आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
स्वामी दयानंद सरस्वती हे भारतीय अध्यात्मिक क्षेत्रातील एक नाव, त्यांनीच आर्य समाजाची स्थापना केली. आध्यात्म, वैदिक धर्म या बाबीवर लोकांची जागृती करत अध्यात्माचा प्रचार व प्रसार या माध्यमातून केला जायचा, स्वामी दयानंद सरस्वती यांचे अनेक अनुयायी व शिष्य सहभागी होते.
स्वामी दयानंदांचे एक पट्ट शिष्य असेही होते जे आध्यात्म, वैदिक धर्म प्रचाराबरोबरच राष्ट्र कार्यातही सक्रीय सहभाग देत. त्यांचं नाव होतं मुन्शिराम वीज अर्थात स्वामी श्रद्धानंद.
मुन्शिराम वीज म्हणजेच स्वामी श्रद्धानंद यांचा जन्म पंजाब प्रांतातील जालंधरमध्ये झाला. त्यांचे वडील नानकचंद ब्रिटीश सरकारच्या ईस्ट इंडिया कंपनीचे पोलीस शिपाई होते. ब्रिटीश सेवेत असले तरी ते प्रचंड श्रद्धाळू होते. देवावर एवढी श्रद्धा की सकाळी देवदर्शन झाल्याशिवाय ते जेवणही करत नसत.
मुन्शिरामला मात्र आध्यात्म, परंपरा यात फारसा रस नव्हता. खरंतर त्यांना देवाचा तिटकारा होता, याचं कारण म्हणजे एकदा मुन्शिराम लहान असताना कुठल्यातरी संस्थानाच्या राणी मंदिरात दर्शनास आल्यामुळे मुन्शिरामला देवळात जाऊन दर्शन घेण्यापासून रोखण्यात आले होते.
एक दिवस स्वामी दयानंद सरस्वती धर्म प्रचारासाठी बरेली शहरात येत आहेत, असा संदेश नानकचंद यांना समजला. ते आपला मुलगा मुन्शिरामला त्याची इच्छा नसतानाही त्यांचे प्रवचन ऐकण्यास घेऊन गेले.
स्वामी दयानंदांचे तेज, त्यांची वाणी व त्या वाणीतून येणारा प्रत्येक शब्द यामुळे मुन्शिरामला अध्यात्माची गोडी लागली, ते स्वामी दयानंदांचे अनुयायी बनले.
त्यांचे शिक्षणही जोरात सुरु होते. प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी वाराणसीच्या क्विन्स महाविद्यालयातून तर नंतर जय नारायण कॉलेजातून शिक्षण घेतले. स्वामी दयानंद यांचा प्रभाव व वंश परंपरेतील शिकवण यामुळे ते दररोज हनुमान चालीसा पठण करत शिवाय रामकथेलाही हजेरी लावत.
त्यांना शिक्षणाची खूप आवड होती आणि म्हणूनच त्यांनी वकिलीचे शिक्षण घेत पदवी मिळवली आणि प्रॅक्टिस करू लागले.
पोरगा कमावता झाला आहे, आता त्याचे दोनाचे चार हात करावेत म्हणून वडिलांनी मुन्शिरामचा शिवदेवीशी विवाह लावला. संसार आनंदात सुरु होता, यातच वयाच्या तिशीतच त्यांच्या पत्नीचे निधन झाले.
२ मुले व २ मुली अशी ४ अपत्ये असतानाही त्यांनी संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आणि स्वामी दयानंद सरस्वतींच्या आश्रयात निघून गेले. तिथे अध्यात्माचा मंत्र घेऊन, ‘मुन्शिराम वीज’पासून वेगळे होऊन स्वामी श्रद्धानंद म्हणून प्रसिद्ध झाले.
