आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
शिक्षण हे समाज बदलाचं एक प्रभावी माध्यम आहे. इंग्रजांच्या काळात पाश्चात्त्य पद्धतीचं शिक्षण आल्यापासून तर, भारतीय सामाजाचा पूर्ण चेहारामोहरा बदलून गेला. व्यक्तिगत असो की सामाजिक पण, बदल घडवण्यासाठी शिक्षण हे क्रांतिकारी ह*त्यार आहे.
फुले दांपत्यापासून ते कर्मवीर आण्णांच्या पर्यंत महाराष्ट्रात असे कितीतरी थोर संत आणि समाजसुधारक होऊन गेले ज्यांनी शिक्षणासाठी अहोरात्र मेहनत घेतली.
लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्व बिंबवले. आज त्याची फळे आपण सगळेच चाखत आहोत. शिक्षणाने लोकांच्या राहणीमानापासून ते विचारसारणीपर्यंत कित्येक अमुलाग्र बदल आज प्रत्यक्षात उतरले आहेत.
स्वप्नांचा आणि ध्येयाचा पाठलाग करायचा तर शिक्षणासारखे आधुनिक आणि निरुपद्रवी हत्यार सोबत हवेच. घरात कुठल्याही प्रकारे शिक्षणाची पूर्वपरंपरा नसतानाही मोठी स्वप्ने गाठण्याचे ध्येय ठेवून कष्टाच्या मेहनतीच्या जोरावर आयएएससारखी स्पर्धा परीक्षा पहिल्याच प्रयत्नात क्रॅक करणाऱ्या गंधम चंद्रुदु यांची कहाणी देखील अशीच आहे.
शिक्षणातून घडणाऱ्या परिवर्तनाचे जिवंत उदाहरण असणारे गंधम हे एका अशिक्षित आई वडिलांच्या पोटी जन्माला आले जे शेतमजूर म्हणून काम करत.
गंधम सांगतात, “माझे आई-वडील तर शेतमजूर आहेत, शाळेत जाऊन शिक्षण घेणारा आणि कॉलेजपर्यंतचे शिक्षण पूर्ण करणारा मी कुटुंबातील पहिलाच व्यक्ती आहे. पदवी पूर्ण केल्यानंतर मी तिकीट कलेक्टर म्हणून नोकरी करू लागलो. आमच्या कुटुंबात सरकारी नोकरी करणारा देखील मी पहिलाच व्यक्ती आहे.”
पाचवी पर्यंतचे शिक्षण गावतील सरकारी शाळेत पूर्ण केल्यानंतर गंधम यांनी पाचवीत असताना जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा दिली. नवोदयच्या जिल्हानिहाय परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर गंधम यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण त्यांचा जन्म गावापासून जवळच असणाऱ्या बनवासी या गावी झाले.
दहावीनंतर त्यांनी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाची परीक्षा दिली. या परीक्षेत पास होणाऱ्या विद्यार्थांना उच्च माध्यमिक व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. जे विद्यार्थी या परीक्षेत यशस्वी होतात, ते रेल्वे कमर्शियलच्या व्होकेशनल कोर्ससाठी पत्र ठरतात.
रेल्वे ज्युनिअर कॉलेज सिकंदराबाद येथून त्यांनी उच्चमाध्यमिक शिक्षण पूर्ण केले.
कोर्स पूर्ण झाल्यांनतर आम्ही लगेचच रेल्वे मध्ये नोकरीला लागलो. २००० मध्ये जेंव्हा मी उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण झालो तेंव्हा, म्हणजे वयाच्या अठराव्या वर्षीच माझ्याकडे सरकारी नोकरी होती.
माझी नोकरी पूर्व वेळ असल्याने मी पुढचे शिक्षण नियमित कॉलेजमध्ये जाऊन करू शकत नव्हतो. पण, पुढील शिक्षण घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. म्हणून, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून मी कॉमर्स मधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर पब्लिक पॉलिसीमधून मी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.” गंधम सांगत होते.
शिक्षणाबद्दल असलेली त्यांची ओढ नोकरी नंतरही संपली नाही.
सरकारी नोकरी मिळाल्यानंतर अनेक जण त्यावरच खुश होतात, पण, गंधम यांची जिद्दच वेगळी त्यांनी. सरकारी नोकरीचा व्याप सांभाळतही त्यांनी पुढील शिक्षणासाठीची वाटचाल सुरूच ठेवली.
घराची परिस्थितीही अशी होती की, पुढील शिक्षणासाठी ते मिळालेल्या नोकरीवर पाणी सोडणं त्यांना शक्यच नव्हतं आणि घराच्या परिस्थितीमुळे शिक्षण सोडाव्या लागलेल्या आपल्या मोठ्या भावाची परिस्थिती ते डोळ्यांनी पाहतच होते. म्हणून नोकरी आणि शिक्षण या दोन्ही जबाबदाऱ्या त्यांना पार पाडव्याच लागणार होत्या. त्याला काहीही पर्याय नव्हताच!
