आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारताच्या स्वतंत्र्यता संग्रामातील शेवटचा टप्प्यात घडून आलेल्या नाविक दलाच्या उठावाविषयीचा इतिहास फारसा चर्चिला जात नसला तरी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील तो एक अत्यंत महत्वाचा टप्पा होता. १९४६ साली ब्रिटीश राजसत्तेचा महत्वपूर्ण अंग असलेल्या रॉयल इंडियन नेव्हीमधील सैनिकांनी ब्रिटीश अधिसत्तेविरोधात मोठे बंड उभारले ज्यामुळे ब्रिटिशांसमोर भारतातून काढता पाय घेण्य खेरीज दुसरा पर्याय उरला नव्हता.
एका २० जणांच्या समूहामुळे हा उठाव घडून आला होता. ह्या १७ ते २४ वयोगटातील रॉयल इंडियन नेव्हीच्या कनिष्ठ दर्जाच्या सैनिकांनी तलवार नामक ब्रिटीश रॉयल नेव्हीच्या जहाजावर केलेल्या उठावाचे लोन हळहळू ७४ ब्रिटीश जहाजांवर पसरले आणि बघता बघता तब्बल २० हजार नौदलाच्या सैनिकांनी ब्रिटीश राजसत्तेविरोधात बंडाचे निशाण उभे केले. अगदी इंडोनेशियापासून एडनपर्यंतच्या सर्व ब्रिटीश नौकांवर ह्या क्रांतीचे वारे पसरले होते. विविध जाती, धर्म, वर्णाचे सैनिक आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते.
ज्या तरुणांनी हे बंड पुकारले ते स्वत:ला आझाद हिंदी अर्थात स्वतंत्र भारतीय म्हणवून घेत होते.
ब्रिटीशांना देशाबाहेरचा रस्ता दाखवणे ह्या एका समान उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी ते झगडत होते. या अशा क्रांतिकारी कृत्याची प्रेरणा काय होती ? ह्या प्रश्नाचे उत्तरं एकमेकात गुंफली आहे. दुसऱ्या जागतिक महायु*द्धाच्या समाप्तीनंतर ब्रिटिशांच्या संपत्तीला घरघर लागली होती. स्वतःच्या जनतेचे पोट पाळण्यासाठी देखील पैसे त्यांच्याकडे नव्हते इतकी बिकट परिस्थिती होती. अशावेळी भारतासारख्या देशातील नौदलाचा खर्च उचलणे त्यांना डोईजड झाले होते. मग यातूनच पुढे त्यांनी रॉयल इंडियन नेव्हीच्या भारतीय सैनिकांची कपात करायला सुरुवात केली.
ज्या सैनिकांनी दुसऱ्या महायु*द्धावेळी ब्रिटिशांच्या बाजूने मोठे शौर्य दाखवले होते त्या सैनिकांचा देखील सन्मान करण्यात आला नाही. यामुळे ब्रिटिश अधिसत्ता ही आपल्याला हीन वागणूक देत आहे, ही भावना भारतीय सैनिकांच्या मनात बळावली.
भारतीय सैनिकांची अवस्था फार वाईट होती. त्यांना अत्यंत तुच्छपणे ब्रिटीश वागवत होते. कनिष्ट दर्जाचे काम जसे संडास साफ करणे, फरशी पुसणे, ब्रिटीश अधिकाऱ्यांना चहा पुरवणे आणि त्यांच्याकडून वर्णद्वेषी आणि अहंकारी शब्दांनी अपमानित होणे असं चक्र अनेक नौदलाच्या जहाजांवर सुरु होतं. दलित, मुस्लिम, ब्राम्हण इत्यादी सर्व प्रकारच्या लोकांची अवस्था फार बिकट होती. त्यांना वारंवार अपमानित केलं जात होतं. त्यांची निंदा केली जात होती. त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. या सर्वच गोष्टींमुळे त्यांच्या मनात एक असंतोषाची भावना निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. आपल्या वरिष्ठ गोऱ्या ब्रिटीश अधिकाऱ्यांविरोधात त्यांच्या मनात असंतोष दाटून आला होता.
तलवार नौकेचा कमांडर आर्थर फ्रेडरिक किंग हा देखील एक वर्णद्वेषी अधिकारी होता. त्याच्या अत्यंत हीन वागणुकीमुळे भारतीय सैनिकांच्या मनातील असंतोष वाढत चालला होता.
वेगवेगळ्या जातीधर्माच्या तरुण वयातील मुलांच्या मनात यामुळे आर्थर किंगच्या विरोधात असंतोष भडकला होता. ब्रिटीश साम्राज्यासाठी युद्धात मोठ्या कुशलतेने मोठी कामगिरी बजावणाऱ्या ह्या सैनिकांना ब्रिटिशांकडून मिळणारी पशुतुल्य वागणूक सहन होत नव्हती, त्यांना कच्च शिजवलेलं अन्न खाऊ घालत ब्रिटीश मात्र चैनीत राहायचे, याचा राग भारतीय सैनिकांना होता.
