आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
चीन दिवसेंदिवस भारताच्या सीमेवर काही तरी कुरापती काढत आहे. २०२० साली गलवान खोऱ्यात चीनने आपल्या सीमा भागात गस्त घालणाऱ्या जवानांवर हल्ला केला होता. यात भारताचे २० जवान शहीद झाले. चीन सध्या आंतरराष्ट्रीय पटलावर महासत्ता बनण्याच्या तयारीत आहे.
भारत-चीन दरम्यान लडाख आणि अक्साई चीनच्या सीमेवर सतत तणावग्रस्त परिस्थिती असते. आताही अक्साई चीनच्या परिसरात भारत घुसखोरी करत असल्याचा आरोप चीन कडून करण्यात आला आहे. २०१७ साली तर डोकलाममध्ये चीनने सैन्य घुसवले होते. डोकलाम सीमावादाच्या प्रसंगावरून भारत चीन दरम्यान प्रचंड तणावाची स्थिती निर्माण झाली होती. डोकलाम तणावाच्या वेळी भारताने चीनला रोखठोक प्रत्युत्तर दिले होते.
भारत आणि चीन दरम्यानचा सीमावाद गेली कित्येक दशके चालत आला आहे. यापूर्वीही भारत आणि चीन दरम्यान युद्ध झाले आहे. भारत आणि चीन दरम्यानचे पहिले युद्ध १९६२ ला झाले. या युद्धात भारताला चीनकडून चांगलाच मार बसला होता. पण, नंतर १९६७ साली जी लढाई झाली त्यात भारतीय सैनिकांनी पहिल्या पराभवाचा चांगलाच वचपा काढला. १९६७ च्या लढाईच्या काळात इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या तेव्हा चीनला त्यांनी चांगलाच धडा शिकवला होता.
इंदिरा गांधीनी चीनला कडक सामरिक आणि सशस्त्र धडा शिकवला होता. चीन हा धडा कधीच विसरला नसेल.
भूतानला संरक्षण दिल्याच्या कारणाने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी चीनच्या रडारवर आल्या होत्या. तेव्हा देखील चीन भारताच्या सीमाभागात घुसून कुरापती काढण्याच्या प्रयत्नात होता. डोकलाम सीमेवर चीनने तणावजन्य परिस्थिती निर्माण केली होती. मागच्या यु*द्धात विजयाच्या अनुभव असल्याने चीनला यावेळी चांगलीच खूमीखूमी चढली होती.
त्यावेळी माओ जेदोंग चीनचे अध्यक्ष होते. माओच्या नेतृत्वाला चीनमध्ये प्रचंड लोकमान्यता होती. ते चीनमधील सर्वश्रेष्ठ नेते असल्याचे मानले जात असे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही जेदोंग यांचा जबर वचक होता. पण तरीही चीनपुढे इंदिराजींनी थोडीशीही माघार घेतली नाही.
७ ऑक्टोबर, १९६६ रोजी पत्रकार परिषद घेऊन इंदिराजींनी हे स्पष्ट केले होते की, त्या भूतानच्या रक्षणासाठी भारत कटिबद्ध आहे. इंदिराजांनी एकप्रकारे या विधानाच्या माध्यमातून चीनला आव्हानच दिले होते. चीन डोकलाम भागात जी काही घुसखोरी करत आहे, ती बेकायदेशीर असून चीनने आल्या पावली उलटे जावे, असा इशाराही त्यांनी दिला होता. परंतु, चीनने हा इशारा गांभीर्याने घेतला नाही. इंदिराजींच्या या निर्णयामुळे भूतानमध्ये भारताचे सामरिक महत्व वाढणार होते. चीनला देखील याचा चांगलाच अंदाज आला होता.