आर्य समाजात सक्रियपणे सहभागी झाल्यावर त्यांनी स्वामी दयानंदांप्रमाणे पूर्णवेळ अध्यात्म व वैदिक धर्म यांचा प्रचार व प्रसार केला. हिंदू वैदिक धर्मासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वाहून घेतले. इंग्रज लोक आपला धर्म बाटवत असून त्यांचा धर्म वाढवत आहेत हे आपल्या संस्कृतीला घातक आहे हे त्यांना जाणवू लागले. त्यांनी धर्माच्या प्रचारासाठी व प्रसारासाठी भारतभ्रमण केले.
१९०१ साली त्यांनी इंग्रजांच्या शिक्षण पद्धतीला विरोध करत ज्याठिकाणी इंग्लिश कॉन्व्हेंट शाळा होत्या, त्या ठिकाणी वैदिक शिक्षण देणारे गुरुकुल स्थापन केले. हरिद्वारच्या कांगडी गावात आणखी एक गुरुकुल सुरु झाले.
या विद्यालयाला सध्या शासनाची मान्यता असून ते कांगडी विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. या प्रकारानंतर इंग्रज त्यांच्या विरोधात अधिक जाचक वागू लागले. त्यांनी मात्र इंग्रजांच्या धमक्यांना न घाबरता आपले काम निरंतर चालू ठेवले.
त्याकाळी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेत संघर्ष करत होते, स्वामी श्रद्धानंदांनी गुरुकुलातील शिष्यांकडून काही निधी जमा करून महात्मा गांधी यांना सहकार्य म्हणून पाठवला..
महात्मा गांधी जेव्हा दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले तेव्हा स्वामीजींनी केलेल्या मदतीची जाण ठेवत त्यांना भेटण्यासाठी आवर्जून गुरुकुलात गेले. त्यांनी स्वामीजींना धन्यवाद देताच स्वामीजी नम्रपणे म्हणाले हा सर्व निधी या मुलांनी जमवला आहे जर आभार मानायचे तर त्यांचे मानायला हवे.
महात्मा गांधी मोठ्या मनाने या विद्यार्थ्यांसमोर नतमस्तक झाले.
इंग्रज सरकारचा भारतीयांवरील अ*त्याचार वाढतच होता, यावर जागृती करावी म्हणून स्वामीजींनी पत्रकाचा आधार घ्यायचे निश्चित करत सद्धर्म नावाचे पत्रक सुरु केले जे सुरुवातीला उर्दू व हिंदी भाषेत प्रकाशित होत होते.
त्यानंतर गुरु आदित्यमुर्ती स्वामी दयानंद सरस्वती यांच्यानुसार तेही देवनागरी भाषेचा अधिक वापर लेखणीत करू लागले. स्वामीजींचा अनुयायी वर्ग वाढतच होता त्यांचा उपद्रव इंग्रजांना अधिक नव्हता म्हणून प्रथमदर्शी त्यांच्या लेखणीकडे दुर्लक्ष केले गेले. स्वामीजींनी धर्मासाठी पुढाकार घेतला होता. पण आता ते देश कार्यातही आपले योगदान देत होते.
स्वामीजी वैदिक धर्माचे समर्थक असले तरी त्यांना मानणारा मुस्लीम वर्गही होता. त्यांनी एकदा दिल्लीच्या जामा मस्जीदीमधून समस्त भारतीयांना देशासाठी एक होण्याचा संदेश दिला होता. त्यांच्या देशावर असलेल्या निष्ठेचा सन्मान करताना रवींद्रनाथ टागोरांनी त्यांच्यासाठी हा “महात्मा देशाला एक नवी दिशा देतोय असे गौरवोद्गार काढले होते.”
स्वामी श्रद्धानन्द यांनी ज्यावेळी काही कॉंगेस नेत्यांना मुस्लिम लांगुलचालन करताना पाहिले तेव्हा त्यांनी तत्काळ काँग्रेसला यासाठी फटकारले. स्वामी श्रद्धानंदांचा प्रभाव वाढत होता, त्यांनी देश धर्मासाठी दिलेली भाषणे लोकांना प्रेरणादायी वाटू लागली. असेच एक भाषण त्यांनी पंजाबच्या अमृतसरमध्ये दिले, ज्यानंतर भारतीयांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले, हिंदू महासभा तर या कार्यक्रमानंतर एवढी प्रभावित झाली की त्यांनी आपल्या संस्थेची एक महत्वपूर्ण जबाबदारी स्वामीजींना देऊ केली, पण स्वामीजींनी त्याला विनम्रपुर्वक नकार दिला.
