आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारत दोन बलाढ्य सत्तांशी झुंझत होता. एक होती वसाहतवादी, साम्राज्यवादी, ब्रिटीश सत्ता आणि दुसरी देशातील अमावानीय रूढींचे समर्थन करणारी धर्मसत्ता.
केवळ हिंदू धर्मातील जाती व्यवस्थेत खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीत जन्माला आल्यामुळे मंदिर आणि धर्मस्थळांच्या ठिकाणी प्रवेश दिला जात नव्हता. कोणीही शुद्र जातीतील मनुष्य मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा विचारही करू शकत नव्हता. फक्त मंदिरामध्ये जाण्याचाच नाही तर या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरून चालण्यासही त्यांना मनाई होती.
फक्त खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीत जन्मणे हाच गुन्हा मानल्या जायचा. चुकून जरी कोणी अस्पृश्य मंदिराच्या रस्त्यावरून चालताना दिसला तर, त्याला जबर शिक्षा केली जात असे.
अस्पृश्यांना दिली जाणारी ही हीन वागणूक आकलनापलिकडची आहे. अशा प्रकारे एखाद्याच्या मानवी अधिकारावर गदा आणण्याचे हे कृत्य लज्जास्पद नव्हे काय? पण, धर्माच्या नावावर अशा हीन कृत्याचेही समर्थन केले जात होते.
केरळमध्ये अस्पृश्यांना दिल्या जाणाऱ्या या अमानुष वागणुकीचा तर स्वामी विवेकानंदांनीही कठोर शब्दात निषेध केला होता. स्वामी विवेकानंदांनी तर अशा अघोरी प्रथेचे पालन करणारे केरळ राज्य म्हणजे वेड्यांची धर्मशाळा असल्याचे म्हटले होते.
हिंदू धर्मातील ही प्रथा नष्ट करण्यासाठी १९२४ साली म्हणजे सुमारे ९६ वर्षापूर्वी एक आंदोलन करण्यात आले. या आंदोलानाने भारताचे भविष्य बदलून टकले. ९६ वर्षापूर्वी करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे भारताचे भविष्यच बदलून गेले.
आपण आपल्याच जाचक, अन्याय्य सामाजिक प्रथांपासून मुक्त झाल्याशिवाय आपण साम्राज्यवादी शक्तींशी लढण्यासाठी सक्षम होणार नाही, हे पटवून देण्यात या आंदोलनाने यश मिळवले. ब्रिटिशांविरोधात लढण्यासाठी आधी या दुष्ट सामाजिक प्रथांचे बंधन झुगारून देणे खूप महत्वाचे होते.
त्रावणकोर येथील वायकोम या गावी पहिल्यांदा अस्पृश्यतेच्या कलंकित प्रथेला मूठमाती देण्यासाठी मंदिर प्रवेशाचे आंदोलन करण्यात आले. अस्पृश्यांच्या आणि इतर वंचित समूहाच्या हक्काच्या मागणीसाठी केलेले हे देशातील पहिले आंदोलन होते.
देशाभिमानी या मल्याळम वृत्तपत्राचे संपादक टी. के. माधवन् यांनी हे आंदोलन करण्यासाठी पुढाकार घेतला होता. टी. के. माधवन् हे केरळमधील अग्रणी समाजसुधारक होते. त्यांनी कोणत्याही प्रकारचा जात-धर्म-लिंगाधारित भेदभाव न करता सर्वांना मंदिर प्रवेश करण्याचा अधिकार मिळावा यासाठी संमती मिळावी म्हणून त्रावणकोरच्या विधिमंडळात म्हणजेच श्री मूलम प्रजा सभेत १९१८ साली पहिल्यांदा प्रस्ताव सादर केला. त्यांनी त्याकाळात उचलेले हे पाऊल अत्यंत धाडसाचे होते असेच म्हणावे लागेल.
