आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
६ जून – तसं पाहिलं तर ही एक सामान्य तारीख वाटते सगळ्यांना पण आपल्याला हे माहिती आहे का की, हा असा एक दिवस होता की जो इतिहासाच्या पानांत सोनेरी अक्षरांनी लिहिला गेलाय आणि याचं कारण आहे ते म्हणजे भारतीय सैन्याने घडवलेले ऑपरेशन ब्लु स्टार.
या ऑपरेशन ब्ल्यू स्टारमुळे इंदिरा गांधींची हत्या करण्यात आली होती, चिडलेल्या त्यांच्या अंगरक्षकांनी त्यांना गोळ्या घातल्या होत्या. या ऑपरेशनचं सगळं श्रेय तसं इंदिराजींनांच जातं. पण या घटनेत अजून सुद्धा एक असा व्यक्ती होता ज्याने ही सगळी परिस्थिती हाताळली होती. हा नायक इतिहासात कुलदीपसिंग ब्रार या नावाने ओळखला जातो.
कुलदीपसिंग यांचा जन्म पंजाबमधल्या एका शीख कुटुंबात झाला. कुलदीपसिंग यांच्या घरची आर्थिक बाजू चांगली असल्याने तसेच घरचे सुशिक्षित असल्याने त्यांना लहानपणी बोर्डिंग स्कुलला दाखल करण्यात आलं.
त्यांच्या शिक्षणाची सुरुवात कर्नल ब्राऊन केंब्रिज स्कुल इथे झाली. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांचा प्रवेश द डून स्कुलमधे घेतला आणि त्यांचे पूर्ण बालपण बोर्डिंग स्कुलमधे कडक शिस्तीत गेलं.
कुलदीप यांच्यासाठी त्यांचे वडील प्रेरणास्थान होते. कारण त्याच्या वडिलांनी दुसर्या महायुद्धात अपार धैर्य दाखवून सैन्यात अभूतपूर्व योगदान दिले. संपूर्ण भक्तीभावाने देशाची सेवा केल्यानंतर त्यांचे वडील मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले.
आपल्या वडिलांचा आदर्श घेत कुलदीपही वयाच्या २० व्या वर्षी सैन्यात दाखल झाले. आधी ते मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये लेफ्टनंट म्हणून तैनात होते. इथली त्यांची चांगली कामगिरी पाहून त्यांना १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये मोठी जबाबदारी देण्यात आली होती. ते इन्फंट्री बटालियनची कमांड सांभाळणार होते. जमालपुरमध्ये जेव्हा भारत-पाकिस्तानच्या सैन्यांची लढाई झाली होती, त्याच वेळी जनरल ब्रार यांनी आपल्या बटालियनला असीम साहसाची ओळख करुन प्रोत्साहन दिलं होतं.
या मोहिमेतील त्यांची कामगिरी पाहता त्यांना भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे असलेल्या वीरचक्राने सन्मानित करण्यात आलं होतं. आणि या नंतर त्यांना १९७१ च्या युद्धाच्या वेळेस आणखी एक मोठी जबाबदारी मिळाली.
यावेळी त्यांना ढाक्याच्या घनदाट जंगलात लपलेल्या पाकिस्तानी सैनिकांशी लढायचं होतं आणि यावेळी त्यांनी आपल्या तुकडीचं नेतृत्व एवढ्या हुशारीने केलं की ते सर्वात पहिल्यांदा पाकिस्तानातला धूळ चारण्यासाठी ढाक्यात पोहोचण्यात यशस्वी झाले.
एकीकडे आणीबाणीचा गडद टप्पा आणि दुसरीकडे राजकीय पक्षांमध्ये सुरू असलेला संघर्ष. याचवेळी अकाली दल वाल्यांनी स्वायत्त राज्याची मागणी केली. एक प्रकारे १९७० च चिन्ह काहीसं असं होतं. त्या काळात अकाली दल हा राजकारणाचा मुख्य भाग होता. ते शीख आणि त्यांच्या मागण्यांशी संबंधित मुद्द्यांविषयी सतत बोलत होते, परंतु त्यांच्या दृष्टीने पंजाबमधील तरुणांना ती निष्ठा दिसली नाही.
आता ते एका कणखर सेनापतीच्या शोधत होते, यावेळी त्यांना ‘दमदमी टकसाल‘ या शीख शैक्षणिक संस्थेचा नेता असलेल्या जरनैलसिंह भिंद्रनवाले यांच्याशी त्यांचा संबंध आला आणि त्यांचा नेत्याचा शोध संपला. जरनैलसिंह भिंद्रनवाले यांनी सरकारच्या धोरणांबाबत कठोर भूमिका घेतली.
त्यांचे केवळ एक भाषण ऐकण्यासाठी लोक लांबून लांबून येत असत. नंतर पंजाबमध्ये वाढत जाणारा हिंसाचार पाहता त्यांच्यावर हिंसक कारवायांना साथ दिल्याचे आरोप लावण्यात आले. पंजाबमध्ये चाललेला हिंसाचार काही केल्या थांबण्याच नावं घेत नव्हता. अकाली दल, खलिस्तानी समर्थक आणि जरनैल सिंग यांच्या समर्थकांनी सरकारच्या विरोधात हिंसाचाराचा मार्ग निवडला होता.