स्वामी श्रद्धानंद यांनी अनेक भाषणांतून, व्याख्यानांतून देशाच्या स्वातंत्र्याचा संदेश दिला. पण त्यांचा या आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला गेला तो रौलट कायद्याचा जाहीर विरोध व जालियानवाला बाग ह*त्याकांडानंतरच्या काही कार्यक्रमांमधून. काही दिवस स्वामीजी काँग्रेसमध्येही सहभागी झाले. एकदा अशाच एका आंदोलनादरम्यान त्यांना पोलिसांनी अटक केली. पण त्यांची ही अटक आंदोलनासाठी नाही तर धर्म जागृतीच्या कामासाठी झाली आहे असाही काही जणांचा समज होता.
यानंतर मात्र त्यांनी काँग्रेसपासून वेगळं होत आपलं देशकार्य चालूच ठेवलं. अध्यात्म हे संस्कृती रक्षणासाठी जरुरीचे आहे, धर्माच्या उद्धारासाठी जरुरीचे आहे. पण त्यासाठी आधी देश स्वतंत्र असायला हवा हा त्यांचा मानस होता. त्यांनी हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देत भारतीयांना एकत्र येण्याचे आवाहन केले. लोकांनीही त्यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त साथ दिली.
पण यामुळे स्वामीजींनी आपले धर्मकार्य मुळीच सोडले नाही, त्यांनी जबरदस्ती धर्मांतर केलेल्या अनेकांचं शुद्धीकरण केलं. हे कृत्य गांधीजींना न पटणारे होते, त्यांनी स्वामीजींपासून काहीशी फारकत घेतली. स्वामीजींचे धर्म जागृतीचे काम एका विशिष्ट उंचीवर पोहचले होते. त्यांना रोखायचे असेल तर त्यासाठी बंदोबस्त करावा लागेल असा बेत आखून काही लोकांनी स्वामी श्रद्धानंदांच्या विरोधात लोकांची माथी भडकावण्यास सुरुवात केली.
स्वामीजी सतत आपल्या कार्यात व्यस्त असत ज्यामुळे त्यांनी स्वतःच्या प्रकृतीवर अधिक लक्ष कधी दिलेच नाही परिणामी एक दिवस त्यांना न्युमोनियाचा आजार जडला.
आजाराने त्रस्त असलेले स्वामीजी आपल्या दिल्लीतील निवासस्थानी आराम करत होते, त्याच वेळी तिथे काही युवक त्यांना भेटण्यासाठी आले. स्वामीजी आराम करत आहेत आपण नंतर यावे असा संदेश त्यांच्या शिष्याने या युवकांना दिला. पण यातील अब्दुल रशीद नावाचा युवक विनंती करून स्वामीजींच्या खोलीत पोचला व त्याने कसलीही तमा न बाळगता स्वामीजींवर एकामागोमाग एक ३ गोळ्या झाडल्या. स्वामीजी जागेवरच कोसळले.
संपूर्ण देशात या कृत्याचा निषेध नोंदवला गेला. महात्मा गांधी, देशातील अनेक स्वतंत्रता सेनानी, अनुयायी स्वामीजींच्या अंतिम दर्शनासाठी आले होते. जिथे ह*त्येचा आरोपी अब्दुलला शिक्षा करावी असा सूर देशभरात उमटू लागला, तिथे दुसरीकडे महात्मा गांधी यांनी स्वामीजींच्या पुत्राला पत्र लिहून “अब्दुल भाई को माफ करो अशी विनंती केली.”
स्वामीजींनी आपले संपूर्ण जीवन देश,धर्म व जन कल्याणासाठी खर्ची केले. अशा महान विभूतींना आमचे नमन.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.