आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
लेखक: आदित्य कोरडे
सिक्कीम – तिबेट सीमेवर अशा तणाव वाढवणाऱ्या घटना घडत असताना हे चोग्याल आणि ग्यालामो मात्र सिक्कीमला स्वतंत्र राष्ट्र बनवण्याचे व आपण त्याचे सत्ताधीश बनण्याचे स्वप्न पाहत होते.
त्या करता त्यांची आंतरारष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवण्याची खटपट चालूच होती. पण ह्या सगळ्यात सिक्कीमी जनतेला, त्यांच्या नेत्यांना रस नव्हता.
त्याना स्वत:चा सर्वांगीण विकास आणि शासनात प्रतिनिधित्व हवे होते. अशाच अनागोन्दितच १९७३ साल उजाडले. ह्यावर्षी सिक्कीमच्या ५व्या सर्वसाधारण निवडणुका झाल्या.ह्या वर्षी चोग्याल धार्जिणी सिक्कीम न्याशनल पार्टी जिंकली.
आधीच्या निवडणुकात बहुमत मिळूनही सिक्कीम न्याशनल कॉंग्रेस काही करू शकली नव्हती, आता तर तिचा धीरच संपला. इथे थोडे थांबून आपण सिक्कीम ची निवडणूक प्रक्रिया काय होती पाहु.
मागे लिहिल्या प्रमाणे ७५% लोकसंख्या असलेले नेपाळी- गुरखा ह्याना कौन्सिल मध्य जागा होत्या ६ तर २५% लोकसंख्या असलेल्या भुतिया लेपचा ह्याना जागा होत्या ६ च शिवाय चोग्याल स्वत:च्या निवडलेल्या ५ जणांची नियुक्ती करत जे अर्थातच त्यांच्याशी राज निष्ठ असत.
म्हणजे ७५% लोकांना प्रतिनिधित्व होते १/३, शिवाय राजा हाच सत्ताधीश असल्याने लोकांनी निवडून दिलेल्या मुख्यमंत्री आणि त्याच्या मंत्रीमंडळाला त्याच्या संमतीविना काही करता येत नसे. असा हा सगळा दिखावू मामला होता.
ह्या सगळ्या विरुद्ध सिक्कीम नॅशनल कॉंग्रेसने आंदोलन छेडले. सरकारने अर्थातच दडपशाही आणि अटक सत्र सुरु केले. ४ एप्रिल १९७३ ला चोग्याल ह्यांचा ५०वा वाढदिवस होता त्यादिवशी राजधानी गंगटोक मध्ये विराट मोर्चे, मोठी निदर्शने आयोजित करण्यात आली.
जमावावर भारताने प्रशिक्षित केलेल्या सुरक्षादलाने गोळीबार केला. कोणी मेले नाही पण गोळीबारात आणि पळापळीत अनेक जण जखमी झाले.दुसऱ्या दिवशी सिक्कीम न्याशनल कॉंग्रेसच्या नेत्यांना सरकारने उचलून आत टाकले.
आता जनता भडकली आणि मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरून राजाच्या( चोग्याल) विरोधात घोषणा देऊ लागले. राजवाड्याला वेढा घालून राजाला पदच्युत करण्याचा त्यांनी निर्धार केला. राजाप्रसादाला जवळ जवळ १५००० लोकांचा गराडा पडला.
तेव्हा चोग्याल ह्यांना परिस्थितीचे गांभीर्य समजले. त्यांनी नेहमी प्रमाणे भारताकडे मदतीचे याचना केली तसेच सिक्कीम मध्ये अनागोंदी माजणे चीनला कसे सोयीचे आहे आणि भारताकरता ते किती धोक्याचे आहे ह्याचे नेहमीचे तूणतुणेही वाजवले.
पण ह्यावेळी भारताच्या पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी आणि त्यानी भारत सरकारचे धोरण (सिक्कीम बाबत) आता अमुलाग्र बदलायचे ठरवले होते.
ह्या आधी ही असे पेच प्रसंग उभे राहत तेव्हा भारत चोग्याल ह्यांच्या मदतीला धावून जात असे व राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली जात असे.
पण एकदा हे झाले कि त्यातून काही धडा घेऊन चोग्याल आपले प्रशासन अधिक जनताभिमुख , अधिक कल्याणकारी करण्याच्या दृष्टीने काही थोडेफार, जुजबी बदल देखील करीत नसत.
त्याना जुनी पुराणी मध्ययुगीन राजेशाहीच पुढे चालवायची होती ते सुद्धा शेजाऱ्याच्या मदतीने, हे असे किती काळ चालणार?
आताही सिक्कीम मधल्या भारतीय फौजांचे प्रमुख अवतार सिंग वाजपेयी हे भारत सरकारच्या आदेशावरून चोग्याल ह्यांना भेटले.
