आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
कोलंबस हे नाव म्हणजे खलाशांच्या जगतातील सगळ्यात प्रसिध्द नाव. वास्को-द-गामा ने जगाला भारताचा रस्ता दाखवला तसेच अमेरिगो व्हेस्पुसी या खलाशाने अमेरिकेचा शोध लावला. परंतु अमेरिगो व्हेस्पुसीच्या आधीही अमेरीकन धरतीवर पाय ठेवला तो कोलंबसने. कोलंबसने मिळवलेल्या नवीन नवीन प्रदेशांच्या सागरी मार्गांचा वापर आजही केला जातो. ‘कोलंबसाचे गर्वगीत‘ अशी कविताच कुसुमाग्रजांनी त्याच्या नावाला प्रदान केली, यावरच त्याच्या महतीची कल्पना येते.
नवनवीन जागा शोधताना कोलंबसला बऱ्याच काही अडचणींचा सामना करावा लागला. आधुनिक तंत्रज्ञान अवगत नसल्याने कमीत कमी साहित्य सोबतीला घेऊन त्याने आपल्या शोधमोहिमा आखल्या. अमेरिकेत “कोलंबस दिवस” साजरा केला जातो, याच्यामागे चंद्रग्रहणाची एक रंजक आणि तेवढीच भयानक गोष्ट आहे. एका मोहिमेत चक्क त्याने चंद्रग्रहणाचा वापर करुन स्वत:चे आणि आपल्या सहकाऱ्यांचे प्राण वाचवले, अशी एक रंजक गोष्ट आहे. आज आपण हीच कथा भेट ऐकणार आहोत.
सतत सागरी मोहिमेवर असणारा कोलंबस मध्य अमेरिकेच्या किनाऱ्यावर एकदा वाईट परिस्थितीत अडकला. स्पेनवरुन ११ मे, १५०२ ला ४ जहाजे बरोबर घेऊन निघालेला कोलंबस त्याच्या २ जहाजांना गमावून बसला. राहिलेल्या २ जहाजांना घेऊन तो उत्तर किनाऱ्यावर (आताचा जमैका) २५ जुन, १५०३ ला पोहचला.
सुरुवातीला तेथील स्थानिक असलेले अरावक भारतीय लोकांनी त्यांचा चांगला पाहुणचार केला. त्यांना अन्न आणि निवारा पुरवण्यात आला. असेच दिवस वाढत गेल्यानंतर मात्र तणाव वाढत गेला. तेथील लोकांना कोलंबसचा आणि त्याच्या साथीदारांचा भार जास्त होत होता. काही दिवसानंतर कोलंबसच्या काही साथीदारांनी तेथील लोकांवर जबरदस्ती करुन अन्न मिळवले. काहींनी स्वत:कडे असणारी भांडी आणि महागड्या वस्तू देऊन अन्न मिळवले. परंतु हळुहळु दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली. अशा वेळी कोलंबसने एक कल्पना बनवली.
यावेळी कोलंबसाच्या मदतीला आले ते ‘रेजिओमॉन्टेनस‘ या नावाने प्रसिध्द असलेल्या एका खगोलशास्त्रज्ञाने लिहिलेले पंचांग. हे पंचांग म्हणजे त्यावेळी प्रत्येक खलाशासाठी असलेले बाइबलच. सुर्य, चंद्र तसेच वेगवेगळ्या तारकासमूहांची माहिती असणारे हे पंचांग त्यावेळी कोलंबसकडेही होते. याच पंचांगात बघितले असता तीन दिवसांवर चंद्रग्रहण आले असल्याचे त्याला कळाले.
त्यावेळी ग्रहणाच्या बाबतीत लोकांमध्ये अतिशय भीती होती. ग्रहणाच्या दिवशी काहीतरी वाईट होईल अशीच धारणा त्यावेळी लोकांची होती. याचाच फायदा घेण्याचा निर्णय कोलंबसने घेतला.
