आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
एक महिला काय करू शकते, असा प्रश्न विचारणेच मुळात चुकीचे आहे. आज असे कुठले क्षेत्र नाही, ज्यात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत नाही. परंतु आजपासून साठ वर्षांपूर्वी मात्र परिस्थिती वेगळी होती. स्त्रियांचे अस्तित्व फक्त चुल आणि मुलापर्यंतच मर्यादित होते. अशा परिस्थितीतच १९६० साली बुंदेलखंडात एका अशा दबंग स्त्रीचा जन्म झाला, जिने आपल्या लाठीच्या बळावर स्त्रियांना पारंपरिक व्यवस्थेच्या जोखडातून मुक्त केले.
संपत पाल असे या महिलेचे नाव असून त्यांनी स्थापन केलेल्या गुलाबी गॅंगने महिला सशक्तीकरणाचा नवा अध्याय रचला होता. संपत पाल यांना त्यांच्या या कामगिरीसाठी जगातील सर्वात प्रभावशाली १०० महिलांच्या यादीत स्थान मिळाले आहे. त्यांच्याच आयुष्यावर ‘गुलाब गॅंग’ नावाच्या चिपत्रपटाची निर्मिती करण्यात आली होती.
संपत यांनी महिलांच्या सशक्तीकरणासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले होते, पण राजकारणाने त्यांचे अस्तित्व संपवून टाकले.
१९६० साली उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबात संपत यांचा जन्म झाला. हा भाग पूर्णपणे ओसाड आणि ओबडधोबड रेतीच्या टेकड्यांनी भरलेला होता. संपत ज्याकाळात जन्माला आल्या, त्यावेळी घरात बिनलग्नाची मुलगी म्हणजे माता-पित्यांसाठी एक ओझे असायची. त्या काळच्या प्रथेप्रमाणे त्यांच्या आई वडिलांनी देखील उशीर न करता वयाच्या बाराव्या वर्षीच त्यांचा विवाह रचला.
संपत यांचे ज्याच्याशी लग्न लावण्यात आले होते, तो माणूस भाजी विक्रीचे काम करत होता. आई-वडिलांनी शिक्षण दिले नाही तिथे सासरचे तरी का शिकवणार? अर्थातच संपत यांना घरकामाला जुंपण्यात आले. संपत यांच्या घरची आर्थिक स्थिती इतकी चांगली नव्हती. यात भर म्हणजे संपत यांना जातीयवादाचा सामना करावा लागला होता.
संपत चित्रकूट जिल्ह्यातील रौलीपूर-कल्याणपूर या गावात वास्तव्यास होत्या. त्यांच्या गावात उच्चवर्णीय ठाकूर समाजाचे वर्चस्व होते. एका दलित कुटुंबात लग्न करून गेलेल्या संपत यांना या गावात सन्मान मिळण्याची अपेक्षा अजिबात नव्हती.
त्यांच्या गावातील विहिरीवरून पाणी भरण्यापासूनसुद्धा त्यांना रोखले जायचे, त्यांच्या जातीमुळे त्यांना सदैव ठाकूरांच्या दबावात रहावे लागत होते.
सततच्या अपमानाला कंटाळून संपतच्या परिवाराने गावाला सोडचिट्ठी दिली आणि बांदा जिल्ह्यातील कैरी गावात त्या वास्तव्य करू लागल्या. इथे त्यांच्या आयुष्याने वेग पकडलाच होता की इतक्यात त्यांच्या आयुष्यात अमूलाग्र बदल घडवणारी एक घटना घडली.
संपत ज्या भागात राहत होत्या. त्याठिकाणी त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या एका महिलेला तिचा नवरा दारू पिऊन मारहाण करत होता, आसपासचे लोक यावेळी फक्त बघ्याची भूमिका घेत होते. संपत यांना हा सर्वप्रकार बघून राग अनावर झाला त्यामुळे त्यांनी लगेचच दोघांच्या भांडणात उडी घेतली. पण त्या शेजारच्या बाईच्या बेवड्या नवऱ्याने त्यांची घरातून हकालपट्टी केली आणि त्यांना आपल्या खाजगी गोष्टीत पडू नका, अशी ताकीद दिली. यामुळे अपमानित झालेल्या संपत यांनी त्यांच्या समाजाच्या महिलांची एक पंचायत बोलवली आणि त्या पंचायतीत त्या महिलेच्या नवऱ्याला धडा शिकवण्याची योजना तयार केली.
