आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
शनिवारी १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या वर्ल्ड कप सामन्यातील भारत पाकिस्तान मॅचची चर्चा अजूनही संपत नाहीये. स्वतःला भारतीय “पत्रकार” म्हणवून घेणाऱ्या काही लोकांनी ‘#SorryPakistan’ हा हॅशटॅग ट्रेंड केला होता. आजवर अनेकदा भारतीय क्रिकेटपटुंवर अक्षरशः ह*ल्ले होत असताना मात्र हेच लोक गांधीजींची माकडं होऊन शांत बसली होती. १९८९-९० च्या दशकात भारतीय क्रिकेटपटू श्रीकांतवर पाकिस्तानमध्ये भर मैदानात चाकूने ह*ल्ला करण्यात आला होता. पण शनिवारी भारतीय, बहुतांशी हिंदू फॅन्सनी फक्त काही नारे दिले आणि पाकिस्तानी क्रिकेटर्सचा जीव धोक्यात आला. असो.
पण नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंसाठी हे काही नवीन नाही. क्रिकेटसारख्या मनोरंजक खेळाला “जि*हाद”चं स्वरूप देण्याचं काम अनेकदा हे खेळाडू करत असतात. अशा वादग्रस्त घटनांमध्ये अनेकदा इम्रान खान, शाहिद आफ्रिदी या दोघांसह आणखी एका खेळाडूचे नाव समोर येतं ते म्हणजे शोएब अख्तर.
भारत आणि पाकिस्तानच्या इतिहासातील काही काळ्या आठवणींचा थेट परिणाम दोन्ही देशांच्या परस्पर संबंधांवर दिसतो. या दोन्ही देशांची एक खासियत आहे. दोन्ही देशातील जनता प्रचंड क्रिकेट वेडी आहे. जेव्हा-जेव्हा उभयतांचे संघ एकमेकांशी भिडतात, तेव्हा स्टेडियमच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी एक वेगळीच वातावरण निर्मिती होते.
खेळाच्या माध्यमातून एकमेकांना उत्तरं देणं जमलं नाही तर अनेकदा शब्दांचा मारा देण्यास देखील पाकिस्तानी खेळाडू मागेपुढे पाहत नाहीत. शोएब अख्तरची कायम कुठल्या न कुठल्या कारणानं भारतीय खेळाडूंसोबत शाब्दिक बाचाबाची होत असे.
अगदी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही पाकिस्तानच्या या खेळाडूने भारतीय खेळाडूंसोबत पंगे घेणं सोडलेलं नाही. मात्र, भारताचे खेळाडूसुद्धा त्याला सुट्टी देत नाहीत. त्यांनी वेळोवेळी शोएबला प्रत्युत्तर दिलेलं आहे. अशा प्रसंगांमधून कधीकधी विनोदाची किनार असलेल्या गोष्टी देखील घडतात. पंजाबी मुंडा हरभजन सिंग आणि शोएब अख्तरचा असाच एक किस्सा अतिशय प्रसिद्ध आहे.
गोष्ट आहे २०११ सालची. हे तेचं वर्ष आहे ज्या वर्षी भारतानं विश्वचषकाला गवसणी घातली होती. भारत आणि पाकिस्तानने विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. एकमेकांना मात देऊन फायनलमध्ये जाण्यासाठी प्रत्येक खेळाडू उत्सुक होता. सेमीफायनलचा सामना मोहालीमध्ये रंगणार होता.
भारत-पाकिस्तान सामना म्हटल्यानंतर सहजासहजी तिकिटं मिळणं कठीणच होतं. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला तर कुठल्याही परिस्थितीमध्ये हा सामना प्रत्यक्षात पहायचा होता. तिकिटे मिळवण्यासाठी शोएबनं हरभजन सिंगची मदत घेतली. हरभजनने दिलेल्या सामन्याचे तिकीट मागितले होते. हरभजननं देखील शोएबसाठी चार तिकिटांची व्यवस्था करून दिली होती. मात्र, त्यानंतर शोएबनं वानखेडेवर होणाऱ्या फायनची देखील तिकिटं मागितली. तेव्हा हरभजननं शोएबला डिवचण्यासाठी त्याची मुद्दाम चेष्टा केली.
शोएबनं विश्वचषकाच्या फायनलची तिकिटे हरभजनसिंगला मागितली. तेव्हा हरभजननं दिलेलं उत्तर ऐकल्यानंतर आजही भारतीय क्रिकेट चाहते ‘भज्जी पाजी तुस्सी ग्रेट हो’ असं म्हटल्याशिवाय राहत नाहीत. “फायनलचा सामना पहायचा असेल तर मी २-३तिकिटांची व्यवस्था करून देऊ शकतो. पण, फायनलची तिकिटे घेऊन तू करणार काय? कारण फायनलमध्ये तर भारतीय संघ जाणार आहे!”, असं हरभजनचं त्यावेळचं उत्तर होतं.
