आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडच्या रॉयल एअरफोर्सने अनेक युद्धात चांगली कामगिरी करून दाखवली. या वायुसेनेने केलेल्या काही आक्रमक कारवायांमुळे अक्ष राष्ट्रांना चांगलाच हादरा बसला. या वायुसेनेने केलेल्या कारवाईमधील ऑपरेशन जेरिकोची चर्चा आजही केली जाते. जर्मनीने आपल्या आजूबाजूच्या राष्ट्रांवर कब्जा मिळवला होता आणि तिथल्या जनतेचा रोष चिरडून टाकण्यासाठी त्यांनी अमानुष पद्धतींचा अवलंब सुरू केला.
फ्रांसचा ताबा मिळाल्यानंतर जर्मन सरकारविरोधात बोलणाऱ्या ७०० फ्रेंच नागरिकांना नाझी सैन्याने फ्रान्सच्याच अमिन्स जेलमध्ये डांबून ठेवले होते. या कैद्यांचा दोष फक्त इतकाच होता की त्यांनी नाझी दडपशाही विरोधात बोलण्याचे धाडस केले होते.
विरोधकांना गप्प बसवायचे असेल तर त्यांना संपवले पाहिजे, हा हिटलरचा नियम सर्वत्रच अंमलात आणला जात होता.
या फ्रेंच कैद्यांना अत्यंत अमानुष वागणूक दिली जात होती. त्यांचा छळछळ करून मारले जात होते. या निष्पाप कैद्यांना सोडवण्यासाठी आता ब्रिटनला पुढाकार घेणे भाग होते. यासाठी त्यांनी एक धाडसी योजना आखली ज्याला नाव दिले ऑपरेशन जेरिको.
आता या फ्रेंच नागरिकांना डांबण्यात आलेला हा तुरुंग जिथे होता तिथे जमिनीवर युद्ध करणे शक्य नव्हते. जमिनी हल्ला केला असता तर नाझी सैनिक सावध झाले असते आणि त्यांनी कैद्यांना लागलीच संपवून टाकले असते. म्हणून यासाठी हवाई हल्ला करण्याचा उपाय योजण्यात आला.
नाझींनी १९ फेब्रुवारी १९४४ रोजी शंभर कैद्यांना मारण्याची योजना बनवली होती. ब्रिटीश गुप्तहेर संस्थेला या योजनेबद्दल सुगावा लागताच त्यांनी या कैद्यांना वाचवण्यासाठी धडपड सुरू केली. या जेलमध्ये ७०० कैदी होते. थोडे थोडे करून लवकरच या सर्वांना मारून टाकण्याची नाझी सैनिकांची योजना होती. या कैद्यांना वाचवण्यासाठी ब्रिटीश सैन्याला तातडीने काही तरी हालचाल करणे आवश्यक होते.
या युद्धात आधीच ब्रिटीश सैन्याचे खूप नुकसान झाले होते. या युद्धात सहभागी असलेल्या आणि नसलेल्याही सगळ्याच देशांना युद्धाची झळ पोहोचत होती.
पण, आता गरज होती ती या ७०० फ्रेंच नागरिकांना सोडवण्याची. यासाठी रॉयल एअरफोर्सने हवेतून हल्ला करण्याची कल्पना पुढे आली.
हल्ला कधी करता येईल, कसा करता येईल, या मिशनमध्ये किती विमानांचा समावेश असेल, कोणत्या पायलटला यामध्ये सहभागी व्हायचे आहे, त्यांना कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण आवश्यक आहे, अशा सगळ्या प्रश्नावंर चर्चा करून रॉयल एअरफोर्सने या योजनेचा आराखडा बनवण्यास सुरूवात केली. हवाई हल्ल्यात निष्पाप फ्रेंच कैदी मारले जाणार नाहीत याचीही दक्षता घेणे आवश्यक होते.
ही योजना अंमलात आणण्यासाठी छोट्या-छोट्या लढाऊ विमानांचा वापर करण्याचे ठरवले. ज्यामुळे कमी उंचीवरूनही मारा करणे शक्य होईल. या हल्ल्यात फक्त तुरुंगाच्या भिंती पाडल्या जातील आणि नाझी सैन्यदलावर हल्ला केला जाईल असे ठरले. यासाठी ब्रिटीश सैन्यातील मॉस्किटो विमानांचा वापर करण्याचे ठरले. यासाठी काही दिवस पायलट्सना प्रशिक्षण दिले गेले. त्यांच्याकडून सराव करून घेण्यात आला.
