आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
युट्युबवर किंवा सावन वर “rain songs” असं सर्च केलं की लगेच पावसाचा फील वाढवणाऱ्या गाण्यांची यादीच हाती लागते. मग बाहेर पाऊस, आत खिडकीत तुम्ही, चहाचा कप, मग त्याचा फोटो स्टेटसला टाकणे, असं सगळं करत असताना ते पावसातलं गाणं तुम्हाला साथ देत असेल. अशीच एक यादी पावसात शूट केलेल्या सिनेमातील सीन्सची, किंवा ज्या कथेत पाऊस हेच एक पात्र आहे, अशा सीन्सचीसुद्धा असावी ना.
माणूस नेहमी आपल्यासारख्या एका समांतर जगात डोकावण्यासाठी आतुर असतो. त्यात सिनेमा तर तसं एक आभासी वास्तवच निर्माण करतो. आता चांगलाच पाऊस सुरू झालाय. आमच्या मराठवाड्यात म्हणतात तसं 2-3 दिवस “झडगं” लागतंय.
त्यानिमित्ताने पावसाळ्याचं समांतर विश्व उभं करणारे, पावसाचे अनेक पैलू उलगडणारे, काही सिनेमे आणि सीन्स यांची एक यादी तयार करण्याचा प्रयत्न करूयात.
1) पावसाची ठोकळेबाज रोमँटीक प्रतिमा :
बाघीमध्ये श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ भेटतात तेव्हा नेहमीच पाऊस पडतो, मग ते नाचतात वगैरे. पावसाचं असं असंबंध रोमँटिक व्हर्जन आपल्याला नवीन नाही. बॉलिवूडमध्ये पार मोहोब्बत बरसा देना तू सावन आया है पासून तर कोई लाडका है, जब वो गाता है सावन आता है, टीप टीप बरसा पानी, लगी आज सावन की फिर बोझडी है, असं बरंच मागे गेलं तरी खूप गाणे सापडतात.
जसं की पावसाच्या थेंबांसोबत अचानक प्रेम ढगातून पडतं आणि सगळंच रोमँटिक होऊन जातं, बॅकग्राऊंड डान्सर पण ढगातून पडतात, वगैरे वगैरे. पावसाने प्रेम सूरु होतं किंवा पावसात प्रेम वाढतं हे सांगणारे कित्येक चांगले गाणे आपल्याला युट्युबवर सापडतात.
पण या सगळ्यात दाखवलेला पाऊस कृत्रिम वाटतो. यातली दृश्य पावसासारखी प्रवाही, नैसर्गिक वाटतील अशी नसतात. म्युजिकमध्ये पण अपेक्षित ओलावा नसतो, ड्रमवर काडी हळू फेकली की पावसाच्या थेंबाचा आवाज येतो याच एका सूत्रात सगळं घट्ट बांधल्यासारखं.
पण याला ए आर रेहमानच्या कृपेने दोन सुंदर अपवाद आहेत. ताल सिनेमातलं पहिलंच गाणं – ताल से ताल मिला. गाण्यातला कोरस ढगांचा-विजेचा असतो तशा मोठ्या आवाजाचा तर सतार थेंबांच्या लयीचा परिणाम तयार करतात. पांढऱ्याशुभ्र कपड्यात ऐश्वर्या भयंकर सहजतेने पण बघत राहावं नाचत असते.
उगाच फॅन म्हणून म्हणून स्तुती करायची झाली तर, जणू पाऊस तिच्यासोबत नाचत असतो. आणि हे सगळं बघून अक्षय खन्नाचं पात्र तिच्या प्रेमात पडतं. कॅमेरा घेऊन तिला फॉलो करत असताना त्याच्या डोळ्यात प्रेम सोडून कुठलीही अश्लील भावना नसते असा आदर्शवादी विचार पटवून देणारा त्याचा तो दमदार अभिनय.
ऐश्वर्याचं आणि निसर्गाचं सौंदर्य नीट हेरण्याचं काम केलंय कबीर लाल यांनी, ज्यांनी कल हो ना हो आणि परदेस यांसारखे सिनेमे शूट केलेत.
खरंतर पावसात नाचण्यात ऐश्वर्यालाच विशेष रस असावा, तिला ते शोभूनही दिसतं. कारण ताल नंतर गुरू सिनेमातलं ऐश्वर्याचं “बरसो रे मेघा मेघा” हे गाणं खूप प्रसिद्ध झालं. पावसाचा आनंद घेताना या गाण्यातूनच तिचं पात्रं सिनेमात एस्टेब्लिश होतं. असं सिनेमातल्या पावसाचं आणि ऐश्वर्याचं एक विशेष नातं आहे.