त्यांच्या या प्रस्तावावर सवर्ण हिंदुच्या समितीत प्रचंड टीका झाली. त्यानंतर माधवन यांनी १९२३ साली काकिनाडा येथे कॉंग्रेसची राष्ट्रीय सभा भरवण्यात आली तिथे हा प्रस्ताव मांडला. राष्ट्रीय कॉंग्रेसच्या सभेत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
शिवाय या आंदोलनाला राष्ट्रीय स्तरावरून पाठींबा दर्शवण्यात आला. या सभेत केरळच्या विविध भागातून आलेल्या लोकांनी एक समिती स्थापन केली. या समितीचे अध्यक्ष होते के. केलाप्पन, या समितीत माधवन, वेलायुधा मेनन, के. पी. केशव मेनन, के निलाकांतन नाम्बुर्थी आणि टी आर कृष्णास्वामी अशी मोठमोठी नावे होती.
या सर्व सत्याग्रहींनी मिळून फेब्रुवारी १९२४ मध्ये “केरळा पर्यटनम” नावाची संघटना स्थापन केली. मंदिरात प्रवेश देताना जातीधारित भेदभाव केला जातोच पण मंदिराच्या रस्त्यावरून जाण्यासाठीही असाच भेदभाव केला जातो.
मंदिरात प्रवेश करण्यासाठी नाही पण, किमान या रस्त्यावरून जाण्या-येण्यासाठी तरी या मंदिर समितींनी विरोध करू नये. सर्वांसाठी मंदिराचे हे रस्ते खुले झाले पाहिजेत, यासाठी आंदोलन पुकारण्याचा या संघटनेने निश्चय केला.
याकाळात सर्व सवर्ण हिंदू माधवन यांच्यावर कठोर टीका करत होते. मात्र महात्मा गांधींनी माधवन यांच्या या कार्याला पाठींबा दिला. १९२१ साली तिरुनेलवेली येथे कॉंग्रेसची एक बैठक भरली होती.
त्या बैठकीत गांधींनी केरळमध्ये मंदिर प्रवेश सत्याग्रह करण्यास अनुमती दिलीच शिवाय, केरळमधूनच मंदिर प्रवेश आंदोलनाची सुरुवात केली जावी असेही गांधीजी म्हणाले.
परंतु हे आंदोलन शांततेच्या, अहिंसेच्या मार्गानेच झाले पाहिजे असा, गांधीजींचा आग्रह होता. सत्याग्रह योग्य मार्गाने हाताळल्यास जलद न्याय मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या सत्याग्रहासाठी पहिल्यांदा वायकोम येथील महादेव मंदिराची निवड करण्यात आली कारण या मंदिराच्या मंदिर प्रवेशासाठीच्या अटी आणि नियम फारच कडक होते.
मार्च ३० रोजी दलित समुदायातील लोक गटागटाने मंदिर प्रवेश करण्यासाठी जमू लागले. लोक समूहाने मंदिराकडे प्रवेश करण्याच्या हेतूने जाऊ लागले. त्यांना मंदिर प्रवेश करता येऊ नये यासाठी बॅरीकेड्स लावण्यात आले होते. पोलिसांची फौजही होती.
हे सत्याग्रही शांततामय मार्गाने मंदिराकडे कूच करत होते आणि शांततेने चाललेल्या या सत्याग्रहींवर पोलीस लाठीचार्ज करत होते. त्यांना पकडून तुरुंगात टाकत होते.
परंतु या आंदोलनाला महत्मा गांधी, चट्टंपी स्वमिकाल आणि श्री नारायण गुरु यासारख्या मोठ्या व्यक्तींनी पाठींबा दिल्यामुळे या आंदोलनाला देशभरातून मोठ्या प्रमाणात समर्थन मिळू लागले.
वायकोम येथील सत्याग्रहींना देशभरातून मोठ्या प्रमाणातून पाठींबा आणि समर्थन मिळू लागले. देशभरातील आणि वेगवेगळ्या धर्मातील अनेक लोक या आंदोलाना पाठींबा देण्यासाठी वायकोम येथे जमू लागले.
