाऱ्या साथीमुळे सासू-सुनेतील नाराजी वाढतच होती. इतकी की संजीव यांच्यावरील एका पुस्तकाची प्रस्तावना लिहून देण्यास सुद्धा त्यांनी मेनकाला नकार दिला.
अशातच संजीव गांधीचे मित्र अकबर अहमद यांनी एका सभेचे आयोजन केले होते. याला त्यांनी मनेकाला निमंत्रित केले होते. इंदिराजी या सभेच्या विरोधात होत्या आणि म्हणूनच त्यांनी मनेकाला सभेत कुठल्याही प्रकारचे भाषण करू नये असे बजावून सांगितले होते. पण अर्थातच मेनका त्यांचं न ऐकता भाषण ठोकून आल्या.
साहजिकच सून आपल्या विरोधात जातेय हे देशातल्या त्याकाळच्या सगळ्यात प्रभावी व्यक्तीला सहन झालं नाही. इंदिराजींनी आपल्या सुनेला, मनेका गांधींना, तत्काळ घर सोडायला सांगितले.
मनेकानी कुठल्याही प्रकारचा विरोध न दर्शवता गांधींचे घर लगेच सोडले. ज्या घरात त्यांचं स्वागत मोठ्या कौतुकाने झालं त्याच घरात आज त्या परक्या झाल्या.
नंतर मनेकांनी राष्ट्रीय संजय मंच म्हणून एका पक्षाची स्थापना केली आणि पुढे त्या जनता दलाच्या सदस्य झाल्या. १९८४ मध्ये त्या गांधींच्या हक्काच्या अमेठीमधून राजीव गांधी यांच्या समोर निवडणुकीला उभ्या राहिल्या. १९८८मध्ये जनता दलाच्या त्या जनरल सेक्रेटरी झाल्या. आणि १९८९ साली त्यांनी आपली निवडणूक जिंकून दाखवली.
आज मनेका गांधी या त्यांच्या प्राणी हक्कांच्या संरक्षणासाठी केलेल्या कामासाठी प्रसिद्ध आहेत. याकरिता त्यांना बरेच पुरस्कार देखील मिळाले आहेत. त्याच्याशी निगडीत अनेक संस्थांशी त्या जोडल्या गेल्या आहेत.
पण राजकीय महत्वाकांक्षा परिवारात अढी आणण्यास कशा कारणीभूत ठरतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे इंदिरा गांधी आणि मनेका गांधी यांच्यातील वाद होय!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.