आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
“खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे” ही शिकवण देत जगाला मानवतावादाचा संदेश देणारे, लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आपलसं वाटणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे साने गुरुजी.
लहानपणी श्यामची आई हे पुस्तक, त्यातील काही गोष्टी आम्हाला अभ्यासक्रमात होत्या इथेच आम्हाला साने गुरुजींची ओळख झाली.
पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजींचे घराणे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याच्या पालगड गावचे. त्यांचे आजोबा या गावातील नामांकित श्रीमंत व्यक्ती, पण त्यांची श्रीमंती अधिक काळ टिकली नाही. साने गुरुजींचे वडील सदाशिव राव यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असे. असा पोकळ संसार असणाऱ्या घराण्यात १८९९ सालच्या २४ डिसेंबर रोजी साने गुरुजींचा जन्म झाला.
बालपणी त्यांच्या आई यशोदाबाई यांनी पांडुरंगाला चांगले संस्कार दिले.
आईच्या संस्कारांमुळेच पांडुरंगाचे व्यक्तिमत्त्व घडले.
पांडुरंग अभ्यासातही हुशार होता, कविता, कथा यांमध्ये त्याला रस होता. पुढे इंग्रजी विषयाचा अभ्यास करून त्यांनी एम.ए. ची पदवी मिळवली व अमळनेरच्या प्रताप महाविद्यालायात सह-शिक्षक म्हणून रुजू झाले.
पूर्वीचे शिक्षक हे अभ्यासाच्या बाबतीत अत्यंत कठोर होते, अशी एक प्रतिमा आपल्या समोर बनली गेली आहे. अगदीच सांगायचं तर बालपणी तुम्ही “छडी लागे छम छम, विद्या येई घम घम” हे गाणे ऐकले असणार. पण साने गुरुजींचे व्यक्तिमत्त्व हे यापेक्षा वेगळे होते. साधी राहणी, मितभाषी स्वभाव यामुळे साने गुरुजी विद्यार्थ्यांमध्ये प्रिय होते. त्यांचे एकंदर वागणे बोलणे आदर्शवत होते, यासाठी ते त्यांच्या आईला नेहमी धन्यवाद देत.
त्यांनी लिहिलेल्या श्यामची आई या पुस्तकात आपल्या आईविषयी अनेक बाबी मांडल्या आहेत. प्रताप विद्यालयात शिक्षक म्हणून काम करत असताना त्यांनी भूमिका चोख पार पडत विद्यार्थ्यांना स्वावलंबी होण्याबरोबरच सेवावृत्तीचे संस्कार देखील दिले.
शिक्षकी कामातून वेळ काढत त्यांनी साहित्य व तत्त्वज्ञानाचाही अभ्यास केला. साने गुरुजींच्या विचारांवर महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव होता. जनजागृती करण्यासाठी त्यांनी ‘विद्यार्थी’ नावाचे एक मासिक सुरु केले होते. पण आपण देशासाठी काही तरी प्रत्यक्ष योगदान द्यायला हवे असा विचार करून त्यांनी प्रताप शाळेची नोकरी सोडून समाजकार्यात स्वतःला झोकून दिले.
समाजातील अनिष्ट रूढी, जातीभेद,अस्पृश्यता निवारण यांसाठी साने गुरुजींनी कष्ट वेचले.
“जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित, तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे” या उक्तीप्रमाणे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी अहिंसा मार्गाने आंदोलन उभारण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर दौरा केला. आपली ही भूमिका जनकल्याणासाठी आहे, गांधीजी याला साथ देतील असे त्यांना वाटत होते. पण गांधींनी यात फार लक्ष दिले नाही. पण साने गुरुजी खचले नाहीत. आपल्या सहकाऱ्यांसोबत ते उपोषणाला बसले आणि आंदोलन यशस्वी करून दाखवले. “पांडुरंगाने आम्हाला पांडुरंगाचे दर्शन घडवले”, असे त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचे कौतुक करताना सांगितले होते.
