आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
भारतावर ब्रिटिशांनी अनेक वर्षे राज्य केले. त्यांना इथून हुसकावून लावण्यासाठी भारतीयांनी बरेच उठाव, आंदोलनं केले. अनेक वर्षांच्या लढाईनंतर, कित्येक क्रांतिकारकांच्या बलिदानानंतर आपल्याला अमूल्य असं हे स्वातंत्र्य मिळाले.
पण त्याच काळात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांसाठी एक उठाव करण्यात आला होता, हे तुम्हाला माहिती आहे का? आणि तोही भारतातील एका अतिसमृद्ध समजल्या जाणाऱ्या पारसी समाजाने हा उठाव केला होता. चला तर मग जाणून घेऊया या मागचे नेमके कारण काय आणि या उठावाचा परिणाम काय झाला? ब्रिटीश कालीन भारतातील हा पहिला उठाव १८३२ मध्ये झाला होता. या उठवाला इतिहासात ‘बॉम्बे डॉग रायोट’ म्हणून ओळखले जाते.
पारसी हे झोरास्ट्रियन धर्माचे अनुयायी. आजच्या इराणच्या परिसरात पूर्वी याच झोरास्ट्रियन धर्मियांची वस्ती होती. नवव्या शतकात त्या प्रदेशात वारंवार हल्ले होऊ लागले. या हल्ल्यांना वैतागून या लोकांनी देश सोडला आणि ते भारताच्या आश्रयाला आले. तसेही व्यापाराच्या निमिताने पारसी भारताच्या संपर्कात होतेच आता मात्र ते इथेच स्थायिक झाले. सहिष्णू भारतानेही पारसी लोकांचे स्वागत केले.
गुजरातमध्ये या लोकांनी स्वतःची वस्ती वसवली. त्यातही मुंबई हे यांच्या राहण्याचे मुख्य ठिकाण! आजही ७०% पारसी हे मुंबईतच आढळतात. पारसी लोक व्यापार उदीम करण्यात तरबेज होते. त्यांच्यातील हाच गुण ब्रिटिशांनी हेरला आणि त्यांच्या व्यापाराला प्रोत्साहन दिले.
चीनसोबत व्यापार करण्यासाठी ब्रिटिशांनाही असे हुशार व्यापारी हवेच होते. ब्रिटीशांच्या वरदहस्ताने पारसी समुदाय चीनशी व्यापार करू लागला. या व्यापाराने पारसी समुदायाची भरभराट झाली. श्रीमंती आणि व्यापारातील महत्त्वाचा दुवा असलेल्या या समुदायाने ब्रिटीश सरकारची मर्जी संपादन केली होती. मुंबईतील अनेक मोक्याच्या जागा पारसींना देण्यात आल्या होत्या.
पारसी व्यापाऱ्यांमुळे एक व्यापारी बंदर म्हणून मुंबईचीही भरभराट होऊ लागली.
त्याकाळी ब्रिटीश इस्ट इंडियाचा फिशर नावाचा एक अधिकारी होता. या अधिकाऱ्याला एकदा भटके कुत्रे चावले. त्याला औषधोपचार उपलब्ध न झाल्याने त्या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. मरता मरता त्याने मुंबईतील सर्वच भटक्या कुत्र्यांवर सूड उगवण्याचे ठरवले आणि त्याने ब्रिटीश सरकारला कुत्रे मारणाऱ्याला इनाम देण्याची विनंती केली. त्यासाठी मोठ्या रकमेची तरतूदही केली. ब्रिटिशांनीही आपल्या अधिकाऱ्याची सूचना ग्राह्य धरत रस्त्यावरून फिरणाऱ्या बेवारस कुत्र्यांच्या उच्छाद रोखण्यासाठी एक नवा कायदा आणला.
या कायद्यानुसार, कुत्रे मारणाऱ्याला त्याकाळात आठ आणे इनाम द्यायचे जाहीर केले. मग काय लोकांनी कुत्रे मारणे हाच आपला व्यवसाय बनवला. कुत्रे मारायचे ते पोलिसात नेऊन दाखवायचे आणि आठ आणे बक्षीस घेऊन जायचे.
