आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
२०१६ मध्ये आलेल्या वरदाह वादळानंतर सलग तीन वर्षे दुष्काळाची झळ सोसलेल्या चेन्नईतील वंदलूर प्राणीसंग्रहालयातील ओट्टेरी तलाव अगदी मृतप्राय अवस्थेस पोचला होता. १७ ते १८ एकर परिसरात पसरलेला हा तलाव पूर्ण कोरडा पडून त्यात भरमसाठ तण वाढले होते. ठिकठिकाणी डबकी साचून त्यात शेवाळ वाढल्याने त्या डबक्यातील जल प्राण्यांचे जीवन ही धोक्यात आले होते.
महत्वाचे म्हणजे थंडीच्या दिवसांत इथे काही आर्क्टिकच्या बर्फाळ प्रदेशातील काही परदेशी पक्षी स्थलांतरित होऊन येत असतात. त्यांनीही हा ओट्टेरी तलाव कोरडा पडल्याने गेली दोन वर्षे अक्षरशः पाठ फिरवली होती. एकूणच सलग येणाऱ्या अस्मानी संकटांनी या तलावाची समृद्धीच जणू हिरावून घेतली होती.
तलावाचा परिसर अगदी भकास दिसत होता, त्यात इतका मोठा तलाव कोरडा पडल्याने या प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांना पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत होते. त्यांचेही जीवन धोक्यात होते. पाणी ही तर संपूर्ण जीवसृष्टीसाठी लागणारी एक प्राथमिक गरज आहे. त्यामुळे या प्राणीसंग्रहालयाला प्रचंड भयावह परिस्थितीचा सामना करावा लागत होता.
प्राणीसंग्रहालयाच्या आवारातील हा भला मोठा तलाव आटून गेल्याने, अक्षरशः या प्राण्यांसाठी संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांना बाहेरून पाणी मागवावे लागत होते.
यावर उपाय एकच होता, मृतप्राय झालेल्या या तलावाला पुन्हा नवसंजीवनी देणे.
वंदलूरच्या अरीग्नार आण्णा प्राणीसंग्रहालयातील या तलावातील पाणी साठा फक्त पावसाच्या पाण्यावरच अवलंबून होता. पण, २०१८ साली तमिळनाडूमध्ये पडलेल्या कोरड्या दुष्काळाचा सर्वात मोठा फटका या तलावाला बसला होता. पाण्याने काठोकाठ भरणाऱ्या या तलावाचे रुपांतर एका भीषण वाळवंटात झाले होते.
प्राणीसंग्रहालयाच्या पश्चिमेस वसलेला हा तलाव म्हणजे एक ओसाड जमिनीचा तुकडा वाटत होता. जिथे जमिनीवर घनदाट वेलींनी आणि खुरट्या झुडूपांनी अस्ताव्यस्त पसारा पसरवून ठेवला होता. अगदी प्राण्यांसाठी देखील पिण्यायोग्य पाण्याचा एक थेंब देखील या तलावात शिल्लक नव्हता. जागोजागी साचलेल्या डबक्यात जलपर्णींचा विळखा होता, ज्यामुळे उरलेसुरले जलजीवन देखील संकटाच्या छायेत होते.
प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांची होणारी चरफड असह्य होती. म्हणूनच या प्राणिसंग्रहालयाच्या उप संचालक पदावर कार्यरत असणाऱ्या सुधा रामन या फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी यावर गांभीर्याने विचार करत या तलावाला पुनरुज्जीवन देण्याचा विडा उचलला. अर्थात एवढ्या मोठ्या परिसरात पसरलेल्या तलावातील तण काढणे आणि गाळ उपसणे ही काही साधीसोपी गोष्ट निश्चितच नव्हती.
परंतु, सुधा रामन यांच्या आदेशा बरहुकूम प्राणीसंग्रहालयातील सर्व कर्मचारी कामाला लागले. तलावातील तण आणि गाळ उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरु झाले. संचालक योगेश सिंघ यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध रित्या हे काम सुरु झाले. २०१९ च्या फेब्रुवारीपासून कामाने गती घेतली. जेव्हा पावसाळ्याचे दिवस आले, तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणाऱ्या आनंदासमोर गगनही ठेंगणे वाटत होते.
ऑक्टोबर २०१९ पर्यंत ओट्टेरी तलावाचा अगदी कायापालट झाला होता.
तलावातील गाळ उपसल्याने तलावाची पाणी साठवण्याची क्षमता देखील वाढली होती.
तलाव पाण्याने तुडुंब भरला होता. पाणी तलावाच्या पात्रा बाहेर जाऊ नये म्हणून तलावावर बांध देखील घालण्यात आला आहे.