स्थानिक लोकांच्या मुख्य व्यक्तीकडे तो गेला आणि तुम्ही नाकारत असलेल्या अन्न आणि निवाऱ्यामुळे तुमचा देव तुमच्यावर रागावला आहे. तो रागाने लाल झालेला असुन ३ दिवसानंतर म्हणजेच २९ फेब्रुवारी, १५०४ ला चंद्राच्या रुपात तो आपला राग व्यक्त करेल असे त्याने सांगितले.
कोलंबसने सांगितल्या प्रमाणे चंद्रग्रहणास सुरुवात झाली. आधीच घाबरलेले स्थानिक लोक ग्रहण बघुन जास्तचं घाबरले. संध्याकाळी चंद्र अगदी लाल दिसु लागला तेव्हा स्थानिक लोकांना कोलंबसची गोष्ट खरी वाटली. त्यानंतर घाबरलेले लोक कोलंबसकडे धावले. कोलंबसला देवाचा दुत मानू लागले. देवाला शांत करण्यासाठी काही करता येईल का अशी विनवणी करु लागले.
कोलंबस आत गेला आणि त्याने पुन्हा पंचांग बघितले. चंद्रग्रहण संपण्यास थोडाच कालावधी बाकी होता. काही वेळाने चंद्रग्रहण संपले तेव्हा कोलंबस बाहेर आला आणि देवाने तुम्हाला माफ केले आहे असे म्हटला. लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला. त्यानंतर लोकांनी कोलंबस आणि त्याच्या सहकाऱ्यांना काहीच कमी पडू दिलं नाही. नंतर २९ जुन, १५०४ रोजी कोलंबससाठी आलेल्या बचाव जहाजाने तो ७ नोव्हेंबर, १५०४ ला परत स्पेनला पोहचला.
जगात आजही अनेक लोक ग्रहणाला घाबरतात. धोक्याची घंटा म्हणून ग्रहणाकडे आजही बघितलं जातं. हिंदु साहित्यात याला अमृतमंथन, काही वेळा राहु-केतु अशा गोष्टींशी जोडले गेले आहे. वैज्ञानिक कारण माहित असुनही आज सुध्दा त्याबद्दल अंधश्रद्धा बाळगल्या जातात.
पश्चिमी आशियाच्या काही लोकांच्या मते ड्रैगन सुर्याला खाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ग्रहण लागते. त्यावेळी ड्रैगनला पळवुन लावण्यासाठी तिथे ढोलताशे वाजवले जातात. तर स्वर्गातील कुत्रा हा सुर्य आणि चंद्राला खायला येतो तेव्हा ग्रहण होते असा समज आहे. वायकिंग संस्कृती नुसार ढगातील लांडगे सूर्यावर हल्ला करतात तेव्हा ग्रहण होते.
टोगो, बेनिन या प्रदेशातील लोक सुर्य आणि चंद्राच्या भांडणामुळे ग्रहण होते असे मानतात. या दोघांना शांत करण्यासाठी आपापसात असणारी भांडणे मिटवली जातात. दक्षिण प्रशांत भागात सुर्य आणि चंद्र प्रेमात असुन प्रेमलीलेसाठी ते पृथ्वीपासून लपतात असा समज आहे.
बाइबलमधे लिहिल्याप्रमाणे पृथ्वीचा शेवट असेल तेव्हा सुर्य पुर्णपणे काळा आणि चंद्र पुर्ण लाल झालेला असेल. ग्रहणाच्या वेळी असेच होत असल्यामुळे आजही लोक ग्रहणाला घाबरत असावेत.
ग्रहणाच्या बाबतीत असलेल्या अंधश्रद्धा कमी झाल्या असल्या तरी भरपुर भागात आजही त्या तशाच आहेत. याच अंधश्रद्धेला हाताशी धरून आपली सुटका करुन घेणारा कोलंबस या अंधश्रद्धेच्या विरोधात नक्कीच नसेल. पण तरीही ग्रहण ही पुर्णपणे नैसर्गिक घटना असुन त्यात वाईट काही नाही हे आज लोकांना समजावून सांगणे तेवढेच गरजेचे आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.