आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
क्रिकेटमधे सर्वोत्तम गोलंदाज कोण? असा प्रश्न विचारल्यास कोणताही विचार न करता क्रिकेटप्रेमींच्या तोंडात पहिले नाव येईल ते म्हणजे श्रीलंकन गोलंदाज मुथैय्या मुरलीधरन. मुरलीधरनने क्रिकेटमधून संन्यास घेऊन बरीच वर्षे झाली. पण, त्याने केलेले विक्रम आजही कुणी मोडू शकलेले नाही.
मुरलीधरनने त्याच्या कारकिर्दीत गोलंदाजीचे नवे मापदंड निर्माण केले. भल्याभल्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीने त्याने घाम फोडला. स्पिन गोलंदाजीला त्याने एक वेगळे परिमाण दिले.
मुरलीधरनचे पूर्ण नाव देशबंधू मुथैया मुरलीधरन असे असले तरी संपूर्ण जग त्याला मुरली याच नवाने ओळखते. श्रीलंकेतील कॅन्डी येथे जन्मलेल्या मुरलीने क्रिकेटमधे खूप नाव कमावले. मुरलीने लहानपणापासूनच क्रिकेट खेळायला सुरुवात केली. लहानपणी तो एक पेसर गोलंदाज होता. चौदाव्या वर्षी त्याने स्पीन गोलंदाजीकडे आपले लक्ष वळवले. या सरावाचा पुढे त्याला चांगलाच फायदा झाला.
१९९२ साली त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे पदार्पण केले. २८ ऑगस्ट १९९२ रोजी श्रीलंका वि. ऑस्ट्रेलिया सामन्यात त्याला सहभागी करून घेतले.
मुरली तेव्हा वीस वर्षांचा होता. निवडकर्त्यांना त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. मुरलीनेही त्यांना निराश केले नाही. पहिल्याच सामन्यात त्याने तीन विकेट घेतल्या.
मुरलीने त्याच्या चाहत्यांना कधी निराश केले नाही. निवडकर्त्यांचा विश्वास जिंकल्यामुळे तो श्रीलंका संघाचा एक अविभाज्य भाग बनला. उत्तम स्पिन गोलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुरलीने कसोटी सामन्यात ८०० विकेट्स घेतल्या आहेत. आजतागायत त्याचा हा विक्रम कोणालाच मोडता आलेला नाही. या आकड्याच्या आसपास पोहोचणेही अजून कोणाला शक्य झालेले नाही. यानंतर दुसऱ्या स्थानावर येतो शेन वॉर्न ज्याने ७०० विकेट घेतल्या आहेत.
२०१० सालचा किस्सा आहे जेव्हा भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर होता. या सामान्यापूर्वीच मुरलीने क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती. त्यावेळी कसोटी सामन्यात त्याच्या खात्यावर ७९२ विकेट्स होत्या. या एकाच शेवटच्या सामन्यात त्याने आठ विकेट घेऊन ८००चा टप्पा पूर्ण केला. त्याच्या या अखेरच्या सामन्याने त्याच्या चाहत्यांना त्याने एक अनोखी भेट दिली.
२०१० सालच्या त्याचा हा शेवटचा सामना त्याच्या या कामगिरीमुळे प्रेक्षकांसाठी एकदम खास बनून गेला. श्रीलंकेच्या गाला मैदानात झालेल्या या सामन्यात मुरलीचे चाहते त्याचा हा शेवटचा खेळ पाहण्यासाठीच नव्हे तर कायमचा अविस्मरणीय असा हा सामना ठरेल याच अपेक्षेने मैदानात हजर होते.
पहिल्या फेरीत मुरलीने पाच भारतीय खेळाडूंना तंबूत पाठवले. ८००चा आकडा पार करण्यासाठी आता त्याला फक्त तीन विकेटची गरज होती. दुसऱ्या फेरीत त्याने आणखी दोन खेळाडूंना तंबूत पाठवून ७९९चा आकडा गाठला. आता गरज होती फक्त एका विकेटची आणि त्याच्या स्पिन बॉलिंगवर प्रग्यान ओझाची दांडी गुल झाली आणि ८०० चा आकडा पार झाला, तेव्हा त्याच्या चाहत्यांनी मैदानात जल्लोष केला होता. त्याचे चाहते या तीन विकेटसाठी खूपच उत्सुक झाले होते.
