आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
तामिळनाडूच्या तिरुचीरापल्लीपासून ४२ किमी अंतरावर असणाऱ्या मुसिरी पंचायत हे गाव कावेरी नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे, गावाला शुद्ध पाण्याचा आणि सुपीक जमिनीचा वारसा लाभला आहे. शेतीसाठी या गावाचा प्रदेश स्वर्ग समजला जातो.
अधिक भूजलपातळीमुळे या भागातील साधारण शौचालये या भागातील लोकांचे कल्याण करण्याऐवजी नुकसानच जास्त करतात.
इथल्या सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा न होऊ शकल्यामुळे इथल्या चांगल्या व शुद्ध पाण्याचे प्रदूषण होते.
सर्वप्रथम सोसायटी फॉर कम्युनिटी ऑर्गनायजेशन अँड पब्लिक एज्युकेशन अर्थात ‘SCOPE’ या संघटनेच्या लक्षात हा मुद्दा आला होता. हे लक्षात आल्यावर त्यांनी त्याठिकाणी अजून कुठल्याही प्रकारे भूजल प्रदूषित होऊ नये यासाठी इकोसन टॉयलेट्स निर्माण केले.
या पद्धतीत कुठल्याही प्रकारचा पाईप संडासात नसून त्यामुळे संडासचा आणि जमिनीचा परिणामतः भूजलाचा कुठलाच संबंध येत नाही त्यामुळे भूजल प्रदूषित होण्याची कुठलीच शक्यता नाही.
या गावातील पहिलं वहिलं इकोसन टॉयलेट २००० साली तयार करण्यात आलं. २००५ सालापर्यंत महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळ्य्या इकोसन टॉयलेट्सची निर्मिती करण्यात आली.
SCOPE या संघटनेचं लक्ष गावातील हगणदारीच्या समस्येकडे गेलं, लोक खुल्यावर शौचास बसायची हे बघून त्यांनी टॉयलेट्सची निर्मिती करण्यास सुरुवात केली. आज त्यांनी संघटनेच्या माध्यमातून २० हजारांपेक्षा जास्त टॉयलेटसची निर्मिती केली आहे. या संघटनेची स्थापना १९८६ साली मारुची सुब्बरमन यांनी केली.
आज SCOPE या संघटनेच्या माध्यमातून आज देशाच्या २६ राज्यात १ लाख इकोसॅन टॉयलेट्स बांधण्यात आले आहेत. त्यांनी बिहार, आंध्र प्रदेश, आसाम, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यात काही मोठे प्रकल्प देखील साकारले आहेत.
सुब्बरमन यांनी दुष्काळग्रस्त भागात जिथे जलपातळी ७० टक्क्याहून कमी आहे अशा ठिकाणी हे टॉयलेट्स अत्यंत प्रभावीपणे काम करत असून याचा कुठलाही प्रादुर्भाव आजपर्यंत जाणवला नसल्याचे मत यक्त केले आहे.
या टॉयलेट्सचे वैशिष्टय म्हणजे यात दोन कॅव्हिटीज असतात, एक मूत्र विसर्जनासाठी आणि एक असते मल निस्सारण करण्यासाठी आणि दोन्ही भागांमध्ये हातपाय धुण्यासाठी एक मोरी देखील असते.
या दोन कॅव्हिटीज एकमेकांना खालच्या बाजूला असलेल्या बांधकामाने जोडलेल्या असतात. या जागेत सर्व मलमूत्र जमा होते. या बांधकामाचा जो पाया असतो तो कॉंक्रिटने मजबूत केलेला असतो. यामुळे तिथे जमा होणाऱ्या पाण्याचा आणि मलमूत्राचा भूजलाशी संबंध येणार नाही.
जेव्हा खालच्या भागात साठवलेले मलमूत्र काढून हलवले जाते त्यावेळी त्या भागात राख टाकली जाते. ही राख गवत अथवा तांदळाच्या पेंढ्या जाळून मिळवली जाते, शक्यतो झाडाच्या लाकडाचा वापर फार कमी प्रमाणात केला जात असतो.
या राखेत अँटी बॅक्टरीयल तत्व असल्यामुळे त्या जागेतील जीव आणि जीवाणू संपतात तसेच दुर्गंधी, रोगराईचा प्रसार होत नाही. सोबतच या राखेमुळे तिथे वातावरणातील मोईस्चर देखील शोषले जाते. ज्यामुळे खतनिर्मिती प्रक्रिया गतिमान होते. ही राख बऱ्याचदा कॅव्हिटीमध्ये देखील टाकली जाते.
या भागात दमट हवामान असून त्या हवामानात खताची निर्मिती होण्यासाठी तब्बल ६-१२ महिन्यांचा कालावधी लागतो. तितका काळ ते टॉयलेटच्या खालचा भाग उघडत नाही.
प्रत्येक वर्षी एका टॉयलेट युनिटमधून तब्बल ४०० किलो खताची निर्मिती होते आणि जे टॉयलेट्स सार्वजनिक वापरासाठी असतात त्यात याचा आकडा वाढून १७७३ किलोपर्यंत गेला आहे. हे टॉयलेट्स अस्तितवात येण्या अगोदर मुसिरीचे शेतकरी रासायनिक खतावर २० हजार रुपयांचा खर्च करायचे, आज त्यांना फुकट आणि दर्जेदार खत सहज उपलब्ध होत आहे.
