आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
गुप्तहेर बनून काम करणे खूपच जोखमीची बाब आहे. हेरगिरी करणारे ही आपला प्राण तळहातावर घेऊनच फिरत असतात. अशात मृत्यू आला तर सगळी गुपिते स्वतःसोबतच नष्ट करावी लागतात. आपण कुठल्या देशाचे नागरिक आहोत, आपली मातृभूमी कोणती, मातृभाषा कोणती कुठलीच माहिती उघड करून चालत नाही. संपूर्ण आयुष्यच गुप्त राहून जगावे लागते. असे कितीतरी गुप्तहेर असतील ज्यांनी गुप्तपणे काम केले आणि ते गुप्तपणेच निघून गेले. ज्यांच्या कामाचा सुगावाही कुणाला लागला नसेल.
स्वातंत्र्यपूर्व काळातही असेच एक गुप्तहेर होऊन गेले ज्यांनी एकाचवेळी पाच देशांसाठी हेरगिरी केली. गंमत म्हणजे या पाचही देशांपैकी एकालाही हा गुप्तहेर आपल्या व्यतिरिक्त इतर देशांसाठीही काम करतो याचा सुगावा लागला नाही.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात यांनी ब्रिटन, जर्मनी, इटली, जपान, आणि रशिया अशा पाच देशांसाठी हेरगिरी करून भारत आणि अफगाणिस्तान या देशांचे इतर देशांशी असलेले संबंधही सुधारले.
खरे तर यांना गुप्तहेरांचा बापच म्हटले पाहिजे. भारताच्या या महान सुपुत्राचे नाव होते भगतराम तलवार. पण हेरगिरी करत असताना त्यांनी कितीतरी नावे परिधान केली. कोणी त्यांना रेहमान खान म्हणून ओळखत होते तर कोणी सिल्व्हर. ब्रिटीश गुप्तचर अधिकारी पीटर फ्लेमिंग यांनी त्यांना हेरगिरीचे प्रशिक्षण दिले होते.
भगतराम तलवार यांचा जन्म फाळणीपूर्व भारतातील पंजाब येथे १९०८ साली झाला. त्यांच्या वडीलांची मोठमोठ्या ब्रिटीश अधिकाऱ्यांसोबत उठबस चालत असे. त्यामुळे घरी राजकीय वातावरण होतेच. जालियनवाला बाग हत्याकांडानंतर त्याच्या वडिलांनी ब्रिटीशांशी असलेले संबंध तोडून टाकले. त्यांचा ब्रिटीश सरकारवरचा विश्वासच उठला. त्या काळात सगळीकडचेच वातावरण देशभक्तीने भारलेले होते. अशाच वातावरणात भगतराम लहानाचे मोठे होत होते. अशात त्यांच्याही अंगात देशभक्ती भिनली नसती तरच नवल. त्यांचे मोठे भाऊ हरकिशन तलवार यांना १९३० साली गव्हर्नरवर गोळी चालवण्याचा आरोपाखाली अटक केली होती आणि ९ जून १९३१ रोजी त्यांना फासावर लटकवण्यात आले. भावाच्या या बलिदानाने त्यांच्यातील देशभक्तीची भावना आणखी तीव्र झाली.
राजाराममोहन रॉय यांच्या आर्य समाजापासून ते कम्युनिस्ट पक्षापर्यंत अनेक देशप्रेमी संघटनेत त्यांनी योगदान दिले. वायव्य सरहद्दीवरून ते बऱ्याचदा अफगाणिस्तानमधे प्रवेश करत असत. हा भाग फार अशांत होता, पण भगतराम तलवार हे स्थानिक क्रांतिकारकांच्या गटाचे सदस्य होते. त्यांना या भागात फिरण्याची भीती नव्हती म्हणूनच नेताजी सुभाषचंद्र बोस यांना काबुलची सीमा पार करवून रशियाला पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. भगतराम यांनी आनंदाने ही जबाबदारी स्वीकारली आणि ती यशस्वीपणे पारही पाडली.
भगतराम यांनी त्यांना काबुलपर्यंत सुखरूप नेले. तिथे रशियन दुतावासात त्यांनी मदत मागितली, पण त्याकाळी मित्र राष्ट्रांच्या बाजूने असलेला रशिया सुभाषचंद्र बोस यांना मदत करण्यास उत्सुक नव्हता. मग त्यांनी नेताजींना इटालियन दुतावासात नेले. तिथे नेताजींना सन्मानपूर्वक वागणूक मिळाली. इटालियन अधिकाऱ्यांनी नेताजींना मदत करण्याचे आश्वासन दिले. मात्र त्याबदल्यात त्यांनी भारतात ब्रिटीशविरोधी कारवायांना मूर्त रूप द्यावे अशी अट घातली.
इटालियन अधिकाऱ्यांना भारतीय जनतेच्या मनात ब्रिटीश सरकारबद्दल मत काय आहे हे जाणून घ्यायचे होते. ही खबर काढून आणण्याची जबाबदारी त्यांनी भगतराम तलवार यांच्यावर सोपवली. त्यासाठी त्यांनी भगतराम यांना काही पैसे आणि साधनेही दिली.
