आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
त्याच्यासोबत पंगतीला बसलेल्या लोकांना वाटले असते थोडी जास्त भूक एखाद्याची, पण त्याने चार जणांच्या वाटणीचे जेवण एकट्यानेच संपवले तरीही त्याची भूक भागली नव्हती. त्याला अजूनही खायचेच होते, इतके जेवण करूनही त्याच्या चेहऱ्यावर थोडासा देखील तृप्तीचा लवलेश नव्हता. उलट अधाशासारखा काय खाऊ आणि काय नको करून तो इकडे तिकडे पाहत होता.
कोण होता हा भस्मासुराचा कलियुगातील अवतार? अठराव्या शतकात फ्रान्समध्ये एक असा माणूस होऊन गेला ज्याची भूक मरेपर्यंत कधीच भागली नाही. अगदी चौदा-पंधरा लोकांना पुरेल इतके अन्न त्याला एकट्याला दिले तरी त्याचे पोट भरत नसे.
त्याकाळचे डॉक्टर्स आणि वैज्ञानिकांसमोरही हा माणूस म्हणजे एका आव्हानच होता, पण शेवटपर्यंत त्याच्या या भुकेमागे काय कारण असावे याचा काहीच पत्ता लागला नाही.
१७७२ च्या आसपास फ्रांसमधील सिर्का येथे टेरारचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्याला खूप भूक लागायची, फक्त भूक! त्याच्या गरीब आईवडिलांना चार जणांच्या वाटणीचे जेवण एकट्या टेरारलाच द्यावे लागे. शेवटी त्याच्या या भुकेला कंटाळून त्यांनी टेरारला घरातून बाहेर काढला. तो फ्रेंच रिव्होल्यूश्नरी आर्मीत भरती झाला. तिथेही त्याची भूक काही मंदावली नाही. चार माणसे खाऊ शकतील इतके अन्न त्याला एकट्यालाच लागत असे.
कुणी काही टाकून दिलेले अन्न असे तेही तो उचलून खात असे. लोकांनी टाकून दिलेले कचऱ्यातील तुकडे देखील. टरारे इतका कसा काय खाऊ शकतो याचे कोडे कुणालाच सुटले नाही.
बरं इतके खा-खा खाणाऱ्याचे वजन किती? तर अवघे १०० पौंड म्हणजे ४५ किलो! इतके खाऊनही तो कायम थकलेलाच वाटायचा.
त्याच्या अंगातून सतत घाम गळायचा, त्याचे शरीर नेहमीच उष्ण असे, इतके उष्ण की त्याच्या शरीरातून निथळणाऱ्या घामाची वाफ होत असे आणि वास तर इतका प्रचंड की वीस पावले दूरवर असलेल्या व्यक्तीलासुद्धा नाक मुठीत धरावे वाटेल.
असे असले तरी तो काही वेडा नव्हता. त्याच्याकडे पाहून अजिबात असे वाटत नव्हते की त्याचे भान हरपले आहे, पण तो नेहमी खाण्यासाठी आसुसलेला असायचा. त्याला भूक लागल्यावर पुढ्यात जे काही येईल ते तो मटकवायचा. अगदी अख्खाच्या अख्खा बोका, कुत्रा, मांजर तो असेच खायचा. फक्त त्यांच्या हाडांचे सांगाडे तेवढे शिल्लक राहायचे. इतके खाऊनही तो कधी धष्टपुष्ट झाला नाही. त्याच्याकडे पाहिल्यास असे वाटायचे जणू कित्येक दिवस बिचाऱ्याला जेवणच मिळाले नसेल.
त्याच्यासोबत असणाऱ्या सैनिकांना देखील तो नकोसा झाला होता. त्याची ती भसाभसा खाण्याची सवय, अंगाला येणारा दर्प, आणि वेंगाडलेले तोंड पाहून कुणालाही त्याची किळस वाटावी असाच तो होता. एकट्या टेरारसाठीच लष्कराचे कितीतरी धान्य वाया जात होते.
