आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारतात जातीभेद इतक्या खोलवर रूजलाय की आजही, स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षे झाली असताना देखील जातीभेदामुळे होणारे गुन्हे निदर्शनास येतच आहेत. अजूनही काही घरात खालच्या जातीतील पाहुण्यांसाठी वेगळा पेला कायम ठेवलेला असतो. उच्च-नीच, शुद्र, स्पृश्य-अस्पृश्य आजही ह्या भावना लोकांच्या मनात ठाण मांडून बसल्याच आहेत.
धर्म माणसाला असे वागावयास शिकवतो का? धर्म म्हणजे नेमके काय? तर धर्म म्हणजे ‘माणसाचे कर्तव्य’, पण आपण धर्माला ओळख बनवून समाजाचे तुकडेच पाडले. कोणता ही धर्म हा द्वेष, छळ, भेद भाव, मान अपमान करण्याला प्रोत्साहन देत नाही, या उलट प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, समानता, बंधुत्व हेच शिकवतो.
जातीभेद, ही काही लोकांनी स्वतःचा अहंकार जोपासला जावा म्हणुन व स्वतःच्या सोयी सुविधांसाठी रचलेली एक “कार्यपद्धती” म्हणावी लागेल.
अशी व्यवस्था, ज्यात साधी तहान भागवण्यासाठीसुध्दा सत्याग्रह करावे लागले.
निसर्गाने सगळ्यांना सामान अधिकार दिलेले असताना देखील, आपल्या समाजातली काही माणसं ‘अन्न, वस्त्र, निवारा’ यासारख्या मुलभूत गरजा भागवण्यासाठीसुद्धा उच्च जातीय लोकांपुढे हात पसरवत. याच लाचारीला, सततच्या होणाऱ्या अपमानाला, व माणूस असूनही माणसाप्रमाणे वागणूक ना मिळण्याला कंटाळून बाबासाहेब आंबेडकर नावाचे वादळ ही जातिव्यवस्था डळमळीत करण्याच्या प्रयत्नात लागले.
याच प्रयत्नांमधील एक महत्वपूर्ण प्रयत्न म्हणजे ‘चवदार तळ्याचा सत्याग्रह.’
”हे सत्याग्रह फक्त दलितांकरता चवदार तळे खुले करण्यापुरते मर्यादित नसून, आमचे मूळ उद्देश ‘शुद्रसुद्धा मानवच आहेत’ हे सांगणे आहे”, असे म्हणत आंबेडकरांनी या सत्याग्रहाचा आरंभ केला. १९२३ साली सरकारने आदेश दिला की सगळी सार्वजनिक ठिकाणे, सोयी सुविधा जसे पाण्याचे नळ, शाळा, मंदिरे, इस्पितळे, इत्यादी दलितांसाठीसुद्धा खुले करण्यात यावे.
सगळ्या नगरपालिकांनी, पंचायतींनी, या निर्णयाचे स्वगतही केले. पण या निर्णयाला समाजातील तथाकथित उच्च जातीच्या लोकांचा ठाम विरोध होता. त्यांच्या या विरोधाला शरण जाऊन, काही नगरपालिका, पंचायती या निर्णयाला अंमलात आणणे टाळत होत्या. ज्यामुळे कायदेशीररित्या अधिकार असून देखील दलित या सुविधांपासून वंचितच होते.
आपल्या अधिकारप्राप्तीसाठी ‘कोलाबा डिस्ट्रिक्ट डिप्रेस्ड क्लासेस कॉन्फरन्स’च्या ‘रामचंद्र बाबाजी मोरे’ या २१ वर्षीय तरुणाने आपल्या इतर कार्यकर्त्यांबरोबर एक सत्याग्रह करण्याची योजना आखली.
मोरेंना काही उच्च जातीय मित्रमंडळींचासुध्दा सहभाग लाभला. त्यांचे वर्गमित्र सुरेंद्रनाथ टिपणीस एक ‘चांद्रसेनिय कायस्थ प्रभू’ कम्युनिटीचे असून, ते महाड नगर पालिकेचे अध्यक्ष होते. त्यांनी देखील आपला पाठिंबा म्हणून सरकारचे आदेश लागू करून घेण्यास संमती दिली. ही योजना आखण्यास जवळपास ४ वर्षे लागली.
१९२७ साली मोरेंनी आंबेडकरांना या सत्याग्रहाचे नेतृत्व करण्याची विनंती केली व आंबेडकरांनी ती स्वीकारली सुध्दा.
१९ मार्च, १९२७ रोजी ३००० दलित बांधवांसमवेत आंबेडकरांनी चवदार तळ्यात जाऊन पाण्याला स्पर्श केला व आपले हात धुतले. हाताला पाणी लागताच स्वर्ग प्राप्ति समान सुख समस्त सत्याग्रही अनुभवत होते. आता तरी आपल्याला पाणी मिळेल अशी आशा वाटत असतानाच, काही चवताळलेल्या उच्च जातीय पंडितांनी चवदार तळ्याचे शुद्धीकरण म्हणून तब्बल १०८ मोठाले रांजण भरून ‘पंचकर्म’ केलेले पाणी त्या तळ्यात मिसळले व अस्पृश्यांनी दुषित केलेले तळे शुध्द करून, त्या तळ्याचे पाणी वापरण्यास पुन्हा एकदा बंदी घातली.
हे आव्हान स्वीकारत आंबेडकरांनी ‘महाड सत्याग्रह समिती’ची स्थापना केली व २५ डिसेंबर रोजी आता १०,००० दलित बांधवांसमवेत पुन्हा एकदा चवदार तळ्याचा सत्याग्रह करण्यात आला.
या सत्याग्रहाबरोबर आता दलित ‘विश्वेश्वर मंदिरात’ प्रवेश करून, तेसुध्दा दुषित करण्याची योजना आखताहेत अशी अफवा संपूर्ण महाडात पसरली. याला प्रतिकार म्हणून, संतापलेल्या काही उच्च जातीय लोकांनी दंगली करण्यास सुरुवात केली.
या दंगलीत दलितांची घरे भुईसपाट झाली, संसार उ*ध्वस्त झाले, जनजीवन रसातळाला लागले, अन्न धान्याची नासाडी झाली, कैक लोकांचे प्राणही गेले. आंबेडकरांना देखील शासकीय विश्रामगृहात आश्रय घ्यावा लागला. हे सगळे सुरू असतानाच, तळे खाजगी मालमत्ता असून त्याचे पाणी विना परवाना वापरल्यामुळे आंबेडकरांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. कायद्याचा मान राखत आंबेडकरांनी तूर्तास सत्याग्रह मागे घेतला आणि आपल्या दलित बांधवांना शिक्षण, स्त्री-पुरुष समानता या विषयांकडे लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. आणि आंबेडकर खुद्द हा खटला लढू लागले.
१० वर्षे जिद्दीने, संयम राखून आंबेडकर लढतच राहिले. अखेर १७ मार्च १९३६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने दलितांच्या बाजूने निर्णय सुनावला व सगळ्या प्राण गमावलेल्या सत्याग्रहींच्या बलिदानाचे, कष्टांचे चीज झाले.
हा विजय फक्त दलितांचा जातिव्यवस्थेवरचा विजय नव्हता तर माणुसकीचा दुराचारावर, क्रू*रतेवर, अंधारावर प्रकाशाचा झालेला विजय होता.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.