आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
१९८९ च्या निवडणुकांनी दिल्लीच्या राजकारणाचा तळ ढवळून टाकला होता. देशातल्या अस्थिरतेचा विस्तव पी. व्ही. नरसिंहरावांनी शांत केला असला तरी रामजन्मभूमी आंदोलन, रथयात्रा आणि १९९२ च्या बाबरी विध्वंस अशा घटनांमुळं अजून धग होती.
स्थितप्रज्ञ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पी. व्ही. नरसिंहरावांची सगळ्यांत मोठी ताकद असणाऱ्या शांत बसण्याच्या आणि ‘विचार करण्याचा’ सवयीनं सरकार आणि पक्ष दोन्ही सांभाळण्याची तारेवरची कसरत लीलया पार करताना दिसत होते. असं असलं, तरी देशभरात काँग्रेसविरोधी लाट तयार झाली होती. याला विरोधी पक्षाबरोबरच शरद पवार, अर्जुन सिंग, नारायण दत्त तिवारी यांसारख्या स्वपक्षाच्या नेत्यांचा पण वेळोवेळी हातभार लागतच होता.
विरोधी पक्षात लालकृष्ण अडवाणी राम जन्मभूमीच्या आंदोलनाचे नायक म्हणून देशभरात भगव्या लाटेवर स्वार होते. अटल बिहारी वाजपेयी यादरम्यान थोडे बॅकफूटवर गेले होते. अडवाणींच्या नेतृत्वात भाजपने लोकसभेत शंभरी पार केली होती.
यामुळं पक्षावर त्यांची पकड घट्ट झाली होती. आणि याचं बक्षीस म्हणून त्यांना अटलजींच्या आधी विरोधी पक्षनेतेपद मिळालं होतं.
पण अडवाणींसाठी विरोधी पक्षनेतेपद ही थोडी अडचणीची गोष्ट होती. ज्या अटलजींच्या मार्गदर्शनाखाली काम केलं, त्यांच्या पुढं कॅबिनेट दर्जा मिरवणं आडवाणींनी जड जात होतं. संघ, जनसंघ, पत्रकार म्हणून प्रत्येक ठिकाणी अटलजी अडवाणींना सिनिअर होते. जनसंघाचे अध्यक्ष म्हणून कानपूरच्या अधिवेशनात अटलजींनीच त्यांच्या हाती जनसंघाचं बॅटन सोपवलं होतं.
पुढं बाबरी प्रकरणानंतर त्यांनी राजीनामा दिला, आणि अटलजी विरोधी पक्षनेते झाले होते. बघता बघता १९९५ साल उजाडलं. सोनिया गांधींनी राजकारणात दखल घ्यायला सुरुवात केली होती, आणि लुटीयन्स दिल्लीत नरसिंहराव आणि सोनिया गांधींच्या मतभेदांची कुजबुज सुरू असायची. पण सगळ्यांच्या माना मुंबईकडे वळल्या होत्या.
११ ते १३ नोव्हेंबरला मुंबईत प्रमोद महाजनांच्या व्यवस्थापन कौशल्याचा अजोड नमुना दाखवणारी भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू होती.
या बैठकीच्या दिवशी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालकृष्ण अडवणींनी अचानक सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकवत १९९६ च्या निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून अटल बिहारी वाजपेयींचं नाव पुढं करत ‘अगली बारी अटल बिहारी’ असा नारा दिला.
खुद्द अटलजी पण सुन्न होते. सगळ्यांचं हृदय अजून जोरजोरात धडधडत होतं. राजकारणाची कूस अचानकपणे बदलली होती. अटलजींनी लगेचच अडवाणींचं नाव घेतलं, पण अडवाणींनी सांगून टाकलं, मी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून हा निर्णय जाहीर केलाय, आता त्यात बदल नाही होणार.
खाली बसल्यावर अटलजींनी अडवाणींना विचारलं ‘ऐसा क्यू किया? एक बार पुछ तो लेते’ त्यावर त्यांनी लगेच उत्तर दिलं, ‘अगर पुछ लेता, तो क्या आप मान जाते?’
बैठक संपल्यावर भाजपचे तत्कालीन संघटनमंत्री के. एन. गोविंदाचार्य तणतणत अडवणींच्या खोलीत गेले आणि म्हणाले, ‘ये क्या कर दिया आपने?’ अडवाणी तिथंही खंबीर होते. त्यांनी उत्तर दिलं, ‘अध्यक्ष के नाते मैने जो सही था, वो ही किया.’
त्यावेळच्या एकूण परिस्थिती आणि संघाची भूमिका बघता अडवाणी पंतप्रधान व्हावेत, अशी चिन्ह होती. पण आता सत्तेच्या पटावरून स्वतः राजाच वजा झाला होता.