नोकरीतून त्यांची आर्थिकस्थिती आता बऱ्यापैकी सावरली होती. म्हणून त्यांनी आपल्या भावालाही पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. त्यांचे भाऊ आज विजयवाडा कॉलेज मध्ये सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत.
तरीही, फक्त तिकीट कलेक्टर म्हणून आयुष्यभर काम करण्यास गंधम यांचे मन अजिबात तयार नव्हते. म्हणून तब्बल नऊ वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी गांभीर्याने सिव्हील सर्विस एक्झाम देण्याचा विचार केला.
“अर्थात, आज मला जे काही यश मिळाले आहे, त्याचे सारे श्रेय मी जवाहर नवोदय विद्यालायालाच देईन. त्या शाळेत मी जे काही शिकलो ते नेहमी माझ्यासोबतच राहिले. नऊ वर्षे नोकरीतून बचत करून ठेवलेली रक्कम मी माझ्या परीक्षेच्या तयारीवर खर्च केले.
पण, याचा पाया जवाहर नवोदय विद्यालयात शिकत असतनाच घातला गेला होता. त्यानंतर नोकरीतून आयुष्याला एक स्थैर्य देखील मिळाले होते. माझ्या या निर्णयाला माझ्या आई वडिलांनी देखील पूर्ण पाठींबा दिला.” ते सांगतात.
अर्थात, परीक्षा देण्यासाठी तयारीसाठी जवळजवळ एक वर्षाचा कालवधी लागला. हा काळ देखील तितकासा सोपा नव्हताच. यासाठी त्यांना एक तर नोकरीचा राजीनामा द्यावा लागणार होता किंवा दीर्घकाळासाठी रजा घ्यावी लागणार होती. अर्थात, राजीनामा देणे काही स्तुत्य वाटत नव्हते. म्हणून त्यांनी रजेसाठी अर्ज केला पण त्यांच्या दीर्घकाळ रजा देणे देखील शक्य नव्हते. म्हणून त्यांनी आपल्या ड्यूटीची शिफ्ट बदलली आणि ते रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करू लागले.
रात्रीच्या वेळी प्रवाश्यांची फारशी गर्दी नसल्याने त्यांना काम करत अभ्यास करणे देखील शक्य होते. अशा प्रकारे संपूर्ण एक वर्ष अभ्यासावरून अजिबात लक्ष विचलित होऊ न देता, दिवसाला सुमारे आठ ते नऊ तास अभ्यास केला. त्यानंतर जो निकाल लागला तो तर स्पष्टच आहे.
संपूर्ण देशात त्यांचा १९८ वा क्रमांक लागला. त्यानंतर आंध्रप्रदेश मध्येच त्यांची नियुक्ती करण्यात आली.
त्यांची सुरुवातीचे पोस्टींग राम्पचोदावरम येथे करण्यात आली होती. या ठिकाणी कोंडारेड्डीज, कोंडाकोम्मारा, कोंडा दोरा, कोंडाकापू आणि वाल्मिकी अश्या अनेक आदिवासी जमाती राहतात. इथल्या लोकांचे मतदार यादीत नाव नोंदवण्याची पहिली मोहीम त्यांनी हाती घेतली.
२०१४ च्या सार्वजनिक निवडणुकीत येथील मतदानाचा टक्का देखील वाढला. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा या लोकांना मतदानाचा अधिकार मिळाला. यासाठी गंधम आणि त्यांच्या संपूर्ण टीमने मेहनत घेतली म्हणूनच हे यश प्राप्त होऊ शकले.
अनंतपुर जिल्ह्यात पोस्टींग होण्यापूर्वी काही महिने ते आंध्रप्रदेशच्या मागासजाती कोर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक होते, या कार्पोरेशन कडून मागास जातीतील लोकांना कमी व्याज दारात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या घटकातील ज्या लोकांकडे उद्योजक होण्याचे कौशल्य आहे, त्यांना एक लाखापासून ते ४५ लाखापर्यंतचे कर्ज कमी व्याजदरात उपलब्ध करून दिले.
आर्थिकदृष्ट्या मागे असलेल्या या वर्गात आर्थिकदृष्ट्या प्रगती यावी म्हणून प्रयत्न करणे हेच त्यांचे स्वप्न आहे. त्याआधी या लोकांपर्यंत, रस्ते, पाणीपुरवठा आणि जीवनावश्यक इतर मूलभूत सोयीसुविधा पोचल्य पाहिजेत याकडेही त्यांचे लक्ष आहे. यामुळे नरेगासारख्या योजनेतून इथल्या लोकांना त्यांनी रोजगार देखील उपलब्ध करून दिला.
हा भाग बंगळूरू-चेन्नई च्या बिझनेस कॉरीडॉरच्या पट्ट्यात येत असल्याने या लोकांची आर्थिक सुबत्ता वाढवणे हेच त्यांचे उद्दिष्ट आहे.
शिक्षणामुळे केवळ एकाच व्यक्तीची प्रगती होत नाही तर, त्यासोबत अनेकांच्या प्रगतीची बीजे देखील रोवली जातात, हे गंधम यांच्या उदाहरणावरून निश्चितच सिद्ध होते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.