आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
कोव्हीड-१९च्या पार्श्वभूमीवर या वर्षी देशात मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरु आहे. परंतु, या लॉकडाऊनमुळे आपल्या देशात जी सार्वजनिक उत्सवांची परंपरा आहे तिलाही लगाम बसला आहे. यावर्षी कोणतेच सण-उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करता येण्याची शक्यता कमी आहे.
सध्या श्रावण महिना सुरु आहे. या महिन्यात अनेक सणांची रेलचेल असते. यातही गणेशोत्सव हा सण तर महाराष्ट्राचा प्रमुख सण आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाचा थाट तर काही औरच असतो. त्यातही मुंबईच्या गणेशोत्सवाकडे संपूर्ण राज्याचेच नाही तर देशाचे लक्ष लागून राहिलेले असते.
मुंबईच्या या गणेशोत्सवाची चर्चा जगभर होत असते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या हा गणेशोत्सवाचा थाट काहीसा फिका पडणार आहे.
यावर्षी मुंबईच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आले आहे. त्यामुळे मुंबईच्या गणेशोत्सवाचा झगमगाट यावर्षी काहीसा धूसर असणार आहे. दरवर्षी महिनाभर आधीच गणेश चतुर्थीच्या तयारीसाठी मुंबईतील बाजारपेठा ओसंडून वाहत असतात. सर्वत्र उत्साह, जल्लोष आणि आनंद संचारलेला असतो.
परंतु यावर्षी मात्र काहीसा हा उत्साह मावळला आहे. दरवर्षी ज्या भल्या मोठ्या थाटात, मोठमोठ्या मिरवणुका काढत हा सण साजरा होतो, तो झगझगीत आणि धामधुमीचा माहोल यावर्षी असणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या गणेशोत्सवावर नेमके काय परिणाम होतील हे पाहूया या लेखातून.
२२ ऑगस्टपासून यावर्षी गणेशोत्सवाला सुरुवात होते आहे. पण, यावर्षी गणेशमूर्तींच्या उंचीवरही बंधने घालण्यात आली आहेत. सार्वजनिक मंडळाच्या मुर्त्यांसाठी चार फुट तर घरगुती देखाव्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मुर्त्या या दोन फुटपेक्षा जास्त उंचीच्या नसाव्यात असे निर्देश देण्यात आले आहेत. यावर्षी गणेशमूर्त्यांच्या विसर्जनासाठी ठिकठिकाणी कृत्रिम कुंड उभारले जाणार आहेत.
पूर्वीप्रमाणे विसर्जनासाठी समुद्राकाठी गर्दी झाल्यास यातून कोरोनाच्या संसर्गाचा मोठ्याप्रमाणात उद्रेक होऊ शकतो. हा धोका जाणून काही मंडळे स्वतःहून विसर्जन कुंड्या उभारण्यासाठी पुढाकार घेत आहेत. सरकारी निर्देशानुसार विसर्जनासाठी ५ ते १० पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकत नाहीत.
तसेही कोरोना रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्र आणि त्यातही मुंबई आघाडीवर आहे. मुंबई तर कोरोनाचा हॉटस्पॉट आहे. त्यामुळे यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.
आजपर्यंत मोठमोठ्या आणि भव्य गणेश मुर्त्या हे मुंबईच्या गणेशोत्सवाचे एक खास वैशिष्ट्य होते. पण, या सरकारी नियमामुळे मोठमोठ्या मुर्त्यांवर बंदी घालण्यात आली आहे. शिवाय, पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा एक स्वागतार्ह निर्णय आहे.
गणेशोत्सवासाठी मोठमोठे मंडप उभारणे, तिथे देखावे सादर करणे, मनोरंजनाचे विशेष कार्यक्रम आयोजित करणे, संगीत कार्यक्रम आयोजित करणे असे अनेकविध कार्यक्रम या मंडळाच्या वतीने केले जात असत. पण, यावर्षी अशा कार्यक्रमांचे सादरीकरण करणे अशक्य आहे. मंडळांनीही हा धोका स्वतःहून ओळखला आहे, त्यामुळे अशा देखाव्यांच्या आणि कार्यक्रमांचे नियोजन करण्याच्या उत्साहावरही विरजण पडले आहे.
गणेश मुर्त्यांची भव्यता हा जसा मुंबईच्या गणेशोत्सवातील आकर्षणाचा विषय आहे, तसाच ढोल, ताशांच्या गजरात निघाणाऱ्या भव्य मिरवणुका हा देखील या उत्सवाचे आकर्षण बिंदू आहे. ढोल, तशा वाजवणाऱ्या पथकांची लगबगही महिनाभर आधीपासूनच सुरु असते. ही पथके महिनाभर आधीपासून सराव करत असतात.
कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या मंडळांशी संपर्क सुरु असतो. एकूणच महिनाभरापूर्वीच गणेशोत्सवाची लगबग सुरु असते. गणेशाच्या आगमनाची आतुरता आणि हुरहूर गणेशोत्सवाचा दिवस जवळ येईल तशी वाढत जाते. यावर्षी ही लगबगही नाही आणि पथकांचा तो थाटही दिसणार नाही.
