आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
सुरुवातीला निखळ मनोरंजनासाठी खेळल्या जाणाऱ्या खेळांचं रुपांतर आधुनिक युगात पैसा मिळवण्यासाठी कधी झालं हे कुणाला समजलंच नाही. सध्या जगातील जवळपास सर्व प्रमुख खेळांचं मोठ्या प्रमाणात व्यावसायिकीकरण झालं आहे. क्रिकेटचा तर यामध्ये अगदी वरचा क्रमांक लागतो. मात्र, व्यवसायाबरोबर क्रिकेटमध्ये भ्रष्टाचार देखील वाढला आहे. अनेक घोटाळ्यांमुळं क्रिकेट चाहत्यांच्या प्रेमाला हादरे बसले आहेत.
जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हॅन्सी क्रोनिएने २००० मध्ये मॅच फिक्सिंग घोटाळ्याची कबुली दिली होती, तेव्हा तर संपूर्ण क्रिकेट जगताचा पायाच हादरला होता. चाहत्यांनी क्रिकेटच्या वैधतेवर शंका घेण्यास सुरुवात केली. अनेक खेळाडूंवर बंदी घातली गेली. आयसीसीला कडक दक्षता बाळगावी लागली. सट्टेबाज खेळाडूंपर्यंत पोहचू नयेत यासाठी विशेष प्रयत्न करावे लागले.
हॅन्सी क्रोनिएच्या प्रकरणानंतर १० वर्षांनी पुन्हा क्रिकेट विश्वात आणखी एकदा मोठा वाद उफाळून आला. क्रिकेटचं तीर्थक्षेत्र समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर स्पॉट-फिक्सिंग झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. तीन पाकिस्तानी खेळाडूंची क्रिकेट कारकिर्द पणाला लागली. आयसीसीच्या कडक निर्बंधांनंतर देखील स्पॉट-फिक्सिंग झाली कशी आणि हे प्रकरण कुणी समोर आणलं याबाबत हा विशेष लेख..
मॅच-फिक्सिंगमध्ये संपूर्ण सामन्याच्या निकालावर परिणाम होईल यासाठी खेळाडूंना आपल्या मनाप्रमाणं खेळ करण्यासाठी सट्टेबाज पैसै देतात. स्पॉट-फिक्सिंगचा सामन्याच्या निकालाशी संबंध नसतो मात्र, त्यावर सट्टेबाजीचे बाजार नक्कीच अस्तित्वात असतात. क्रिकेटच्या सामन्यात एखादा नो-बॉल किंवा वाइड डिलीव्हरी टाकण्यासाठी खेळाडूंना सट्टेबाज पैसे देतात. त्याला स्पॉट फिक्सिंग म्हणतात.
ऑगस्ट २०१० मध्ये लॉर्ड्सवर झालेल्या इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील चौथ्या कसोटी दरम्यान हा शब्द प्रकाशझोतात आला. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड आधीच २-१ नं आघाडीवर होता. पण, पाकिस्तानने ओव्हल कसोटी जिंकून दमदार पुनरागमन केलं होतं. शेवटचा सामना लॉर्ड्सच्या मैदानावर ठेवण्यात आला होता.
या कसोटीतील डावात मोहम्मद आमीर आणि मोहम्मद आसिफनं जलवा दाखवला होता. आमीरनं सहा विकेट्स घेतल्या त्यानंतर आसिफने एक विकेट घेऊन इंग्लंडची अवस्था ७ बाद १०२ अशी केली होती. आपल्या स्पेल दरम्यान, आमीरने एक मोठा नो-बॉल टाकला होता. खेळ सुरू असताना त्यावर कुणीही शंका उपस्थित केली नाही. कारण क्रिकेटमध्ये नो बॉल आणि वाईड बॉल पडणं ही नियमीत गोष्ट आहे. त्याच कसोटीमध्ये आसिफनं देखील एक नो-बॉल टाकला होता त्यावर देखील कुणाला संशय आला नाही. पण, दोन नो बॉलच्या मागील खरं नाटक तर लॉर्ड्सच्या बाहेर विकसित होऊ लागलं होतं.
‘न्यूज ऑफ द वर्ल्ड टॅब्लॉईड’ वर्तमानपत्रानं स्टिंग ऑपरेशन केलं होतं. त्यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. मजहर मजीद नावाच्या एका बुकीनं असा दावा केला होता की त्यानं आमिर आणि आसिफला जाणीवपूर्वक नो बॉल टाकण्यासाठी लाच दिली होती. यासाठी माजिदनं दीड लाख पाउंड दिले होते. सलमान बट, कामरान अकमल आणि इतर तीन खेळाडूंचा देखील या संपूर्ण डीलमध्ये समावेश असल्याचा आरोपही स्टिंग ऑपरेशन दरम्यान झाला होता.