दुसऱ्या महायु*द्धात हे सैनिक ब्रिटीशांच्या बाजूने लढले, हि*टल*र आणि इतर ना*झींच्या सर्वनाशाचे हे सैनिक कारण बनले होते.
त्यांच्या त्यागाला ब्रिटीश काहीच किंमत देत नाही हे बघून आपण कोणाचे यु*द्ध आणि कोणासाठी लढलो ही भावना त्या सैनिकांच्या मनाला व्यथित करू लागली. ह्या दरम्यान हे नौदलाचे भारतीय सैनिक ब्रिटीश राजसत्तेसाठी जगभरात स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या विविध राष्ट्रात आपली सेवा बजावत होते. ह्या राष्ट्रातील स्वातंत्र्यता संग्रमांना याची डोळा याची देही अनुभवत होते. इंडोनेशियामध्ये नौदल उठाव झाला आणि त्या ठिकाणी भारतीय ब्रिटीश नौदलाच्या सैनिकांना तिथल्या लोकानी ‘चालते व्हा’ असे सांगितले.
ब्रिटीश सत्तेविरोधात लढणारे ते लोक बघून भारतीय सैनिकांना देखील आपल्या पारतंत्र्याची जाणीव व्हायला सुरुवात झाली होती.
नौदल उठाव करणाऱ्या लोकांची प्रमुख मागणी होती की इंडोनेशियातील भारतीय सैनिकांना बाहेर काढून परत मायभूमीवर आणणे, कारण ते लोक नाहक आपले प्राण ब्रिटन-इंडोनेशिया यांच्या वादात गमावत होते. अजून एक मागणी ह्या नौदल उठाव करणाऱ्या लोकांची होती ती म्हणजे सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या सैनिकांच्या मुक्ततेची. आझाद हिंद सेनेच्या सैनिकांप्रती नौदलाच्या सैनिकांना प्रचंड आदराची भावना होती. बी.सी. दत्त ह्या प्रमुख सैनिकाने आपल्या वीस साथीदारांना घेऊन आपल्या मागणीचे पत्र तलवार जहाजावरील आर्थर किंग ह्या प्रमुखाला देऊ केलं. पण दत्तला आर्थर किंगने अटक करून तुरुंगात घातले. यामुळे भारतीय सैनिक आणि ब्रिटीश अधिकारी यांच्यातील तणाव वाढत गेला.
मग मदन सिंह आणि एम एस खान ह्या दत्तच्या इतर साथीदारांनी ह्याविरोधात एल्गार पुकारण्याचे आवाहन तलवार नौकेवरील सैनिकांना केले.
१८ फेब्रुवारीला ह्या असंतोषाने पेट घेतला आणि १५०० नाविकांनी कामबंद आंदोलन सुरु केले. भारत छोडो आणि क्विट इंडियाचे फलक तलवार नौकेवर झळकू लागले. पुढे भारतीय नौदलाच्या सैनिकांनी संदेश वहन यंत्रणा आपल्या ताब्यात घेतली आणि त्यांनी २० समुद्रातील जवळ जवळ ७० जहाजांवर आपल्या उठावाचे संदेश धाडले. मग त्यांनी टेलिफोन एक्स्चेंज्वर कब्जा मिळवत त्यांनी ब्रिटीश आणि भारत सरकारमधील फोनचे दुवे काही काळात ह्या नौदलाच्या सैनिकांनी ताब्यात घेतले.
काही काळात त्यांनी कराची आणि इतर बंदरांवरील ७४ जहाजांना देखील आपले संदेश पाठवले व ताब्यात घेतले.
ह्या सगळ्या ब्रिटीश जहाजांवरील झेंडे काढून टाकत तिथे ह्या नौदलाच्या सैनिकांनी कॉंग्रेस, कम्युनिस्ट आणि मुस्लीम लीगचे झेंडे लावले. ह्या नौदलाच्या उठावामुळे ब्रिटीश आधीच धक्क्यात होते आणि इकडे मुंबईत ब्रिटीश राजसत्तेविरोधात कामगारांनी संप पुकारला, विद्यार्थी रस्त्यावर उतरले. कम्युनिस्ट संघटनांनी ब्रिटीश सेवेवर बहिष्कार घातला. परीस्थिती हाताबाहेर गेली आहे, हे ब्रिटीशांचा लक्षात आले आणि पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल ह्या भारतीय नेत्यांच्या मध्यस्थीने ब्रिटिशानी बंद पुकारणाऱ्या नौदलाच्या सैनिकांच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि २३ फेब्रुवारी रोजी अखेरीस हा बंद मागे घेण्यात आला पण यामुळे ब्रिटीश राजसत्तेची पार वाताहात झाली होती.
हा नौदलाचा उठाव भारतातील ब्रिटीश राजसत्तेच्या अंताचा आरंभ होता. दीडशे वर्षांच्या क्रू*र राजवटीच्या अंताचा शेवटचा अध्याय ह्या उठावाने लिहला गेला होता.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.