आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
आजपर्यंत देशभक्तीचे किस्से आपण खूप ऐकलेत तसेच कुख्यात गुंड आणि डाकूंचेसुद्धा! पण, जर देशभक्त असलेल्या व्यक्तीवरच देशद्रोही होण्याची वेळ आली तर यात चूक कोणाची? ज्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाच्या नावाची पताका उंचावली, ज्याचे आंतरराष्ट्रीय धावण्याच्या शर्यतीतील रेकॉर्ड दहा वर्षे कुणालाही तोडता आले नाही, ज्या व्यक्तीने राजपूत रेजिमेंटमध्ये राहून देशाच्या सीमांचे रक्षण केले अशा व्यक्तीला जर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मरण येत असेल तर निश्चितच देशासाठी आणि समाजासाठीही ही एक लाजिरवाणी बाब आहे.
अर्थातच प्रख्यात ॲथलिट आणि कुख्यात डाकू पान सिंग तोमरबद्दल! ज्याने सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर फक्त आपली शेती कसून पोट भरण्याचे स्वप्न पाहिले होते आणि यात काहीच चुकीचे नव्हते. कष्ट करून, घाम गाळून जगण्याच्या स्वप्नाला कुणी चूक कसे ठरवू शकेल. पण, त्याला इतके साधे स्वप्न, इतकीशी इच्छा पूर्ण करता आली नाही.
एकीकडे सैन्याच्या जोरावर आपला देश शांत आणि निर्धास्त झोपू शकतो म्हणायचे आणि दुसरीकडे अशाच एका सैनिकाला स्वत:च्या आणि कुटुंबियांच्या रक्षणासाठी बंदूक हातात घेण्याची वेळ आणायची?
चंबळच्या खोऱ्यातील अनेक डाकूंचे किस्से ऐकले तर त्यांच्याही कथा काही यापेक्षा फारशा वेगळ्या नाहीत. फक्त अन्यायाविरोधात आवाज कुणीच ऐकून घेत नाही हे लक्षात आल्यावर त्यांना बंदुकींच्या फैरींचा आवाज आणि त्या आवाजाच्या दहशतीचा आसरा घ्यावा लागला. पण, ज्याने देशविदेशात भारताचे नाव उंचावले अशा माणसावर हातात बंदूक घ्यायची वेळ आली हे आपलं दुर्भाग्यच.
पान सिंह तोमरच्या जीवनांवर एक चित्रपटही प्रदर्शित झाला होता, ज्यात सुभेदार पान सिंह तोमरपासून डाकू पान सिंह तोमर पर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला होता.
१९३२ साली मध्यप्रदेशच्या मुरैना जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात पान सिंह तोमरचा जन्म झाला. गावात सगळे लोक फक्त शेतीवरच अवलंबून होते. गावातील तरुणांकडे शेती कसणे किंवा लष्करात भरती होणे याशिवाय तिसरा काही पर्यायच नव्हता. पान सिंह तोमरने देखील सैन्यात जाण्याचा पर्याय निवडला. सैन्यात भरती होताना देशाप्रती संपूर्ण समर्पण आणि निष्ठा राखण्याची त्यानी प्रतिज्ञा केली होती.
रजपूत रायफल्समध्ये तो शिपाई म्हणून रुजू झाला आणि त्याची सैन्यातील कामगिरी सुरु झाली. पान सिंह तोमरकडे आणखी एक अंगभूत कौशल्य होते, ते म्हणजे न थकता धावण्याचे. सैन्यात गेल्यानंतर त्याच्यातील या कौशल्याला जास्त प्रोत्साहन मिळाले. याला अडथळा शर्यतीत धावण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. देशविदेशातील अनेक स्पर्धांमध्ये पान सिंह तोमर यांनी यश मिळवले. तिरंग्याची शान वाढवली.
सैन्यातील त्याची कामगिरी पाहून त्याला रूडकीच्या बंगाल इंजिनियरिंग ग्रुपमध्ये सुभेदार म्हणून पाठवण्यात आले. एक निष्ठावंत शिपाई आणि एक समर्पित खेळाडू अशा दोन्ही भूमिकेत त्याने आपले पूर्ण योगदान दिले. सैन्यातील त्याचे सहकारी त्याला एक हसमुख आणि जिंदादिल व्यक्ती म्हणून ओळखत असत.