खेळाडूंना प्रायोजकत्व आणि किट कॉन्ट्रॅक्ट देण्याच्या बहाणाण्यानं माजिदनं खेळाडूंशी संपर्क प्रस्थापित केले होते. स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आयसीसीनं गांभीर्यानं या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा निर्णय घेतला. स्कॉटलंड यार्डनं देखील या प्रकरणामध्ये उडी घेत तपास सुरू केला. तपासादरम्यान हॉटेलमधील खेळाडूंच्या खोल्यांमध्ये पैसे सापडले. मजहर मजीदनं व्हिडिओमध्ये केलेली वक्तव्य एकदम बरोबर होती. मॅच हिस्ट्री तपासली असता आसिफ आणि आमीर दोघांनीही विशिष्ट क्षणी नो-बॉल टाकले होते. दुसरीकडं पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं हे प्रकरण नाकारात आपल्या खेळाडूंचा बचाव करण्याचा प्रयत्न केला.
पाकिस्ताननं लॉर्ड्सवरील कसोटी सामना तर गमावलाच पण खरे परिणाम त्यानंतर दिसू लागले. आयसीसीनं तपासासाठी तिन्ही खेळाडूंना निलंबित केलं. सलमान बटनं आपलं निलंबन मागे घेण्यासाठी अपील देखील केले मात्र, त्याला सूट मिळाली नाही. ५ फेब्रुवारी २०११ रोजी आयसीसीनं या प्रकरणाचा निकाल दिला. तिन्ही खेळाडूंवर बंदी घालण्यात आली. पाकिस्तानचा कर्णधार सलमान बटवर १० वर्षांची, मोहम्मद आसिफवर सात वर्षांची आणि मोहम्मद आमिरवर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली. बट, अमीर आणि आसिफ कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळू शकणार नव्हते. तिन्ही खेळाडूंना क्रीडा लवाद न्यायालयात अपील दाखल करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, तिथे देखील त्यांचं अपील फेटाळण्यात आलं.
आयसीसीनं खेळाडूंवर बंदी घातल्यानंतर, स्कॉटलंड यार्डनं क्राउन प्रॉसिक्यूशन सर्व्हिससह पुरावे गोळा करण्याचं आणि सहभागी खेळाडूंवर गुन्हे दाखल करण्याचं काम केलं. १ नोव्हेंबर २०११ रोजी साऊथवार्क क्राउन कोर्टात, माजीद, आसिफ, अमीर आणि सलमान बट्ट यांना दोषी ठरवण्यात आलं. ३ नोव्हेंबर रोजी त्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. बटला दोन वर्षे आणि सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची तर आसिफला एक वर्ष आणि सहा महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा झाली. आमीर आणि माजीद यांना दोन वर्ष आठ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
शिक्षा झालेल्या खेळाडूंपैकी फक्त मोहम्मद आमीरला क्रिकेटमध्ये पुनरागमन करणं शक्य झालं. विशेष म्हणजे आपल्या पुनरागमनाचा पहिला सामना त्यानं लॉर्ड्सवर खेळला. लॉर्ड्सवर कसोटी विजय मिळवण्यात त्यानं पाकिस्तान संघाला मोठी मदत केली. मात्र, मोहम्मद आसिफ आणि सलमान बट यांना पुनरागमन करण शक्य झालं नाही.
निलंबनाचे दिवस संपल्यानंतर त्यांनी काही प्रमाणात घरगुती क्रिकेटमध्ये आपलं नशीब आजमवण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण त्यात त्यांना विशेष यश मिळालं नाही. वयाच्या २७व्या वर्षी कसोटीतून निवृत्तीचा निर्णय घेण्यापूर्वी आमीर काही वर्षे खेळला. पण, त्याच्या माथ्यावर लागलेला स्पॉट फिक्सिंग कलंक पुसला गेला नाही. त्या प्रकरणाच्या सावलीखाली त्याचा मैदानावरील प्रत्येक प्रयत्न झाकोळून जात होता.
लॉर्ड्सच्या प्रकरणानंतर २०१३ च्या ‘इंडियन प्रीमियर लीग’मध्ये पुन्हा स्पॉट फिक्सिंग एक प्रकरण समोर आलं. श्रीसंतसह तीन भारतीय खेळाडूंना स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी ठरवण्यात आलं होतं. तपासानंतर अंकित चव्हाण, अजित चंडिला आणि श्रीसंत यांच्यावर बंदी घालण्यात आली होती. स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळल्यामुळं तीन पाकिस्तानी आणि तीन भारतीय खेळाडूंच्या कारकिर्दी संपुष्टात आल्या. भलेही स्पॉट फिक्सिंगचा सामन्याच्या अंतिम निकालावर थेट परिणाम होत नसेल मात्र, खेळाडूंच्या जीवनावर नक्कीच त्याचा थेट परिणाम होतो.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.