आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
चीनमध्ये लोकांचा आवाज कसा दाबला जातो याच्या सुरस कहाण्या सांगितल्या जातात. आज या चीनने संपूर्ण जगाला कोरोना सारखी महामारी भेट दिली आहे. चीन मधले वूहान शहर जे या प्रकोपाला पहिल्यांदा बळी पडले होते त्याबाबतच्या अनेक खोट्या बातम्या या चायनीज सरकार ने प्रस्तुत केल्या आहेत.
आजही संपूर्ण जगाला संशय आहे के चीन वुहानची सत्य परिस्थिती दाबून ठेवत आहे. सरकारी आकड्यापेक्षा कितीतरी जास्त बळी कोरोनाने चीन मधून घेतलेले आहेत परंतु तेथील सरकारचा सोशल मिडिया, प्रिंट मिडिया, यांच्यावर चांगलच वचक असल्यामुळे खरी माहिती कधीही जगासमोर येत नाही.
चीनमध्ये आजही फेसबुक चालत नाही. तिथे ट्विटरला सुद्धा बंदी आहे. चीनच्या कम्युनिस्ट सरकारचा जुलमीपणा संपूर्ण जगाला ठावूक आहे. मात्र हे सरकार तिथे नक्की कशा प्रकारे काम करते हे कोणालाच माहित नाही. त्यासंदर्भातली खरी बातमी कधी बाहेर येत नाही.
मात्र इतिहास जर पहिला तर इतिहासात या चीनच्या सरकारने आपल्याच लोकांवर केलेला रक्तपात जगाने सगळ्यात पहिल्यांदा बघितला होता तो १९८९ मध्ये.
बीजिंग येथील तिआननमेन चौकात सरकार विरोधात निदर्शन करायला लोक जमले असताना तिथे जो निघृण रक्तपात घडला त्याबाबतच्या हकीकती जगभरातील लोकांपर्यंत पोहोचल्या आणि चीनचा खरा क्रूरकर्मा चेहरा लोकांच्या नजरेसमोर आला.
चीनमध्ये कम्युनिझमचा इतिहास हा रक्तरंजित आहे. तेथील अत्याचारांचा मेरुमणी म्हणता येईल अशी घटना म्हणजे १९८९ ची तिआननमेन चौकातली घटना होय.
चीन मधली जी आजची पिढी आहे त्या पिढीला सुद्धा या तिआननमेन चौकातील रक्तपाताविषयी जास्त माहिती नाही. याचे कारण या घटनेशी निगडीत प्रत्येक हकीकत चीनच्या सरकारने पुरेपूर दाबून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज ही चीनच्या लोकांसाठी ही घटना म्हणजे एक मोठे रहस्य होवून बसले आहे. या घटनेचा कुणीही सार्वजनिक आयुष्यात उल्लेख करू शकत नाही.
जर असा उल्लेख केलाच तर अशा माणसाला पकडून त्याला त्याबाबत शिक्षा करण्याचे अधिकार हे चीनचे सरकार स्वत:कडे राखून आहे. चीन मध्ये या घटनेबाबत नवीन पिढीला खरेखुरे ज्ञान व्हावे म्हणून शिकवणुकीचे वर्ग घेतले जातात. तिआननमेन मधील घटना ही कशी खोटी होती आणि सरकारची बदनामी करण्यासाठी कशा पद्धतीने ही घटना बाकी जगातील मिडीया पसरवते याबाबत चीनच्या लहान मुलांना अशा क्लासेस मध्ये सांगितले जाते.
तिआननमेन चौकात घडलेले हत्याकांड हे तिथल्या लोकांनी कम्युनिस्ट सरकारच्या विरोधात दीर्घकाळ चालवल्या गेलेल्या आंदोलनाचा परिणाम होता.
लोकांना हे कम्युनिस्ट सरकार नको होते. त्यांना या सरकार मध्ये चालणाऱ्या भ्रष्टाचाराचा कंटाळा आला होता. चीनच्या शेजारील देशामध्ये भारतामध्ये जशी लोकशाही राज्यव्यवस्था आहे तशी राज्यव्यवस्था त्यांना स्वत:च्या देशात हवी होती.
