आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
काही दिवसांपूर्वी टीव्हीएफची ‘ॲस्पीरन्ट्स’ नावाची एक बेवसिरीज आली. दिल्लीतील राजेंद्र नगरमध्ये राहून युपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांचं आयुष्य यात दाखवण्यात आलं. या सिरीजमध्ये ‘संदीप भैय्या’ नावाचं एक पात्र आहे. नवीन आलेली मुलं अभ्यासासाठी त्याचा सल्ला घेतात. मात्र, अनेकदा प्रयत्न करूनही भैय्याला यश मिळत नाही आणि शेवटी त्याला एका लहान हुद्द्याची नोकरी स्विकारावी लागते. या संदीप भैय्याकडं प्रचंड ज्ञान असतं मग घोडं अडतं कुठं? तर याचं उत्तर सिरीजमध्येच मिळतं. एक डायलॉग आहे, ‘पोस्ट काढण्यासाठी फक्त कष्टचं नाही तर नशीबाची देखील साथ लागते’. संदीप भैय्याच्या बाबतीतही तेच झालं होतं.
या संदीप भैय्यासारखाच एक क्रिकेट खेळाडू आपल्याकडे होऊन गेला आहे. या खेळाडूनं आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात एक-दोन नाही तर पाच विकेट्स घेतल्या होत्या. अशी गुणवत्ता असलेला खेळाडू फक्त दोनच कसोटी सामने खेळू शकला, असं जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही याला काय म्हणाल? कमनशिबी?
वामन विश्वनाथ कुमार नावाचा हा खेळाडू अचूक लाइन लेंथवर फिरकी गोलंदाजी करण्यात माहीर होता. वामन कुमारला सुभाष गुप्तेंचा उत्तराधिकारी म्हटलं जाई. २२ जून १९३५ रोजी जन्मलेल्या वामन कुमार यांनी १९६१ साली भारतासाठी फक्त दोन कसोटी सामने खेळले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये कमालीची उत्कृष्ट कामगिरी असूनही कुमार यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द बहरू शकली नाही. याच कारणामुळं त्यांना देशातील सर्वात दुर्दैवी क्रिकेटपटू मानलं जातं.
वामन कुमार यांच्या क्रिकेट कारकिर्दीचा आढावा घेतला असता, दोन कसोटीच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीच्या शापामागे एक यशस्वी रणजीपटू झाकोळून गेल्याचं लक्षात येतं.
असं म्हणतात रणजी क्रिकेटमध्ये खेळाडूचा कस लागतो. जो खेळाडू रणजीमध्ये चांगली कामगिरी करतो, त्याच्या क्षमतेवर शंका घेण्यास जागाच नसते. वामन कुमार देखील असेच कसलेले गोलंदाज होते. रणजी क्रिकेटमध्ये सर्वात अगोदर ३०० आणि ४०० बळी मिळवणारे ते पहिले गोलंदाज होते. रणजी क्रिकेटमध्ये कुमार यांनी १८.१४ च्या कमालीच्या सरासरीनं एकूण ४१८ बळी मिळवले होते. याशिवाय १२९ सामन्यांच्या प्रथम श्रेणी कारकीर्दीत त्यांनी १९.९८ च्या सरासरीनं ५९९ बळी घेतले.
वामन कुमार मद्रासच्या (तामिळनाडू) संघाकडून क्रिकेट खेळायचे. कुमार आणि श्रीनिवास वेंकटराघवन ही गोलंदाजांची जोडगोळी मद्राससाठी अतिशय फायद्याची ठरली होती. ६०च्या दशकाच्या सुरुवातीला श्रीनिवास वेंकटराघवनच्या आगमनामुळे कुमारला देशांतर्गत क्रिकेटमध्ये सक्षम जोडीदार मिळाला होता. आपल्या या साथीदाराबाबत कुमार यांनी अनेकदा भरभरून स्तुती केलेली आहे. कुमार यांच्या मते, वेंकटराघवन एक रणनीतिकार होता. गोलंदाजी करण्याअगोदर आम्ही नेहमी एकमेकांना सल्ले द्यायचो. बहुतेकवेळा त्याचाच प्लॅन कामी येत होता, असं कुमार यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं.
१९६०-६१च्या रणजी हंगामामध्ये अप्रतिम कामगिरी केल्यानंतर १९६१ मध्ये वामन कुमार यांच्यासाठी मुख्य भारतीय क्रिकेट टीमचे दरवाजे खुले झाले. आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत दौऱ्यावर येणार होता. त्यांच्याविरुद्ध निवडलेल्या भारतीय संघात वामन यांना संधी मिळाली. दिल्लीमध्ये खेळवलेल्या कसोटी सामन्यात वामन कुमारनं कसोटीत पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यांनी आपली गुणवत्ता सर्वांना दाखवून दिली.
