आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
संयुक्त अरब अमिराती (युएई). कच्च्या तेलाच्या खाणींनी समृद्ध असलेला देश. याठिकाणी रूब अल् खाली, अल् बदायर आणि लिवा ओॲसिस नावाची तीन विस्तीर्ण वाळवंट आहेत. वाळवंट असल्यामुळं युएईला ‘डेझर्ट स्टॉर्म्स’ ही संकल्पना काही नवीन नाही. मात्र, २२ एप्रिल १९९८ या दिवशी शारजाहनं एकाच वेळी दोन वादळं अनुभवली. एक धुळीचं आणि दुसरं रन्सचं!
एका वादळाची निर्मिती निसर्गाच्या कलेतून झाली होती तर दुसऱ्या वादळाची निर्मिती ‘सचिन तेंडुलकर’ नावाच्या अवलियाच्या बॅटमधून. २२ एप्रिलला शारजाह क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान कोका-कोला कपची (ट्राय सिरीज) सेमीफायनल रंगली होती. याच सामन्यादरम्यान सचिनच्या बॅटनं एका अशा वादळाची निर्मिती केली की, ऑस्ट्रेलियन बोलर्सच्या मनात त्या ‘डेझर्ट स्टॉर्म’ची कायमस्वरूपी दहशत बसली. त्या दिवशी नेमकं काय झालं होतं हे आपण जाणून घेऊया..
९०च्या दशकामध्ये सचिन तेंडुलकरला खेळताना पाहणं म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी एक पर्वणी असायची. विशेषत: जर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरोधात खेळत असेल तर मग कल्पनाच नको करायला. जगाच्या पाठीवर ज्या-ज्या ठिकाणी भारत आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांविरोधात खेळले त्या प्रत्येक ठिकाणी सचिननं ‘ऑसी बोलिंग’च्या चिंधड्या उडवल्या होत्या. ९०च्या दशकात सचिन तेंडुलकरनं अनेक अविस्मरणीय खेळी केल्या.
मात्र, एप्रिल १९९८ मध्ये शारजाहच्या मैदानावर केलेल्या शतकाला कशाचीच सर येणार नाही. त्यादिवशी सचिननं एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील मोजक्या लोकप्रिय खेळींपैकी एक खेळी खेळली होती. ऑस्ट्रेलियन क्रिकेट साम्राज्यावर ह*ल्ला करून त्यानं त्यांना गुडघ्यावर आणलं होतं. पहायला गेलं तर नव्वदचं दशक हे एकदिवसीय त्रिकोणी मालिकांचं दशक समजलं जातं. दशकभरात अनेक त्रिकोणी क्रिकेट मालिका खेळवल्या गेल्या.
१९९८ साली एका वर्षात तब्बल ९ त्रिकोणी स्पर्धा झाल्या. यामुळं एकदिवसीय क्रिकेट प्रचंड लोकप्रिय झालं. एप्रिल महिन्यात ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यूझीलंड दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये त्रिकोणी मालिका खेळवली गेली. त्याठिकाणी येण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि भारत, झिम्बाब्वेसह एक त्रिकोणी मालिका खेळले होते आणि ऑस्ट्रेलियानं ती मालिका जिंकली होती. युएईमध्ये येण्यापूर्वी सचिन फारशा चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता. १० सामने खेळून त्याला फक्त ३८७ धावा जमवता आल्या होत्या. मात्र, वर्षाअखेर त्याच्या खात्यात १ हजार ५०७ धावा जमा झाल्या होत्या. अन् या झंझावाताची सुरुवात शारजाहतील एका वादळी रात्रीपासून झाली होती.
भारताशी सामना होईपर्यंत ऑस्ट्रेलियानं मालिकेतील आपला प्रत्येक सामना जिंकलेला होता. २२ एप्रिलला झालेल्या सामन्यात कर्णधार स्टीव्ह वॉनं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपल्या भावाच्या निर्णयाचा मान राखण्यासाठी मार्क वॉनं ८१ धावांची खेळी केली. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या मायकेल बेवननं शतक झळकावलं आणि ऑस्ट्रेलियाचा स्कोअर २८० पार नेला. डावा अखेरीस ऑस्ट्रेलियानं सात गड्यांच्या बदल्यात २८४ धावा केल्या होत्या. ही त्या मालिकेतील सर्वोच्च धावसंख्या होती.
