आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
स्वतंत्र भारतासाठी भारतभूच्या अनेक वीर सुपुत्रांनी आपले प्राण अर्पण केले. त्यापैकीच काही होते रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्रनाथ लिहाडी, रोशन सिंह, आणि अश्फाक उल्लाह खान. हे तेच देशभक्त होते ज्यांनी काकोरी कांड घडवले होते. भारतीय स्वतंत्र संग्रामात काकोरी कांडाचे एक अनन्य साधारण महत्व आहे. पण या प्रकरणा विषयी जनतेत म्हणावी तेवढी माहिती नाहीये.
पण काकोरी कांडबद्दल वाचल्यानंतर आपल्या हे लक्षात येते की काकोरी कांडानंतर भारतातील सामान्य माणसांचा क्रांतिकाऱ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला.
स्वातंत्र्यसंग्रामातील सेनानी अधिक लोकप्रिय ठरू लागले व त्यांच्या समर्थनार्थ लोक रस्त्यावर उतरू लागले.
हा तो काळ होता जेव्हा सशत्र लढ्याला पुन्हा सुरुवात झाली होती, त्यातच १९२२ मध्ये चौरा-चौरी कांडात २२ पोलीस मारले गेले होते या घटनेने व्यथित होऊन महात्मा गांधी यांनी असहकार आंदोलन मागे घेतलं. तरुणांमध्ये यामुळे निरुत्साह पसरला होता. स्वतंत्र चळवळीतील तरुणांमध्ये असंतोष होता आणि या असंतोषाचा बांध फुटला तो काकोरी कांडच्या माध्यमातून..
खरंतर काकोरी कांडाबद्दल सांगायचे झाल्यास भारतीय लोक “आपण ठरवले तर साध्य करू शकतो.” हा विश्वास व्यक्त करू लागले. नेमके काकोरी कांड होते काय?
१९२५ मध्ये स्वातंत्र्याच्या स्वप्नांनी झपाटलेल्या काही युवकांनी ब्रिटीश सरकारला व त्यांच्या जुलमी राजवटीला धडा शिकवण्यासाठी ब्रिटीशांची एक खजिना भरून चाललेली रेल्वे काकोरी च्या स्थानकावर लुटली होती.
ही ट्रेन लुटून यातून मिळणारा महसूल हा स्वातंत्र्याच्या कामी वापरावा असा त्यांचा उद्देश होता. या पैश्यातून ह*त्यारे व सामग्री खरेदी करून ते वाटण्त्र्याचा कार्यासाठी वापरावेत असा त्यांचा मानस होता.
काकोरी कांडात ब्रिटीश सरकारचा खजिना भरलेली रेल्वे लुटणारे क्रांतिकारी हे शचींद्रनाथ सान्याल यांनी १९२३ मध्ये स्थापन केलेल्या “हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशन” चे सक्रीय सदस्य होते. काकोरीमध्ये ही ट्रेन आल्यानंतर लुटण्याचा एक प्रस्ताव या संघटनेच्या काही सदस्यांनी मांडला होता, पण या सर्व बाबींना सत्यात उतरवणे वाटते तेवढे सोपे काम नाही याची कल्पनाही या मंडळींना होती.
कारण ब्रिटीश सरकारविरोधी आंदोलनात दोषी सापडल्यानंतर अनेक क्रांतिकारकांना मृत्यूदंड दिला जात होता, शिवाय मुळ आरोपी सापडले नाहीत तर अनेक निष्पाप लोकांना नाहक त्रास दिला जायचा. त्यामुळे या प्रकरणाविषयी नियोजनबद्ध अशी योजना आखून त्याला पूर्णत्वास नेण्याचा संकल्प या क्रांतिकारकांनी केला.
हे काम जोखमीचे असले तरी देशासाठी अत्यंत गरजेचे आहे हे या सदस्यांना माहित होते, पण जर ही योजना फसली तर त्याचे घातक परिणाम भोगावे लागतील, या विचाराने बैठकीत उपस्थित असलेल्या अश्फाक उल्लाह खान यांनी यावर विचारपूर्वक निर्णय घ्यावा असे मत मांडले होते.
शिवाय या लुटीपेक्षा समोरासमोर अधिक तीव्र विरोध करावा असाही साला त्यांनी दिला होता, पण मोठं काहीतरी केल्याशिवाय ब्रिटीश सरकार ठिकाण्यावर येणार नाही असा मत प्रवाह अधिक असल्याने काकोरी कांड करायचेच यावर शिक्कामोर्तब करण्यात आला.