याव्यतिरिक्त “वजीर” सिनेमात सुरुवातीलाच अगदी काही सेकंदासाठी दाखवलेला पाऊसही लक्षात राहील इतका छान दाखवला आहे. मुलगी बघायचा कार्यक्रम, तिथून त्यांच्या आयुष्याची होणारी सुरुवात याला पावसामुळं एक पावित्र्य आल्यासारखं वाटत.
2) भावना आणखी गडद करणारा पाऊस :
सिनेमा समृद्ध होत गेला तसा पावसाचा उपायोग रोमान्स दाखविण्यासोबतच एखाद्या भावनेचा प्रभाव वाढवायलाही होऊ लागला. उदाहणार्थ “आशिकी 2″मधला सुप्रसिद्ध जॅकेटचा सिन. सिनेमात तो प्रसंग येईपर्यंत ते दोघेही बऱ्याचदा ज्या गोष्टीपासून पळाले, ती गोष्ट त्यांच्यासमोर येते, आणि ते एकमेकांना सरेंडर करतात. या सगळ्यातला त्यांचा भावनिक गोंधळ अजून नीट सादर करायला पावसाचं वातावरण मदत करतं.
तसंच होतं “3इडियट्स”मध्ये. जेव्हा एक होतकरू विज्ञानप्रेमी विद्यार्थी सिस्टिमला, प्रचार्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करतो तेव्हा त्याच्या अंत्यविधीच्या वेळी रँचो प्राचार्यांना ही घुसमट बोलून दाखवतो. हाच सिन बिनपावसाचा शूट केलाय अशी कल्पना करून बघा, त्या सीनचा परिणामच अर्धा होईल. असं परिणाम वाढवायला पावसाचा वापर बऱ्याच सिनेमांत आहे.
मारामारीवाल्या दाक्षिणात्य सिनेमांत फायटिंग जास्त इंटेस करायला पाऊस वापरतात. उदा. रावडी राठोड मधला सिन सगळ्यांना आठवत असेलच. “केजीएफ”मधलं विश्व अजूनच गूढ करणारा सिन (ज्यात शेट्टी रॉकीला धमकी देऊन फसतो) पावसात शूट केला आहे.
बाहुबलीच्या पहिल्या भागात पावसाचा खूप हुशारीने वापर केला गेला. बाहुबलीच्या मुलाचा खून करण्यासाठी मागावर असणाऱ्या सैनिकांपासून शिवगामी त्याला स्वतःचे प्राण देऊन वाचवते, तेव्हा पाऊस सुरू असतो. आणि पहिल्या भागाच्या मध्यात शिवा हाच बाहुबलीचा मुलगा आहे असं जेव्हा कट्टपाला समजतं तेव्हाही पाऊस पडत असतो.
एकार्थाने अमरेंद्र बहुबलीच्या दोन्ही नाट्यमय पुनर्जन्माच्या वेळी पाऊस दाखवून एक प्रकारचं साधर्म्य फील होतं आणि त्याचा प्रभाव वाढतो.
“तुंबाड” सिनेमातले पावसातले सीन्स तर आदर्श म्हणून बघितले पाहिजेत असे आहेत. निर्मात्यांना विशिष्ट प्रकारच्या ढगांसाठी महिनाभर सेट लावून वाट बघावी लागली होती. या सिनेमात हॉरर टिकविण्यासाठी पाऊस सगळ्यात महत्वाची भूमिका पार पाडतो. कारण अचानक वाड्याबाहेर पडलो, सगळं भडक वातावरण दिसलं असतं ते तो एवढा काळ टिकवलेला फील गेला असता. भयकथांत पाऊस अडकल्याची भावना आणतो, “काँज्युरिंग” सिनेमात हे आपण बघू शकतो.
3) पावसाला पात्रं म्हणून वापरताना…
“वेक अप सिड”मधल्या सिडला फायनली कळतं की काही तरी चुकतंय ते, नेमकं काय आहे आणि आयेशा मॅगझीनमधल्या लेखातून त्याला प्रपोज करून त्याची वाट बघत असते. त्याच सकाळी पहिला पाऊस पडतो. दोघांनाही माहीत असतं की ते यावेळी कुठं असतील.
मरिन ड्राइव्हला दोघे पहिल्या पावसात, मुंबई आणि समुद्राच्या बॅकग्राऊंडवर एकमेकांना मिठी मारतात.