या सगळ्या बिघडत चाललेल्या वतावरणावरून इंदिरा गांधी यांनी दरबारा सिंग यांचे तत्कालीन काँग्रेस सरकार बरखास्त केलं. आता पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. राज्यात बाहेरून येणाऱ्या गाड्या आता थांबवण्यात आल्या होत्या.
ऑपरेशन ब्ल्यू स्टारचं मुख्य कारण हे भिंद्रनवाले हेच मानलं जातं. त्यांनी खलिस्तान समर्थकांसह अमृतसरमधील सुवर्ण मंदिर आणि अकाल तख्त परिसरात आपलं बस्तान मांडलं होतं. भिंद्रनवाले आणि त्याच्या साथीदारांना सुवर्ण मंदिरातून काढून टाकण्याच्या उद्देशाने भारतीय सैन्याने ही कारवाई केली आणि या मोहिमेची जबाबदारी दिली होती ती जनरल कुलदीपसिंग ब्रार यांच्या खांद्यावर.
हे ऑपरेशन ब्ल्यू स्टार चालू होण्यापूर्वी जनरल कुलदीपसिंग हे मेरठ इथे एका तुकडीचं नेतृत्व करत होते. आपल्या कुटुंबाला वेळ देण्यासाठी त्यांनी १ महिन्याची सुट्टी घेतली होती आणि १ जून रोजी ते आपल्या कुटुंबासमवेत उड्डाण करणार होते. पण त्यांना पहिल्याच दिवशी अमृतसरला जाण्याचा आदेश मिळाला.
ऑपरेशन ब्ल्यू स्टार सुरु करण्याच्या इंदिरा गांधींच्या निर्णयामुळे त्यांना या ऑपरेशनचे नेतृत्व करावे लागले. देशसेवेला सर्वोतोपरी मानून त्यांनी रजेवर न जाणे पसंत केले आणि त्वरित उड्डाण करून अमृतसरला पोहोचले.
जनरल कुलदीपसिंग यांना माहिती होते की, दहशतवाद्यांनी सैन्याचा प्रवेश रोखण्यासाठी केवळ सर्वसाधारण लोकांना ओलिस ठेवले आहे. मग परिस्थिती समजल्यानंतर त्यांना कठोर पावले उचलावी लागली.
५ जूनच्या रात्री जनरल कुलदीपसिंग यांनी आपल्या ६ व्या इन्फंट्री बटालियनसह सुवर्ण मंदिरात प्रवेश केला. त्यांच्यासोबत सैन्यातील सर्वात हुशार कमांडोही होते. या वेळेस दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले.
तेथे उपस्थित सर्व शीखांच्या धार्मिक भावनांना लक्षात घेऊन जनरल कुलदीपसिंग यांनी आपल्या सैनिकांना हरमंदिर साहिबच्या दिशेने हल्ला करु नये असे आदेश दिले. दहशतवाद्यांनी हरमंदिर साहिब येथून गोळीबार सुरू ठेवला, पण तरीसुद्धा जनरल कुलदीपसिंगआपल्या निर्णयापासून मागे हटले नाहीत.
त्यांनी शीखांचे सर्वात पवित्र स्थान असलेल्या अकाल तख्तला वाचवण्याचाही प्रयत्न केला. हे करण्यासाठी त्यांनी दहशतवाद्यांना चकवा देण्यासाठी इतर गोष्टींचा वापर केला.
शेवटी जनरल कुलदीपसिंग यांच्या नेतृत्वात भारतीय सैन्याने अकाल तख्त आणि हरमंदिर साहिब येथून दहशतवाद्यांना पळवून लावण्यात यश मिळवले. या कारवाईच्या वेळी दहशतवाद्यांचे सरदार शबेग सिंह आणि जरनैलसिंग भिंद्रनवाले हे दोघे ठार झाले.
तुम्हाला कदाचित या गोष्टीवर विश्वास बसणार नाही की, शबेग सिंग हे सुद्धा सैन्याचे अधिकारी होते. इतकंच नाही तर जेव्हा जनरल कुलदीपसिंग हे सैन्यात भरती होऊन प्रशिक्षणासाठी गेले होते, तेव्हा त्यांना शबेगसिंग हे प्रशिक्षक होते.
जनरल कुलदीपसिंग ब्रार यांना १९८७ साली सैन्यातून आपली निवृत्ती स्वीकारल्यानंतर मुंबईच्या सर्वात सुरक्षित भागात राहावं लागलं होतं. त्यांच्यावर कित्येक वेळा हल्ले झाले, पण त्यांना असलेल्या सुरेक्षेमुळे हल्लेखोरांना यश आले नाही.
आज सुद्धा ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा विषय निघाला की जनरल कुलदीपसिंग ब्रार यांचा उल्लेख या मोहिमेचे हिरो म्हणून केला जातो. त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना परम विशिष्ठ सेवा पदक आणि सर्वांत प्रतिष्ठित सेवा पदक सुद्धा देण्यात आले.
जनरल कुलदीपसिंग ब्रार आजही या ऑपरेशनमधील झालेल्या रक्तपाताची आठवण काढतात. ते या मोहिमेला त्यांच्या आयुष्यात लढलेल्या लढायांपैकी सर्वात कठीण लढाई मानतात. ते म्हणतात की, ढासळणारी परिस्थिती लक्षात घेता त्यावेळी सैन्य आणि सरकार यांच्याकडे ही कारवाई करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता म्हणून हे सगळं घडलं.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.