त्याकाळी आठ आणे ही खूप मोठी रक्कम होती. आधीच खायची मारामार असल्याने कुत्रे मारून जर आठ आणे मिळत असतील तर कुणाला नको होते. कुत्रे मारण्याचा या व्यवसाय इतका फोफावला की मुंबईत कुत्री कमी आणि कुत्रेमार जास्त झाले. पुढे पुढे तर बक्षिसाच्या आमिषाने लोक पाळीव कुत्र्यांना देखील मारू लागले.
पारसी धर्मात कुत्र्याला पवित्र प्राणी मानले गेले आहे. माणूस मेल्यानंतर कुत्रा त्याला स्वर्गाचा रस्ता दाखवतो अशी श्रद्धा पारसी समाजात आढळते. कुत्र्याचे तोंड पाहणे देखील पारसी लोकांत शुभ समजले जाते. जेव्हा पारसी लोकांनी पाळलेली कुत्रीसुद्धा मारून लोक पैसे कमवू लागले तेव्हा मात्र पारसी समुदाय संतापला. याविरुद्ध हा समुदाय रस्त्यावर उतरला.
ब्रिटीशांनी केलेल्या या अमानुष कायद्यामुळे कुत्र्यांना मारले जात आहे तेव्हा ब्रिटीशांनी तातडीने हा कायदा मागे घ्यावा अशी मागणी करत पारसींनी आंदोलन उभे केले. खरे तर कायदा अस्तित्वात येण्याआधीच तो मागे घेण्याची विनंती पारसी समुदायाने केली होती, पण इंग्रजांनी तेव्हा त्यांच्या मागणीला भाव दिला नाही.
शेवटी ६ जून १८३२ रोजी २०० पारसी लोक रस्त्यावर उतरले. जेव्हा पोलिसांनी हे आंदोलन रोखण्याचा प्रयत्न करताच पारसींनी त्यांच्यावर हल्ला चढवला कारण, ब्रिटिशांनीही त्यांचा अंत पाहिला होता. पारसी समुदायातील काही बड्या लोकांनी इस्ट इंडिया कंपनीची बोलणी करून या समस्येची जाणीव करून दिली होती, तरीही त्यांच्या मागणीकडे ब्रिटीशांनी दुर्लक्ष केले होते. त्या दिवशी जमलेल्या लोकांनी दिवसभर बराच धिंगाणा घातला. इतर व्यापाऱ्यांनाही त्यांच्या दुकानांचे शटर बंद करायला भाग पाडले.
एक न्यायाधीश आपल्या गाडीतून कोर्टाकडे जात होते, त्यांची गाडी अडवून त्यात मेलेल्या घुशी आणि उंदरे टाकली. एकंदरीत तरुण पारसींनी सगळीकडे चांगलीच दहशत माजवली होती. पोलिसांनी अशा टारगट पारसी तरुणांना उचलून नेले. त्यांना दोन तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षाही सुनावली.
एवढेच नाही तर, निषेधार्थ पारसी लोकांनी आपली दुकाने आणि व्यापारच बंद ठेवला. यामुळे ब्रिटीश इस्ट इंडियाची चांगलीच गोची झाली, कारण पारसी व्यक्तींशिवाय त्यांचा व्यापार होणार तरी कसा? शेवटी सरकारला नमते घ्यावेच लागले. पोलिसांनी दडपशाहीने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे प्रयत्न व्यर्थ गेले. शेवटी सरकारने हा कायदा मागे घेतल्याची घोषणा केली आणि पारसींनीही त्यांचे आंदोलन थांबवले. कुत्र्यांना मारण्याऐवजी त्यांना पकडून पांजरपोळात ठेवले जाऊ लागले. अशाप्रकारे भटक्या कुत्र्यांचा त्रासही कमी करण्यात आला.
आज हे आंदोलन लोकांना कुणाच्या फारसे लक्षात नाही. मात्र त्याकाळी या आंदोलनाने इंग्रजांना चांगलाच धडा शिकवला होता. अतिशय शांत स्वभावाच्या समजल्या जाणाऱ्या पारसी समाजाने भारतात पहिली दंगल केली होती हे आज कुणाला तरी पटेल काय?
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.