आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
लेखिका : शर्वरी जोशी
प्रत्येक व्यक्तीला कमी जास्त प्रमाणात आपल्या तब्येतीची काळजी असते .साधा सर्दी खोकला झाला तरी लगेच आपण दवाखाना गाठतो. कुठल्याही शारिरिक आजारावर आपण तातडीने उपाययोजना करतो. पण मानसिक आजाराच्या बाबतीत आपण इतकीच काळजी घेतो का? मुळात जवळच्या लोकांजवळ आपण बोलून तरी दाखवतो का?
कुठलाही मानसिक आजार म्हणजे ‘पागल’ किंवा ‘वेड’ लागलं असं समीकरण आपल्या मनात घट्ट बसलेलं आहे. काही भागात तर ‘भूत बाधा झाली’, ‘काळी जादू केली’ अशा अंधश्रद्धा अजूनही आहेत. याचे परिणाम खूप भयंकर असतात.
मानसिक आजार कुणालाही होऊ शकतात, ही वास्तविकता जोपर्यंत आपण स्विकारत नाही तोपर्यंत आपल्याला उपाय मिळणार नाही, आणि या ही पुढे जाऊन हे आजार पुर्णपणे बरे होऊ शकतात हे देखील मनांत रूजवायला हवं.
मानसिक आजारांचे अनेक प्रकार असतात. केवळ रस्त्यावर उतरून दगडं मारणं म्हणजे मानसिक विकार नव्हे, मुळात तो केवळ आजाराचा एक टप्पा आहे. याची सुरुवात खूप आधी होते.
मानसिक आजारांची लक्षणे सहसा इतरांना दिसून येत नाहीत. अगदीच कमी प्रकरणांत इतरांना लक्षात येतं. ही लक्षणं आपल्यालाच ओळखायची असतात. हा पहिला आणि मुख्य टप्पा आहे.
यांत कुठलाही कमीपणा वाटून न घेता, मोकळेपणाने आपल्या जवळच्या व्यक्तींना सांगायला हवं आणि शेवटचा टप्पा म्हणजे मानसशास्त्र तज्ञाची मदत घेणं!
आपला मेंदू देवाने घडवलेला एक चमत्कारच म्हणावा लागेल. एकाच क्षणी तो कितीतरी कामं करत असतो, ते ही कुठलीही विश्रांती न घेता. आपल्या मेंदूचे विविध भाग असतात.
दिलेल्या कामानुसार शरीरातील सूक्ष्म बदलांवर लक्ष ठेवून असतात व नियंत्रण करतात. त्यातील एक भाग भावना, संवेदनांना नियंत्रित ठेवण्याचं काम करतो. व्यक्तींमधील स्वभाव भिन्नता याच भागामुळे बघायला मिळते.
कुठलाही मानसिक धक्का या भागांत अस्थिरता निर्माण करु शकतो आणि यातूनच मानसिक विकार वर येतात.
हा धक्का कुठलाही असू शकतो, जसं आर्थिक, भावनिक, एखादा जवळचा व्यक्ती सोडून जाणं, मृत्यू, एखाद्या भयंकर अपघाताचा साक्षीदार होणं, अपयश इत्यादी.
यातून बाहेर पडायला तो व्यक्ती असमर्थ ठरला तर मानसिक आजार होऊ शकतात. अर्थात हे पुर्णपणे व्यक्तीच्या मनोधैर्यावर अवलंबून आहे. पण प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक प्रसंगाला तोंड देऊ शकेलच असं नाही !
मानसशास्त्र प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळ्या तऱ्हेने काम करतं. म्हणुनच आत्तापर्यंत मानसशास्त्राची अचूक व्याख्या एका ओळीत कुणीही करु शकलेलं नाही. हे शास्त्र स्वभावानुसार, तक्रारींनुसार बदलत जातं.
औदासिन्य किंवा डिप्रेशन सगळ्यांत जास्त प्रमाणात बघायला मिळणारा मानसिक आजार आहे. एकटे राहणे, गर्दीत जायला टाळणे, मन एकाग्र करण्यात अपयश येणं, मूड स्विंग, अशी लक्षणं दिसू लागतात.