भूतान आणि डोकलाम प्रश्नावरून चीन आणि भारत दरम्यान आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. शाब्दिक संघर्षाची सीमा ओलांडल्यानंतर सिक्कीम भागात सशस्त्र संघर्षाला सुरुवात झाली. चीनने ‘नथु ला’ येथे हल्ला केल्याने भारताला आक्रमक पाऊल उचलणे भाग पडले. नथु ला हा भाग सिक्कीम प्रांतात येत होता. त्यावेळी सिक्कीममध्ये राजेशाही होती. सिक्कीम अधिकृतरित्या भारताचा भाग नव्हता. पण, चीनसोबतची ही लढाई संपल्यानंतर सिक्कीम भारतात विलीन झाला.
१९६७ च्या लढाईत आपल्या बहाद्दर सैनिकांनी चीनच्या सैन्याला धोबीपछाड दिली होती. यावेळच्या अनुभवामुळे चीन आजही भारतासोबत यु*द्ध करण्याची कल्पना करू शकत नाही. भारतीय सैन्याने चीनी सैनिकांना मोठ्या संख्येने मार*ले होते. फक्त सैनिकच नाही, तर चीनचे बंकरदेखील उ*द्ध्वस्त केले होते. ‘नथु ला’मध्ये त्यावेळी आपल्या सैनिकांनी जे शौर्य दाखवले होते, त्याच्या कथा आजही ऐकायला मिळतात.
‘नथु ला’ तिबेट-सिक्कीमच्या सीमेवर आहे. गंगटोक-यातुंग-ल्हासा हा व्यापारी मार्ग इथूनच जातो. सिक्कीम भारताचा भाग आहे, हे चीनला मान्यच नव्हते. त्यांनी नथु लातून भारतीय सैन्याने माघार घ्यावे अशी चिथावणी दिली. पण, भारतीय सैन्याने माघार घेतली नाही. दोन्ही देशांदरम्यान आधीच तणाव वाढला असता. ‘नथु ला’मधील भारतीय सैनिकांची उपस्थिती ही आगीत तेल ओतणारी ठरली ज्याने लढा*ईचा भडका उडाला.
त्यावेळी ‘नथु ला’मध्ये भारताची 2 ग्रेनेडीयर्स बटालियन तैनात होती आणि ले. कर्नल राय सिंग त्याचे नेतृत्व करत होते. यावेळी भारतीय सैनिक आणि चीनी सैनिकांमध्ये शाब्दिक चकमकी देखील होत. पण त्या दिवशी अचानक चीनी बंकर मधून भारतीय सैन्यावर गोळी*बार होऊ लागला. भारतीय सैन्याला चीनकडून असे काही पाऊल उचलले जाईल याची जराही कल्पना नव्हती. पण, हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यास भारतीय सेना सज्ज झाली आणि त्यांनी चीनी सैनिकांना जबर प्रत्युत्तर दिले.
या लढा*ईत चीनचे ५०० सैनिक जखमी झाले तर त्याहून अधिक सैनिक मारले गेले. सरकारी आकडेवारीनुसार याठिकाणी प्राण गमावलेल्या भारतीय सैनिकांची संख्या ८८ होती. १९६२ च्या यु*द्धात जो पराभव पत्करावा लागला होता, त्याचा भारतीयांनी चांगलाच बदला घेतला होता.
वस्तुतः १९६२ चा पराभव हा लष्करी पराभव नसून तो राजकीय पराभव होता, असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. कारण भारत तर तेव्हा “हिंदी-चीनी, भाई-भाई” या घोषणेत दंग झाला होता…!
त्यावेळी चीन मात्र भारतासोबत विश्वासघात करत यु*द्धास उभा ठाकला होता. त्यावेळी चीनवर अतिरिक्त विश्वास ठेवल्याने भारताला नामुष्की पत्करावी लागली. पण त्यानंतर पाचच वर्षात जे यु*द्ध झाले, त्यात भारतीयांनी फक्त चीनचे सैनिकच मारले असे नाही तर, चीनचे अनेक बंकरदेखील उद्ध्वस्त केले.
आपल्या सैन्याने अचानक झालेल्या हल्ल्याला देखील ज्या शिताफीने आणि शौर्याने हाताळले ते पाहून चीनी सैन्य देखील आवाक झाले होते. १९६७ च्या विजयानंतर भारतीय सैन्याचा आत्मविश्वास दुणावला.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.