आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
‘फेमिनिझम’ किंवा ‘ स्त्रीवाद’ ह्या शब्दाची व्याख्या १८३७ साली, फ्रेंच समाजसुधारक व तत्वज्ञ ‘चार्ल्स फॉरियर’ यांनी मांडली. अणि त्यानंतर लगेचच फेमिनिझम ही एक चळवळ बनली. या चळवळीने संपूर्ण जग व्यापून टाकले.
महिलांना मतदानाचा अधिकार, प्राथमिक व उच्च शिक्षणाचा अधिकार, स्वतःच्या शरीरा संबंधीचे काही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य, याच बरोबर कोणत्याही स्त्रीची शारीरिक व मानसिक प्रतारणा होत असल्यास तिच्या घुसमटलेल्या भावनांना वाचा मिळावी अशा काही मुलभूत व प्राथमिक मागण्या कायदेशीररित्या मंजुर करून घेणे हे या चळवळीचे मुख्य उद्दिष्ट होते.
फ्रान्स, ब्रिटेन, अमेरिका असा प्रवास करत ‘स्त्रीवाद’ भारतात येऊन लागला. १८५० साली, भारतात काही स्त्रीवादी पुरुषांनी ‘सती, केशवपन, बाल विवाह’ यासारख्या कूप्रथांचा समाजातून समूळ नाश करण्याचे आणि महिलांना समान शिक्षण, घटस्फोटाचा अधिकार यांसारखे अधिकार मिळवून देऊन, समाजाला अनावश्यक असलेल्या पितृसत्ताक मानसिकतेचा नाश करण्याचे कार्य हाती घेतले होते.
स्त्रीवादाची उदाहरणे द्यायचीच झाली तर राणी लक्ष्मीबाईंपासून थेट रमाबाई आंबेडकर, डॉ. आनंदी गोपाळ जोशी, सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, कामिनी रॉय अशी अनेक नावे घेता येतील.
यांच्यापैकीच एक, दलित स्त्रीवाद व राजकारणातील एक अतिशय महत्वाचे नाव म्हणजे ‘सुलोचनाबाई डोंगरे’.
सुलोचनाबाई ह्यांनी २० जुलै १९४२ साली, नागपूर येथे झालेल्या ‘ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस वुमेन्स कॉन्फरन्स’ चे अध्यक्षपद भूषविले होते. १९३० साली डॉ. आंबेडकरांनी ‘डिप्रेस्ड क्लासेस फेडरेशन’ व १९३५ साली ‘इनडिपेंडेंट लेबर पार्टी’ ची स्थापना केली. पुढे या दोन संघटनांचे विलीनीकरण होऊन त्या ‘शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन (एस. सी. एफ) म्हणुन कार्यरत होत्या.
एस. सी. एफ च्या चळवळीचे एक वैशिष्ट्य होते. ते म्हणजे त्या चळवळीत असलेला महिलांचा सहभाग. कोणत्याच इतर चळवळीत एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांनी याआधी कधीच सहभागा घेतलेला नव्हता. इतक्या मोठ्या स्तरावर महिलांमध्ये जागरूकता व आत्मविश्वास निर्मितीचे संपूर्ण श्रेय सुलोचनाबाईंना जाते.
त्यांच्या एका हाकेवर १९४२ मध्ये नागपूर येथे तब्बल पंचवीस हजार स्त्रियांनी AIDCW’s कॉन्फरन्स ला हजेरी लावून तिला यशस्वी बनवले.
ज्या काळात काही राष्ट्रवादी व पितृसत्ताक समाजाचे समर्थक भारतीय स्त्री ही सीतेसमान व सत्यवानाच्या सावित्री समान सुशील असावी, तिची मर्यादा केवळ घराचा उंबरा इतकीच असावी, असे विचार भारतीय स्त्रियांवर लादण्याचा प्रयत्न करीत होते.
त्याच काळात दलित स्त्रिया समानता, शिक्षणाचे अधिकार, शारीरिक संघ करण्यास संमतीचा अधिकार, महिला कामगारांना योग्य तो मोबदला मिळावा यासाठी झटत होत्या. सुलोचनाबाई त्यांचे नेत्रुत्व करून त्यांना योग्य ती दिशा दाखवीत होत्या. ‘ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लास फेडरेशन’ च्या स्थापने आधी सुलोचनाबाई इतर दलित स्त्रीवादी कार्यकर्त्यांबरोबर ‘ऑल इंडिया वुमन्स कॉंग्रेस’ (AIWC) अंतर्गत समाजसुधारणेचे कार्य करीत होत्या.
परंतु AIWC च्या काही उच्च जातीच्या सदस्यांकडून त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली.
त्यावेळी त्यांनी, रमाबाई आंबेडकर व इतर दलित स्त्रीवादी सदस्यांसमवेत AIWC चा त्याग केला व त्या ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस अंतर्गत काम करु लागल्या.
मुलभूत अधिकार प्राप्ती व्यतिरिक्त, सुलोचनाबाईंनी दलित महिलांमध्ये लैंगिक आरोग्याबाबत जागरूकता पसरवण्याचा प्रयत्न केला.
‘रामस्वामी पेरीयारां’ नंतर त्याच एकमेव दलित महिला नेत्या होत्या ज्यांना ह्या नाजूक व निषिद्ध वाटणाऱ्या विषयाला संबोधित करणे महत्वाचे वाटले.
उच्च जातीच्या स्त्रियांना या समस्येबाबत योग्य ते शिक्षण देण्यात आले होते, ज्यामुळे त्या स्त्रिया लैंगिक आजार, ते होऊ नये यासाठी आवश्यक असणारी काळजी याबाबतीत जागरूक होत्या. त्याबरोबरच मातेला व अपत्याला होणाऱ्या सर्व विकारांबद्दल योग्य ती माहिती त्यांना होती.
पण दलित स्त्रियांची या संबंधी शिक्षणाच्या अभावापायी हाल-अपेष्टा होत होती. सुलोचनाबाईंनी १९४२ च्या सभेत, २५००० महिलांना त्यांच्या लैंगिक अधिकारांची जाणीव करून दिली व जन्मप्रतिबंधक साधने वापरून कुटुंब नियोजन कसे करावे या बद्दल जागरूक केले.
चार भिंतींच्या आत देखील स्पष्ट आणि मोकळेपणाने बोलल्या न जाणाऱ्या या प्रश्नाची भर सभेत मांडणी करून, एखाद्या स्त्रीने जर ठरवले तर समाजात कुठल्याही पातळीवर बदल घडवून आणण्याची क्षमता ती बाळगते हे सिद्ध करून दाखवले.
असं म्हणतात की एका स्त्रीचं सर्वांत शक्तिशाली रूप हे तिचं मातृरूप असतं. पण ती आई केवळ आपल्या मुलांचीच असते का? नाही. तर ती संपूर्ण समाजाची आई असते. समाज घडवण्याची भली मोठी जबाबदारी तिला पार पाडायची असते.
तिला मदतीची किंवा सहानुभूतीची गरज नाही, तर समाजाच्या बदलत्या द्रुष्टीकोनाची गरज आहे. ही सुलोचनाबाईंची शिकवण आपण आत्मसात करुन नव्या पिढीला योग्य ती शिकवण देऊन मुलींना अजून सशक्त बनवायला हवं.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.