आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
स्व. अटल बिहारी वाजपेयी हे भारतीय राजकारणातील यशस्वी नेत्यांपैकी एक होते. ते तब्बल १२ वेळा संसदेत निवडून आले आहेत. १० वेळा लोकसभा सदस्य म्हणून आणि २ वेळा राज्यसभा सदस्य म्हणून ते निवडून आले आहेत.
भारताचे पंतप्रधानपद त्यांनी तीन वेळा भूषविले आहे. परंतु वाजपेयींसारख्या धुरंधर आणि यशस्वी नेत्याला देखील १९६२ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभवाचे तोंड बघावे लागले होते. त्यांचा पराभव सुभद्रा जोशी नावाच्या एका महिलेने केला होता.
सुभद्रा ह्या १९५१ साली हरियाणाच्या कर्नाल आणि १९५७ साली अंबाला मधून लोकसभेला खासदार म्हणून निवडून आल्या होत्या.
१९६२ साली त्यांना काँग्रेसकडून वाजपेयींच्या विरोधात उत्तर प्रदेशच्या बलरामपूर लोकसभा मतदारसंघात उतवरण्यात आले.
बलरामपूर हा वाजपेयींचा गड होता सुभद्रा जोशी ह्या दुसऱ्या राज्यातील खासदार असूनही त्यांनी वाजपेयींच्या मतदारसंघात येऊन त्यांना आव्हान दिले होते. नुसते आव्हान देऊन त्या थांबल्या नाहीत त्यांनी वाजपेयींना त्या निवडणुकीत चांगलीच मात दिली होती.
बलराज सैनी ह्या तत्कालीन अभिनेत्याने सुभद्रा जोशींचा प्रचार करून त्यांना विजय मिळवण्यात मोठी मदत केली होती.
सुभद्रा जोशी यांचं कर्तृत्व हे फक्त वाजपेयींच्या पराभव करणारी महिला इथवरच सीमित नव्हते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नोंदवणाऱ्या काही प्रमुख महिलांपैकी त्या होत्या.
२३ मार्च १९१९ ला आजच्या पाकिस्तानात असलेल्या सियालकोट येथे सुभद्रा जोशींचा जन्म झाला. त्यांनी फॉर्मन ख्रिश्चन कॉलेजमधून
राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच त्यांचा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीशी संबंध आला.
सुभद्रा जोशींवर महात्मा गांधींच्या विचारांचा खूप मोठा प्रभाव होता. वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमात सुभद्रा जोशी यांची महात्मा गांधींशी पहिली भेट घडून आली होती. १९४२ सालच्या छोडो भारत चळवळीत देखील त्यांनी स्वातंत्र्यसेनानी अरुणा असफ अली यांच्या खांद्याला खांदा लावून लढा दिला होता.
छोडो भारत चळवळीतील त्यांच्या योगदानामुळे त्यांना भूमिगत व्हावे लागले होते. त्यावेळीदेखील त्या हमारा संग्राम नावाच्या नियतकालिकेच्या संपादक म्हणून कार्यरत होत्या.
पुढे ब्रिटिश पोलीसांंनी त्यांना अटक केली आणि लाहोरच्या मध्यवर्ती तुरूंगात बंदिस्त केले.
तुरूंगातून बाहेर आल्यावर सुभद्रा यांनी कामगारांच्या समस्यांवर काम करण्यास सुरुवात केली. परंतु भारताची फाळणी ही सुभद्रांच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना ठरली.
फाळणीच्या अत्यंत हिंसक काळात त्यांनी शांती दल नावाच्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून दारोदारी जाऊन शांतीचा संदेश दिला आणि संकटग्रस्त लोकांची मदत देखील केली.
त्यांनी एका इतिहासकाराला दिलेल्या मुलाखतीत शांती दलाच्या स्थापने संदर्भात महात्मा गांधींशी केलेल्या चर्चेचा सारांश सांगितला होता. त्यावेळी फाळणीमुळे होणाऱ्या हिंसाचाराने आणि दिल्लीतील मुस्लिम लोकांच्या हत्याकांडाने गांधीजी व्यथित झाले होते.
तब्बल १० हजाराच्या आसपास मुस्लिमांना आपला जीव फाळणीच्या काळात गमवावा लागला होता.
