आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
गेल्या १४ फेब्रुवारीला मागच्या वर्षी पाकिस्तानी आतंकवाद्यांनी घडवून आणलेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झालं. ह्या दहशतवादी हल्ल्यात आपण आपले ४० वीर जवान गमावले. अनेक लोकांनी ह्या जवानांना वेगवेगळ्या प्रकारे श्रद्धांजली अर्पण केली. ह्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आणि वीरगती प्राप्त करणाऱ्या जवानांपैकी एक होते मेजर विभूती शंकर धोंधियाळ.
इतर शहिदांच्या कुटुंबाप्रमाणे विभूती यांच्या कुटुंबियांसाठी देखील हे वर्ष फार कष्टदायी होतं.
केवळ ३५ वर्ष वय असलेल्या विभूतींचे नुकतेच निकिता नावाच्या मुलीशी लग्न झाले होते. लग्नाला वर्ष देखील पूर्ण होत नाही तोपर्यंत विभूती निकीताला ह्या जीवनाच्या प्रवासात एकटं सोडून गेले. पती गेला त्यावेळी इतर कुठल्याही महिलेप्रमाणे निकिता ह्यांना दुःख झाले पण आपला पती देशासाठी लढला, त्याने राष्ट्रसाठी बलिदान दिले, त्यामुळे त्यांना दुःखासोबत आपल्या पतीच्या शौर्यावर गर्व होत होता.
आपला पती जसा राष्ट्रसेवेसाठी झुंझला तसं आपणही झुंझलं पाहिजे, ही भावना निकिता यांच्या मनात दाटून आली. तिने आपल्या पतीच्या अंत्यसंस्कारावेळी सांगितलं की माझं माझ्या पतीवर प्रेम होतं, आज त्याने राष्ट्रासाठी आपले प्राण अर्पण केले, त्यामुळे माझ्या मनात त्याच्याविषयी प्रेम आणि आदर दोन्ही आहेत.
आज माझे पती जसे राष्ट्राच्या सेवेत दाखल झाले त्याप्रमाणे इतरांनी देखील भारतीय सैन्यात जाऊन राष्ट्राची सेवा करावी.
निकिता ह्यांनी ‘आय लव यु विभू’ म्हणून निरोप दिला खरा, पण त्याचवेळी त्यांनी आपल्या पतीच्या पाऊलावर पाऊल ठेवायचा निर्धार मनोमन केला होता. आपल्या पतीने आपल्यापेक्षा राष्ट्रावर अधिक प्रेम केले ह्या भावनेने तिच्या मनाला इतकं घेरलं होतं की ती आपल्या पतीच्या ह्या राष्ट्रप्रेमाने भारावून गेली. निकिताने लोकांना सैन्यदलात सामील होण्याचे आवाहन केले होते पण आपण का मागे रहायचं हा विचार तिच्या मनात वारंवार येत होता. आपल्या घराच्या कपाटात ठेवलेला त्याचा युनिफॉर्म, त्याचा टूथब्रश, ह्या सर्व गोष्टी तिला आपल्या पतीच्या असीम त्यागाची आणि राष्ट्रप्रेमाची वारंवार आठवण करून देत होत्या, अखेरीस तिने एक दिवस आपल्या पतीच्या पावलावर पाऊल ठेवून सैन्य दलात सामील होण्याचा निर्धार केला.
दिल्लीच्या एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करत असलेल्या निकिताच्या मनात अचानक सैन्यात जाण्याचा विचार आला.
आधी परिवारातील लोकांनी तिच्या ह्या निर्णयाला विरोध केला. पण ती ठाम राहिल्याने त्यांनी तिचा हा निर्णय स्वीकारला. आपल्या पतीच्या पाउलखुणावर चालायचा निर्णय घेतला आणि सहा महिन्यातच तिने शोर्ट सर्व्हिसेसच्या परीक्षेचा अर्ज भरला. आपलं काम सांभाळून ती परीक्षेची तयारी करू लागली. लष्करी सेवेत जायचं म्हणजे आधी स्वत:मध्ये एक आत्मविश्वास निर्माण करायला हवा, निकिता ह्यांनी ती भावना निर्माणच केली नाही तर स्वतला परीक्षेच्या आभ्यासासाठी झोकून दिले.
परीक्षेचा आभ्यास करत असतांना निकिता यांच्या मनात नेहमी विभूती यांचा विचार असायचा. विभूती ह्या परीक्षेची तयारी करताना कशाप्रकारे आभ्यास करत असेल, ह्या विचाराने निकिता आभ्यास करताना आपल्या पतीच्या परीक्षेच्या प्रवासासाठीची तयारी कशी असेल याचा अनुभव घेत होती. निकिताने मोठ्या जिद्दीने परीक्षेचा अभ्यास करून परीक्षा दिली.
परीक्षेचा निकाल लागला आणि निकिता मुलाखतीसाठी पात्र ठरली होती. मोठ्या कष्टाने तिने ही कामगिरी करून दाखवली होती.
निकिताने मुलाखतीसाठी, मोठ्या वेगाने अभ्यास करायला सुरुवात केली. निकिताला विभूतीने आपल्या मुलाखतीचे असंख्य अनुभव सांगितले होते. विभूतीने कशाप्रकारे परीक्षेची तयारी केली असेल हे डोळ्यासमोर ठेवून निकिता आभ्यास करत होती, जणू विभूतीचे आयुष्य ती पुन्हा जगत होती.
नोकरी करतांना तिला ह्या गोष्टींचा अनुभव घेता येत होता. सकाळी ९-५ ह्या काळात ऑफिसात काम करणारी, निकिता घरी आभ्यासाला जाऊन बसायची, तिच्या ऑफिसच्या मित्रांना आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांना तिच्याबद्दल प्रचंड आदर निर्माण झाला होता. अखेरीस मुलाखतीचा दिवस आला आणि निकिता ह्या मुलाखतीला गेल्या आणि त्यांना विचारण्यात आलेल्या अनेक प्रश्नांची त्यांनी बेधडकपणे उत्तरं देण्यास सुरुवात केली.
मुलाखती दरम्यान तिला मुलाखतकाराने प्रश्न विचारला, तुम्ही म्हणताय तुमच्या लग्नाला दोन वर्ष झाली आहेत पण तुमच्या पतीचे निधन तर तुमच्या लग्नाच्या नंतर नऊ महिन्यांनी झाले होते.
ह्याला उत्तर देताना निकिता ठामपणे म्हणाली की माझे पती जरी शरीराने माझ्यासोबत नसले आणि जगासाठी ते मृत असले तरी माझ्या आठवणीत जिवंत आहेत. त्यांचाच प्रेरणेने मी हा इंटरव्ह्यु देते आहे.
मुलाखतकार ह्या उत्तराने फार प्रभावित झाले. मुलाखतीचा निकाल आला, निकिता आर्मी ट्रेनिंगसाठी निवडल्या गेल्या असून लवकरच त्या चेन्नई येथे असलेल्या आर्मी ट्रेनिंग अकेडमीला त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. काही दिवसांतचं निकिता देखील आर्मीच्या एक अधिकारी म्हणून देशाच्या सेवेत रुजू होतील. आपल्या शहीद पतीला त्यांनी दिलेली ही एक मोठी मानवंदना आहे.
निकिता आणि त्यांच्या जिद्दीला आमचा मानाचा मुजरा!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.