आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
आफ्रिकेच्या केनिया आणि टांझानियातील जंगलांमध्ये राहणारी मसाई ही भटकी जमात आपल्या विचित्र रुढी, परंपरांमुळे जगभर प्रसिद्ध आहे. गेल्या ५ हजार वर्षांपासून ही जमात अस्तित्वात आहे. पशुपालन हा त्यांचा मुख्य व्यवसाय असून या जमातीमध्ये गायीला अनन्यसाधारण महत्व आहे. गौरक्षणासाठी जंगली प्राण्यांशी दोन हात करायलाही हा समुदाय घाबरत नाही.
या जमातीचे लोक खुप हिम्मतवान मानले जातात. केवळ एका भाल्याच्या साहाय्यानं ते जंगली प्राण्यांची सहज शिकार करतात. या प्राण्यांच्या तोंडचा घास पळवण्यातही ही लोक माहिर आहेत. या जमातीतील पुरुषांना लग्न करायचं असल्यास एका कठीण परीक्षेस सामोरे जावे लागते. जंगलात शस्त्रास्त्रांशिवाय एखाद्या जंगली प्राण्याची शिकार केली, तर आणि तरच या पुरुषाला मुलगी देण्यास वधूपक्ष तयार होतो. अशाप्रकारे लग्न जुळल्यानंतर वरपक्षाकडून वधूपक्षाला कमीतकमी ३० गायी आंदण म्हणून दिली जातात.
त्यांच्या या परंपरेमुळे जंगली प्राण्यांच्या शिकारीचं प्रमाण वाढल्यानं तेथील सरकारची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परंपरांपासून त्यांना परावृत्त करण्यासाठी आणि त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारची धडपड सुरु आहे.
घरातील सर्वात वृद्ध व्यक्ती कुटुंबासंबंधी सर्व महत्वाचे निर्णय घेतो. घरातील अविवाहितांना हे निर्णय मान्य करावे लागतात. लग्नानंतर मात्र त्यांचे निर्णय घ्यायला त्यांना स्वातंत्र्य दिलं जातं. लग्नानंतर दाम्पत्याला त्यांचं वेगळं घर थाटावं लागतं. त्यासाठी त्यांच्या कुटुंबांकडून पशुधन दिलं जातं.
मसाई जमातीची वेशभुषादेखील मोठी आकर्षक असते. पुरुष कमरेला लुंगीसारखं लाल किंवा भगव्या रंगाचं वस्त्र गुंडाळतात. त्यावर विविध रंगाच्या शालीसारखा प्रकार खांद्यावर घेतला जातो. हातात भाला, काठी आणि कमरेला धारदार सुरा बांधलेला असतो. तर स्त्रिया खांद्यावरुन पदर घेऊन वस्त्र गुंडाळतात. गळ्यात, हातात मण्यांचे मोठमोठे अलंकार त्या घालतात. मसाई जमातीतील अनेक पुरुष आणि स्त्रियांचे कान या अलंकारांच्या वजनानं फाटून लोंबकळताना दिसतात.
आपल्याला जर वाटेत कुणीतरी भेटलं तर आपण रामराम, नमस्कार करतो किंवा त्यांच्याशी शेक हँड करतो. मात्र, या जमातीतील लोक जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा चक्क थुंकतात. आपल्या आजूबाजूला जर कोणी थुंकलं तर आपल्याला किळस वाटते. मात्र, थुंकणं हा प्रकार देखील त्यांच्या परंपरेचा एक भाग आहे. या जमातीत लोक नवजात बाळांना आशिर्वाद थुंकुन देतात. एवढंच काय लग्नात वडील मुलीच्या माथ्यावर थुंकण्याची विचित्र प्रथा देखील या जमातीत आहे.
या जमातीतील लोक जनावरांचं रक्त पितात. गायीच्या मानेवर बाण मारुन हे रक्त एका बाटलीत जमा केलं जातं. गायीच्या जखमेवर झाडपाल्याचं औषध लावून तिला रानावनात सोडून दिलं जातं. काही वेळा तर गायीची सरसकट कत्तलही केली जाते. त्यानंतर सर्व लोक एकत्र येत हे रक्त पितात. जनावरांचं रक्त प्यायल्यानं रोगप्रतिकार शक्ती वाढते, असा या जमातीचा समज आहे. याशिवाय नशा उतरवण्यासाठी देखील जनावरांच्या रक्ताचं सेवन केलं जातं.
