आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
बाजीराव पेशवे कधीच नाचले नसतील, कदाचित खिलजीही आपल्याला दाखवला तेवढं विद्रूप नसेल पण तरीही आपल्याला बाजीराव-मस्तानी आणि पद्मावतसारखे बायोपिक्स आवडले. कारण ते खऱ्या इतिहासाशी किंवा व्यक्तींशी सुसंगत नसले तरीही रंजक होते आणि योग्य भावना टिपल्यामुळे त्यांना प्रसिद्धीही मिळाली. असंच काहीसं मिल्खा सिंग, एम एस धोनीच्या बाबतीतही झालं.
नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला “गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल” हासुद्धा एक असाच सिनेमा. खरी व्यक्तिरेखा आणि घटना अगदी जशाच्या तशा साकारल्या नसल्या तरी एक भावनिक करणारा, चांगला चित्रपट आपल्या वाट्याला आलाय.
बायोपिक म्हटलं की त्यातली पात्रं खूप हिरोईक असतात, जसं की त्यांना माहीतच असतं की ते यशस्वी होणारच आहेत. गुंजन सक्सेना सिनेमात मात्र इथली सगळी पात्र आणि त्यांच्या प्रतिक्रिया बऱ्यापैकी वास्तववादी दाखविल्या आहेत.
असं असलं तरी सिनेमाची सुरुवात हिरोईक मोमेंटपासून करण्याची हौस (किंवा बॉलिवूडप्रेमी प्रेक्षकांची गरज) निर्मात्यांनी पूर्ण केलेली दिसते. स्लो मोशनमध्ये पळणाऱ्या गुंजनच्या फक्त पायांचा शॉट, मग पाठीमागून एका उंच दरवाज्यातून पळतानाचा वाईड अँगल शॉट, आणि मग फायनली ती हेलिकॉप्टरमध्ये बसल्यावर दिसणारा तिचा चेहरा. लहानपणीपासून तिची उडण्याची महत्वकांक्षा, असा सगळा टिपिकल बॉलीवूडपणा संपला आणि मूळ कथा सुरू झाली की हा सिनेमा बघून चूक केली नाही असं वाटतं.
“गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल” हा सिनेमा अगदी अपेक्षेप्रमाणे गुंजनच्या बालपणीपासून तिचा प्रवास दाखवतो. यात तिची महत्वकांक्षा दिसते आणि फक्त मुलगी असल्यामुळे तिला करावा लागलेला संघर्ष दिसतो. भरतीची प्रक्रिया आणि ट्रेनिंग यातून सेनादलातील निर्विवाद शिस्त आणि कठोरपण दिसतं.
या क्षेत्रातील ग्लॅमर इथे विरुद्ध अर्थाने दाखवलं आहे, त्यामागचा संघर्ष यात उलगडून सांगितला आहे. सिस्टीम महिला विरोधी नाहीये तर त्यातल्या लोकांची मानसिकता कशी यासाठी तयार नाहीये हे लिखाणातून नीट अधिरेखीत केलं आहे.
फक्त पायलट बनण्याचं स्वप्न देशसेवेत कामी येईल का? देशभक्ती म्हणजे नेमकं काय? या खुप मूलभूत प्रश्नांवर लेखकांनी खूप सटल प्रकारे भाष्य केलं आहे. फक्त गुंजनच्या भावाचं पात्र लिहिण्यात आळस केला असं वाटतं.
पंकज त्रिपाठी यांचं निवृत्त सेनाधिकाऱ्याचं पात्रं त्यांच्या रागात, आनंदात, दुःखात सगळीकडे खुप वास्तववादी ठेवलं आहे. हेच पात्र गुंजनच्याला तिच्या अडचणीत सल्ला आणि मदत देत असतं. यामुळं गुंजनच्या आणि अर्थात, सगळ्याच मुलींच्या समस्यांचं प्रॅक्टिकल उत्तर आपल्याला मिळतं.
उरी सिनेमाप्रमाणे इथंही सेनादलातील बारकावे नीट हेरले आहेत, आणि पण नेमकी क्लायमॅक्सला खोट्या वाटणाऱ्या परिस्थितीची किनार आहे. प्रोड्युसरमध्ये जोहरसह अनेक मोठी नावं आहेत, यामुळं प्रत्येकच गोष्ट खुप चकाचक झाली आहे.
पण बजेट मोठं असणं हे खरंतर सिनेमाच्या दर्जाला मारक ठरलं आहे. कारण यातून महागडे सीन्स वाढलेत पण कथेचा मूळ आधार जो मानसिक संघर्ष आहे, तो दाखवणारे सीन्स कमी पडलेत. किंवा यात सिनेमॅटोग्राफरच्या निर्णयांचा भागही असू शकतो.
