आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
बौद्ध धर्म हा आज जगातील चार सर्वात मोठ्या धर्मांपैकी एक आहे. दक्षिण मध्य व पूर्व आशियाई देशात विस्तारलेल्या या धर्माची संस्थापना भगवान गौतम बुद्धांनी केली होती. या धर्माचा पुढे इतका विस्तार झाला की आजही जगभरात या धर्माच्या अनुयायी वर्गाची संख्या वाढतच चालली आहे.
गौतम बुद्धांचा जन्म कुठे व कसा झाला? याबाबतीत कुठलेच सबळ पुरावे उपलब्ध नाहीत. असं म्हणतात की गौतम बुद्ध हे राजा शुध्दोदन यांचे पुत्र होते. नेपाळमधील लुम्बिनी येथे त्यांचा जन्म झाला. नेपाळमध्ये आज रुमिनदेई नावाचं एक स्थळ आहे, त्याठिकाणी हे लुम्बिनी नगर एकेकाळी वसलेलं होतं, असं मानलं जातं.
बुद्धांचे बालपणीचे नाव सिध्दार्थ होते. ते लहान होते तेव्हाच त्यांच्या आईचे निधन झाले. आईचे निधन झाले तरी वडीलांनी त्यांना तिची कमतरता भासू दिली नाही. सिध्दार्थ वयात येत होते तसे त्यांच्यातील सामाजिक जाणिवा विकसित होत गेल्या, त्यांना समाजाच्या एकूण अस्तित्वाविषयी ममत्व वाटत होते. पुढे त्यांनी घोषणा केली की ते भविष्यात संन्यास घेऊन अध्यात्मिक मार्गाचा अवलंब करतील. हे ऐकून राजा शुध्दोदन यांचे धाबे दणाणले. त्यांनी आपल्या मुलाला जगातील दुःख व पीडेपासून दूर ठेवायला सुरुवात केली.
सिद्धार्थ जेव्हा १६ वर्षांचे होते तेव्हा त्यांचा विवाह यशोधरेशी झाला. यशोधरेपासून त्यांना एका पुत्रप्राप्ती देखील झाली. त्या पुत्राचे नामकरण राहुल असे करण्यात आले. जसा काळ उलटू लागला तसा सिद्धार्थ यांचा संसारातील मोह कमी होऊ लागला. २९ वर्षाच्या वयात त्यांनी घराला त्यागण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्या अगोदरच आपल्या राज व्यवहाराला व प्रजा दरबाराचे कामकाज थांबवले होते.
एका यात्रेदरम्यान एका आजारी व्यक्तीचे प्रेत बघून बुद्धांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले, या प्रश्नांनी बुद्धांना अंतर्बाह्य बदलले. याच घटनेमुळे त्यांनी घरदार त्यागले.
भगवान बुद्ध एकदा आपल्या प्रवासादरम्यान एका नगरात गेले व त्यांनी तिथे सामान्य लोकांकडून भिक्षा मागायला सुरुवात केली. त्या नगरावर बिंबीसारचे राज्य होते, त्याला जशी बुद्ध आपल्या राज्यात येऊन भिक्षा मागत आहेत, अशी सूचना मिळाली, त्याने क्षणाचाही विलंब न करता, बुद्धांचे दर्शन घेतले व त्याने आपले सिंहासन बुद्धांना देण्याची इच्छा प्रकट केली.
परंतु भगवान बुद्धांनी त्याला नम्रपणे नकार दिला, कधीतरी त्याच्या मगध राज्याचा दौरा करेल असे वचन देऊन त्या ठिकाणाहुन निघून गेले. याच यात्रेच्या काळात भगवान बुद्धांनी आपल्या शिक्षेसाठी अथक साधना करायला सुरुवात केली.
आजवर त्यांनी जितके ज्ञान कमावले त्याने बुद्ध संतुष्ट नव्हते त्यामुळे त्यांनी ‘उदक रामपुता’ या साधूचे शिष्यत्व धारण केले. बुद्धांनी त्या साधुकडून संपूर्णपणे योग विद्येची दीक्षा घेतली. त्यांनी योग अभ्यासात एक वेगळीच पातळी गाठली. एका क्षणासाठी त्यांनी स्वतःला परब्रह्माशी जोडण्यात यश मिळवले.परंतु योगविद्येतील ही सिद्धीसुद्धा त्यांना संतुष्ट करू शकली नाही.
सर्वप्रकारच्या विद्या संपादन करून देखील मनशांती का मिळत नाही? याचा विचार करत बुद्ध एकदा एका पिंपळाच्या झाडाखाली बसले होते त्याचवेळी १०० मैलावरून काही साधू चालत त्यांच्याकडे आले.
हे तेच साधू होते ज्यांच्याकडे गौतम बुद्ध अभ्यासाला गेले होते. ते साधू भगवान बुद्धाच्या जवळ आले आणि दोघात संवाद सुरू झाला, बघता बघता त्यांचा संवाद ऐकण्यासाठी शेकडोच्या संख्येने लोक तिथे जमायला सुरुवात झाली. मग बुद्धांनी त्या उपस्थित लोकांना चार सत्य आणि आठ पथ यांच्याविषयी मार्गदर्शन केले.
बौद्धांचे हे मार्गदर्शन पुढे बौद्ध धर्माचे आधारस्तंभ बनले. बुद्धांचे उपदेश ऐकून अनेक लोक त्यांचे शिष्य बनले. अनेक लोक बुद्धांच्या तत्वज्ञानाचा स्वीकार केला.
बुद्धांच्या जन्माचे जसे रहस्य आहे तसे मृत्यूचे देखील आहे, असे मानले जाते की इसवी सन पूर्व ४८० मध्ये वयाच्या ८० व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. उतारवयात ते फार थकले होते व असंख्य व्याधींनी त्यांना ग्रासले होते. कुंसेरा नावाच्या ठिकाणी त्यांनी आपला देह ठेवला होता.
गौतम बुद्ध आजही विचारांच्या रुपात ते जिवंत आहेत. त्यांच्या विचारांना अमरत्वाचे वरदान प्राप्त आहे. आजही त्यांचे शांती व प्रीतीचे विचार सर्वदूर तसेच वेगाने पसरत आहेत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.