मुरली हा आकडा गाठणार का हे पाहण्यासाठी स्टेडियममधील प्रेक्षक श्वास रोखून बसले होते. भारतीय खेळाडूंना आता कोणत्याही परिस्थितीत आणखी विकेट गमवायच्या नव्हत्या.
सामना वाचवण्यासाठी भारतीय खेळाडू तितक्याच जिद्दीने खेळत होते. तरीही मुरलीने आपले ध्येय गाठलेच. या सामन्यात श्रीलंकेने भारताला दहा विकेटने मात दिली होती. मुरलीच्या निरोपाचा हा सामना त्याच्या चाहत्यांसाठी मात्र अपेक्षेप्रमाणेच अविस्मरणीय ठरला.
कसोटी सामन्यातील सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम तर मुरलीच्या नावावर आहेच पण, एकदिवसीय सामान्यांमध्येही त्याने सर्वाधिक म्हणजे ५३४ विकेट्स घेतल्या आहेत. एकदिवसीय सामन्यातील सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. टी-ट्वेंटीमध्ये त्याने १३ विकेट्स घेतल्या आहेत. अशा सर्व मिळून त्याने एकूण १३४७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा हा विक्रम कोणी मोडू शकेल असे सध्या तरी वाटत नाही. इंग्लंडविरोधात खेळलेल्या १२ कसोटी सामन्यांत त्याने इंग्लंडच्या ११२ खेळाडूंची विकेट घेतली. कमी सामन्यांत जास्त विकेट घेण्याचा विक्रम आणि एकाच देशाचे शंभरपेक्षा जास्त खेळाडूंची विकेट घेण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे.
सर्वाधिक वेळा एकाच सामन्यात दहा विकेट घेण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर नोंदवला गेला आहे. २२ वेळा त्याने एकाच सामन्यात दहा विकेट घेतल्या आहेत. कसोटी सामन्यात एकापेक्षा जास्त वेळा पाच विकेट घेण्याचा विक्रमही त्याचाच नावावर आहे. सर्वाधिक म्हणजे ६७ वेळा त्याने एकदिवसीय सामन्यात पाच किंवा पाचपेक्षा जास्त खेळाडूंची विकेट घेतली आहे.
खेळाडू आणि विवाद हे समीकरण लागू पडत नाही असा एकही खेळाडू झाला नसेल. मुरलीही याला अपवाद नाही. त्याच्या बॉलिंगच्या ॲक्शनवरून बराच गदारोळ मजला होता. अनेक खेळाडूंना आणि पंचांनाही त्याच्या बॉलिंगबद्दल आक्षेप होता. ऑस्ट्रेलियन खेळाडू गिल क्रिस्टने तर मुरलीला आयसीसीने आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची परवानगी देऊ नये अशीही मागणी केली होती.
त्याच्या मते बॉल फेकताना मुरलीचा हात पंधरा अंशांपेक्षाही जास्त अंशात झुकत होता, जे क्रिकेटच्या नियमाबाहेर आहे.
गिलक्रिस्टने मुरलीच्या या खेळाचा उल्लेख आपल्या आत्मचरित्रातही केला आहे. त्याच्या मते मुरलीला राजकीय संरक्षण होते म्हणूनच मुरली इतके विक्रम स्थापित करू शकला.
मुरलीची पत्नी माधीमालर ही भारतातील तामिळनाडूमधील आहे. २००५ साली ते दोघे विवाहबद्ध झाले. मुरलीधरनबद्दल भारतीय क्रिकेट रसिकांमध्येही एक वेगळा आदर आहे.
२०१६ साली चेन्नईत आलेल्या पुरात त्याने मदत केली होती. या पुरात नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना त्याने एक कोटी रुपयांची मदत केली होती. मुरलीला इंडियन ओवरसीजचा व्हिसा मिळाला असल्याने दरवेळी भारतात येताना त्याला व्हिसाची गरज लागत नाही. तो अनेकदा भारत दौऱ्यावर आला आहे. भारतातील क्रिकेट खेळू इच्छिणाऱ्या आणि क्रिकेट खेळणाऱ्या शाळकरी मुलांना त्याने क्रिकेटचे प्रशिक्षणही दिले आहे.
२०१५ साली मुरलीची आयपीएलमधील हैदराबाद संघाचा कोच म्हणून नियुक्ती झाली होती. क्रिकेटमध्ये त्याच्यासारखेच खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी त्याच्याकडून असे प्रयत्न सुरू राहतील अशी अपेक्षा करूया.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.