सत्याग्रहींना समर्थन देण्यासाठी आकालीस यांनी वायकोम येथेच एक राहुटी बांधली आणि सातत्याने पुढे चाललेल्या सत्याग्रहींना त्या जेवण बनवून पुरवू लागल्या. मंदिर समिती आणि आंदोलकांमध्ये मंदिराचे दरवाजे उघडण्यावरून चर्चा सुरु झाली. तेंव्हा गांधींनी सत्याग्रहींना काही काळ आंदोलन स्थगित करण्याचा सल्ला दिला. परंतु या चर्चेतून काहीही सध्या झाले नाही. सवर्ण लोक थोडीदेखील तडजोड करायला तयार नव्हते.
मग आंदोलनाला पुन्हा नव्या जोमाने सुरुवात करण्यात आली. यावेळी फक्त सत्याग्रहींनाच नाही तर वायकोम सत्याग्रहाला पाठींबा दर्शवण्यासाठी झेंडे घेऊन उभ्या असलेल्या सर्व लोकांना पोलिसांनी अटक करण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी माधवन आणि केशव मेनन यांनाही अटक केली. इ. व्ही. रामास्वामी आणि पेरियार हे देखील तामिळनाडूतून वायकोम येथे या आंदोलनाला पाठींबा दर्शवण्यासाठी दाखल झाले. पोलिसांनी त्यांना देखील डांबून तुरुंगात टाकले.
१ ऑक्टोबर १९२४ रोजी सवर्ण समाजातील काही लोकांनी या आंदोलनाला पाठींबा दर्शवण्यासाठी एक मोर्चा काढला. या मोर्चात सामील झालेल्या लोकांनी त्रावणकोरच्या महाराणी सेतुलक्ष्मी यांच्याकडे एक निवेदन सादर केले.
या निवेदनाद्वारे त्यांनी शुद्र, अस्पृश्य समजल्या गेलेल्या हिंदू धर्मातील या लोकांना मंदिर प्रवेशाचा हक्क मिळावा यासाठी त्यांना विनंती करण्यात आली होती. या निवेदनावर सुमारे पंचवीस हजार लोकांनी सह्या केल्या होत्या.
या मोर्चाचे नेतृत्व मान्नाथू पद्मनाभन हे करत होते. सुरुवातीला फक्त ५०० लोकांनी एकत्र येऊन या मोर्च्याला सुरुवात केली. परंतु, रस्त्यात अनेक लोक येऊन स्वतःहून सामील झाले. वायाकोममधून निघालेला हा मोर्चा तिरुअनंतपुरम येथे पोहोचेपर्यंत नोव्हेंबर महिना उजाडला होता. या मोर्च्यात तोपर्यंत ५००० लोक सामील झाले होते.
हा सत्याग्रह सलग ६०९ दिवस सुरु होता. परंतु यातून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. जात वर्चस्व आणि जातीधारित शोषणाविरोधात पुकारलेले हे पहिलेच अहिंसक आंदोलन होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्याला याच आंदोलनातून योग्य तो रस्ता सापडला.
आणखी एक वर्षभर वायकोम येथील हा लढा असाच सुरु राहिला. एका वर्षानंतर मंदिराचे दरवाजे अस्पृश्यांसाठी खुले करण्यात आले असले तरी, पूर्वेकडील दरवाज्यातून त्यांना प्रवेश निषिद्ध करण्यात आला.
काही झाले तर केरळ राज्यातील शोषित समुदायाने ही लढाई जिंकली होती.
१९२८ साली मात्र सर्व मागासवर्गीयांना त्रावणकोर संस्थानातील मंदिराचे दरवाजे खुले करण्यात आले. जातीधारित वर्चस्ववादाला मूठमाती देण्याच्या ऐतिहासिक कार्याचा पाया या आंदोलनानेच रचला होता.
वायाकोम सत्याग्रहाकडे आज भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक मैलाचा दगड म्हणून पहिले जाते. या आंदोलनाला दिशा देणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात सत्याग्रहींविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.