त्या काळात युरोपियन देशामध्ये असलेल्या कम्युनिस्ट सरकरच्या विरोधात पण असेच उठाव होत होते. वर्सोवा कराराच्या पार्श्वभूमीवर होणारे हे उठाव जगातून साम्यवाद उखडून टाकण्याची भाषा बोलत होते. चीन मध्ये उपोषण आणि आंदोलने या माध्यमातून लोक चीन मधील जुलुमी कम्युनिस्ट राजवटीचा निषेध करत होती.
तिआननमेन चौकातील घटनेच्या काही महिने आधीपासून चीनच्या विविध भागात लोक हरताळ, उपोषणे, बंद अशा विविध मार्गाने निषेध चालू होते. त्यातून ४ जूनच्या सुमारास अनेक लोकांनी तिआननमेन चौकामध्ये मोठ्या प्रमाणात एकत्रित होवून सरकार विरुद्ध निदर्शने केली होती.
मात्र या जमावावर चीन सरकरने मिलिटरीला गोळ्या घालण्याचे आदेश दिले. जवळ जवळ ५०० लोक जे या चौकात निदर्शानासाठी जमले होते ते गोळीबारामध्ये ठार झाले. तरीसुद्धा चीन सरकारने तिआननमेन चौकात मेलेल्या लोकांची आकडेवारी कधीही बाहेर येऊ दिलेली नाही हे विशेष.
या घटनेनंतर चीन मधील पत्रकारितेचे मात्र पूर्णपणे धिंडवडे काढण्यात आले. हॉंगकॉंग सह देशभरातील मिडीया वर कडक सेन्सॉरशिप बसवण्यात आली. मीडिया द्वारे या घटनेबद्दल देण्यात येणारी हर एक खबर दाबली गेली. वर्तमानपत्रे, वाहिन्या यांची कार्यालये बंद करण्यात आली. पत्रकार लोकांना सस्पेंड करून घरी पाठवण्यात आले.
या चौकातील एक बोलके छायाचित्र मात्र जगभरात प्रसिद्ध झाले. चौकातील आंदोलकांवर मिलिटरीचे रणगाडे चालुन येत होते तेंव्हा त्या रणगाड्या समोर उभा राहण्याची हिम्मत एका आंदोलकाने दाखवली होती. रणगाडा त्याला चिरडून पुढे गेला मात्र त्यापूर्वी घेण्यात आलेला त्याचा फोटो हा जगभरात ‘पिक्चर ऑफ टँकमॅन’ म्हणून गाजला.
जगभरात सरकारने आंदोलकांचे चिरडलेले उठाव प्रसिद्ध आहेत मात्र चीनच्या तिआननमेन चौकातला उठाव हा वेगळा का मानला जातो ते या टँकमॅनच्या फोटोकडे पाहून समजते.
मानवी आशा, उमेद, भावना आणि स्वतंत्र याला चिरडणारा रणगाडा हे या कौर्याचे प्रतीक बनून राहिले आहेत म्हणून हा उठाव सुद्धा इतिहासामध्ये काळ्या अक्षरांमध्ये लिहिला गेलेला आहे.
परंतु चीनने या इतिहासामधून काहीही धडा घेतलेला नाही. आजही हॉंगकॉंगला रिपब्लिक ऑफ चायना मध्ये राहायचं नाही आणि चीनी राजवटी विषयी तेथील लोकांना प्रेम नाही.
आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा हॉंगकॉंग मधील जनतेने आपला विरोध हा थांबवलेला नाही. चीन जरी हॉंगकॉंग ला स्वत:चा एक हिस्सा मनात असले तरी हॉंगकॉंगला चीनच्या अधिपत्त्याखाली राहायचे नाही. याचे कारण इतिहासातील या तिआननमेन चौकाच्या घटनेचे तपशील पाहिल्यास आपणाला समजू शकते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.