जंगल परिसरात हे लोक झोपड्या बांधून राहतात. गोलाकार मोठ्या कुंपणाच्या कडेने माती, शेण आणि गवताच्या साहाय्यानं झोपड्या उभारतात. या झोपड्यांवर घट्ट विणलेल्या गवताचं छप्पर असतं. या झोपड्यांशेजारी गायी, गुरांसाठी गोठे असतात. मसाई हाच या लोकांचा धर्म. आजच्या या आधुनिक युगात प्राचीन परंपराचं जोखड आपल्या खांद्यावरुन आजही उतरवायला ते तयार नाहीत.
मसाई स्त्रियांचं आयुष्य अत्यंत कष्टाचं असतं. बाळंतपणाच्या चक्रातच या स्त्रियांचं बहुतांश आयुष्य सरुन जातं. त्यामुळे या स्त्रिया तर कुपोषीत राहतातच शिवाय त्यांची अपत्यही कुपोषित जन्माला येतात. या समाजात बालमृत्यूचं प्रमाणही अधिक आहे. जितकी अधिक मुलं आणि पशु, तेवढंचं ते कुटुंब श्रीमंत मानलं जातं. या समाजात घटस्फोट होत नाहीत. त्यामुळे स्त्री पुन्हा लग्न करु शकत नाही. याउलट पुरुषांना अनेक लग्न करण्याची मुभा आहे.
या समाजात मुलींबाबत एक अघोरी प्रकार केला जातो. ११ ते १३ या वयातील मुलींचा खतना केला जातो. हे काम इतर स्त्रिया धारदार शस्त्रानं कुठलीही भुल न देता करतात. हे करताना जी मुलगी ओरडली तर तिला भित्री समजली जाते. यामुळे जंतुसंसर्ग आणि अतिरक्तस्त्राव होऊन कित्येक मुलींना जीव गमवावा लागतो. लग्नानंतर मुलगी तिच्या माहेरी कधीच परतत नाही. लग्नानंतर घरी परत आल्यास ती दगडाची बनते, अशी भाकडकथा या लोकांमध्ये आहे.
जंगलांमध्ये राहणारा हा समाज सरकारी नियम आणि न्यायव्यवस्था मानत नाही. त्यांचे स्वत:चे नियम आणि कायदे आहे, ज्याचं ते काटेकोरपणे पालन करतात.
टांझानियामध्ये मसाई, माकोन्डेय आणि मनाती या ३ मुख्य आदिवासी जमाती आहेत. ५० वर्षांपूर्वीपर्यंत या तीनही जमाती एकमेकांचे कट्टर शत्रु होते. एका जातीचा व्यक्ती दुसऱ्या जातीच्या प्रदेशात चुकुन जरी शिरला तरी त्याला जीवे मारलं जाई. त्या व्यक्तीचं मुंडकं विजयाचं प्रतिक समजून गावाच्या बाहेरच्या सर्वात उंच झाडाला टांगलं जाई.
अनेक धर्मांमध्ये अंत्यविधी अतिशय महत्वाची मानली जाते. मृतदेहावर योग्य प्रकारे अंत्यसंस्कार न केल्यास आत्म्यास मुक्ती मिळत नाही, असा समज आहे. प्रत्येक जाती, धर्माच्या मान्यतेप्रमाणे अंत्यविधी केला जातो. मात्र, अंत्यविधीची ही पद्धतच या समाजात अस्तित्वात नाही. एखाद्या मसाईचा मृत्यू झाल्यास त्याला गाडलं किंवा जाळलं जात नाही. त्या व्यक्तीचा मृतदेह उघड्यावर सोडून दिला जातो. मृतदेह गाडल्यानं जमीन खराब होते, असा या लोकांचा समज आहे.
मसाई समाजातील या चित्रविचित्र प्रथांमुळे हा समाज आधुनिक जगापासून अजूनही कोसो दूर आहे. विकासाच्या नावावर झाडांच्या कत्तली होत असताना हजारो वर्षांपासून निसर्गासोबतचं घट्ट नातं हा समाज टिकवून आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.