योजनेनुसार त्यांनी गावातील महिलांसकट एका शेतात त्या महिलेच्या नवऱ्याला गाठले आणि त्याची चांगलीच धुलाई केली. त्यांनी त्याला त्या महिलेची माफी मागायला सांगितली. त्याने माफी मागितल्या नंतरच त्यांनी त्याला सोडले. हे प्रकरण त्यावेळी बरेच गाजले. अनेक पुरुषांनी याचा खाजगीत निषेध केला पण त्याचा काही परिणाम झाला नाही.
संपत पाल यांचे नाव प्रसिद्ध झाले होते आणि त्यांनी महिलांचे नेतृत्व करून आपली गुलाबी गॅंग स्थापित केली होती.
गुलाबी गॅंगने गुलाबी रंगाची साडी आपला पोशाख म्हणून निर्धारित केली होती. आधी महिला वेगवेगळ्या प्रकारच्या गुलाबी साड्या परिधान करायच्या पण काही काळाने त्यांनी एकाच प्रकारच्या साड्या परिधान करायला सुरुवात केली. हळूहळू या गॅंगमधून ५० महिला सामील झाल्या. या महिलांनी गावात गरीबी शेतकरी, मागासवर्गीय लोक यांच्या लढाया लढण्यास सुरुवात केली. संपत यांनी स्वतः काठी चालवण्याचे प्रशिक्षण घेतले आणि त्यांनी सोबतच्या महिलांना देखील त्याचे प्रशिक्षण दिले.
आज जिथे कुठे अत्याचार होऊ लागले तिथे गुलाबी गॅंग जाऊन पोहचू लागली. सुरुवातीला गुलाबी गॅंग समजावण्याची भूमिका घ्यायची पण जर समोरची वक्ती ऐकत नसेल तर त्या प्रदर्शन करत आणि सरतेशेवटी आक्रमक होत हिंसक मार्गाचा अवलंब करत, पण हा मार्ग फार कमी अवलंबिला जात असे. कित्येकदा तर चांगले चांगले पहिलवान गडी देखील भयग्रस्त होऊन त्यांच्यापासून पळ काढायचे.
हळूहळू संपत यांच्या गॅंगमधील महिलांची संख्या ५०वरून ५० हजार इतकी झाली. गँगने जिल्ह्याच्या सीमा ओलांडून आसपासच्या जिल्ह्यात देखील विस्तार करण्यास सुरुवात केली. संपत अत्याचारग्रस्त महिला, दारुबंदी, पंचायतीच्या समस्या आणि रेशन दुकानातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत.
२००६ मध्ये त्या चर्चेत आल्या होत्या. एका अत्याचाराच्या प्रकरणात त्यांनी एका माजी पोलीस अधिकाऱ्याला डांबून ठेवले होते. गुलाबी गँगच्या दबावापोटी पोलिसांना आरोपीची सुटका करावी लागली होती.
अवैध उत्खनन करणाऱ्या मजुरांना सोडविण्यासाठी संपत पाल यांच्या नेतृत्वात मोठे आंदोलन करण्यात आले होते.
खूप प्रयत्न करून देखील गुलाबी गॅंग मागे हटत नव्हती, हे बघून पोलिसांनी बळाचा प्रयोग करण्यास सुरुवात केली. याचा प्रतिकार करताना गुलाबी गँगने आपल्या लाठ्याकाठ्यांनी पोलिसांवर ह*ल्ला चढवला होता. त्यांनी एसडीएम आणि सीओ पदावरील अधिकाऱ्यांवर हल्ला चढवला आणि दोन्ही अधिकाऱ्यांनी आपले केबिन सोडून धूम ठोकली होती. अखेरीस दबावाखाली येऊन या अधिकाऱ्यांना मजुरांची मुक्तता करावी लागली होती.