या ऑपरेशनसाठी १८ पायलट निवडण्यात आले. या पायलट्सना नाझी सैन्याच्या एका मोठ्या तुकडीला तोंड द्यायचे होते. १९ फेब्रुवारीच्या आत त्यांना हे ऑपरेशन यशस्वी करून दाखवायचे होते आणि हवामान मात्र दिवसेंदिवस खराब होत चालले होते. ढगाळ वातावरणात पायलट विमान कसे उडवणार? शिवाय, अशा वातावरणामुळे प्लेन क्रॅश झाले तर? हाही प्रश्न होताच.
वातावरण निवळेल अशा आशेवर ब्रिटीश एअरफोर्सने काही दिवस योजना पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला पण छे! बर्फवृष्टी दिवसेंदिवस वाढतच होती. शेवटी काही झाले तरी आता १८ तारखेला ऑपरेशन पूर्ण करायचेच असा त्यांनी निश्चय केला.
१८ फेब्रुवारी १९४४ रोजी रॉयल एअरफोर्सच्या मॉस्किटो विमानांनी फ्रांसच्या दिशेने झेप घेतली. या दिवशी तर वातावरण खूपच खराब होते. फ्रांसमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी सुरू होती. अठरा विमाने आकाशात झेपावणार होती पण काही विमानांना झेप घेणेच अशक्य झाले कारण धावपट्टीवर पूर्णतः बर्फ अच्छादलेला होता. झेप घेतलेल्या काही विमानांपैकी दोन विमानं तर रस्ताच भरकटली. अठरा पैकी फक्त दोन विमाने ठरलेल्या वेळेत फ्रांसच्या त्या अमिन्स जेलवर घिरट्या घालू लागली.
हवामानाचा अंदाज बघता नाझी सैन्याला चुकूनही वाटले नसेल की आजच्या दिवशी त्यांच्यावर हवाई हल्ला होईल. अचानक सुरु झालेल्या बॉम्ब वर्षावाने नाझी सैनिक हडबडून गेले. हळूहळू एकेक विमाने ऑपरेशनमध्ये सामील होऊ लागली.
फक्त तुरुंगाच्या भिंतीवर बॉम्बहल्ला करायचा असे ठरले होते पण ढगाळ वातावरणात सगळे काही अंधुक दिसत होते. तुरुंगाच्या भिंती कोसळत होत्या. आतील कैद्यांनाही आता आपली सुटका होईल अशी अशा निर्माण झाली. तुरुंगाच्या भिंती पडतील तसे कैदी बाहेर पाळण्याचा प्रयत्न करू लागले. पण, नाझी सैनिक त्यांना बाहेर जाऊ देत नव्हते. पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कैद्यांना त्यांनी जागीच मारून टाकले.
वरून बॉम्ब वर्षाव करणाऱ्या विमानांना आपण कुठे बॉम्ब टाकतोय हे काहीच कळत नव्हते. पण त्यांनी एकसारखा बॉम्ब वर्षाव सुरूच ठेवला.
बाहेर पळून येण्यात यशस्वी झाले अशा कैद्यांसाठी जवळच एक बचाव केंद्र उभारण्यात आले होते तिथे त्यांना प्रवेश दिला. या ठिकाणी हे कैदी सुखरूप होतो. शेवटचा नाझी सैनिक मरेपर्यंत वरून विमानांनी बॉम्ब वर्षाव थांबवला नाही. त्या तुरुंगाच्या परिसरातील नाझी सैन्याची सर्व बेसकॅम्प उध्वस्त करण्यात आले.
या जेलमध्ये एकूण ७१२ कैदी होते पण त्यातील फक्त २५८ कैदीच सुखरूप बाहेर पडले. बॉम्बमुळे ७४ कैदी जखमी झाले होते. १०२ कैदी तर तुरुंगातच मृत्युमुखी पडले. काही बॉम्बमुळे मारले गेले तर काही नाझी सैन्याच्या गोळीबारात मारले गेले.
बर्फवृष्टीमुळे खालचे चित्र पुरेसे स्पष्ट दिसत नव्हते. त्यामुळे विमानातून अति बॉम्बवर्षाव झाला. नाझी सैन्य तर संपलेच पण ज्या निष्पाप फ्रेंच नागरीकांना वाचवण्यासाठी हा बॉम्ब वर्षाव केला जात होता त्यातीलही थोडेफारच बचावले. तरीही हे ऑपरेशन दुसऱ्या महायुद्धातील एक यशस्वी ऑपरेशन मानले जाते.
नाझी सैनिकांच्या मनात दहशत निर्माण करण्यात आणि त्यांच्या संपूर्ण दलाचा खात्मा करण्यात मात्र हे ऑपरेशन यशस्वी झाले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.