हे असं अचानकपणे का झालं? याला कोणती पार्श्वभूमी होती?
राम जन्मभूमी आंदोलनानंतर देशभरात त्यांची प्रतिमा ‘हार्डलाईनर’ म्हणून झाली होती. भाजप सत्तेच्या थोडा अलीकडं राहिला, तर त्यांच्या नावावर एकमत होणं थोडं कठीण दिसत होतं. शिवाय अडवाणी फाळणीच्यावेळी पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून भारतात आल्यामुळं ते अल्पसंख्यांक होते.
अशा परिस्थितीत भाजपच्या माणसासाठी ‘7 रेस कोर्स रोड’चा दरवाजा उघडायचा असेल, तर सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा, आणि सगळ्यांचं एकमत होईल असा माणूस पंतप्रधान पदासाठी देणं गरजेचं होतं. आणि यातून अडवाणींना एकच निर्विवाद नाव दिसलं, अटल बिहारी वाजपेयींचं.
दिल्लीच्या राजकारणात असंही बोललं जातं, की अडवाणींच्या जागी अटलजींचा चेहरा पुढं करण्याची कल्पना एका काँग्रेसच्या माणसाची होती, नाव होतं माखनलाल पोतेदार. गांधी घराण्याचे अत्यंत विश्वासू. त्यांची संसदेत खासदार म्हणून भाजपचे एक खासदार कृष्ण लाल वर्मा यांच्याशी घनिष्ठ मैत्री झाली, आणि बोलता बोलता पोतेदारांनी अटलजींच्या नावाची कल्पना कृष्ण लाल वर्मांना सांगितली, जे त्यावेळी लाल कृष्ण अडवणींच्याही खूप जवळचे होते. आणि यातूनच त्यांनी वैयक्तिक महत्वाकांक्षा बाजूला ठेऊन कार्यकारिणीच्या वेळी तो निर्णय जाहीर केला होता.
पुढं अडवाणींचं नाव जैन हवाला घोटाळ्यात जोडलं गेलं, आणि त्यांनी आपण जोपर्यंत निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत निवडणूक न लढवण्याचं ठरवलं. त्यांनी १९९६ सालची निवडणूक लढवली नाही, आणि त्यामुळं ते अटलजींच्या १३ दिवसांच्या सरकारमध्येही नव्हते.
पुढं निर्दोष सिद्ध झाल्यावरच ते गांधीनगरच्या जागेवरून १९९८ साली खासदार झाले. पुढं १९९९ च्या विजयानंतर मंत्रिमंडळात उपपंतप्रधानही झाले. त्यानंतर अटलजींच्या जागी लाल कृष्ण अडवाणी पंतप्रधान होणार अशा बातम्या दिल्लीच्या हवेत सारख्या यायच्या, पण अटल बिहारी वाजपेयी राजकीय चातुर्य आणि प्रतिमेच्या जोरावर सगळ्या चर्चांना पूर्णविराम देत २००४ पर्यंत पंतप्रधान राहिले.
२००४ सालच्या निवडणुकांत भाजपचा अनपेक्षित पराभव झाला होता. २००५ साली अटलजींनी लाल कृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजन यांना राम लक्ष्मणाची उपमा देत राजकीय संन्यास जाहीर केला. अडवाणी पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून २००९ साली निवडणूकांना सामोरे गेले, पण परत हाती पराभव आला.
आणि २०१४ साली, जेव्हा विजयाची पूर्ण खात्री वाटत होती, तेव्हा त्यांच्याच एका राजकीय शिष्यानं त्यांना आधीच ओव्हरटेक केलं होतं. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले होते.
आता लाल कृष्ण अडवाणी भाजपच्या मार्गदर्शक मंडळात आहेत. त्यांनी कधीतरी एक वाक्य म्हटलं होतं, ‘काश सिंध भारत का हिस्सा होता.’ तसं झालं असतं, तर त्यांच्या नावापुढं कदाचित ‘माजी उपपंतप्रधान’ यापेक्षाही काहीतरी मोठं पद लागलं असतं.
पण राजकारण असंच असतं. आयुष्यभर ज्या पदाचं स्वप्नं बघतो, ज्या पदासाठी संघर्ष करतो, आटापिटा करतो, ते शेवटपर्यंत स्वप्नंच राहतं.
आणि ज्यांच्या नशिबात असतं, त्यांना आंध्र भवनमध्ये झोपलं असताना रात्री दोन वाजता उठवून सांगण्यात येतं, “उठा तुम्हाला देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घ्यायची आहे…”
या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.