याचा सरळ अर्थ असा होता की, मोहालीच्या सामन्यात भारत पाकिस्तानचा पराभव करणार. असं उत्तर देऊन भज्जीनं शोएब अख्तरची बोलतीचं बंद केली होती. विशेष म्हणजे हरभजन सिंगचा प्रत्येक शब्द खरा ठरला. मोहालीतील सेमीफायनलच्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला होता. तिकिटांचा हा किस्सा हरभजन सिंगनं नंतर एका सार्वजनिक कार्यक्रमात सांगितला होता.
हरभजन सिंग आणि शोएब अख्तरच्या जुगलबंदीचा हा काही एकमेव किस्सा नाही. दोघेजण यापूर्वी देखील अनेकदा एकमेकांशी भिडले होते. २०१६ साली हरभजसिंगनं रजत शर्माच्या ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळीसुद्धा त्यानं एक किस्सा सांगितला होता. २००४ साली भारत पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. तेव्हा शोएब अख्तर, युवराज सिंग आणि हरभजन सिंग दरम्यान रुममध्ये बाचाबाची झाली होती.
त्यानंतर २०१० च्या आशिया चषक स्पर्धेतमध्ये देखील हरभजन आणि शोएब एकमेकांविरोधात भिडले होते. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्या दरम्यान शोएबनं हरभजनला षटकार मारण्याचं आव्हान दिलं. भज्जीनं देखील चिडून शोएबला त्याच्याचं गोलंदाजीवर षटकार मारून दाखवला होता. त्यानंतर चिडलेल्या शोएबनं भज्जीवर बाऊन्सर्सचा मारा केला.
हरभजन सिंगच्या म्हणण्यानुसार शोएबनं त्यावेळी त्याला शिवीगाळ देखील केली होती आणि हॉटेल रुममध्ये येऊन मारण्याची धमकी देखील दिली होती. हॅलो ॲपला दिलेल्या मुलाखतीमध्ये खुद्द शोएब अख्तरनं देखील ही गोष्ट मान्य केलेली आहे. सामना संपल्यानंतर रागाच्या भरात मी खरोखर हरभजनच्या शोधात त्याच्या रुमपर्यंत गेलो होतो. मात्र, तो मला सापडलाच नाही.
दुसऱ्या दिवशी राग शांत झाल्यानंतर आम्ही एकमेकांची माफी मागून प्रकरण मिटवून घेतल्याचं ही शोएब म्हणाला होता. सध्या दोन्ही क्रिकेटर निवृत्त झालेले आहेत. मात्र, तरी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून ते एकमेकांना डिवचत असल्याचं दिसतं. या डिवचण्याला विनोदाची किनार नक्की असते. २०१९ साली हरभजन सिंग शोएब अख्तरच्या यूट्यूब चॅनेलवरही दिसला होता. त्याठिकाणी दोघे क्रिकेटपटू एकमेकांशी मैत्रीपूर्ण संवाद साधताना दिसले होते.
हरभजन सिंग व्यतिरिक्त आशिष नेहरा आणि मोहम्मद कैफ यांच्याकडे देखील शोएब अख्तरबद्दलचे किस्से आहेत. नेहरानं विस्डेनच्या ग्रेटेस्ट रायव्हलरी पॉडकास्टवर २००४च्या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यानची एक गोष्ट सांगितली होती. भारतानं पाकिस्तान विरुद्धचा सामना गमावला होता. आशिष नेहरा हा सर्वात शेवटी आउट होणारा खेळाडू होता. शोएब अख्तरचा बॉल पुल करण्याच्या नादात आशिष आउट झाला होता.
त्यानंतर शोएब नेहराच्या समोर येऊन पंजाबीमध्ये म्हटला होता, ‘बॅट उचलण्याच्या अगोदर समोर कोण गोलंदाजी करतं हे बघायला शिक’. २०२०च्या सुरुवातीला अख्तर आणि मोहम्मद कैफ दरम्यान ट्विटरवर जुंपली होती. कैफनं एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्या व्हिडिओमध्ये त्याचा मुलगा त्याला, शोएब अख्तरसारख्या वेगवान गोलंदाजाचा सामना करणं किती सोप आहे, हे सांगताना दिसत होता. या व्हिडिओला शोएब अख्तरनं उत्तर दिलं होतं. आपण आपल्या मुलांचा एक सामना ठेवू, असं अख्तर म्हणाला होता.
असं असलं तरी दिखाव्यासाठी का होईना पण प्रतिभावान भारतीय खेळाडूंची स्तुती करण्यापासून शोएब स्वत:ला रोखू शकलेला नाही. भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या खेळाचा तो खूप मोठा चाहता आहे. त्याने अनेकदा कोहलीवर स्तुतीसुमने उधळलेली आहेत. यामुळं त्याला पाकिस्तानी मीडिया आणि क्रिकेट चाहत्यांच्या टीकेचा सामनाही करावा लागलेला आहे. एकूणच काय तर रावळपिंडी एक्सप्रेस मैदानावर कितीही आक्रमक असली तरी त्यानं आपल्यातील खिलाडूवृत्ती कुठेतरी टिकवून ठेवलेली आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.