आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
भारत-पाकिस्तान दोन्ही देश स्वतंत्र झाल्यापासून सातत्याने एकमेकांविरोधात कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. अगदी स्वातंत्र्य मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशी काश्मीरवर कब्जा मिळवण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने काश्मीरमध्ये घुसखोरी केली. काश्मीरमधून पाक सैन्याला हुसकावून लावण्यासाठी भारतीय सैन्याने काश्मीरला सहाय्य केले तेव्हापासून भारत-पाक संबंधात कायमची कटुता निर्माण झाली.
भारत आणि पाकिस्तान या शेजारी राष्ट्रातील वैमनस्य जगजाहीर असल्याने या दोन देशांतील संबंधाकडे सगळ्या जगाचे लक्ष लागून राहिलेले असते. दोन्ही देश अण्वस्त्र सज्ज झाल्यापासून तर ही चिंता अधिकच भयावह बनली आहे. या दोन देशात जर अणुयुद्धाचा भडका उडाला तर, याचे परिणाम सबंध जगाला भोगावे लागू शकतात. म्हणूनच दोन्ही देशादरम्यानच्या समस्या शक्य तितक्या सामोपचाराने कशा सोडवता येतील यावरच सगळ्यांचा भर असतो. तुम्हाला माहिती नसेल पण, भारतीय वैमानिकांच्या सावधानतेमुळे भारत-पाक अणुयुद्ध होता होता राहिले आहे. त्याक्षणी जर या वैमानिकांनी प्रसंगावधान दाखवले नसते तर कदाचित भारत आणि पाकिस्तानसह संपूर्ण जगाला पुन्हा एकदा अणुयुद्धाच्या भीषण झळा सोसाव्या लागल्या असत्या.
१९९८ साली दोन्ही देशांनी शांतता करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारानुसार दोन्ही देशाच्या सीमेवरील काही प्रदेश हा लष्कर विरहित ठेवण्यात येईल असे ठरले. दोन्ही देशादरम्यानचा सलोखा वाढण्यासाठी लाहोर ते दिल्ली अशी बस सेवाही सुरू करण्यात आली.
भारत सामोपचाराने पाकिस्तानशी संबंध सुधारण्याचे प्रयत्न करत असताना तिकडे पाकिस्तान मात्र भारताविरुद्ध कट रचण्यात मश्गुल होता.
इकडे शांतता करारावरील स्वाक्षरीची शाही सुकलीही नसेल तोपर्यंत तिकडे १९९८च्याच डिसेंबरपासून पाकिस्तानने या लष्कर विरहित प्रदेशात घुसखोरी सुरू केली होती. कारगिलसारख्या समुद्र सपाटीपासून १६ ते १८ हजार फुट उंचावरील घुसखोरी लक्षात यायला भारतीय सैन्याला खूपच उशीर झाला. या प्रदेशात पाकिस्तानने चढाई केल्याचे भारतीय लष्कराच्या लक्षात येईपर्यंत १९९९ सालचा पावसाळा उजाडला. त्यानंतर मात्र दोन्ही देशात घमासान युद्ध सुरू झाले.
१९९८ मध्येच पाकिस्तानने अणू चाचणी केली होती आणि यात पाकिस्तानला यशही मिळाले होते. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी कारगिल युद्धावेळी भारता विरोधात अण्वस्त्र वापरण्याची तयारीही केली होती, असे म्हटले जाते. कारगिलचे हे युद्ध सर्वात अधिक उंचावर लढले गेले होते. भारताविरोधात युद्ध लढण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने १९९८ पासूनच तयारी सुरू केली होती. कारगिलवर कब्जा मिळवण्यासाठी पाकिस्तानने आपले ५ हजार सैनिक या परिसरात तैनात केले होते. पाकिस्तानी हवाई दलाला या युद्धाची सुरुवातीला कसलीच माहिती देण्यात आली नव्हती. अचानक जेव्हा पाकिस्तानी हवाई दलाकडे पाकिस्तानी सैन्य दलाने मदतीची मागणी केली तेव्हा पाकिस्तानी हवाई दलाने आपल्याच सैनिकांना मदत नाकारली होती.
समुद्रसपाटीपासून १६ हजार ते १८ हजार फुट उंचावरील कारगिलमध्ये विमानांचा वापर करायचा तर विमानांना जवळपास २० हजार फुट उंचावरून उडावे लागणार होते. इतक्या उंचीवर हवा अगदीच विरळ असते. अशा वातावरणात विमान उड्डाण करणे म्हणजे जोखमीचे काम, पण आपल्या हवाई दलाने अजिबात माघार घेतली नाही.
८ मे पासून कारगिल युद्ध सुरु झाले आणि ११ मे पासून भारतीय हवाई दलाने या युद्धात सहभाग घेतला.
भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी सैन्याला हुसकावून लावण्यासाठी भारतीय सैनिकांनी कंबर कसली होती. जिथे सैन्याचे काही चालणार नाही अशा ठिकाणी हवाई हल्ला करून पाकिस्तानी सैन्याला मात देण्याची योजना आखण्यात आली. यासाठी भारतीय लष्करातील मिग-२७ आणि मिग-२९ विमानांचा वापर करण्यात आला. भारतीय हवाई दलाने जर त्यावेळी ही अवघड कामगिरी पार पाडली नसती तर, भारताला कारगिल युद्धात पाकिस्तानावर मात देणे शक्य झाले. भारतीय वैमानिकांनी मिग-२७ ला या युद्धात बहाद्दूर असे नाव दिले. या ऐतिहासिक विजयात मिग-२७ चे नाव देखील सुवर्ण अक्षरात लिहिले जाईल.
हवाई हल्ल्या व्यतिरिक्त या युद्धात तोफा आणि रॉकेटच्या सहाय्यानेही मारा करण्यात आला होता. दुसऱ्या महायुद्धानंतर हे पहिले असे युद्ध होते ज्यात एका देशाने दुसऱ्या देशाविरुद्ध मोठ्या प्रमाणात बॉम्बचा मारा केला होता.
याच योजनेचा भाग म्हणून पाकिस्तानी तळावर बॉम्ब वर्षाव करण्याच्या इराद्याने एक भारतीय विमान गुलतेरी परिसरात पोहोचले. भारतीय वैमानिकांना तिथे पाकिस्तानच्या लष्कराच्या छावण्या दिसत होत्या. भारतीय वैमानिकाने या परिसरात पाकिस्तानी छावणी असल्याच्या सूचना नियंत्रण कक्षाला दिल्या. नियंत्रण कक्षाने या मिशनमध्ये सहभागी असलेल्या सगळ्या वैमानिकांना त्या प्रदेशात बॉम्ब वर्षाव करण्याचे आदेशही दिले.
इतक्यात एका वैमानिकाच्या लक्षात आले की ही छावणी पाकिस्तानच्या हद्दीत असून तिथल्या तंबूत खुद्द पाकिस्तानी लष्कर प्रमुख परवेझ मुशर्रफ आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफही उपस्थित आहेत. त्याने लगेच नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून भारतीय नियंत्रण कक्षाने या मिशनमधील सगळ्या वैमानिकांना माघारी बोलावून घेतले. भारतीय विमाने जर वेळेत परत आली नसती तर कदाचित या बॉम्ब वर्षावात पाकिस्तानचे तत्कालीन लष्कर प्रमुख परवेझ मुशर्रफ आणि पंतप्रधान नवाज शरीफ दोघेही मारले गेले असते.
पाकिस्तानच्या पंतप्रधानांना आणि त्यांच्या लष्कर प्रमुखालाच संपवल्यामुळे पाकिस्तानमधील भारतविरोध आणखी तीव्र झाला असता आणि कदाचित कारगिल युद्धाने वेगळेच वळण घेतले असते.
कदाचित यातून अण्वस्त्र युद्धाचाही भडका उडाला असता. भारतीय वैमानिकांनी वेळीच माघार घेतल्याने भारत-पाकिस्तान दरम्यानच्या अणुयुद्धाची शक्यता मावळली.
८ मे १९९९ रोजी सुरु झालेल्या या युद्धाला २७ जुलै १९९९ रोजी अधिकृतरित्या पूर्ण विराम मिळाला. पाकिस्तानी सैन्याला या युद्धात खूप नुकसान सोसावे लागल्याचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनीही मान्य केले. या युद्धात पाकिस्तानने २७०० पेक्षाही जास्त सैनिक गमावले. अर्थात यातून पाकिस्तानने काही धडा घेतला असे मात्र झाले नाही. पाकिस्तानचा उद्दामपणा त्यानंतरही अनेकदा पाहायला मिळाला. यानंतरही पाकिस्तानने अनेकदा शस्त्रसंधीचे आणि नियंत्रण रेषेचे उल्लंघन केले आहे. नजीकच्या काही भूतकाळात घडलेल्या लष्करी कारवाईवरून तर हे संबंध खूपच चिघळल्याचे दिसत आहे. २०२० हे वर्ष तर भारत-पाक संबंधाच्या दृष्टीने अत्यंत वाईट ठरले.
सध्या तरी या दोन्ही देशात पुन्हा सलोखा निर्माण होण्याची शक्यता अगदीच धूसर आहे. दोन्ही देशांतील तणावाला पूर्णविराम मिळण्याची कल्पनाही निव्वळ कल्पनाच बनून राहील असे वाटते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.