जीवघेणी वाढती स्पर्धा, जवळ येत चाललेलं जग पण दुरावत चाललेली माणसं ही या मागील काही मुख्य कारणं आहेत. अर्थात ही लक्षणं प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावानुसार आणि परिस्थितीनुसार बदलतात. बदलत्या काळानुसार समस्या बदलत चालल्या आहेत. समस्या छोट्या किंवा मोठ्या नसतात. समस्या व्यक्तीसापेक्ष असतात. त्यामुळे आपल्याला क्षुल्लक वाटणारी एखादी समस्या समोरच्या व्यक्तीसाठी महत्त्वाची असू शकते.
त्यामुळे समस्या ऐकताना त्या व्यक्तीच्या जागेवर उभं राहून विचार करावा व मन:स्थिती समजून घ्यावी. खरंतर औदासिन्यता वयाच्या कुठल्याही टप्प्यावर येऊ शकते. यात काहीही वावगं नाही.
जसं आपल्याला सर्दी, खोकला, ताप येतो तसंच औदासिन्यता येऊ शकते. पण आपल्या समाजात याचा इतका बाऊ केला जातो की कुणीही व्यक्ती याबद्दल सांगायलाही धजावत नाही.
बरेचदा आपल्या जवळची व्यक्ती आपल्याकडे समस्या घेऊन येते, पण आपण मात्र त्याकडे दुर्लक्ष करतो. कधी कधी तर खिल्लीसुद्धा उडवली जाते, कारण आपण त्या दिशेने विचारच करत नाही.
खरंतर त्या व्यक्तीला योग्य मानसोपचार तज्ञांकडे घेवून जाण्याची जबाबदारी आपली असते. औदासिन्यता पूढे जाऊन खूप भयंकर रूप घेऊ शकते. कधी कधी रुग्णाला आपला जीवसुद्धा गमवावा लागू शकतो !
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) केलेल्या एका सर्वेक्षणात असं लक्षात आलं आहे की भारतातील ७.५% लोकसंख्या मानसिक आजराने ग्रस्त आहे. जगात जितके मानसिक रोगी आहेत त्यातील १५% भारतीय आहेत.
ही आकडेवारी नक्कीच थक्क करणारी आहे. शिवाय ४००० हून कमी मानसशास्त्रज्ञ भारतात आहेत. त्यामुळे संघर्ष मोठा आहे.
कुणालाही भेटल्यावर, ‘कसा आहेस?’ या प्रश्नाचं उत्तर आपण हसत ‘मजेत आहे’ असंच देतो. पण खरंच ती व्यक्ती मानसिक दृष्टीने सुद्रुढ आहे का याचा विचार करायला हवा.
‘सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया ।’ अशी प्रार्थना आपल्या संस्कृतीत केली आहे. आपल्या शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्य जपायला हवं. मुळात कुठल्याही शारीरिक समस्येचं मूळ मानसिक अस्थिरतेत असतं.
सर्वांत आधी तर मानसोपचारतज्ञ आणि रुग्ण यांच्यातील दरी संपायला हवी. जेव्हा प्रत्येक व्यक्ती रुटीन चेकअप साठीसुद्धा न चाचपडता मानसोपचार तज्ञांकडे जाईल तेव्हा खऱ्याअर्थाने आपण मानसिक समस्येवर मात करु शकू.
पण रुग्ण परमोच्च टप्प्यावर असल्यावरच मानसोपचार तज्ञाकडे येतो असं दिसून येतं. तोपर्यंत वेळ निघुन गेली असं नाही म्हणता येणार पण खूप वेळ झालेला असतो. अजूनही तो रुग्ण बरा होऊ शकतो.
आपल्याला स्वतःमध्ये किंवा आजूबाजूच्या व्यक्तींमध्ये कुठल्याही प्रकारचे बदल दिसत असतील तर मानसोपचार तज्ञांची नक्कीच मदत घ्या! नागरीक सुखी, समाधानी असतील, मानसिकदृष्ट्या सुदृढ असतील तरच देश प्रगती पथावर वाटचाल करु शकेल.
(लेखिका मानसशास्त्राच्या अभ्यासक आहेत)
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.