आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आशिया खंडातील पहिली महिला ट्रेन चालक बनून सुरेखा यादव यांनी एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. फक्त पुरुषांसाठी मर्यादित असलेल्या या क्षेत्रात सुरेखा यादव यांनी आपला ठसा उमटवला आहे. सुरेखा यादव यांना स्वप्नात देखील वाटले नव्हते की त्या भारतातील पहिल्या महिला ट्रेन चालक बनणार आहेत. त्यांना शिक्षक व्हायचे होते. ट्रेन चालक होण्याचे स्वप्न देखील त्यांनी कधी पाहिले नव्हते. पण नशीबात जे लिहले आहे, तेच घडते.
इलेक्ट्रीकल इंजिनियर असलेल्या सुरेखा यांचा आशिया खंडातील पहिल्या महिला ट्रेन चालक बनण्याचा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे.
१९६५ मध्ये सुरेखा यांचा जन्म झाला, पाच भावंडांमध्ये त्या सर्वात मोठ्या होत्या. त्यांच्या वडिलांचे नाव होते रामचंद्र भोसले आणि आईचे नाव होते सोनाबाई. सुरेखा यांचे बालपण सातारा जिल्ह्यात गेले. एका कॉन्व्हेंट शाळेत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी व्होकेशनल ट्रेनिंग घेतली. इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग हा विषय आधी फक्त मुलांसाठी होता पण कालांतराने मुलींनी त्यात प्रवेश केला, सुरेखा या देखील त्याच काही मुलींपैकी एक होत्या ज्यांनी या पुरुषांसाठी म्हणून समजल्या जाणाऱ्या फिल्डमध्ये करियर केले होते. त्यांनी इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा कोर्स केला.
त्यांना शिक्षक व्हायचे होते पण अचानक त्यांना कुठून तरी रेल्वेमध्ये असिस्टंट ड्रायव्हर पदासाठी जागा निघाल्याची बातमी समजली. इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग केल्यामुळे सुरेखा या पदासाठी योग्य होत्या. त्यांनी यासाठी अर्ज केला.
ज्यावेळी सुरेखा परीक्षेसाठी हॉलमध्ये पोहचल्या त्यावेळी तिथे त्यांना एकही महिला आढळली नाही, सर्व पुरुषच होते. सुरेखा या एकमेव महिला होत्या ज्यांनी या पदासाठी अर्ज केला होता. सुरेखा यांना याची तसूभर कल्पना नव्हती की या अगोदर कुठल्याच महिलेने या पदासाठी अर्ज केलेला नव्हता. पण सुरेखा डगमगल्या नाहीत, त्यांना या क्षेत्रात इतिहास रचायचा होता. त्यांच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यावर त्यांनी मात केली. त्यांचे यश बघून त्यांना ट्रेनी असिस्टंट ड्रायव्हर या पदाची ट्रेनिंग देण्यासाठी पाठवले गेले.
कल्याणच्या ट्रेनिंग स्कुलमध्ये त्यांनी सहा महिने ट्रेनिंग घेतले. या ट्रेनिंगदरम्यान त्यांनी त्यासंबंधित प्रत्येक बारीकसारीक गोष्ट जाणून घेतली. १९८९ साली त्यांची असिस्टंट ड्रायव्हर पदावर नियुक्ती करण्यात आली. अशाप्रकारे सुरेखा यांनी या क्षेत्रातील अनेक वर्षांच्या पुरुषी प्रभावाला मोडून काढले.
हे करणाऱ्या त्या आशिया खंडातील पहिल्या महिला होत्या. त्यांनी ट्रेन चालवून दाखवत हे सिद्ध केले की महिलांनी ठरवले तर त्यांना देखील बऱ्याच गोष्टी शक्य आहेत. त्यांनी पुरुषांनी प्रभुत्व निर्माण केलेल्या क्षेत्रात महिलांना मानाचे स्थान मिळवून दिले होते.
त्यांनी आपल्या आयुष्यातील २९ वर्ष रेल्वेत नोकरी केली. त्यांनी आपल्या करियरची सुरुवात एल ५० नावाच्या लोकल मालगाडीच्या चालक म्हणून त्यांनी काम केले. इंजिन आणि सिग्नल संबंधित काम त्यांनी मोठ्या यशस्वीपणे पार पाडले. १९९८ साली त्या एक परिपूर्ण मालगाडी चालक बनल्या.
त्यांची ज्यावेळी पश्चिम घाटात ड्रायव्हर म्हणून नेमणूक करण्यात आली, तो त्यांच्या करियरमध्ये सर्वात आव्हानात्मक क्षण होता. महाराष्ट्राच्या घाटात त्यांनी व्यवस्थितपणे गाडी चालवली.
घाट रस्त्यावर लोको ट्रेन ड्रायव्हर म्हणून गाडी चालवणाऱ्या सुरेखा पहिल्या महिला होत्या. त्यांचे काम बघून त्यांना २०११ साली मेल एक्स्प्रेस ड्रायव्हर म्हणून नियुक्त करण्यात आले.
सन २००० मध्ये ममता बॅनर्जी यांनी महिलांसाठी चालवलेल्या स्पेशल लोकल ट्रेनच्या ड्रायव्हर म्हणून सुरेखा यांनी काम पाहिले होते. २०११ मध्ये त्यांना आशिया खंडातील पहिल्या महिला ट्रेन ड्रायव्हर म्हणून सन्मानित करण्यात आले कारण त्यांनी मुंबई पुण्यादरम्यानच्या घाट रस्त्यावर यशस्वीपणे डेक्कन क्वीन रेल्वे चालवली होती. २०११ पासून त्या कल्याणच्या सेंटरमध्ये नवीन तरुणांना प्रशिक्षण देण्याचे काम करत आहेत.
सुरेखा यांना विश्वासाची कमतरता भासल्यावर सदैव त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी साथ दिली. त्यांनी कधीच स्वतःला त्या महिला आहेत आणि हे काम करतायत, अशा दृष्टिकोनातून पाहिले नाही. त्यांनी सदैव एका कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्याचा रुपात काम केले. कदाचित यामुळेच त्या अनेकांच्या प्रेरणास्रोत बनू शकल्या!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.