गांधीजींनीच सुभद्रा जोशी आणि त्यांचा साथीदारांना संकटग्रस्त मुस्लिम लोकांची मदत करण्याचे आवाहन केले. गांधीजींच्या सांगण्यावरून शांती दल अस्तित्वात आले आणि दिल्लीच्या परिसरातील हिंसाचारग्रस्त मुस्लिम वस्त्यांचे रक्षण करण्यात आले.
फाळणीच्या काळात सुभद्रांच्या मनात धार्मिक सद्भावनेचे बीज रोवले गेले. तेव्हापासून त्यांनी जातीय आणि धार्मिक दंगे रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले.
१९६१ साली मध्य प्रदेशातील सागर येथे हिंदू मुस्लिम दंगलीचा भडका उडाला. त्यावेळी कुठलाही विचार न करता सुभद्रा त्याठिकाणी गेल्या आणि दंगल शांत होईपर्यंत त्या तिथेच राहिल्या. दोन्ही समुदायातील वितुष्ट दूर करून शांतता प्रस्थापित केली.
१९७१ साली त्यांनी हिंदू मुस्लिम एकतेसाठी कौमी एकता कमिटीची स्थापना करून बंधुभावाचं वातावरण निर्माण करण्यात योगदान दिलं.
इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांचे सुपुत्र संजय गांधी, हे प्रचंड आक्रमकपणे मुस्लिम विरोधी भूमिका घेत होते. त्यावेळी सुभद्रा स्वतः पुढे जाऊन इंदिरा गांधींना भेटून म्हणाल्या होत्या की त्यांनी तत्काळ त्यांचा मुलाच्या वागण्यावर नियंत्रण मिळवणे आवश्यक असून यातून खूप वाईट परिणाम देशाला भोगावे लागू शकतात.
त्यावेळी त्या दिल्लीच्या चांदणी चौक मतदारसंघाच्या खासदार होत्या आणि काँग्रेस नेते संजय गांधी आणीबाणीचा फायदा घेऊन त्यांच्या परिसरातील वास्तूंची नासाधुस करत आहेत, अशी तक्रार त्यांची होती. परंतु इंदिरा गांधींनी त्यांच्या प्रश्नाला इतके महत्व दिले नाही.
त्यांनी स्वतःच्या पक्षाच्या त्यावेळीच्या सर्वात शक्तिशाली नेत्याच्या विरोधात बोलताना मागचा पुढचा विचार केला नाही. अगदी शेवटपर्यंत त्या धार्मिक भेदभावाच्या राजकारणाविरोधात लढत होत्या.
१९८४ साली शीख दंगलीचा भडका उडाला त्यावेळीदेखील अत्यंत कठोरपणे त्यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली होती.
आपल्या खासदार म्हणून असलेल्या कारकिर्दीत ही त्या महिला हक्कांसाठी सदैव लढत राहिल्या. त्यांनी पुरुषांना दुसरा विवाह करण्याचा अधिकार देणाऱ्या कायद्याविरोधात आवाज उठवत स्त्रियांची पिळवणूक थांबवण्यासाठी सरकारला विनंती केली.
त्यांच्याच प्रयत्नातून भारतीय विवाह कायदा अस्तित्वात आला, यामुळे स्त्रियांच्या हक्कांचे रक्षण झाले आणि एकापेक्षा अधिक विवाह करणाऱ्या नवऱ्याला शिक्षेची तरतूद करण्यात आली.
त्यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण, संस्थांनिकांना दिला जाणारा भत्ता रद्द करण्यासाठी पण मोठे प्रयत्न केले. इतकंच नाही, दोन धर्मात तणाव वाढवणाऱ्या शक्तींवर कारवाई करणारा कायदा देखील त्यांनीच पारित करून घेतला होता. त्या धार्मिक हिंसाचाराचा विरोधात कायम प्रयत्नशील होत्या.
पुढे त्यांच्यावर रशियन एजंट असल्याचा आरोप सातत्याने केला जाऊ लागला. त्यांच्या परिवाराने हे सर्व खोटे असल्याचे सांगून देखील त्यांच्यावर सतत आरोप होत राहिले.
अशा आरोपांमुळे त्यांनी भारतीय राजकारणातून संन्यास घेतला आणि २००३ साली त्यांचा मृत्यू झाला.
भारतात धार्मिक सद्भावना कायम राहावी यासाठी त्या आजन्म प्रयत्नशील होत्या. धर्मांमुळे होणाऱ्या भांडणांच्या विरोधातील त्यांचा लढाईनेच त्यांना इतिहासात मोठे स्थान प्रदान केले आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.