डॉ. सर्वील आणि बरोन पर्सी हे दोघे सैन्यातील डॉक्टर होते. दोघांनाही टेरारच्या या महाकाय भुकेचे कोडे फारच आकर्षित करत असे. त्या दोघांनी त्याच्यावर उपचार सुरु केले, पण त्यांच्या एकही उपचाराला टेरार दाद देत नव्हता. त्यांना जाणून घ्यायचे होते एक बैलगाडी भरून अन्न खाऊनही या माणसाची भूक का भागत नाही?
टेरारची ही अशी राक्षसी भूक मरेपर्यंत त्याच्यासोबत राहिली. तुम्हाला प्रश्न पडला असेल असे काहीही खाल्लेलं याला पचलं कसं असेल. हीच तर टेरारची खरी गंमत होती. कारण त्याने खाल्लेले त्याला पचतही होते.
त्याचा जबडा आणि गाल खूपच लवचिक होते. सफरचंदाची भरलेली पूर्ण टोपली तो एकाच वेळी आपल्या तोंडात ओतून घेत असे, आश्चर्य म्हणजे हे सगळे सफरचंद त्याच्या भल्या मोठ्या जबड्यात आणि गालात सहज बसत असत आणि तो हे सफरचंद अख्खे गिळत असे.
तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे हे? बरोबर आहे, पण टेरारसाठी काहीही शक्य होतं. ज्यांनी कुणी त्याचा या रस्त्यावरील खेळ पहिला असेल त्यांच्याच शब्दात सांगायाचे तर,
“तो जिवंत मांजर अख्खे तोंडात घालू शकत होता. आपले दात त्याच्या शरीरात घुसवून त्याचे रक्त पीत होता, कच्चेच खात होता आणि फक्त त्याचा सांगाडा बाहेर फेकून देत होता. अगदी कुत्रेही तो याच पद्धतीने खात होता. एकदा तर त्याने अख्खा वोंब मासा गिळला होता.”
त्याच्या अशा या अजबगजब खाण्याच्या प्रकारामुळे, कुत्री आणि मांजरे देखील टेरारला पाहता क्षणीच घाबरून जात असत.
त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही त्याच्या या अजब वागण्याचे नेमके कारण कळत नव्हते. टेरार जेव्हा खात असे तेव्हा त्याचे शरीर एखाद्या समान भरलेल्या पोत्यासारखे दिसे. विशेषत: पोटाचा घेर खूपच वाढत असे. त्याची त्वचा रबरासारखी होती. त्याचे गाल जबडा ताणले जात असत. म्हणूनच कितीही मोठी वस्तू तोंडात घातली तरी ती त्याच्या तोंडात बसत असे.
पण, तेच तो शौचाला जाऊन आला की त्याचे शरीर चिपाडासारखे होत असे. त्याच्या गालाची त्वचा हत्तीच्या कानाप्रमाणे लोंबत असे. पोटाची त्वचाही तशीच. त्याच्या हातापायांची त्वचा ताणून त्याचे हातपाय बांधता येत असत. इतका हा माणूस विचित्र होता. खाल्ले की फुग्यासारखा टम्म फुगत असे. फुग्यात हवा भरली जाते आणि टेरारच्या पोटात अन्न. पण इतक्या मोठ्या प्रमाणात आणि अगदी काहीही खालेल्या अन्नामुळे त्याच्या शरीराचा खूपच वास येत असे. नेहमीच त्याच्या शरीराला ती असह्य दुर्गंधी चिकटलेली असे. शिवाय, त्याच्या शरीरातून सतत टीपटीप घाम ठिबकत असे.