कारण त्या काळात न्यायला लागणारा मंद प्रकाश न वापरता एकदम स्वच्छ दिवसाच्या उजेडात सिन्स शूट केलेत. काही सीन्समध्ये पारंपरिक पद्धत सोडून प्राईग करायला ही संधी होती, ती न वापरल्यामुळे नुकसान होतं. एडिटरनेसुद्धा तसंच केलं आहे.
गुंजनचा पंजा लढवतानाचा सिन. छोटे कट घेऊन परत परत “अगेन” म्हणणाऱ्या विनीतच्या चेहऱ्यापेक्षा गुंजनचा होणारा अपमान, मग आलेले अश्रू, हे सगळं एकसंध बघता आलं असतं तर हा एक आठवणीत राहणारा सिन होऊ शकला असता.
त्यात ही कथा कारगिल युद्धाच्या वेळची असली तरी फक्त राम लखन, हम आपके है कोन?, सारख्या सिनेमांना डायलॉगमध्ये नमूद करून तो काळ साकारण्याचा फसवा प्रयत्न केलाय असं वाटतं. वेशभूषा, शब्द, यात अजून काम करता आलं असतं.
नेपोटीझमची चर्चा रंगात आलेली असताना जान्हवी कपूरला मुख्य भूमिकेत बघणं जरा खटकतं पण तिच्या चांगल्या अभिनयाने ती सगळी चर्चा विसरायला ती भाग पाडते. तिने पात्रं साकारण्यासाठी केलेली मेहनत दिसते, हेलिकॉप्टर चालविण्यातल्या तांत्रिक बाबी, एअरफोर्स ऑफिसरचं चालणं यातून तिची अभिनय कला दिसून येते.
तिला साथ द्यायला पंकज त्रिपाठीसारखा मुरलेला अभिनेता गुंजनच्या वडिलांच्या भूमिकेत आहे. त्या दोघांना सोबत बघणं छान वाटतं. गुंजनच्या प्रवासात अडथळे निर्माण करणाऱ्या पात्रांची कास्टिंगही छान झाली आहे. पण विनीत कुमार मिश्रा विशेष छाप सोडून जातो. “हम यहा देश की सुरक्षा के लिये है, तुम्हारी नहीं” असे डायलॉग बोलताना त्याने त्या पात्राच्या मनस्थितीचा किती नीट विचार केला असेल हे समजतं.
ही कास्टिंग जशी छान जमली आहे, तेवढाच वाईट गोंधळ गुंजनच्या भावाची कास्टिंग करताना झालाय असं वाटतं. तो जे बोलतोय त्याच्याशी तोच नीट कंव्हीन्स नाहीए असं वाटतं.
2020 च्या ऑगस्ट महिन्यातच सुप्रीम कोर्टाने सेनादलात महिला अधिकाऱ्यांना परमनंट कमिशन देण्याचा निर्णय लागू करण्याचे आदेश दिले.
2003 पासून एका महिला अधिकाऱ्याने यासाठी न्यायालयात लढा दिला होता. म्हणजे आतापर्यंत महिला अधिकाऱ्यांना परमनंट स्थान नव्हतं, म्हणजे पेन्शन पण नाही.
हे सगळं सुकर होण्याच्या खूप आधी वायुसेनेतील महिला पायलटच्या पहिल्याच बॅचच्या गुंजन सक्सेना यांच्यावर ऑगस्टमध्येच सिनेमा येणं हा एक चांगला योगायोग.
जेव्हा ही सिस्टीम महिलांसाठी अजिबात तयार नव्हती तेव्हा गुंजन सक्सेना यांनी कपडे बदलण्यासाठी ट्रायल रूम्सपासून सगळ्या गोष्टींसाठी संघर्ष केला. नेहमी रेबन घातलेले वायुदलातील अधिकारी, उंच बुटांमध्ये रायफल सोबत पाळणारे सैनिक, गाझी सिनेमात दाखवलेत तसे नौदलातील अधिकारी, या सगळ्यांमुळे त्या ग्लॅमरयुक्त फ्रेम्समध्ये आतापर्यंत आपण फक्त पुरुषांनाच बघितल होतं.
आता पहिल्यांदा महिला अधिकाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारा सिनेमा आला आहे. यातून काही तरुणींच्या बेडरूम्समध्ये गुंजन सक्सेना किंवा जानव्ही कपूरचे फोटो दिसले तर खरंच या संघर्षाचा उद्देश पूर्ण झाला असं म्हणता येईल!
या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.