या एका टॉयलेट्सच्या निर्मितीसाठी मोठा खर्च करावा लागतो. एका टॉयलेटच्या निर्मितीसाठी ३० हजार रुपये खर्च येत असतो.
सार्वजनिक टॉयलेट्सच्या निर्मितीला अजून जास्त खर्च येत असतो. आधी सुब्बरमन हे एका सार्वजनिक टॉयलेटच्या निर्मितीसाठी ८ लाखांचा खर्च करत होते. आज बांधकाम खर्च वाढल्यामुळे तो खर्च वाढून १५ लाख इतका झाला आहे. या रक्कमेत देखील टॉयलेट्च्या संख्येनुसार वाढ होऊ शकते, असं सुब्बरमन यांनी स्पष्ट केलं आहे.
सुब्बरमन यांनी बीएस्सीचे शिक्षण घेतले असून, त्यांनी १९७५ साली तिरुचरापल्ली येथील इ.व्ही.आर कॉलेज मधून रसायनशास्त्रात पदव्ययुत्तर शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी बीएड केले.
१९७६ साली ग्राम पुनर्विकास संस्थेचे ते सभासद बनले. पुढे दहा वर्ष या संस्थेसाठी काम केल्यानंतर आपल्या गावाचा विकास करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. यासाठीच १९८६ साली त्यांनी SCOPE ची स्थापना केली.
सुरुवातीला या संघटनेच्या माध्यमातून कामाला प्रारंभ झाला आणि मग त्या संघटनेची संस्थात्मक रचना करण्यात आली होती.
आधी फक्त कृषी, पशुपालन आणि विणकाम या क्षेत्राच्या ग्रामीण भागातील विकासावर संस्थेचे लक्ष होते पुढे कालांतराने संस्थेला यश मिळत गेले आणि संस्थेचा विकास होत गेला.
पुढे एका कार्यक्रमादरम्यान सुब्बरमन यांच्या कानी इकोसॅन टॉयलेट्सची संकल्पना पडली आणि ती सत्यात उतरवण्याचा ध्यास त्यांनी घेतला. त्यांनी त्यासाठी पॉल कल्व्हर्ट या बेल्जीयमच्या इंजिनियरची भेट घेतली. या इंजिनियरकडून त्यांना ह्या इकोसॅन टॉयलेट्सची संपूर्ण संकल्पना लक्षात आली.
२००० साली त्यांनी अखेरीस मोठ्या मेहनतीने ही कल्पना सत्यात उतरवली. कल्लीपलायम या गावी इकोसॅन टॉयलेट्सची सुरुवात करण्यात आली होती.
सुरुवातील लोक या टॉयलेट्सचा वापर करण्यासाठी मोठा संकोच करत होती, त्यांना उघडयावर प्रातविधी करणे जास्त सोयीचे वाटत होते, त्यांना त्याचे दुष्परिणाम लक्षात येत नव्हते. ह्या मोठ्या समस्येवर मात करण्यासाठी SCOPE ने आधी टॉयलेट्सचा जो वापर करेल त्याला पैसे देखील देण्यास सुरुवात केली.
हे त्यांनी पुढे अनेक काळासाठी चालू ठेवले, पुढे लोकांना याची सवय झाली, त्यावेळी त्यांनी लोकांना पैसे देण्यास बंद केले. लोकांनी देखील उत्स्फूर्तपणे याचा वापर करण्यास सुरुवात केली.
त्यांनी उघड्यावर शौचाच्या दुष्परिणामांवर अनेक कार्यशाळा आणि मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन देखील केले.
२०१८ साली केरळमध्ये आलेल्या पुरानंतर त्यांनी १०० इकोसॅन टॉयलेट्सचे बांधकाम केले. युनिसेफच्या सोबतीने त्यांनी २८हजार टॉयलेट्सची निर्मिती केली आहे.
देशातील वाया जाणाऱ्या मलमूत्रामुळे देशातील शुद्ध जलस्रोतांवर गंभीर परिणाम होत आहे, वाढत्या लोकसंख्येमुळे ही समस्या अधिक गंभीर बनत चालली आहे.
यावर इकोसॅन टॉयलेट्स हे उत्तम उपाय असून देशातील शेतकरी जो नापिकीच्या समस्येने ग्रस्त आहे त्याला यामुळे चांगल्या संद्रिय खताचा पुरवठा होऊन ती देखील समस्या सुटण्यास मदत होणार आहे, शिवाय ग्रामीण भागातील नागरिकांचा उघड्यावर शौचाचा जो गंभीर प्रश्न आहे त्यावर देखील हा चांगला उपाय आहे.
सुब्बरमन ही संकल्पना देशभरात राबवू इच्छित असून लवकरच सरकारच्या सहाय्याने यासाठी प्रयत्न करण्यास ते सुरुवात करणार आहेत. त्यांच्या कार्याला यश मिळो ह्याच आमच्या सदिच्छा !
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.