आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
२५ जानेवारी १९८७ ते ३१ जुलै १९८८ या एक वर्ष नऊ महिन्यांच्या काळात संपूर्ण भारताची अयोध्या नगरीच झाली होती. दर रविवारी लोकांची ठरलेली दिनचर्या असे. सकाळी उठताच लगबगीने, महिला, वृद्ध ते घरातील सगळ्यात लहान सदस्य, सगळी मंडळी घर काम अंघोळ- पूजा आटोपून अगदी मंदिरात जाण्याप्रमाणेच तयारी करीत. इतकी उत्सुकता नेमकी होती कसली? तर त्या काळात, रामानंद सागरांचे ‘रामायण’ प्रसारित व्हायचे.
त्या काळी घरोघरी टी.व्ही नसायचे, त्यामुळे खेड्यांमधील ग्रामपंचायतींनी आपली दारे, समस्त भाविक-भक्तांसाठी उघडी करण्याचे ठरविले. ज्या घरात टी.व्ही असायचे, ते लोकं देखील अगदी खुशाल घराला नाट्यगृहात परावर्तित होऊ द्यायचे. टी.व्ही च्या छोट्या काळ्या पडद्यावर खुद्द प्रभू श्री रामचंद्रच अवतरतात या निस्सीम श्रद्धेने रसिक रामायण बघायचे व रामाला नमस्कार करण्यास त्यांचे हात नकळत जोडले जायचे.
रामायण सुरू असताना अगदी संचारबंदी लागू असल्यासारखाच शुक- शुकाट पसरायचा. या मालिकेमुळे भारतात ‘ दूरदर्शन क्रांती’ घडून श्रीकृष्ण, बी. आर. चोपडाचे महाभारत, भारत एक खोज, हम पाँच अशा अनेक दर्जेदार मालिका रसिकांच्या भेटीस आल्या.
रामायण ही त्या काळातील जगातील सगळ्यात अधिक गाजलेल्या ‘पौराणिक मालिकांच्या’ पंक्तीतील एक होती आणि आजही हा विक्रम कायम आहे.
१९७६ साली “चरस ” या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी रामानंद सागर व त्यांचे दोन्ही चिरंजीव, सुभाष सागर व आनंद सागर हे स्वित्झर्लंडला होते. विश्रांतीसाठी एका कॅफेत असताना तिथल्या मालकाने काउंटर जवळील छोट्याश्या लाकडी कपाटाचा दरवाजा उघडला व त्या कपाटात रामानंदाना जे दिसले, तो आविष्कार पाहून ते चकितच झाले.
कुठल्याही प्रकारचे रीळ किंवा कॅसेट न वापरता, त्या पडद्यावर ‘रंगीत चित्र’ दिसू लागले. तो आविष्कार म्हणजेच ‘कलर टेलीव्हिजन’. रंगीत टीव्ही’. तो टी.व्ही पाहताच ते खोल विचारात पडले. जणू काही त्यांची तंद्री लागून ते ध्यानस्थ झाले असावे असे वाटत होते.
काही वेळात सागरांनी त्यांच्या दोन्ही मुलांना थेट एक निर्णयच दिला, ‘ मी सिनेमा सोडतोय, मला दूरदर्शनाकडे वळायचे आहे. माझ्या आयुष्याचे आता फक्त एकच ध्येय आहे की रामचंद्र, कृष्ण, दुर्गादेवी, यांचे जीवनपट व कथा नव्याने रसिकांपर्यंत पोहचविणे’. त्यंच्या ह्या निर्धाराने ‘दुरदर्शन क्रांतीचा’ शंखनाद झाला.
ही बातमी सिनेक्षेत्रात पसरताच ‘प्रतिक्षिप्त क्रिये’प्रमाणेच (reflex action) सगळ्यांची एकच प्रतिक्रया उमटली की ‘ समस्त सागर परिवाराची मती भ्रष्ट झाली असावी’.