तसेच प्राणीसंग्रहालयात अन्य काही ठिकाणी देखील छोटी छोटी डबकी खोदून त्यात पावसाचे पाणी साठून राहील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या परिसरातील भूजलपातळी खाली येणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. याशिवाय, अतिरिक्त पावसामुळे तलावातील पाणी पात्राच्या बाहेर येऊन पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून ठिकठिकाणी अतिरिक्त पाण्याचा विसर्ग होण्यासाठी म्हणून चॅनेल्स खोदली आहेत.
या चॅनेल्स मधून निघालेल्या मातीच्या प्रत्येक ढिगाऱ्यावर एक-एक जलद गतीने वाढणारे झाड लावण्यात आले आहे. याच झाडांवर आता अनेक पक्ष्यांनी आपली सुबक, सुंदर घरटी उभारली आहेत. आणि हो, आर्क्टिक मधून पाहुणे बनून येणाऱ्या पक्षांची संख्या देखील हळूहळू वाढत आहे. आत्तापर्यंत जवळपास ३०० स्थलांतरीत पक्षांनी या परिसरात आपली घरटी बांधली आहेत.
अर्थात, या मौसमाची ही तर नुकतीच सुरुवात आहे. आता, तलावाच्या परिसरात पक्षांचा मंजुळ चिवचिवाट ऐकू येत असतो. निसर्गाची ही अद्भुत किमयागारी पर्यटकांनाही अनुभवता येईल. शेवटी रया गेलेल्या या तलावाचे सौंदर्य, वैभव आणि समृद्धी परत आल्याने एकूणच प्राणीसंग्रहालयातील वातावरणात एक नवा तजेला निर्माण झाला आहे.
पूर्वी बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना देखील तलावाचे सौंदर्य पाहता यावे आणि स्थलांतरीत पक्ष्यांचेही दर्शन घेता यावे म्हणून, या तलावाच्या काठाने एक पादचारी पूल बांधण्यात आला होता. तो रस्ता वरदाह वादळाच्या तडाख्याने कोलमडून गेला होता. तो पूलही या टीमने पुन्हा बांधला आहे. त्यामुळे आता, या तलावाच्या सौंदर्याचा आनंद पर्यटकांनाही पुन्हा घेता येईल.
“या तलावाची दुरुस्ती करून तिला नवसंजीवनी देण्यात आमच्या टीमने अक्षरश: जीव तोडून काम केले आहे. अर्थात, त्यांच्या कामाचे चीज झाले, असे आत्ता म्हटल्याशिवाय राहवत नाही. पण, आमच्या रेंज ऑफिसर उमा, फॉरेस्टर कुमार आणि इतर कार्यालयीन कर्मचारी यांनी फारच मेहनत घेतली म्हणून हे यश साध्य झाले,”
असे सुधा रामन सांगतात.
हिवाळा जसजसा जवळ येईल तसतसे या तलावाच्या आजूबाजूचा परिसर खुलून येत आहे. या तलावाने प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांना लागणाऱ्या पाण्याची चिंता तर मिटलीच पण, यामुळे असंख जीव पुन्हा प्राणीसंग्रहालयाकडे आकर्षित होत आहेत. जलचर प्राण्यांचीही संख्या वाढत आहे. या तलावाच्या पुनरुज्जीवनाने प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांनाही आता त्यांचा नैसर्गिक अधिवास त्यांच्या पूर्वीच्या रुपात परत मिळवून दिल्याचा आनंद होत आहे.
वन्य प्राण्यांच्या परिसरातील जलस्त्रोत हे त्यांच्या जीवनावश्यक गरजेचाच एक भाग असतात. त्यांचे पर्यावरण आणि सहजीवन अशा जलस्त्रोतांवरच अवलंबून असते. म्हणून देशभर असे जे मृत जलसाठे, तलाव, नद्या, नाले विहिरी असतील त्या-त्या सर्वाना अशा पद्धतीने नवसंजीवनी देण्याची मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेतली पाहिजे असे आयएफएस सुधा रामन यांना वाटते.
यामुळे देशातील पाण्याचे दुर्भिक्ष्य तर कमी होईलच पण, आजूबाजूच्या जैव-पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास देखील थांबण्यास मदत होईल. मुक्या जनावरांचे आणि त्यांच्या सहचरांचे जीवन आनंदी आणि सुलभ होईल.
याबाबत सरकारने अधिक व्यापक धोरण आखून त्याची काटेकोर अंमलबजावणी करून घेण्यासाठी स्वतःहून पुढाकार घ्यावा अशी त्यांची अपेक्षा आहे. अर्थात, आपल्या कष्टांमुळे आणि मेहनतींमुळे मुक्या प्राण्यांना मिळणारा लाभ आणि निसर्गाची भरून निघणारी हानी, याचे मोल कशातच मोजता न येण्याजोगे आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.