आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
गालिब म्हटले की पहिल्यांदा आठवते ती शायरी. शायरी आणि गालिब यांचे नाते काय? गालिब म्हणजेच शायरी आणि शायरी म्हणजेच गालिब. त्या दोघांना एकमेकांपासून वेगळे करताच येत नाही. लिहिणाऱ्या, वाचणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला गालिबची भेट झाली नाही तरच नवल. आपल्या शायरीतून भावनांचा वेध घेणारा गालिबसारखा शायर शोधूनही सापडणार नाही.
नवथर तरुणांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत गालिब सर्वांचाच आवडता शायर आहे. गालिब आपल्या हयातीतही तितकाच प्रसिद्ध होता जितका आज आहे.
‘हैं और भी दुनिया में सुखनवर बहुत अच्छे, कहते हैं कि ग़ालिब का है अंदाज़े-बयां और.’
शायर तर खूप होऊन गेले पण, गालिबची जादू आजही कायम आहे.
गालिबचा जन्म २७ डिसेंबर १७९७ रोजी आग्रा येथे झाला. उर्दू आणि फारसी दोन्ही भाषांवर गालिबचे प्रभुत्व होते आणि तो या दोन्ही भाषेत शायरी लिहित असे. उर्दू शायरीनेच त्याला प्रसिद्धी मिळवून दिली ही गोष्ट वेगळी. गालिबच्या शेरोशायारीतील वेदना ऐकणाऱ्याच्या मनाला घायाळ करून जातात याचे कारण त्याच्या बालपणीच्या दु:खात दडले असावे. लहानपणीच त्याच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले. अनाथपणाची ही वेदना त्याला कायम सतावत राहिली आणि ती त्याच्या शब्दातूनही ओघळत राहिली.
गालिबचे भाषेवर, शब्दावर प्रचंड प्रेम आणि याच भाषेशी, शब्दाशी तो रोज नवनवे प्रयोग करण्यात व्यस्त असे. फक्त ११ व्या वर्षी त्याने पहिली शायरी लिहिली होती. त्याच्या सुरुवातीच्या सगळ्या रचना गझल प्रकारातील होत्या. १३ वर्षाचा असतानाच त्याचे लग्न उमराव बेगम नावाच्या तरुणीशी झाले. लग्नानंतर गालिबने आग्रा सोडले आणि तो दिल्लीला पोहोचला.
दिल्लीत आल्यानंतर त्याची शायरी आणखी आणखी फुलत गेली. आपले संपूर्ण आयुष्य त्याने दिल्लीतच घालवले. गालिबला पितृसुख लाभले नाही तसेच त्याला आपत्यसुखही लाभले नाही. त्याला सात मुले झाली पण, यातील एकही जगू शकले नाही.
वारंवार ज्याने जवळून मृत्यू पाहिला तो गालिब दु:खाशिवाय आपल्या शायरीतून आणखी काय मांडू शकणार होता.
पण, गालिबने शायरीतून जे दुःख मांडले ते विरहाचे होते. प्रेयसीच्या दगाबाजीने दुखावलेला तरी तिच्या विरहात दिवस कंठणाऱ्या प्रियकराचे चित्र तर गालिब नेहमीच रंगवतो, पण त्याच्या शायरीत झळकणारे हे प्रेम नेमके कुणाबद्दल होते हे गुपित मात्र गालिब सोबतच गेले. अखेरपर्यंत गालिबच्या प्रेमाची खरी हकीगत कुणालाही कळू शकली नाही.
गालिब लिहित गेला आणि त्याच्या शायरीतून तो अनाम भावनांना वाट देत गेला. त्याची शायरी ऐकण्यासाठी त्याचे चाहते रात्र रात्र जागून काढीत असत. मुघल दरबारातही त्याच्या शायरीची चर्चा होऊ लागली.
मुघल सम्राट बहाद्दूर शहा जफरलाही शायरीची खूप आवड होती, तो स्वतः शायरी लिहायचा. त्याने गालिबला दरबारात बोलवून घेतले. गालिबचे शेर ऐकून तो गालिबचा चाहता झाला. त्याने गालिबला आपला शायरीतील गुरु मानले. गालिब आता मुघल सम्राट बहाद्दूर शहाजफरला शायरीचे धडे देऊ लागला.
“होगा कोई ऐसा भी जो ग़ालिब को न जाने, शायर तो वो अच्छा है पे बदनाम बहुत है.”
गालिबचे हे वर्णन त्याने स्वतःच केले आहे. गालिब अतिशय बेफिकीर माणूस होता. त्याने आपल्या उदरनिर्वाहासाठी म्हणूनही त्याने कुठे नोकरी केली नाही.
शायरी शिवाय त्याला आणखी दोन गोष्टी प्रिय होत्या . एक म्हणजे दारू आणि दुसरी जुगार. जुगार खेळल्यामुळे गालिबला एकदा अटकसुद्धा झाली होती.
गालिबच्या जीवनाचा आणखी पैलू म्हणजे त्याचा धार्मिक दृष्टीकोन. गालिब मुसलमान होता पण, त्याची दिनचर्या एखाद्या सामान्य मुस्लीम व्यक्तीसारखी अजिबात नव्हती. तो कधीही मस्जिदीत गेला नाही. दिवसातून पाच वेळा नमाज पढली नाही. रोजे सुद्धा ठेवले नाहीत. याचा अर्थ तो नास्तिक होता असे अजिबात नाही. पण, त्याचा या सगळ्या कर्मकांडावर मात्र अजिबात विश्वास नव्हता.
‘शराब पीने दे मस्जिद में बैठ कर, या वो जगह बता दे जहाँ पर ख़ुदा न हो’
या शायरीवरून समजेलच गालिबचा खुदावर किती विश्वास होता.
खूप कमी लोकांना माहिती असेल पण गालिबला आंबे खूप आवडायचे. आंब्याचा सिझन आला की कधी एकदा आंबे मिळतात अशी त्याची गत होई. एकदा त्याचा मित्र आणि तो त्याच्या मित्राच्या शेतात उभे होते. मित्राच्या शेतात भरपूर आंबे आले होते आणि त्याने एके ठिकाणी सगळ्या आंब्याचा ढीग लावला होता. आंब्याच्या ढिगाजवळ उभे राहून ते दोघे बोलत होते इतक्यात एक गाढव तिथे आले आणि आंब्याचा वास घेऊन परत गेले.
गालिबचा मित्र म्हणाला, “बघितलंस गाढवांना पण, आंबे आवडत नाहीत.” यावर हजरजबाबी गालिबने जे जे उत्तर दिले ते ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही, गालिब म्हणाला, “हो हो फक्त गाढवांनाच आंबे आवडत नाहीत.”
गालिब दर्दी शायरच नाही तर, हजरजबाबी विनोदवीर सुद्धा असावा. म्हणून तर स्वतःची बदनामीही तो सहज पचवू शकला.
गालिबचे आयुष्य म्हणजे विरोधाभासाची दोन टोके एकत्र गुंफल्यासारखेच होते जणू. म्हटले तर फकीर, म्हटले तर श्रीमंत, म्हटले तर सुप्रसिद्ध म्हटले तर बदनाम. जीवनाच्या या उलट्यासुलट्या खेळाला तर तो चांगलेच ओळखून होता. म्हणून तर तो म्हणतो,
“हमको मालूम है जन्नत की हकीकत लेकीन, दिल को खुश रखने को गालिब ये ख्याल अच्छा है!”
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.