आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
ज्यांच्या आवजाने रसिकांच्या मनावर तब्बल दशकानुदशके अधिराज्य गाजवले त्या बेगम अख्तर यांचा एक मुशायरा करणारी एक तवायफ ते मल्लिका-ए-गझल हा प्रवास त्यांच्या संगीता इतकाच रोमांचकारी होता, ज्यात उदासीची एक किनार देखील होती.
मल्लिका-ए-गझल किंवा गझलची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेगम अख्तर भारतातील एक सुप्रसिद्ध गायिका होत्या ज्यांनी ठुमरी, दादरा आणि गझल यावर उत्कृष्ट प्रभुत्व मिळवले होते.
उत्तरप्रदेशमधील अयोध्येतील फैजाबाद येथे ७ ऑक्टोबर १९१४ रोजी जन्मलेल्या बेगम अख्तर यांचं मूळ नाव अख्तरी बाई फैजाबादी होते.
अख्तरीची आई एक तवायफ होत्या आणि त्यांचे वडील अश्गर हुसेन वकील होते.
मुश्तरी ही वकीलसाहेबांची दुसरी पत्नी होती आणि त्यांना दोन जुळ्या मुली होत्या. पण, अख्तरी आणि तिची बहिण लहान असतानाच तिच्या वडिलांनी तिच्या आईचा त्याग केला.
या धक्क्यातून अख्तरी आणि त्यांची आई सावरल्या नव्हत्या इतक्यात काळाने त्यांच्यावर दुसरा मोठा आघात केला आणि त्यांची छोटी बहिण देखील त्या गमावून बसल्या.
अशा कठीण काळात उर्दू शायरी, गझल आणि संगीत हेच अख्तरी बाईंच्या ‘दर्द की दवा’ बनले. सुरुवातीला चित्रपटात काम करण्यास आणि संगीत शिकण्यास त्यांच्या आईने विरोध केला पण, हा विरोध फार काळ टिकला नाही.
अख्तरी बाई लखनौच्या इश्तियाक अहमद अब्बासी यांच्या प्रेमात पडल्या. ते पेशाने वकील होते. १९४५ साली त्यांनी अब्बास यांच्याशी विवाह केला.
लग्नानंतर त्यांना बेगम अख्तर या नावाने ओळखले जाऊ लागले. पण, त्यांच्या पतींना गायन आणि संगीत आवडत नसे, त्यामुळे त्यांनी अख्तर यांचे गाणे आणि संगीत पूर्णतः बंद केले.
जवळजवळ पाच वर्षे त्या संगीत आणि गायन या त्यांच्या आवडत्या कलेपासून त्यांनी फारकत घेतली. परंतु, संगीत हा तर त्यांच्या आत्मा होता. संगीताशिवाय त्यांना जीवन निरास वाटू लागले. त्यात वरचेवर होणाऱ्या गर्भापातामुळे त्यांचे आरोग्य देखील बऱ्याच प्रमाणात खालावले आणि त्या निराशेच्या गर्तेत गेल्या.
त्यांची तब्येत कदाचित सुधारेल या आशेने डॉक्टरांनी त्यांना पुन्हा एकदा संगीत आणि गायन सुरु करणे असा सल्ला दिला.
डॉक्टरांच्या या सल्ल्याने त्या पुन्हा गयानाकडे वळल्या आणि त्यांच्यातील निराशेचा सूर पूर्णतः एका दिव्य संगीतमय सुरवातीत बदलून गेला. यानंतर त्यांनी जे गाणे सुरु केले, ते त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत!
आपल्या आयुष्यातील कटू आणि दु:खद प्रसंगांनी दिलेल्या आघातातून त्यांच्यात जे दुख आणि निराशा निर्माण झाली होती, ती त्यांनी सुरावटीच्या रागदारीतून अत्यंत सृजनशील पद्धतीने बाहेर काढली.
त्यांनी ज्या पद्धतीने प्रेम, विरह आणि आशा यांची अभिव्यक्ती केली त्यामुळे येणाऱ्या पिढ्यांना देखील त्यांच्या गायनाबद्दल एक भावनिक ओढ वाटत राहील.