साने गुरुजींचे कार्य अविरत सुरु होते. सविनय कायदेभंगाची चळवळ उभी राहत होती, साने गुरुजी यात सहभागी झाले. राष्ट्रवादी विचारांच्या लोकांना प्रेरणा मिळावी व त्यांचा सहभाग वाढवा यासाठी त्यांनी “कॉंग्रेस” नावाचं एक मासिक सुरु केलं. लोकं उस्फुर्तपणे आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी समाजातील ज्वलंत विषय, देशभक्ती, समाज जागृती यांवर भाष्य करत असताना अनेक निबंध, लेख, कविता, गीते लिहिली, ज्यातून आपल्याला आजही प्रेरणा मिळते. त्यांचा मनात देशाप्रती जी निष्ठा, समाजाविषयी असलेली सद्भावना त्यांनी आपल्या शब्दातून व्यक्त केली. त्यांचे लिखाण हे हृदयाचा वेध घेणारे होते.
त्यांनी लिहिलेल्या “बल सागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो” कवितेमुळे तर देशभक्तांमध्ये चैतन्य निर्माण झाले. त्यांच्या सेवेवृत्तीमुळे स्वातंत्र्याच्या चळवळीला हातभार लागला. एका शाळेतील शिक्षक ते स्वातंत्र्याच्या चळवळीतील सेनानी असा त्यांचा प्रवास होता. ते काही दिवस काँग्रेस मधेही कार्यरत राहिले.
ते आंदोलनांत प्रत्यक्ष सहभाग घेऊ लागले. असेच एक आंदोलन धुळ्यात करण्यात आले ज्यामुळे साने गुरुजींना १५ महिन्याचा करावासही भोगावा लागला.
स्वातंत्र्यानंतर त्यांनी समाजवादी विचारांच्या पक्षासोबत काम सुरु केले. साने गुरुजींचे लिखाण व त्यांचे व्यक्तिमत्त्व यामुळे त्यांचा सहकारी वर्ग जोमाने वाढू लागला.
साहित्याच्या चळवळीत त्यांनी संस्कृती विषयीही आपली मते उघडपणे मांडली, आपण एकमेकांची संस्कृती स्विकारली व समजून घेतली पाहीजे अशा विचाराचे ते होते. यातूनच त्यांनी स्वतः तमिळ, बंगाली आदी भाषा आत्मसात केल्या. ‘करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे’ हे गुरुजींच्या जीवनाचे ब्रीद होते. यातूनच त्यांनी मुलांवर संस्कार व्हावेत म्हणून काही पुस्तकेही लिहिली, ती आजही तितकीच लोकप्रिय आहेत.
मानवतावाद, समाजवाद, देशभक्ती यात महत्त्वपूर्ण योगदान देत त्यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला. त्यांनी आपल्या हयातीत एकूण ७० पेक्षाही अधिक गीत-संग्रह, पुस्तके, कादंबऱ्या लिहिल्या. साने गुरुजींचे भारतीय साहित्य, संस्कृती यांवर नितांत प्रेम होते. त्यांनी याचे वर्णन आपल्या शब्दात “भारतीय संस्कृती” या ग्रंथात करुन ठेवले आहे. ज्यातून भारताचे सांस्कृतिक सौंदर्य आपणाला पहावयास मिळते.
साने गुरुजींचे सर्वाधिक प्रसिद्ध असलेले श्यामची आई हे पुस्तक त्यांनी नाशिकच्या तुरुंगात असताना लिहिले.
एक भारतीय म्हणून आपण भारतातील साहित्य, भारताची विविधता यांचा आदर केला पाहिजे व ती आत्मसात करत आपले ज्ञान वाढवले पाहिजे हा त्यांचा विचार होता. यासाठी रवीन्द्रनाथ टागोरांच्या शांती निकेतनप्रमाणे संस्था काढावी अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी काही निधी संकलनही केले पण काही कारणास्तव ते शक्य होऊ शकले नाही.
“कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे, समस्ता बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे” म्हणत जगाला जगण्याची कला शिकवणाऱ्या साने गुरुजींनी ११ जून १९५० रोजी आत्मह*त्या करत आपले जीवन संपवले. “जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला.” हे खरेच ठरले.
साने गुरुजींच्या पुण्यस्मृतींना आमचे वंदन!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.