टेरार आपल्या पोटात काहीही साठवू शकतो हे फ्रेंच सैन्याला कळले होते म्हणून त्यांनी त्याचा एका गुप्तहेराप्रमाणे वापर करायचे ठरवले. त्यांनी प्रशियन सैन्यातील आपल्या एका फ्रेंच कर्नलला निरोप देण्यासाठी टेरारचा वापर करायचे ठरवले. खरे तर फ्रेंच सैनिकांना टेरार सैन्यात अजिबात नको होता, पण जनरल अलेक्झांडर द बुहार्नीस यांना वाटले की टेरार देशसेवेच्या कामाला उपयोगी पडेल.
त्यांनी टेरारचा कुरिअर सर्विसप्रमाणे वापर करायचे ठरवले. यासाठी त्यांनी काही गोपनीय कागदपत्रे एका लाकडी खोक्यात ठेवली आणि ते खोके टेरारला खाण्यास सांगितले. टेरारला अशा वस्तू खाण्याची सवय होतीच.
त्याने तो लाकडी खोका गिळून टाकला. आता त्याला शौचाला पाठवून त्याच्या मैलातून तो खोका आणि त्यातील कागदपत्रे व्यवस्थित बाहेर पडतात का हे पाहण्यासाठी एक सैनिक टेरारजवळ थांबला. अपेक्षेप्रमाणे ती गोपनीय कागदपत्रे अगदी वाचनीय स्थितीत परत मिळाली.
हाच प्रयोग करून टेरारला प्रशियनच्या सीमेत प्रशियन नागरिक म्हणून पाठवण्यात आले, पण टेरारचे ते अजब दिसणे, त्याचा उग्र दर्प, यावरून प्रशियन सैनिकांनी त्याला लगेचच हटकले आणि कैद केले. त्यांच्या त्रासाला कंटाळून शेवटी टेरारने त्यांना सगळे खरेखरे सांगून टाकले. प्रशियन अधिकाऱ्यांना टेरारसोबत नेमका काय संदेश पाठवला आहे हे पाहायचे होते. त्यांनी टेरारला टॉयलेटमध्ये बांधून घातले आणि त्याला शौचास होण्याची वाट पाहू लागले. शेवटी त्याला शौचास झाले आणि त्यांना शत्रू सैन्याकडून आलेली गोपनीय माहिती मिळाली, पण त्या कागदावर फक्त एवढाच मजकूर लिहिण्यात आला होता की, टेरारने तुम्हाला ही माहिती सुखरूप पोहोचवली का?
टेरारला फासावर चढवू असे प्रशियाच्या लष्करी अधिकाऱ्यांचे मत होते, पण त्याचा राग निवळल्यावर त्याने टेरारला समज देऊन सोडून दिले. टेरार फ्रांसला परत आला.
टेरार फ्रांसमध्ये आला तेव्हा त्याने फ्रांसच्या लष्करी अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती केली की त्याच्यासोबत पुन्हा असे काही करू नका. तो पुन्हा काही असा निरोप वगैरे घेऊन प्रशियाला जाणार नाही. शेवटी डॉ. पर्सीने मध्यस्थी केली आणि त्यांनी टेरारची सुटका केली.
तो डॉ. पर्सीना सतत विनवू लागला, “मलाही इतरांप्रमाणेच जगायचे आहे. मला या आजारातून मुक्त करा.” पर्सीनी शक्य ते सगळे प्रयत्न केले. त्याची भूक शमेल आणि त्याला जास्ती भूक लागणार नाही, त्याची भूक मंदावेल यासाठी त्यांना योग्य वाटेल त्या प्रत्येक औषधाचा त्यांनी वापर केला, पण कशाचाच उपयोग झाला नाही.
आता त्याला कितीही अन्न दिले तरी ते कमीच पडू लागले. टेरार आपली भूक भागवण्यासाठी इतरत्र अन्न शोधू लागला. एकदा तर त्याने प्रयोग शाळेत तपासणीसाठी जमा केलेले रुग्णांचे रक्तच पिऊन टाकले. शवागारात ठेवेलेले मृतदेहसुद्धा त्याची भूक भागवण्यास कमी पडू लागले. तेव्हापासून त्याला मानवी रक्ताची आणि मांसाची चटकच लागली.