आतापर्यंत भारतीय सैन्य राजवाड्याचे व महाराजांच्या कुटुंब व मालमत्तेचे रक्षण करीत होते म्हणून सद्भावना म्हणून लोक आणि सिक्कीम न्याशनल कॉंग्रेसचे नेते शांत होते.
पण राजवाड्यात महाराजांचे काही सहकारी तिबेट मधून आलेल्या निर्वासितांना(चीनने तिबेट बळकावल्यामुळे साधारण ६०००० तिबेटी शरणार्थी म्हणून तिथे आलेले होते) शस्त्रास्त्रे देऊन चळवळ मोडून काढायचा सल्ला देत होते.
अवतार सिंगानी डोक्याला हात लावला. असे जर काही झाले तर सिक्कीम मध्ये जातीय हिंसाचार मोठ्या प्रमाणात होईल, दंगल पेटेल आणि महाराज व त्यांचे सर्व आप्त स्वकीय तसेच ते ज्या लोकांचे प्रतिनिधित्व करतात.
त्या भुतिया-लेपचा लोकांचे हि जीवित धोक्यात येईल ह्याची जाणीव त्यांनी करून दिली. तसेच त्याना सल्ला दिल्ला कि त्यांनी भारत सरकारला तार करून हस्तक्षेप करायची व सिक्कीम मध्ये कायदा व सुव्यवस्था पूर्ववत करावी अशी विनंती करावी.
हताश होऊन चोग्यालनी तार केली. चीन सीमेवर टपून बसलेला असताना व त्याच्याकडून काही गडबड व्हायच्या आतच भारताला हालचाल करणे भाग होते.
त्याप्रमाणे ६ एप्रिलला तार मिळाल्यावर लगेच ८ व ९ एप्रिल रोजी भारतीय लष्कराने राजधानीत कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित केली.( (ह्या वाक्याचा अर्थ नीट समजूनघ्या) प्रशासकीय कारभार केवलसिंग ह्यांनी ताब्यात घेऊन मंत्रीमंडळ बरखास्त केले.
चोग्याल ह्यांनी जेरबंद केलेल्या राजकीय नेत्यांना तुरुंगातून सोडले गेले व त्याना फेरनिवडणुकाचे, निर्वाचन प्रक्रियेत मूलगामी बदल, लोकांच्या हिताचे रक्षण तसेच राजकीय स्थैर्य, सुरक्षेची तसेच प्रशासकीय सुधारणेचे आश्वासन दिले गेले.
आंदोलन मागे घ्यायचे त्याना आवाहन केले. त्या प्रमाणे त्यांनी आंदोलन स्थगित केले. ३च दिवसात परिस्थिती सुरळीत झाली.
सिक्कीम विधानसभेचा आकार वाढवून आता १७ वरून ३२ असा केला गेला.
ह्यात १५ भुतिया-लेपचा, १५ नेपाळी गुरखा आणि एक मठाचा (बौद्ध भिक्कू संघ) आणि एक अनुसूचित जातीचा असे प्रतिनिधी निवडले जाणार होते.
महाराजांच्या मर्जीतले ५ प्रतिनिधी काढून टाकले गेले. तसेच मतदानाचा अधिकार एक व्यक्ती एक मत असा केला गेला. आधी भुतिया लेपचा उमेदवाराला नेपाळी लोक मतदान करु शकत नसे तसेच नेपाळी उमेदवाराला भुतिया मतदान करु शकत नसत त्यामुळे हे उमेदवार फक्त त्यांच्या मतदाराना उत्तरदायी असत.
असे बंदिस्त मतदार संघ रद्द केले गेले. विधानसभा ज्या बाबतीत कायदे करू शकेल, ठराव करून राजासमोर मांडू शकेल अशा विषयांची यादी वाढवली गेली. हे फार मुलभूत बदल होते.
ह्या नवीन व्यवस्थेप्रमाणे आणि भारतीय लष्कर व भारतीय निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली १९७४ मध्ये निवडणुका लढल्या गेल्या. सिक्कीम न्याशनल कॉंग्रेस ने ३२ पैकी २९ जागा जिंकल्या.
ग्यालामो साहिबा ह्यामुळे फार दुखी झाल्या, अमेरिकेतले सुखी जीवन सोडून त्या सिक्किंमसाराख्या दुर्गम भागात ज्या आशेने आल्या होत्या ती काही फलद्रूप होण्याची चिन्हे दिसत नव्हती.
शिवाय १९७३ सालचा लोकक्षोभ पाहून त्या घाबरल्या व आपले चंबू गबाळे आवरून त्या अमेरिकेत निघून गेल्या १९८० मध्ये त्यांनी चोग्याल ह्यांच्याशी घटस्फोट घेतला.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.