आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
आपल्या देशात कधी काय घडेल ते सांगता येत नाही. कधीकधी या घडणाऱ्या गोष्टी इतक्या अतर्क्य असतात की सामान्य माणसाची मती कुंठित होते. मात्र त्यात जे लोक विनाकारण भरडून निघतात त्यांचा त्रास त्यांनाच माहिती. कल्पना करा, तुम्हाला काही कारणासाठी पैशाची गरज आहे. तुम्ही मोठ्या आशेने कर्जासाठी बँकेत जाता आणि तेथील अधिकारी तुम्हाला सांगतो की त्याच्या रेकॉर्डनुसार तुम्ही गेल्या वर्षभरापासून मृत आहात. काय प्रतिक्रिया असेल तुमची? अर्थात, भारताची नोकरशाही भ्रष्ट आहे तोवर सामान्य माणसाला हे असेच आश्चर्याचे धक्के बसत राहणार. अशाच प्रकारची घटना १९७६ साली उत्तर प्रदेशातील आझमगढ येथील एका शेतकऱ्याच्या बाबतीत घडली होती.
लाल बिहारी हे त्या शेतकऱ्याचे नाव. त्यांना हातमागाचा व्यवसाय सुरू करायचा होता. व्यवसाय म्हटला की कर्ज घेणे आले. लाल बिहारींनाही व्यवसायासाठी कर्जाची गरज होती. प्रत्यक्षात मात्र ही प्रक्रिया त्यांच्यासाठी बरीच उलटीसुलटी ठरणार होती.
गावच्या लेखपालाने त्यांना, ‘तुम्ही सरकारी नोंदीनुसार जिवंत नाही’ असे सांगितले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
एवढेच नाही तर, त्यांची जमीन त्यांच्या चुलत भावांना देण्यात आली होती. त्यासाठी त्यांच्या काकाने संबंधित अधिकाऱ्यांना पैसे चारले होते, जेणेकरून त्याला खलीलाबाद येथील बिहारींच्या वडिलोपार्जित जमिनीची मालकी (जी एक एकरापेक्षा कमी होती) मिळेल. लेखपाल कार्यालयात ते प्रत्यक्ष उपस्थित असूनही तेथील अधिकाऱ्याने झालेली चूक सुधारण्यासाठी कोणतीही पावले उचलली नाहीत. उलट त्यांची दयनीय अवस्था इतरांसाठी टिंगलटवाळीचा विषय बनला.
हा थट्टा आणि अपमानांमुळे लाल बिहारींनी कंबर कसली आणि व्यवस्थेच्या अन्यायाविरुद्ध लढा देण्याचा आणि आपण जिवंत आहोत हे सिद्ध करण्याचा दृढ निश्चय केला.
आपल्याला जिवंत माणूस म्हणून ओळखले जावे यासाठी त्यांनी अनेक टोकाची पावले उचलली :
आपल्याच चुलत भावाचे अपहरण केले
जुने हिशेब चुकते करण्याच्या नादात लाल बिहारींनी त्यांचा चुलत भाऊ असलेल्या बाबूरामचे अपहरण केले. हा तोच भाऊ होता, ज्याच्या कुटुंबीयांनी अधिकाऱ्यांना लाच देऊन जमीन लाटण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याला आणि त्याच्या घरच्यांना अद्दल घडवण्याचा लाल बिहारींचा मनसुबा होता. तसे पाहता ही बाब असामान्य होती, पण त्या काळात अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून आपल्या सोयीनुसार एखाद्या व्यक्तीला मृत घोषित करणे सोपे होते.
लाल बिहारींचा मृत्यू झाल्याची अधिकृत घोषणा झाल्यानंतर सर्व चल आणि अचल मालमत्ता कायदेशीर वारसांकडे हस्तांतरित करण्यात आली. मात्र लाल बिहारीला कुणाचे अपहरण करण्याचा काही अनुभव नव्हता. बाबूरामचे अपहरण केले तरी पुढे त्याचे काय करायचे हे लाल बिहारींना कळत नव्हते. त्यामुळे ते दररोज बाबूरामबरोबर चित्रपट बघायला जात. पण, जेव्हा कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली नाही तेव्हा लालबिहारींनी बाबूरामला कुटुंबाकडे परत पाठवले.