सैन्यात असताना एक धावपटू म्हणून त्याने अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले होते. १९५८च्या एशियन गेम्समध्ये त्याने भारताचे प्रतिनिधित्वही केले.
प्रचंड गरीब घरातून येऊन पान सिंहने आपल्या घराण्याचे नाव उज्ज्वल केले होते. आता निवृत्तीच्या या वयात त्याला सुखाने जगण्याची इच्छा होती. आपल्या मुलाबाळांचे शिक्षण करावे, घरच्यांना काही आनंदाचे क्षण द्यावेत. निम्मे आयुष्य देशासाठी घालवल्यानंतर आता आपल्या गावासाठी आणि गावकऱ्यांसाठी काही करावे, असे वाटत होते. म्हणून सैन्यातून निवृत्त होऊन तो गावी आला.
गावात त्याची छोटीशी शेती होती. पण, काही कारणाने ती गावातील सावकाराकडे गहाण होती. तोमरने सावकाराकडून ती जमीन सोडवून देण्याची विनंती केली. त्याची ही काही गहाणवट रक्कम असेल तीही परत करण्याची तयारी दर्शवली. परंतु मग्रूर सावकाराने त्याची जमीन परत देण्यास नकार दिला. सावकाराशी भांडत बसण्यापेक्षा आपण कायदेशीर मार्गाने आपली जमीन परत मिळवू असे त्याने ठरवले. कलेक्टर साहेबांना गावात बोलावून पंचायत भरवली आणि दोन्ही पक्षांना आपले म्हणणे मांडण्याची मुभा देण्यात आली. दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर तोमरने जमिनीचे पैसे देऊन जमीन सोडवून घ्यावी असे आदेश देण्यात आले.
परंतु सावकाराने हा निकाल मान्य करण्याऐवजी पान सिंह तोमरच्या घरावर हल्ला केला. त्याच्या मुलाला म्हणजे हनुमंत सिंहला भरपूर मारले. त्याच्या म्हाताऱ्या आईलाही मारहाण केली. तोमर सिंह घरी येऊन पाहतात तर सगळ्या घराचे नुकसान तर झाले होतेच पण, आई आणि मुलाची अवस्था अगदीच दयनीय झाली होती. त्याची आई त्याला म्हणाली,
“सत्तर देशांत भारताचा झेंडा उंचावणारा तू आणि बघ ही तुझ्या आईची अवस्था. सकाळपर्यंत मला त्या बाबू सिंहचे मेलेले तोंड पहायचे आहे.”
झालं..! आई एवढंच बोलली आणि तिने शेवटचा श्वास घेतला. देशाची निष्ठा राखणारा एक सैनिक आपल्या आईची अखेरची इच्छा पूर्ण न करता कसा राहील. त्याने दुसऱ्याच दिवशी आपला भाऊ बळवंत सिंह याच्या साथीने बाबू सिंहला घेरले आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबांचा सफाया केला.
सुभेदार पान सिंह तोमारचा डाकू पान सिंह तोमर होण्याचा हाच तो क्षण होता. इथून पुढे पान सिंहच्या आयुष्याने असे काही वळण घेतले की त्याने त्याची कधी कल्पनाही केली नसेल. सुखाचे आयुष्य जगण्याची आणि गावकऱ्यांसाठीही आशेचा किरण घेऊन येण्याची स्वप्ने पाहत गावी परतलेला पान सिंह तोमरच्या वाट्याला मात्र शेवटपर्यंत संघर्षच आला.
देशासाठी पदके जिंकल्यावर ज्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव होत होता त्याच पान सिंहला पकडण्यासाठी आता बक्षीस दिले जाऊ लागले. शेवटी १ ऑक्टोबर १९८१ साली पान सिंह तोमरचा “पोलीस एन्काउंटर”मध्ये मृत्यू झाला.
आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकली तेंव्हा पान सिंह तोमर कोण हे अनेकांना माहितही नव्हते. पण, हातात बंदूक घेतल्यावर मात्र जो-तो त्याच्याच मागे हात धुवून लागला. प्रशासनाने त्याचे म्हणणे ऐकून घेऊन वेळीच त्यांना मदत दिली असती तर एक राष्ट्रनिष्ठ सैनिकावर डाकू होण्याची वेळच आली नसती.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.