या सामन्यात त्यांनी एकूण सात विकेट्स घेतल्या होत्या. पहिल्या डावात ६४ धावा देऊन पाच तर, दुसऱ्या डावात ६८ धावा देऊन दोन विकेट्स त्यांनी आपल्या नावे केल्या. विशेष म्हणजे त्यांना पहिली विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये मिळाली होती. पहिल्याच आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात ‘फाईव्ह विकेट हॉल’ मिळवणाऱ्या मोजक्या भारतीय गोलंदाजांमध्ये त्यांचा समावेश होतो. वामन कुमारच्या अप्रतिम गोलंदाजीमुळं भारतानं तो सामना आपल्या नावे केला.
या सामन्यानंतर, इंग्लंडविरुद्ध त्यांना आपला दुसरा सामना खेळण्याची संधी मिळाली. नोव्हेंबर १९६१ मध्ये इंग्लंड भारताच्या दौऱ्यावर आला होता. दोन्ही संघांदरम्यान मुंबईमध्ये खेळवल्या गेलेल्या कसोटी सामन्यात वामन कुमार यांनी गोलंदाजी केली होती. दुर्दैवानं हा त्यांच्या कारकीर्दीतील दुसरा आणि शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला. असं म्हटलं जातं या सामन्यापूर्वी वामन कुमार जखमी होते. मात्र, इंग्लिश फलंदाज फिरकीच्या माऱ्यापुढे माना टाकतात, हा विचार करून कुमारला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेण्यात आलं. मात्र, या सामन्यात त्यांना एकही विकेट मिळाली नाही. त्यानंतर पुन्हा त्यांना कधीच भारतीय संघात स्थान मिळालं नाही.
वामन कुमार यांच्याबाबतीत एक किस्सा तामिळनाडूच्या रणजी संघामध्ये आजही चर्चिला जातो. तामिळ मातृभाषा असलेल्या वामन कुमार यांचा आणि हिंदी भाषेशी छत्तीसचा आकडा होता. तरीदेखील पहिली कसोटी खेळल्यानंतर ते ‘दाग’ हा हिंदी चित्रपट पाहण्यासाठी थेटरमध्ये गेले होते. कारण तेव्हा चित्रपट सुरू होण्यापूर्वी चित्रपटगृहे बातम्या चालवत असत आणि त्यामध्ये कसोटी सामन्यातील क्लिप दाखवल्या जात. मोठ्या पडद्यावर स्वतःला गोलंदाजी करताना पाहण्याची संधी मिळावी म्हणून त्यांनी हिंदी चित्रपट पाहिला होता.
कुमारचा आणखी एक किस्सा तामिळनाडूचे माजी क्रिकेटपटू व्ही. रामनारायण यांनी सांगितला होता. चेन्नईतील एका क्लब सामन्यादरम्यान कुमार यांनी विकेटसाठी अपील केलं. मात्र, अंपायरनं विकेट दिली नाही. या प्रकारानं चकित झालेले वामन कुमारनं सरळ अंपायरला त्याच्या खाण्यावरून टोमणा मारला होता. लंचब्रेक दरम्यान जरा कमी दही-भात खात जा, असा टोला कुमारनं अंपायरला लगावला होता. त्यानंतर पुन्हा एकदा कुमारनं विकेटसाठी अपील केलं. यावेळी मात्र, बॅट्समन आऊट नसतानाही अंपायरनं विकेट मान्य केली होती!
वामन कुमार हे प्रसिद्ध बासरी वादक टी.आर. महालिंगम यांचे चाहते होते. महालिंगम यांच्या मैफिली चुकू नये म्हणून वामन स्वत: अनेक महत्त्वाच्या सामन्यांमधून बाहेर पडले होते! असा अतरंगीपणा करणारे ते कदाचित पहिलेच खेळाडू असावेत.
आता क्रिकेटमध्ये खेळाडूंना प्रचंड पैसा मिळतो. याशिवाय ते विविध जाहिराती देखील करतात. त्यामुळं त्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी नोकरी किंवा व्यवसाय करण्याची तितकी गरज भासत नाही. पूर्वी मात्र, परिस्थिती वेगळी होती. खेळाडूंना माफक मानधन मिळत असे. त्यामुळे अनेक क्रिकेटपटू स्थिर उपजीविकेसाठी कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत होते.
वामन कुमार यांनी देखील ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मध्ये (एसबीआय) नोकरी स्विकारली होती. १९८५ पर्यंत कुमार एसबीआयचे कर्मचारी होते. याशिवाय कुमार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) फिरकी शाखेचा एक भाग होते. बिशनसिंग बेदी आणि इरापल्लीप्रसन्नासारख्या इतर फिरकीपटूंसह त्यांनी नवोदित खेळाडूंना सल्ले देण्याचं काम केलं. कुमार यांनी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) देखील सात वर्षे घालवली.
आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्याला पुरेशी संधी मिळाली नाही म्हणून निराश न होता वामन कुमार यांनी स्थानिक क्रिकेटचा मनमुराद आनंद घेतला. आपल्यामध्ये गुणवत्ता आहे, याची त्यांना खात्री होती. ती येणाऱ्या पिढीला मिळाली म्हणून त्यांनी अनेक नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन केलं.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.रणजी क्रिकेटमध्ये कुमार यांनी १८.१४ च्या कमालीच्या सरासरीनं एकूण ४१८ बळी मिळवले होते.