त्या काळातील सिनेव्यवसायात यशाचे नव नवीन उच्चांक गाठणारे निर्माते असून सुद्धा सागर असा निर्णय का घेऊ पाहताहेत, हे सगळ्यांना समजण्या पलीकडले होते.
सिनेमा ते छोट्या पडद्यावरील मालिकावाले सर्वांनाच हा निर्णय सगळ्यांना पटेनासाच होता. पण रामानंद सागर आपल्या निर्धारावर ठाम होते. सिनेमा क्षेत्रात वाढत्या माफियांच्या दखलामुळे त्यांना सिनेमा क्षेत्र सोडायचेच होते. त्यांनी त्वरितच रामायण व श्रीकृष्ण या मालिकांच्या काही पुस्तिका छापून घेतल्या व आपल्या मोठ्या मुलाला परदेशात असलेल्या आपल्या काही श्रीमंत मित्र व नातेवाईकांकडे निधी गोळा करण्यासाठी पाठवले.
त्यांचा हा प्रस्ताव ऐकताच काही मित्रांनी तो अमान्य केला व काहींनी तर रामानंदाना समज व सल्ले देण्याचा प्रयत्न केला. पैश्यांचा अभावामुळे, रामायणाचा पुढील प्रवास तूर्तास थांबवावा लागला. पण त्यांनी त्याच काळात डी.डी. नॅशनल वर प्रयोग म्हणून ‘विक्रम- वेताळ’ ही, केवळ २६ भागांची मालिका प्रसारित केली.
मालिकेच्या दणदणीत यशामुळे गुंतवणूकदारांना भरवसा आला व रामायणाकरीता पुरेसे पैसे जमले. विक्रम वेताळातीलच कलाकार अरुण गोविल, दीपिका चिखालीया, सुनील लहरी, दारा सिंह, यांनाच रामायणातील भूमिकांसाठी निवडून अखेर रामायणाचा आविष्कार पडद्यावर साकारला जाणार होता.
पण दिल्लीत एक वेगळेच वादळ सागरांना पुन्हा डळमळीत करण्याची वाटच बघत होते. त्या काळात सत्तेत असलेल्या कॉंग्रेसच्या, सूचना व प्रसारण मंत्री ‘व. न. गाडगीळ’ यांचा समज होऊ लागला की रामायणाच्या प्रसारणामुळे देशातील हिंदू जनतेच्या मनात आत्मसन्मान निर्माण होऊन, रामाप्रतीचे दडलेले प्रेम उफाळून येईल.
ज्याचा फायदा भाजपाला अयोध्येच्या ‘राममंदिर’ खटल्यात होईल व आपण हिंदू मते गमावून बसू. अशाप्रकारे मतांचे राजकारण एका सुंदर कलाविष्काराच्या निर्मितीत अडथळा बनले होते.
सागरांना या वेळी ‘सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या’ अनेक वाऱ्या कराव्या लागल्या. मंत्र्यांशी निव्वळ एका तसाच्या बैठकीसाठी त्यांना दिवस दिवसभर कार्यालयाबाहेर अडवून ठेवण्यात येत असे.
पण हा सगळा प्रकार ‘राजीव गांधींच्या’ कानावर पडताच त्यांनी त्वरीतच प्रसारणाचे अधिकार व मंजुरी देण्याचे आदेश दिले.
त्या काळात अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील गांधींनी घडवून आणल्या. ‘राम व रामायण हा भारताचा महान सांस्क्रुतिक व पौराणिक वारसा आहे व तो रसिकांपर्यंत पोहोचायलाच हवा. त्यात मतांचे राजकारण करू नका‘ अशी कडक सूचना त्यांनी आपल्या मंत्र्यांना केली व अखेर रसिकांच्या मनावर आधिराज्य गाजवण्यास ‘ रामायण’ सज्ज झाले!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.