आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
बॉलिवूडमध्ये मोठ्ठा स्ट्रगल करत वर आलेला अनुराग आज एक ब्रँड झाला आहे. केवळ भारतातच नाही, तर जगभरात त्याचा स्वतःचा एक फॅनबेस आहे. इतकेच काय, तर त्याच्या राजकीय विचारसरणीचे विरोधकही त्याच्या चित्रपटांचं कौतुक केल्याशिवाय राहत नाहीत. अनुरागच्या बॉलिवूडमधील स्ट्रगलबाबत तुम्ही कितीतरी ठिकाणी वाचलं किंवा ऐकलं असेल. कित्येक मुलाखतींमधून त्याने स्वतः किंवा इतरांनी त्याचा मुंबईमध्ये आल्यानंतरचा प्रवास कसा होता हे सांगितलं आहे.
मात्र, अनुरागला पहिल्यापासून दिग्दर्शक व्हायचं नव्हतं. त्याचं स्वप्न खरंतर एक वैज्ञानिक व्हायचं होतं. मग अनुराग हे सोडून ‘स्वप्नांच्या शहरात’ कसा आला?
अनुराग कश्यपचा जन्म उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये झाला, पण त्याचं बालपण वाराणसी, सहारनपूर, ग्वाल्हेर, देहराडून अशा विविध शहरांमध्ये गेलं. अनुरागला लहानपणी चित्रपटांची आवड होतीच. अगदी वयाच्या पाचव्या वर्षीपासूनच तो ओपन थिएटर्समध्ये जाऊन चित्रपट पाहत होता. मात्र नंतर शाळा-अभ्यास हे सगळं सुरू झालं, आणि अनुरागची ही आवड मागे पडली. हळूहळू त्याला अभ्यासात आवड निर्माण झाली आणि वेध लागले वैज्ञानिक होण्याचे.
अनुरागला शाळेत असताना अभ्यासाची एवढी आवड निर्माण झाली, की पुढे वैज्ञानिक होऊन नोबेल पारितोषिक मिळवायचं त्याचं लक्ष्य होतं. त्यामुळे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने दिल्लीच्या हंसराज महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्याने जीवशास्त्र (झूलॉजी) हा विषय निवडला होता. १९९३ मध्ये त्याने आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले. सगळं सुरळीत सुरू राहिलं असतं, तर आज अनुराग एक वैज्ञानिक झालाही असता. मात्र, दिल्लीमध्ये असं काही झालं, ज्यामुळे त्याच्या आयुष्याला पूर्णपणे वेगळं वळण मिळालं.
दिल्लीमध्ये कॉलेज लाईफ जगत असताना अनुरागचं चित्रपट पाहणं पुन्हा सुरू झालं. त्यानंतर त्याला दारू आणि अमली पदार्थांचंही व्यसन लागलं होतं. आपल्याला आयुष्यात काय करायचंय, आणि आपण काय करतोय हेदेखील त्याला समजत नव्हतं. त्यामुळं मग तो भयंकर डिप्रेशनमध्ये गेला होता. या सगळ्यात केवळ एकच गोष्ट चांगली झाली होती – अनुरागने ‘जन नाट्य मंच’ या पथनाट्य करणाऱ्या ग्रुपमध्ये सहभाग घेतला होता. ज्यामध्ये त्यानं मोठ्या प्रमाणात पथनाट्यं केली.
याच वर्षी अनुरागच्या काही मित्रांनी त्याची ‘वर्ल्ड सिनेमा’शी ओळख करुन दिली. आणि आतापर्यंत केवळ बॉलिवूड किंवा हॉलिवूडचे सिनेमे पाहणारा अनुराग, आता इटॅलियन, फ्रेंच आणि इतर भाषांमधील सिनेमेही पाहू लागला. याची सुरुवात झाली, ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया’मध्ये. जिथे मित्रांच्या सांगण्यावरुन त्याने ‘विट्टोरिओ डे सिका’ या इटॅलियन दिग्दर्शकाचे चित्रपट पाहिले.
त्या फिल्म फेस्टिवलमध्ये अनुरागने दहा दिवसांमध्ये तब्बल ५५ चित्रपट पाहिले. यातील डे सिकाच्या ‘बायसिकल थीव्ज’ या चित्रपटाचा त्याच्यावर सर्वाधिक परिणाम झाला.
या फिल्म फेस्टिवलमध्ये जगभरातील विविध चित्रपट पाहून त्याला ‘आपल्यालाही हेच करायचं आहे’ असा साक्षात्कार झाला. त्यानंतर पुढच्या पाच महिन्यांमध्येच त्याने मुंबई गाठली; आणि त्यापुढचा इतिहास तर सर्वश्रुत आहे!
दिल्लीमध्ये असतानाच अनुरागने वैज्ञानिक होण्याच्या विचाराला फुलस्टॉप दिला होता. मात्र त्याच्या आतील संशोधक वृत्ती मात्र तशीच होती. सिनेमामध्ये कायतरी करायचं या विचाराने अनुराग मुंबईमध्ये आला खरा, मात्र पुढे काय? १९९३मध्ये मुंबईत आल्यानंतर काही दिवसांमध्येच त्याच्याकडचे पैसे संपले. पुढं आठ महिने तो अक्षरशः रस्त्यावर राहत होता.
दरम्यान त्याने नाटकांमध्ये, चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुठेच यश मिळत नसल्यामुळे आलेला तणाव आणि रस्त्यावर राहण्याची आलेली वेळ या सगळ्यामुळे त्याला अभिनयच जमत नव्हता. मग त्याने ‘मैं’ नावाचं एक आठ पानी नाटक लिहिलं. महाविद्यालयीन महोत्सव आणि स्पर्धांमध्ये हे नाटक चांगलंच गाजलं. त्यानंतर त्याला कित्येकांनी कथा-पटकथा लिहिण्यातच करिअर कर असा सल्ला दिला.
यानंतर मग अनुरागने कित्येक पुस्तकं वाचली, चित्रपट पाहिले, कित्येक सिनेमांची पारायणं केली. दरम्यान तो विविध कथा-पटकथा लिहितही होता. याच काळात त्याने ‘पाँच’ या चित्रपटाची कथाही लिहिली. या चित्रपटाला त्याने अगोदर ‘मिराज’ हे नाव दिलं होतं. दरम्यान, रामगोपाल वर्माने अनुरागला सत्या चित्रपटाची कथा लिहिण्याची संधी दिली. ज्यामुळे अनुराग हे नाव चर्चेत आले. त्यानंतर त्याने रामूच्याच ‘कौन?’ (१९९९) या चित्रपटासाठी पटकथा आणि संवाद; तर ‘शूल’ (1999) चित्रपटासाठी संवाद लिहिले.
२००७ मध्ये अनुरागने ‘रिटर्न ऑफ हनुमान’ या ऍनिमेशनपटाचेही दिग्दर्शन केले. बच्चेकंपनीला आणि मोठ्यांनाही हा चित्रपट आवडला. मेनस्ट्रीममध्ये आल्यानंतर अनुरागने कित्येक चित्रपटांमध्ये अभिनयही केला. शिवाय आता अनुराग हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील नावाजलेला दिग्दर्शक आहे. त्याच्या करिअरचा चढता आलेख पाहता, ‘नोबेल’ नाही मात्र कधीतरी तो ‘ऑस्कर’ नक्कीच मिळवेल असं दिसतंय, हो ना?
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.