वर्षानुवर्षे त्यांनी जो एकाकीपणा, दुःख, दबाव आणि शांतता अनुभवली, त्याच अगम्य रुदानातून त्यांचे सूर जन्माला येत. त्यांच्या अविस्मरणीय सुरांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. हा आवाज मर्यादित न राहता संपूर्ण समूहापर्यंत पोचला. शास्त्रीय आणि उप-शास्त्रीय हिंदुस्तानी संगीत जसे की गझल, ठुमरी आणि दादरा हे एकेकाळी वैयक्तिक मेहफिलीपुरते मर्यादित होते ते त्यांनी देखील खुल्या मेहफिलीमध्ये गायले.
साहित्यातील अनेक मान्यवरांच्या कवितांना आपल्या आवाजात गाऊन त्यांनी या अजरामर साहित्याला आणखी चार चंद लावले.
मिर्झा गालिब, कैफी आझमी, शकील बदायुनी, मीर तकी मीर आणि जिगर मोरादाबादी, अशा अनेक रथी-महारथीच्या कवितांना त्यांनी आपला स्वर दिला.
तिच्या सगळ्या दु:खांवर जालीम उपाय बनून संगीताने तिला शेवटपर्यंत साथ दिली. बेगम अख्तर यांच्या अद्वितीय स्वर्गीय आवाजाने पंडित जसराज, आगा शहीद आलीसारख्या कित्येक दिग्गजांना संगीत शिकण्याची प्रेरणा दिली.
अनेक कवींना हातात लेखणी घेऊन शब्द उतरवण्याची देखील प्रेरणा दिली.
१९३४ साली नेपाळ-बिहारमध्ये झालेल्या भूकंप पिडीतांसाठी ठेवलेल्या खुल्या कार्यक्रमात त्यांनी पहिल्यांदा आपले गाणे सदर केले. या कार्यक्रमासाठी सरोजिनी नायडू देखील उपस्थित होत्या आणि त्यांनी बेगम अख्तरचे आणि तिच्या संगीत कौशल्याचे तोंड भरून कौतुक केले. यानंतरच अख्तरच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळाली.
१९४० च्या सुरुवातीला अख्तर यांनी चित्रपट सृष्टीत देखील काम केले. अख्तरी बाईने ‘नसीब का चक्कर (१९३६), रोटी (१९४२), जलसागर (१९५८) अशा अनेक चित्रपटातून देखील काम केले आहे. ३० ओक्टोंबर १९४७ रोजी एका कार्यक्रमा दरम्यानच तिला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच तिचे देहावसान झाले. संगीताने तिला अखेरपर्यंत सच्ची साथ दिली.
पद्मश्री आणि संगीत नाटक अकादमी पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आले होते. तिला मरणोत्तर पद्मभूषण देखील देण्यात आला.
त्यांनी ऑल इंडिया रेडीओवर देखील गायनास सुरुवात केली. यामुळे तर त्यांचा आवाज देशाच्या कानाकोपऱ्यात पोचला. आयुष्यभर ती पितृसत्ताक व्यवस्थेची कैदी बनूनच राहिली, या कैदेतून बाहेर पडणं तिला कधी जमलंच नाही.
लग्नानंतर जरी ती मध्यमवर्गीय स्तरावर स्थालांतरीत झाली तरी, प्रथा, परंपरा यांनी तिला जखडून ठेवले. परंतु मानवी दुःखाच्या वास्तवाची तिला अचूक जाण होती.
याच जाणीवेतून तिने समूहाच्या वेदनेशी जुळवून घेतले. हाती काही लागो न लागो पण सुखाच्या शोधात केलेला प्रवास फार महत्वाचा आहे, हे तिला कळले होते.
इशरत-ए-कतरा दर्या में फना हो जाना,
दर्द का हद्द से गुजरना है दवा हो जाना..
मिर्झा गालिब यांच्या या ओळीतच बेगमच्या जीवनाचे सार सामावले आहे. इथून पुढे देखील हा आवाज आणि हे मल्लिका-ए-गझल म्हणूनच चिरंतन स्मरणात राहील.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.