आता टेरार जिथून फिरेल तिथून लहान कोवळी लेकरे देखील गायब होऊ लागली. लोकांचा टेरारवरील संशय वाढू लागला होता. ते टेरारला मारण्यासाठी टपले होते. डॉ. पर्सी देखील आता हतबल झाले होते. त्यांनी टेरारला कसाबसा त्या लोकांच्या तावडीतून सोडवले आणि त्याला तो परिसर सोडून कुठे तरी दूर निघून जाण्यास सांगितले.
जे काही झाले त्याचा डॉ. पर्सीनाही धक्का बसला होता. त्यांनी कसेबसे स्वतःला सावरले.
अचानक चार वर्षांनी त्यांना कळले की, टेरार व्हार्सालीसच्या एका हॉस्पिटलमध्ये अखेरच्या घटका मोजत आहे.
शेवटच्या क्षणीही टेरारची अवस्था खूप बिकट झाली होती. त्याच्या शरीराची दुर्गंधी वाढली होती. त्याला टीबी झाला होता. मृत्यूशय्येवर अक्षरश: तळमळत तो मृत्यूची वाट पाहत होता.
त्याला ज्या खोलीत ठेवण्यात आले होते तिथे कुणीही डॉक्टर जाण्यास तयार नसत. डॉ. पर्सीना वाटले की आता तरी त्यांना टेरारच्या अघोरी खाण्यामागचे खरे कारण कळेल. १७९८ मध्ये टेरारचे निधन झाले तेव्हा डॉ. पर्सी त्याच्यासोबत होते. त्याच्या मृतदेहाला कोणीही स्पर्श करायला तयार नव्हते इतकी दुर्गंधी सुटली होती. डॉ. पर्सीना मात्र त्याचे शवविच्छेदन करायचे होते. त्याचे शवविच्छेदन करूनही डॉक्टरांना फारसे काही हाती लागले नाही.
डॉक्टरांनी जेव्हा त्याचा जबडा पूर्ण उघडला तेव्हा त्यांना दिसले की टेरारच्या घशातून अन्ननलिका सरळ आतड्यात गेली आहे. त्याचे आतडे, पित्ताशय, आतील सगळ्या अवयवांत भरमसाठ पस साचला होता ज्याची दुर्गंधी डॉक्टरांनाही सहन होत नव्हती. त्याच्या पोटाचा आकार खूपच मोठा होता. त्याच्या शरीराच्या खालचा भाग त्या पोटानेच व्यापला होता. शवविच्छेदन करूनही डॉ. पर्सीच्या हाताला काहीच लागले नाही.
त्याचा जबडा इतका पसरत होता की एक अख्खा सिलिंडर जरी त्यात ठेवला असता तरी तो सहज त्यात बसला असता. शेवटी दुर्गंधी असह्य झाल्याने डॉ. पर्सींनी ते शवविच्छेदन अर्ध्यातच सोडून दिले.
टेरारची प्रत्येक कृती ही फक्त त्याची महाकाय भूक भागावण्यातूनच जन्मली होती. जन्मत:च लाभलेल्या या विचित्र शापाने अखेरपर्यंत त्याचा पिच्छा सोडला नाही. फक्त भूक भागवणे एवढा एकच विचार सोडल्यास टेरारच्या मनाला दुसरा कोणताही विचार शिवला नव्हता. त्याच्या या जैविक गरजेनेच त्याला असह्य आणि दुबळे करून सोडले. पण, यामागचे वैज्ञानिक कारण डॉक्टर देखील शोधू शकले नाहीत.
त्याच्या अमर्याद आणि राक्षसी भुकेनेच त्याचा बळी घेतला.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.