तेव्हा पावसाने तो क्षण साजरा होतो. आता पर्यंतचा अबोला त्यात धुवून निघतो.
तर लगानमध्ये पाऊस पडला नाही म्हणूनच ती गोष्ट घडते. त्यातल्या लोकांचं अस्तित्वच पावसावर आधारलेलं असतं. पावसामुळं मूलभूत लोकजीवनावर काय परिणाम होतो हे सांगणार प्रसिध्द गाणं “घनन घनन” आपल्याला या सिनेमामुळेच ऐकायला मिळालं.
नंदिता दास मुख्य भूमिकेत असणाऱ्या “बिफोर द रेन्स” या सिनेमातली कथा नावाप्रमाणेच पावसाआधी घडते, आणि क्ल्यामॅक्सला पाऊस सगळे गुंते सोडवतो.
मराठी सिनेमांना पाऊस दाखवणं हे कमी बजेट असल्याने परवडत नाही असं वाटतं. पण त्यामुळं आपण खऱ्या पावसात शूटिंग करून कुणालाही जमलं नाही तेवढ्या नीट पावसाला पात्र म्हणून वागवलं आहे.
आपणही पावसात हिरो हिरोईनला रोमान्स करताना दाखवलंय, “सैराट झालं जी” मधला विहिरीतला सिन सगळ्यांना आठवत असेलच. “पिंपळ” सिनेमात आयुष्यात प्रगती करायला बाहेर पडलेले गृहस्थ (दिलीप प्रभावळकर) म्हातारपणी स्वतःची मुळं शोधायला धरणाच्या भिंतीवर येऊन बसतात.
तिथं त्यांचे गुंते सुटतात, आयुष्य संपत असताना त्यांना नवी सुरुवात मिळते आणि पाऊस सुरू होतो, मागे डायलॉग ऐकू येतो – “मातीत वाढलोय ती शिळी होऊ देत नाही. पाऊस येतो, तो तसं होऊ देत नाही”.
किल्ला सिनेमात आईच्या बदलीने कंटाळलेला मुलाचा नव्या घरचा पहिला दिवस पावसामुळं अजूनच जास्त भावनिक कोंडलेपण तयार करतो. तिथून पुढे त्याच्या मनात घर करून असलेलं हे एकटेपण परमोच्च पातळीला जाईपर्यंत सिनेमात पाऊस असतो आणि नंतर बंद होतो.
खऱ्या लोकेशनवरचा, कोकणातला खरा पाऊस कथा गुंफण्यासाठी वापरला आहे. हा सिनेमा राष्ट्रीय-आतंरराष्ट्रीय स्तरावर खूप गाजला.
पण आतापर्यंतच्या नमूद केलेल्या सगळ्याच सिनेमांपेक्षा खूप पुढे जाऊन नागराज मंजुळे यांनी पावसाचा वापर मुख्य पात्रं म्हणून “पावसाचा निबंध” या त्यांच्या शॉर्ट फिल्ममध्ये केला आहे. तुमच्यासाठी नवचैतन्य आणणारा हिरव्यागार गालिच्यांचा पाऊस, पक्क छत नसणाऱ्या लोकांसाठी एक भीषण संकट आहे.
यात फक्त जात वेगळी असल्याने नशिबी येणारी गरिबी, व्यसनाधीन नवरा, रिकामे पिठाचे डबे आणि गळक्या झोपडीत अडकलेक्या एका परिवाराची ही कथा. पांढरपेशी समाजाने पावसाचं हे जे ग्लॅमरस रूप बिंबवलं आहे, ते नागराजने अत्यंत कलात्मक प्रकारे खोडून काढलं आहे. हा सिनेमा खऱ्या लोकेशनवर खऱ्या पावसात शूट केला आहे.
सिनेमॅटोग्राफर सुधाकर रेड्डीचे आपण यानंतर हार्ड कोर फॅन होतो, यांनीच सैराट, नाळ, देऊळ शूट केले आहेत. ऑडिओग्राफी, एडिटिंग सगळंच खूप उच्च दर्जाचं झालंय. पाहिजे तसा पाऊस येईपर्यंत वाट बघणे, सगळी टीम त्या पावसात कामाला लावणे हे सगळंच खूप भन्नाट आहे. तुम्ही हा “पावसाचा निबंध” झी फाईव्हवर बघू शकता.
या यादीत काही राहीलं असेल तर कमेंट करून नक्की कळवा!
या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.