सोशल डिस्टन्सिंगच्या नियमामुळे या पथकांचे सदरीकरणही होणार नाही. शिवाय, कुठल्याही प्रकारे भव्य मिरवणुका तर निघणार नाहीतच. तरीही डॉल्बीचा ठेका मात्र सुरु राहील कारण यावर कोणती बंधने नाहीत.
सगळ्यात मोठी आणि विशेष बाब म्हणजे यावर्षी लालबागचा राजाही मंडपात बसवला जाणार नाही.
मुंबईत सगळ्यात जास्त चर्चा असते ती लालबागच्या राजाची. लालबागचा राजा म्हणजे नवसाला पावणारा गणपती. त्यामुळे या राजाचे दर्शन घेण्यासाठी, नवस बोलण्यासाठी, बोललेले नवस फेडण्यासाठी दूरदुरून लोक येतात. दर्शनासाठी २४ तास रांगेत उभे राहतात. यावर्षी मात्र लालबागच्या दर्शनासाठी लागणाऱ्या या भल्या मोठ्या रांगाही दिसणार नाहीत.
लालबागच्या इतिहासात गेल्या ८६ वर्षात अशी वेळ पहिल्यांदाच आली आहे की, ज्यावर्षी लालबागचा राजा मंडपात स्थानापन्न होणार नाही.
लालबागप्रमाणेच मुंबईतील आणखी काही मोठ्या मंडळांनीही यावर्षी मंडप न उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याऐवजी या मंडळांनी भाविकांसाठी ऑनलाईन दर्शन करण्याची सोय उपलब्ध करून देण्याबद्दल विचार केला आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून भाविक आपल्या लाडक्या गणरायाचे ऑनलाईन दर्शन घेऊ शकतील, अशी माहिती या मंडळांच्या कार्यकर्त्यांनी दिली. यामुळे गर्दीची शक्यता कमी होतील.
तरीही काही भाविक दर्शनासाठी आले तर सावधगिरी म्हणून मंडपाचे दिवसातून चार ते पाच वेळा सॅनिटायझेशन करण्यात येईल. भाविकांचे टेम्परेचर आणि ऑक्सिजन तपासण्याची सोय करण्यात येईल. पण यामुळेही कोरोनाचा धोका पूर्णतः टळणार नाही. म्हणून भाविकांनी दर्शनासाठी घरातून बाहेर न पडता या ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा अशी या कार्यकर्त्यांनी विनंती केली आहे.
सरकारने मात्र भाविकांनी मंडपात जाऊन दर्शन घ्यावे किंवा नाही याबाबत कोणतीही सूचना जाहीर केलेली नाही. गणेशोत्सवावर जे कोरोनाचे सावट आले आहे त्यामुळे काही आर्थिक समीकरणेही कोलमडणार आहेत हे निश्चित.
कोव्हीड-१९मुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेला प्रचंड फटका बसला आहे. या मंदीचे सावट गणेशोत्सवावरही दिसणार आहे. या मंदीमुळे यावर्षी गणेश मंडळांच्या वर्गणीत भरपूर घट झाली आहे. मुंबईचा गणेशोत्सव फक्त वर्गणीवरच चालत नाही तर इथे अनेक राजकीय पक्ष आणि मोठमोठे व्यापारीही गणेश मंडळांचे कार्यक्रम स्पॉन्सर करतात. यावर्षी त्याचे प्रमाणही कमी असेल.
अर्थव्यवस्थेतील मंदी आणि गणेशोत्सवाचा उत्साह कमी होण्याचा सर्वात जास्त फटका बसेल तो मूर्तीकारांना. गणपती आणि दुर्गापूजा हे दोन उत्सव म्हणजे या मूर्तिकारांसाठी सुगीचे दिवस असतात. वर्षभारातून फक्त या दोन सणाला त्यांचा धंदा तेजीत चालतो.
वर्षभर त्याच्या हाताला परत कामही नसते. त्यांची वर्षभराच्या कमाईवरच यामुळे परिणाम होणार आहे. लॉकडाऊनच्या काळात हे कामगारही बहुतेक शहर सोडून आपापल्या गावी गेले आहेत. ही देखील एक समस्या आहेच. लॉकडाऊन आणि कोरोनाने या कामगारांचे जगणेच मुश्कील करून टाकले आहे.
एकूणच यावर्षीचा मुंबईतील गणेशोत्सव काहीसा रुक्ष असणार आहे. झगमगाट, धांगडधिंगा, भव्यता, नसल्याने हा गणेशोत्सव अगदीच साध्यापध्तीने साजरा होईल. तरीही गणेशोत्सवाचा दहा दिवसाच्या काळातील श्रद्धा, भक्ती आणि पवित्रतेने भारलेले वातावरणात मात्र तसेच राहील, हे निश्चित.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.