आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
गरिबीमुळे त्याला शिक्षण घेता आलं नाही. शिक्षणाचा खर्च परवडत नसल्याने शिक्षण सोडणारा एक अवलिया मासे विकणारा मनुष्य गेल्या ४० वर्षांपासून आपल्या कामातून वेळ काढून गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करतो आहे. बिस्वनाथ नारू असे या अवलियाचे नाव आहे.
नारू यांची दिनचर्या भल्या पाहटे सुरु होते, कोलकाता शहराच्या पुटूकपूर फिश मार्केटच्या गल्ल्यांमधून आपल्या मासळीचे डालकं घेऊन ते आपल्या रोजच्या बाजारहाटी साठी निघतात. थोड्यावेळात ते डुम डुम बाजारातील आपल्या दुकानावर ते पोहचतात आणि १० वाजेपर्यंत आपल्या सर्व मालाची विक्री करून, ते सामन बांधून स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळेत पोहचतात. त्यांना आपल्या विद्यार्थ्यांना वाट बघावी लागू नये याची काळजी असते.
लहान मुलांना गणित आणि विज्ञान शिकवणे त्यांचा आवडता छंद आहे. नारू त्यांचा संपूर्ण दिवस त्या लहान मुलांना शिकवण्यात व त्यांच्या सोबत खेळण्यात घालवतात. ज्या विद्यार्थ्यांना गरज असते त्यांच्यावर विशेष लक्ष देऊन ते अभ्यास करवुन घेतात.
त्यांच्या ग्राहकांसाठी जरी ते एक सामान्य मासे विक्रेते असले तरी त्यांच्या विद्यार्थ्यांचे ते लाडके गुरु आहेत.
गेल्या चाळीस वर्षांपासून नारू यांच्या दिनचर्येत कुठलाही बदल झाला नसून, ते रोज सकाळी उठतात, मत्स्यविक्री करतात आणि पुढे शाळेत विद्यार्थ्यांना शिकवायला शाळेत जाऊन घरी परततात. हे रुटीन जसेच्या तसे सुरु ठेवण्यात अनंत अडचणींचा सामना नारू यांना करावा लागत असला तरी मुलांच्या भविष्याला विचारात घेऊन ते कष्ट सोसत आहेत. ते विद्यार्थ्यांना शिकवताना त्यांच्या आठवणीही सांगतात, ज्यावेळी ते केवळ एक पत्र्याचं छत असलेल्या शाळेत शिकवत होते. त्या शाळेत मुसळधार पाऊस झाला की पाणी घुसायचं.
इतक्या बिकट परिस्थितीत हि मुलं शिकायला यायची, तेव्हा त्या मुलांच्या निष्ठेला बघून त्यांनी त्या पत्र्याच्या शाळेचं एका भक्कम बांधकाम असलेल्या वास्तूत रूपांतर करायचा निर्धार केला होता.
जेव्हा नारू यांच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा ते केवळ सहा वर्षांचे होते. त्यांच्या आईवर दोन मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी येऊन पडली. त्यांच्या आईचे शिक्षण झाले नसल्याने त्यांना धुणी भांडी करावी लागत होती.
नारू यांच्या शेजाऱ्यांच्या चांगुलपणामुळे त्यांना व त्यांच्या बहिणीला दहावीपर्यंत घेणे शक्य झाले होते. लहानपणापासून अत्यंत जिद्दी आणि कष्टाळू असलेल्या नारू यांना परिस्थितीसमोर हात टेकावे लागले. शेवटी त्यांनी मासेविक्रीच्या उद्योगात उडी घेतली. मग १८ वर्ष अल्प उत्पन्न असणाऱ्या परिवारातील मुलांना सुशिक्षित करणे नारू यांचे बनले. त्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलने नारुला शक्य नसल्याने त्याने त्या विद्यार्थ्यांसाठी शाळेची निर्मती करून बालवाडी ते इयत्ता चौथीपर्यंतच शिक्षण देण्यात सुरुवात केली.
१०० बाय २० फुटाच्या प्लॉटवर त्यांनी काही देणगीदारांच्या मदतीने छोटेसे बांधकाम केले. त्यांच्या नव्या शाळेत बेंच नव्हते, लाईट्स नव्हते. एका जोडप्याने त्यांच्या शाळेला पुस्तकं आणि इतर गोष्टी दान केल्या.
त्यांनी काही स्थानिक लोकांना शिकवायला ठेवलं. रिक्षावाले, मजूर आणि कष्टकऱ्यांच्या मुलांना त्यांनी शिक्षण देण्यास सुरुवात केली.
शाळेला पुढे कोलकाता अर्बन क्लब आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया काउन्सिलचे अर्थसहाय्य मिळाले व आवश्यक त्या गोष्टींची खरेदी करणे त्यांना सोपे झाले. अनेक शेतकऱ्यांचा संघटना, बँक आणि फायनान्स कंपनीजने पुढे त्यांच्या शाळेला अर्थसहाय्य देऊ केलं.
परंतु २००० साली, शाळेला मिळणाऱ्या अनुदानाचं प्रमाण घटलं. मग शाळेच्या सर्व खर्चाचा डोलारा नारू यांच्या खांद्यावर येऊन पडला. त्यावेळी त्यांना प्रत्येक शिक्षकाला ५० रुपये पगार द्यावा लागत होता. पुढे जाऊन विद्यार्थ्यांची संख्या वाढून २०० इतकी झाली, त्यामुळे त्यांना खर्च उचलने कठीण झाले.
घरचे पैसे त्यांनी वापरले, ज्यामुळे त्यांनी परिवाराचा रोष ओढवून घेतला होता.तो काळ त्यांच्यासाठी अत्यंत कसोटीचा होता.
पण वाईट काळ जास्त टिकत नाही. कधी कधी आशेची पहाट होतच असते. तशीच आशेची पहाट नारू यांच्या आयुष्यात प्रज्ञाता फाउंडेशनच्या रूपाने आली. या फाउंडेशन नारू यांच्या शाळेची व्यवस्था वर्षभर पाहिली आणि त्यांना त्यांच्या कार्यासाठी मदत करायला सुरुवात केली.
या फाउंडेशनने नारू यांच्या शाळेला वर्षाकाठी २०,००० पुस्तकांची देणगी देण्यास सुरुवात केली. पुढे जाऊन या शाळेवरचा अतिरिक्त पुस्तकांचा भार कमी झाला आणि खर्च कमी झाला.
प्रज्ञाता फाउंडेशनने देखील या शाळेच्या संचलनासाठी निधी उपलब्ध करून द्यायला सुरवात केली आहे, पण हि शाळा सरकारी नसल्याने या शाळेत आर्थिक अडचणी उद्बवत असतात. ह्या शाळेला सरकारी मान्यता मिळावी यासाठी नारू हे प्रयत्नशील आहेत.
सरकारी मान्यता नसल्याने बऱ्याचदा पालक आपल्या पाल्याला शाळेत पाठवायला कचरतात, यामुळेच सरकारी मान्यता मिळवणे गरजेचे असल्याचे नारू म्हणतात. सरकारी मान्यता मिळवल्यानंतर इतर बरेच फायदे शाळेला मिळत राहणार आहेत. पण नारू यांना सरकारी मान्यता मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.
आपल्या विद्यर्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपण संघर्ष करत राहणार आहोत असं नारु आत्मविश्वासाने सांगत आहेत. त्यांच्या कार्याला यश प्राप्त होवो हीच प्रार्थना!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.