काबुलमधून भगतराम आपल्या मातृभूमीला परत आले आणि त्यांनी इथे काही खोटी पत्रके वाटली आणि पुन्हा काबुलला परत गेले.
आता दुसऱ्या महायुद्धाचे चित्र काहीसे पालटले होते. पूर्वी मित्र राष्ट्रांचा सहकारी असलेल्या रशियाने आता पलटी मारली होती आणि त्यांनी जर्मनीशी हातमिळवणी केली. त्यामुळे आता रशियन दूतावासाने नेताजींना बर्लिनला जाण्यासाठी हिरवा झेंडा दाखवला. आता भगतराम जर्मनीसाठी हेरगिरी करू लागले. जर्मनीने त्यांच्यावर काही महत्त्वाच्या ऑपरेशन्सची जबाबदारी सोपवली.
यानंतर ते पुन्हा सोव्हिएत दुतावासात आले, रशियाने त्यांची रशियाचा गुप्तहेर म्हणून नेमणूक केली. रशियातून भगतराम पुन्हा भारतात आले. भारतात येताच त्यांना ब्रिटीश सरकारने अटक केली. रशियाने ब्रिटिशांवर दबाव आणल्याने काही वेळाने भगतराम यांची तुरुंगातून सुटका झाली.
ब्रिटीश गुप्तहेरासोबत मिळून भगतराम यांनी एक खोटा अहवाल तयार केला आणि तो काबुलमधील जर्मनीच्या दुतावासात सादर केला. आता जर्मन दुतावासाने भगतराम यांच्याकडे दोन रेडीओ सेट दिले आणि ते रेडीओ सेट घेऊन जपानी दुतावासात पोहोचवण्याची जबाबदारी सोपवली. तोपर्यंत नेताजी बोस जपानमधे पोहोचले होते आणि त्यांनी बर्मामधून जपानच्या वतीने भारतावर हल्ला करण्याची मोहीम आखली होती.
भगतराम यांना जपानी दुतावासात पोहोचवण्यासाठी दिलेले रेडीओ रशियन आणि ब्रिटीश दुतावासात पोहोचवले. यामुळे बर्लिनहून जर्मन गुप्तचर संघटनेकडून येणारे संदेश ब्रिटीश आणि रशियन अधिकारी ऐकू शकत होते आणि त्या संदेशांवर व्यक्त होऊन जर्मन गुप्तहेरांना चुकीची माहितीही पोहोचवू शकत होते.
जपानी दुतावासाने भगतराम यांच्यावर त्यांचे लष्कर बंगालपर्यंत पोहोचू शकेल का याचा आढावा घेण्याची जबाबदारी सोपवली. हे सैन्य भारतात पोहोचेल आणि हिंसक कारवाया घडवून आणेल. ज्यामुळे भारतीय जनता आणि ब्रिटीश सरकार यांच्यातील संबंध आणखी ताणले जातील, अशी जपानचे धोरण होते.
भगतराम यांनी या सैन्याशीही आपले संबंध जुळवले आणि त्याची माहिती ब्रिटीश गुप्तचर यंत्रणांना पुरवली. त्यामुळे जपानने पाठवलेले हे सैन्य भारतात येऊन काही गोंधळ माजवण्याआधीच ब्रिटीशांनी त्यांना अटक केली.
भगतराम यांनी पाच देशांसाठी हेरगिरी करता करता तेच केले जे भारताच्या हिताचे होते. त्यांच्या संपर्कातील अनेक लोकांना ते गुप्तहेर म्हणून काम करताहेत हेही माहिती नव्हते. नंतर जेव्हा त्यांनी स्वतःचे आत्मचरित्र लिहिले तेव्हाच त्यांच्याबद्दलची सगळी माहिती प्रकाशात आली. पाच देशासाठी हेरगिरी करूनही अखेरच्या श्वासापर्यंत त्यांचे या पाचही राष्ट्रांशी सलोख्याचे संबंध राहिले, हे विशेष. पाच देशासाठी त्यांनी हेरगिरी केली पण कुणालाच त्यांच्यावर थोडासाही संशय आला नाही.
जर्मन दुतावासाने तर भगतराम यांना आयर्न क्रॉस या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर भगतराम अनेक वर्षे अज्ञातवासात राहिले. वेशभूषा बदलून राहणे, त्यांच्यासाठी डाव्या हाताचा मळ होता. पुढे भारत स्वतंत्र झाल्यानंतर ते भारतात आले. त्यानंतरचे त्यांचे जीवनही साधेपणातच व्यतीत झाले. १९८३ साली त्यांचे निधन झाले.
भगतराम तलवार यांच्या या कामगिरीपुढे जेम्स बॉंडही फिका पडेल! भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या अशा असंख्य अज्ञात वीरांना मानाचा मुजरा!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.