२८४ धावांचं आव्हान पार करण्यासाठी भारतीय संघाच्यावतीनं सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी डावाची सुरुवात केली. सुरुवातीला सावधपणे खेळणाऱ्या मास्टर ब्लास्टरनं पाचव्या ओव्हरनंतर आपले गिअर्स बदलले. ऑस्ट्रेलियाकडे मायकेल कास्प्रोविझ, डेमियन फ्लेमिंग, शेन वॉर्न, टॉम मूडी आणि स्टीव्ह वॉ या पाच जणांचा बॉलिंग अटॅक होता.
यातील प्रत्येकजण सचिनची कडक परीक्षा घेणार होता. पण मास्टर ब्लास्टरकडे प्रत्येकासाठी उत्तर होतं. सुरुवातीला कॅस्प्रोविझला सचिननं सलग दोन षटकार खेचले. २१व्या ओव्हरमध्ये शेन वॉर्नला कव्हर ड्राइव्ह मारून त्यानं आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यावेळी कॉमेंट्री करणाऱ्या टोनी ग्रेगनं सचिनच्या शतकाची भविष्यवाणी करून टाकली होती.
सामना रंगात आला होता मात्र, मध्येच निसर्गाला आपला रंग दाखवून देण्याची लहर आली. २१ ओव्हर्सचा खेळ शिल्लक असताना अचानक एक वाळूचं वादळ शारजाहला येऊन धडकलं. पूर्ण वेगानं वारे वाहू लागल्यानं मैदान रिकामं करावं लागलं. जेव्हा खेळ पुन्हा सुरू झाला तेव्हा चार ओव्हर्स आणि नऊ धावा कमी करून भारताला नवीन टारगेट दिलं गेलं.
ऐनवेळी झालेल्या या बदलानं भारताचा रिक्वायर्ड रन-रेट वाढला. सामना जिंकण्यासाठी तेंडुलकरला टॉप गिअरमध्ये जाण्याची वेळ आली. धुळीचं वादळ ओसरल्यानंतर त्याने मैदानाच्या मध्यभागी स्वतःचं वादळ सुरू केलं. सचिननं मैदानात चौफेर फटकेबाजी करत आपलं चौदावं एकदिवसीय शतक पूर्ण केलं. तेव्हा भारताची धावसंख्या १९४ होती.
त्यानंतर भारताला मालिकेतील आपलं आव्हान टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक बॉलमागे एक रन आवश्यक होता. सहा षटके बाकी असताना भारताला विजयासाठी ७० धावांची गरज होती. ४२व्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर सचिननं एक सरळ षटकार खेचला. ती ओव्हर त्यानं चांगल्या प्रकारे खेळून काढली. मात्र, त्यानंतरच्या ओव्हरनं घात केला.
फ्लेमिंगनं एक शॉर्ट लेंथ बॉल टाकला. सचिनला तो बॉल व्यवस्थित बॅटवर घेता आला नाही अन् ऑस्ट्रेलियन्सनी आनंदाने उड्या मारण्यास सुरुवात केली. स्ट्रायकर एन्डला असलेल्या अंपायरनं बोट उचललं नाही मात्र, मास्टर ब्लास्टर परत पॅव्हेलियनमध्ये निघाला. कारण, स्क्वेअर लेग अंपायरनं त्याला आउट दिलं होतं.
सचिन तेंडुलकरची स्वप्नातीत खेळी संपुष्टात आली होती. १४३ ही त्यावेळची एकदिवसीय सामन्यांतील सर्वोच्च धावसंख्या होती. १३१ बॉल्सच्या या खेळीमध्ये नऊ चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. रनरेट चांगला राखल्यानं भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता. सामना मात्र, २६ धावांनी गमावला. त्यानंतर दोनच दिवसांनी, त्याच मैदानावर, त्याच प्रतिस्पर्ध्याविरोधात सचिननं आणखी एक शतक केलं.
शारजाहच्या मैदानात सचिन तेंडुलकरनं केलेली खेळी क्रिकेटच्या इतिहासात ‘डेझर्ट स्टॉर्म’ नावानं ओळखली जाते. त्यानं ऑस्ट्रेलियन बोलर्सची यच्छेद धुलाई केली होती. जोपर्यंत सचिन क्रिकेट खेळत होता तोपर्यंत क्रिकेटमध्ये भारताचा हा दरारा कायम राहिला.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.