प्राण गेले तरी ती मातृभूमीसाठी दिलेली आहुती असेल, हे या क्रांतिकारकांनी मनाशी घट्ट ठरवले होते.
ठरल्याप्रमाणे ९ ऑगस्ट १९२५ रोजी सर्व क्रांतिकारकांनी ही योजना फत्ते करत काकोरीत ब्रिटीश खजिना ट्रेन लुटली, ज्यावेळी ही बातमी ब्रिटीश अधिकाऱ्यांपर्यंत पोचली त्यावेळी त्यांनी यात सहभागी असलेल्या प्रत्येकाला पकडून त्यांना शिक्षा करण्याचा फर्मान जारी केला.
काकोरी कांडाने केवळ पैसाच लुटला गेला नव्हता तर, ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीला एक जबर चपराक बसली होती. याप्रकरणामुळे भारतीयांमध्ये ब्रिटीशविरोधी चळवळीला एक नवसंजीवनीच मिळाली होती, ब्रिटीश सरकार खडबडून जागे झाले त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु केली.
एक एक करून सरकारने यात सहभागी असलेल्या अनेकांना अटक करत त्यांच्यावर अ*त्याचार सुरु केले.
या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान लखनऊच्या अधिकारी असलेल्या एकाने ही चोरी पूर्ण नियोजनाने केल्याचे स्पष्ट करत एकूण २५ जण यात सहभागी होते असा दावा केला होता, शिवाय जे लोक यात आरोपी आहेत ते सर्व खाकी रंगाचे कपडे घालून होते असाही खुलासा त्याने केला होता.
या घटनेनंतर क्रांतिकारकांची धरपकड सुरु झाली, क्रांतिकारकांना ब्रिटीश सरकारच्या अन्यायकारक जुलमाला सामोरे जावे लागले. पण आपण जे केले ते राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी योग्य होते यावर ते ठाम होते.
चौकशी अंती रामप्रसाद बिस्मिल, अश्फाक उल्लाह खान, राकेश सिह, शचींद्रनाथ सान्याल, मन्मथनाथ गुप्त, योगेशचंद्र चटर्जी, गोविंद चरणकर, राजकुमार सिंह, रामकृष्ण खत्री, विष्णुशरण, सुरेशचंद्र भट्टाचार्य, भूपेंद्रनाथ या सर्वांना अटक केली गेली, या लुटीत एकूण ४००० हून अधिकचा माल लुटला गेला असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला.
अखेर ६ एप्रिल १९२७ ला ब्रिटीश न्यायालयातील न्यायाधिश हमिल्टन याने तत्कालीन कलमे लाऊन निकाल देत रामप्रसाद बिस्मिल,राजेंद्रनाथ लहिडी, अश्फाक उल्लाह खान, रोशन सिंह यांना फाशीची शिक्षा सुनावली.
तर उर्वरित शचींद्रनाथ सान्याल, मन्मथनाथ गुप्त यांना १४ वर्षांची योगेशचंद्र चटर्जी,गोविंद चरणकर, राजकुमार सिंह यांना १० वर्षाची तर रामकृष्ण खत्री, विष्णुशरण, सुरेशचंद्र भट्टाचार्य, भूपेंद्रनाथ यांना ५ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
ही शिक्षा सुनावल्यानंतर जनतेत असंतोष पसरला, या विरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलने करण्यात आली पण इंग्रज सरकारच्या सरकार पुढे त्यांचा निभाव लागू शकला नाही.
काकोरी कांडाने देशातील तरुणांना देशप्रेमाची एक शिकवण दिली, यातून प्रेरणा घेऊन अनेक तरुण सरकारविरोधात मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले व स्वातंत्र्याच्या चळवळीत प्रत्यक्ष पणे सहभागी होण्यास पुढे आले.
असं म्हणतात की फाशी झालेल्यांपैकी एक असलेल्या राजेंद्रनाथ लहिडी यांनी त्यांच्या मित्राला एक पत्र लिहून आपल्या भावना मांडल्या होत्या त्यात ते असे म्हणाले होते की,
“जर मला माहित असते की देशाच्या यज्ञात माझ्या प्राणांची आहुती होणे गरजेचे आहे, तर मी हसत हसत त्या यज्ञात आहुती द्यायला तयार होतो. आज माझा देह कामास आला. सर्वांना शेवटचा नमस्कार…!”
या महान क्रांतिकारकांना व त्यांच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन..!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.