संपत पाल यांच्या शौर्याच्या कथा वर्तमानपत्रात छापून येऊ लागल्या. मोठ्या मीडिया एजन्सीज त्यांच्यावर डॉक्युमेंटरी तयार करू लागल्या. गुलाबी गॅंगचे जरी एकीकडे कौतुक सुरु होते तरी तिकडे राज्य सरकार गुलाबी गॅंगवर नाराज झाली होती. पोलीस महानिर्देशक विक्रम सिंह यांनी गुलाबी गॅंगला नक्षलवादी संघटना घोषित करून त्यांना जेलमध्ये डांबले होते. काही काळाने संपत पाल यांची मुक्तता करण्यात आली आणि त्यांना मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळण्यास सुरुवात झाली.
संपत पाल आणि गुलाबी गँगने यानंतर दारूबंदीसाठी आपला आवाज बुलंद करण्यास सुरुवात केली. २००७ साली गुलाब गँगमध्ये १५ हजार महिलांचा समावेश करण्यात आला होता. यात बहुतांश महिला अशा देखील होत्या, ज्यांना त्यांच्या परिवारातून हाकलण्यात आले होते.
संपत यांनी या बेघर आणि निसहाय्य्य स्त्रियांना आसरा दिला. संपत पाल यांच्या प्रेरणादायी कामगिरीवर एका फ्रेंच मासिकाने एक पुस्तकाचे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे त्यांना जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळाली. २०११ साली “द गार्डियन” या वृत्तपत्राने त्यांचा जगातील १०० प्रभावशाली महिलांमध्ये समावेश केला आहे.
संपत लाल यांनी आपल्या कामगिरीने अनेकांना प्रभावित केले, एकेकाळी डाकुंसाठी प्रसिद्ध असलेल्या भागात त्यांनी स्वतःचा दरारा निर्माण केला. त्यांच्या संघटनेला तब्बल २ लाख महिला जोडल्या गेल्या होत्या.
महिला सशक्तीकरणाच्या त्यांच्या या चळवळीने अनेक महिलांना प्रेरीत केले. त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात, संमेलनात आमंत्रित करण्यात येऊ लागले, त्यांच्या भाषणांना गर्दी होऊ लागले. त्यांना एक ग्लॅमर मिळत गेले आणि त्यांचा जमिनीशी असलेला संबंध तुटत गेला, प्रसिद्धीच्या हव्यासाने त्यांना माणसांपासून दूर केले.
संपत यांच्या ख्यातीचा उपयोग करण्यासाठी राजकीय दल पुढे सरसावले.
त्या २०१२ साली राजकारणात उतरल्या, पण त्यांचे नवे रूप लोकांना भावले नाही, याचा परिणाम असा झाला की लोकांनी त्याना निवडणुकीत पराभूत केले. संपत यांना राजकारणात यश मिळत नव्हते म्हणून त्या ‘बिग बॉस ६’ मध्ये स्पर्धक म्हणून उतरल्या. त्यात दुसऱ्याच फेरीत त्या बाहेर पडल्या.
संपत यांना तिकडे यश मिळेनासे झाले तेव्हा त्या पुन्हा आपल्या गुलाबी गॅंगचे नेतृत्व करायला पोहचल्या, पण यावेळी मात्र परिस्थती पालटली होती. अनेक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने गॅंगचे काम सुरु होते पण आता कोणालाच संपत यांना कामात सहभागी करवून घ्यायचे नव्हते. शेवटी, संपत यांची एक सभा घेऊन हकालपट्टी करण्याचा निर्णय गँगच्या इतर सदस्यांनी घेतला.
सुमन सिंह यांची प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. आजही गॅंगचे काम व्यवस्थित सुरु आहे पण संपत मात्र आज पूर्णपणे बाहेर गेल्या आहेत. २०१७ साली त्यांनी निवडणूक लढवण्याचा केलेला प्रयत्न देखील यशस्वी झाला नाही. आज त्यांची अवस्था फार दारुण आहे, आज त्या घरकाम करत असून त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या अनेक खटल्यांमुळे कोर्टात हजेरी लावत आहेत.
आज वैयक्तिक महत्वकांक्षेमुळे जरी संपत पाल बऱ्याच गोष्टी काही गमावून बसल्या असल्या तरी त्यांनी एकेकाळी सुरु केलेली गुलाबी गॅंगची क्रांतीज्वाळा आजही धगधगते आहे आणि अनेकांना प्रेरित करते आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.