दंग*लीचा खोटा गुन्हा पोलिसांत दाखल केला
लाल बिहारींनी एका इन्स्पेक्टरला लाच देऊन त्यांच्यावर दंग*लीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची विनंती केली. एवढे झाल्यावर तरी अधिकारी दखल घेतील असा त्यांचा अंदाज होता. पण इथेही दुर्दैव आड आले. जेव्हा इन्स्पेक्टरला त्यांच्या हेतूविषयी कळले तेव्हा त्याने लाच परत केली.
विधवा पेन्शनसाठी अर्ज केला
लाल बिहारींना आपण जिवंत असल्याचं सिद्ध करण्यासाठी अजून एक भन्नाट कल्पना सुचली. ती म्हणजे आपल्या पत्नीला विधवा पेन्शनसाठी अर्ज करायला लावणे. कायद्याच्या दृष्टीने ते मरण पावलेले होते.
त्यांना वाटले की, विधवा पेन्शनसाठी आपल्या पत्नीचा अर्ज फेटाळताना अधिकारी कबूल करतील की पती अजूनही जिवंत आहे. एवढी हटके आयडिया असूनही इथेही त्यांना नशिबाने साथ दिली नाही.
म्हणजे तसा त्यांचा अर्ज फेटाळला गेलाही, पण इतर काही तांत्रिक अडचणींमुळे!
उत्तर प्रदेश विधानसभा, लखनऊ इथे आंदोलन
आपल्या दुर्दैवी परिस्थितीवर राज्य विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान एक प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचे लाल बिहारी यांना कळले, तेव्हा त्यांनी विधानसभेसमोर तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. नंतर त्यांच्या लक्षात आले की, यामुळे मूळ मुद्दा बाजूला पडून विधानसभेमधील अंतर्गत विरोधालाच जास्त प्रसिद्धी मिळेल. म्हणून मग त्यांनी एका व्हिजिटर पासची व्यवस्था केली आणि तिथे ठाण मांडत ‘मुझे जिंदा करो’ म्हणत घोषणाबाजी केली. हा प्रकार मार्शल्सनी बाहेर हाकलून देईपर्यंत चालू होता.
भारताच्या दोन पंतप्रधानांविरुद्ध निवडणूक लढवली
लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी लाल बिहारींनी अजून एक प्रयत्न केला. त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. आपली मालमत्ता विकून राजीव गांधी (अमेठी) आणि नंतर व्ही. पी. सिंग यांच्याविरुद्ध उमेदवारी अर्ज दाखल करण्यापर्यंत त्यांनी मजल मारली. ही कृती तशी अविचाराचीच होती. काहींसाठी विशेषतः मीडियावाल्यांसाठी त्यांची ही कृती लक्षणीय ठरली आणि त्यांना एक चांगली ‘स्टोरी’ मिळाली.
‘मृतक संघ’ची स्थापना: मृतांची संस्था
मालकाला मृत घोषित करून बेकायदा जमीन बळकावण्याच्या घोटाळ्याविरुद्धच्या लढ्याला गती देण्यासाठी लाल बिहारींनी आपल्यासारख्याच पीडित लोकांचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यांच्यासारखेच आणखी किमान १०० लोक त्यांना आढळले.
या गटाचे नामकरण “मृतक संघ” असे करण्यात आले. या गटाने अनेक दिवस वर्तमानपत्रात बातम्या छापून आणल्या. जमीन बळकावण्याच्या या बेकायदेशीर प्रथेबाबतच्या नियमित अहवालांमुळे अधिकारी वर्गालाही दणके बसू लागले.
१९९४ साली तहसीलदारांनी चौकशीचे आदेश दिले तेव्हा त्यांचा संघर्ष आणि चिकाटी यांना यश मिळाले. २००४ पर्यंत त्यांनी आपल्या चार सदस्यांना जिवंत घोषित करण्यात यश मिळवले होते.
लालबिहारी यांना २००३ साली आयजी नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला. २००४ साली त्यांनी भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यासाठी मृतक संघाचे सदस्य शिवदत्त यादव यांना पुरस्कृत केले होते.
त्यांचा संघर्ष त्यांच्यासारख्या इतर अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. आजही ‘मृतक संघ’चे मुख्य कार्यालय लाल बिहारींच्या घराच्या अंगणात कार्यरत आहे. सध्या असोसिएशनचे संपूर्ण भारतातून २०,००० पेक्षा जास्त सभासद आहेत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.