आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
बासरी ऐकायला कोणाला आवडत नाही. बासरी संगीतात प्रेम आणि स्वरांचा मिलाफ घडवते. बासरीचा मधुर आवाज ऐकल्यावर प्रत्येकाचे मन शांत होते. बासरी म्हटल्यावर आपल्या समोर उभा राहतो गोपाळांच्या घेराव्यात बासरी वादन करणारा भगवान श्रीकृष्ण. बासरी ऐकायला कितीही सुंदर असली तरी ती तेवढी सुरेल वाजवणे हे काही सोपे काम नाही. यासाठी संगीतावर विशेष प्रेम आणि श्रद्धा असणे आवश्यक असते. बासरीवादनातील एक प्रसिद्ध नाव आहे पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे!
भारतातच नाहीतर विश्वभरात आपल्या स्वर्गीय बासरीवादनाने कीर्ती मिळवणारे पंडित हरिप्रसाद चौरसिया हे भारतीय संगीत परंपरेतील ध्रुवताऱ्याप्रमाणे आहेत. त्यांच्या बासरीने आजही लोकांना मन:शांती लाभते. ते खऱ्या अर्थाने भारतीय संगीत क्षेत्रातील महानायक आहेत. पण असं म्हणतात की त्यांच्या वडिलांना त्यांनी पैलवान व्हावे असे वाटत होते, मग असं काय घडलं ज्यामुळे ते या मार्गाकडे वळले ? चला जाणून घेऊ ..
१ जुलै १९३८ साली पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा प्रयाग येथे जन्म झाला. त्यांचे वडील एक प्रसिद्ध मल्ल होते. ५ वर्षांचे असतांना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांच्या मुलाने त्यांच्याप्रमाणे मल्ल व्हावे. त्यांनी आपल्या मुलासाठी तशी प्रशिक्षणाची व्यवस्था देखील केली होती, पण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे मन त्यात कधीच रमले नाही. त्यांचे मन संगीतक्षेत्राकडे आकर्षित होत होते.
हरिप्रसाद चौरसिया यांना बालपणापासून संगीताची आवड होती. त्यांच्या वडिलांना मात्र संगीताची अजिबातच आवड नव्हती. आपल्या मुलाने कुस्ती खेळणे सोडून संगीत क्षेत्रात जावे यासाठी ते कधीच तयार नव्हते. अशा परिस्थितीत हरिप्रसाद यांनी लपूनछपून प्रशिक्षण घेतले.
सुरुवातीच्या काळात त्यांनी त्यांचे शेजारी पंडित राजाराम यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतले. यानंतर काशीत त्यांची भेट प्रसिद्ध बासुरीवादक पंडित भोलेनाथ प्रसन्ना यांच्याशी झाली. भोलेनाथ प्रसन्न यांना भेटून हरिप्रसाद फार प्रभावित झाले. त्यांनी बासरीवादक होण्याचे ठरवले. भोलेनाथ यांच्याकडे हरिप्रसाद ८ वर्ष राहिले. याठिकाणी त्यांनी सांगीतातील बारीक सारीक गोष्टींचे व बासरीवादनाचे ज्ञान प्राप्त केले.
पैलवान होण्याची इच्छा नसताना देखील त्यांनी वडिलांचे मन राखायला कुस्तीची ट्रेनिंग घेतली. याचा फायदा त्यांना संगीतक्षेत्रात झाला. कुस्तीच्या ट्रेनिंगमुळे त्यांचे शरीर मजबूर झाले, त्यांचे फफ्फुस व आतडे मजबूत झाले, याचा त्यांना बासरीवादन करताना मोठा फायदा झाला.
१९५७ मध्ये त्यांनी एक कलाकार म्हणून ऑल इंडिया रेडियोमध्ये काम करण्यास सुरुवात केली. ते एआयआर ओडिया, कटकच्या टीमचे सदस्य होते.
या ठिकाणी त्यांनी बासरीवादनात प्राविण्य मिळवले आणि काही रचनांची निर्मिती देखील केली. १९६० साली त्यांना कटकहून मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओमध्ये ट्रान्सफर करण्यात आले. मुंबईत असताना त्यांची प्रसिद्ध संगीतकार बाबा अल्लाहुद्दिन खान यांच्या मुलीशी अन्नपूर्णा देवींशी भेट झाली. त्या एक उत्कृष्ट सतारवादक होत्या. त्यांनी अन्नपूर्णी देवींकडे संगीत शिकवा अशी मागणी केली, अन्नपूर्णा देवींनी त्यासाठी होकार दिला.
अन्नपूर्णा देवी यांच्या शिकवणीने हरिप्रसाद चौरसिया यांच्या करियरला एक नवे वळण मिळाले. त्यांनी ऑल इंडिया रेडियोची नोकरी सोडली. इतकेच नाही इतर अनेक संगीतकारांकडूनही त्यांनी शिक्षण घेतले. कुठल्याही महान संगीतकाराकडून काहीतरी शिकण्यासाठी ते आसुसलेले असत. आपल्या मेहनतीच्या बळावर त्यांनी काही काळातच भारतीय संगीत क्षेत्रात त्यांनी एक नवीन उंची गाठली. एक महान बासरीवादक म्हणून त्यांना ओळख मिळाली.
१९६० च्या दशकात संतूरवादक शिवकुमार शर्मा यांच्या सोबत त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी त्यांच्यासमवेत जगाच्या कानाकोपऱ्यात शिव -हरी अशा नावाचे प्रोग्रॅम्स केले. १९६७ साली त्यांनी एकत्रितपणे कॉल ऑफ दि व्हॅली नावाचा एक अल्बम रिलीज केला. यात ब्रज भूषण काबरा यांचा देखील समावेश होता.
त्यांचा हा अल्बम पाश्च्यात्य देशात फार लोकप्रिय झाला. त्यांनी आपला एक से एक अल्बम आपल्या चाहत्यांसमोर सादर केला. चाहत्यांनी त्यांना डोक्यावर घेतले. या दोघांच्या जोडीने भारतीय शास्त्रीय संगीतात मोठी प्रसिद्धी कमावली. यातून त्यांना बॉलिवूडमध्ये देखील काम करण्याची संधी मिळाली. या दोघांच्या जोडीने बॉलिवूडमध्ये देखील आपल्या स्वरांनी मन जिकंली. चांदनी, सिलसिला, डर, फांसले, साहिबान आणि विजय यांसारख्या चित्रपटात त्यांनी आपल्या मधुर संगीताने रस भरला. हरिप्रसाद चौरसिया यांनी भारतीय सिनेमासृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.
भारतीय संगीताला एका वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. फ्रान्स सरकारने त्यांना नाईट ऑफ दि ऑर्डर ऑफ आर्टस् अँड लिटरेचर हा पुरस्कार प्रदान केला. त्यांना ११९० मध्ये पद्मभूषण आणि २००० मध्ये पदमविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांना संगीत अकादमी, हाफिज अली खान अवॉर्ड, कोणार्क अवॉर्ड तसेच ब्रिटनच्या शाही घराण्याचा पुरस्कार देखील मिळाला आहे.
पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा एक प्रसिद्ध संगीतकार बनण्यापर्यंतचा प्रवास हा देखील त्यांच्या बासरीच्या स्वरांप्रमाणेच मधुर आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.